जगात जिथं जिथं संकट येतं, तिथं तिथं बीबीसीची प्रतिनिधी लीस ड्युसेट हजर असते
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • लीस ड्युसेटची दोन छायाचित्रं
  • Wed , 01 September 2021
  • पडघम माध्यमनामा लीस ड्युसेट Lyse Doucet बीबीसी BBC तालिबान Taliban अफगाणिस्तान Afghanistan अमेरिका America

‘‘२० वर्षांपूर्वी अमेरिकेनं अफगाणिस्तानवर चढाई करून तालिबानच्या हातातली सत्ता काबीज केली. आज अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानतून परतत आहे. बलाढ्य अमेरिकेचा आम्ही पराभव केला आहे, असं सांगून तालिबान विजय साजरा करत आहे. आमच्या आजूबाजूला बंदुकीच्या फैरी झाडल्या जात आहेत. म्हणून मी आज हेल्मेट घातलं आहे. अफगाणिस्तानातून सैन्य परत फिरवण्याचं अमेरिकेला दिलेलं आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पूर्ण केलं आहे, पण त्यासाठी जी किंमत चुकवावी लागली, ती भयानक आहे.’’

गडद निळ्या रंगांचा बुरखासदृश पोषाख, आकाशी रंगांची ओढणी आणि हेल्मेट घातलेली लीस ड्युसेट बीबीसी न्यूजवर बोलत असते. तिच्या मागून बंदुकींच्या फैरींचे धडाधड आवाज येत असतात. बातम्या बघताना आपल्या पोटात गोळा येतो, पण ६२ वर्षांच्या लीसच्या आवाजात कोणताही कंप जाणवत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पेटलेला अफगाणिस्तान आणि तिथल्या जनतेच्या करुण कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. या यादवीपासून दूर आपण सुरक्षित आहोत, हा विचार मनाला शिवल्यापासून राहत नाही. पण आज या घोंघावणाऱ्या वादळात शिरून तिथली परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांत लीस ड्युसेट प्रमुख आहे. जगात जिथं जिथं संकट येतं, तिथं तिथं बीबीसीची प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस ड्युसेट हजर असते.

कॅनडात जन्मलेली लीस गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ बीबीसीसाठी बातमीदार म्हणून काम करते. स्टुडियोमध्ये अँकर म्हणून काम करणारे पत्रकार बऱ्याच वेळा स्टुडिओच्या वातावरणात रमतात, पण लीसने अँकरिंग करताना जगातल्या सगळ्यात धगधगणाऱ्या क्षेत्रातून बातम्या देण्याचं काम केलं. स्टुडिओच्या सुरक्षित वातावरणात टेलिप्रॉम्प्टर वाचणाऱ्या अँकर्सपेक्षा हे अगदी वेगळं होतं. आज साठी पार केलेली लीस आपल्या साथीदारांबरोबर मध्यपूर्वेतले देश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या भागातून रिपोर्टिंग करते.

विशेष म्हणजे १९८८-८९च्या दरम्यान काबुलहून रशियन सैन्य माघार घेत असतानाही लीस काबूलहून बीबीसीसाठी रिपोर्टिंग करत होती. आज ३० वर्षांनी त्याच देशातून अमेरिकन सैन्य परतत असतानाही ती तिथं आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी महासत्तांनी ओरबाडलेला हा देश कोणकोणत्या भयानक स्थित्यंतरातून जातोय, याचा इतिहास तिच्यासमोर घडला. त्यानंतर लीस इस्लामाबाद, अफगाणिस्तान आणि इराण इथून पुढे जॉर्डन, जेरुसलेम, ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, सिरिया असं भटकत राहिली. जिथं जिथं उठाव झाले, यादवी माजली, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तिथं तिथं बीबीसीसारख्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या वृत्तवाहिनीची प्रतिनिधी म्हणून वावरली.

२०१०च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक अरब देशांत प्रस्थापित सत्तांच्या विरोधात उठाव झाले, त्यांना ‘अरब स्प्रिंग’ असं म्हटलं जातं. ट्युनिशियामधून सुरू झालेला हा उठावाचा वणवा लीबिया, इजिप्त, येमेन, सिरिया यांसारख्या देशांत पसरला. यापैकी काही देशांमध्ये मुआमार गद्दाफी (लीबिया), होस्नी मुबारक (इजिप्त) सारख्या राष्ट्रप्रमुखांना सत्तेवरून हटवण्यात आलं, इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दंगली आणि हिंसा झाली. या काळात लीस तिथून वार्तांकन करत होती.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हमीद करझाई यांच्या भावावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या वेळी लीस तिथं हजर होती. तिच्याशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय बातमीदाराला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. ज्या कार्यक्रमाच्या वेळी हा हल्ला झाला, त्या वेळी तिने तिच्या प्राणाची पर्वा न करता झालेल्या हल्ल्याचं वार्तांकन केलं होतं.

ती जिथं जाते, तिथं फक्त बातमीदारी करते असं नाही, त्या प्रश्नांचा सखोल शोध घेणारे माहितीपटही बनवते. तिने बनवलेल्या सीरिया, गाझाबद्दलच्या माहितीपटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिच्या माहितीपटांचा फोकस यादवीत अडकलेली लहान मुलं हा असतो. एका मुलाखतीत तिला याबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर तिने स्वतःचा अनुभव सांगितला. ती म्हणाली,

‘‘मी सिरियात बातमीदार म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिथं शांततामय वातावरण होतं. सिरियात त्या काळी प्रामुख्यानं मध्यमवर्गीय होते. हळूहळू हा देश एका कृष्णविवरात ओढला गेला. माझ्या प्रत्येक भेटीत मला सिरियातला हा बदल जाणवत होता. पण यातून मला एक गोष्ट जाणवली की, माझ्याशी बोलण्यासाठी तिथली लहान मुलं पुढे येत होती. त्यांच्या देशात नक्की काय घडतंय, याचं निरीक्षण आणि योग्य शब्दांत वर्णन ही नवी पिढी करत होती. सिरियात जे झालं ते कुठेही, कुणाबरोबरही होऊ नये. पण त्यांच्या शब्दांत त्यांची कहाणी मला सांगायची होती. जेव्हा बीबीसीने मला सिरियाबद्दल माहितीपट बनवायला सांगितला, तेव्हा ठरवलं, मी आई-वडलांच्या नाही, मुलांच्या नजरेतून सीरियाची गोष्ट सांगणार. या मुलांच्या कथनात तिरस्कार आहे, त्यांना झालेल्या यातनांची वर्णनं आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं आणि पर्यायानं सिरियाचं भविष्य आहे.’’

तिच्या सिरियावरच्या या माहितीपटाचं नाव ‘चिल्ड्रन ऑफ सीरिया’ असं आहे. प्रतिष्ठेच्या बाफ्ता पुरस्कारासाठी या माहितीपटाचं नामांकन झालं होतं. याशिवाय लीसला आणि तिने बनवलेल्या माहितीपटांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. साठी पार केलेली व्यक्ती रिटायर होते. त्यात इतक्या तणावांत रिपोर्टिंग केलेल्या लीसने तर निवृत्ती स्वीकारणं नैसर्गिक होतं. पण ही खमकी बाई आजही तितक्याच जोशात काम करत आहे. ती जिथं जाते, तिथल्या लोकांशी फार जवळचे संबंध जोडते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पाश्चिमात्य बातमीदारी ठराविक प्रदेशांत निर्माण होणाऱ्या प्रश्नांना प्रसिद्धी देते आणि बाकी जगात घडणाऱ्या गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करते, असा एक आरोप आहे. पाश्चिमात्य जगाची आपल्याच नजरेनं ठासून सांगण्याची पद्धत आणि स्वकेंद्रित अजेंडा याला कारणीभूत मानला जातो. असं असलं तरी भारतात कोविडमुळे शेकडो जणांचे प्राण जात असताना बातम्यांच्या नावाखाली स्टुडियोमध्ये किळसवाणा आणि ओंगळ आरडाओरडा करणाऱ्या देशी कथित टीव्ही न्यूज रिपोर्टर्सच्या तुलनेत लीसचं काम बघितलं की, असंच म्हणावं लागेल की, टीव्ही पत्रकारिता करायची असेल तर ‘बीबीसी’, ‘अल जझिरा’, ‘सीएनएन’सारख्या वाहिन्यांसाठी काम करण्याची आकांक्षा ठेवा. कोणतीही बातमीदारी निरपेक्ष नसते, हा नियम मानला तरी तिथं निदान बातमीदारी होते, ‘मुजरा’ आणि आरडाओरडा नाही... 

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

भारत या पूर्वीही तालिबानविरोधी उत्तर आघाडीचा प्रमुख समर्थक राहिलेला आहे. आताही तालिबानचा विरोधच केला पाहिजे

खरा मार्ग आणि खरे देशप्रेम हे दोन्ही रविन्द्रनाथांच्या ‘काबुलीवाल्या’चेच असू शकते, आत्ताच्या का‘बुली’(bully)वाल्यांचे नव्हे!

अमेरिकेने अफगाणिस्तानात विकास केला असता अन् अफूला मुळातून संपवले असते, तर अफगाणिस्तानच्या अन् जगाच्या वाट्याला हे भयानक दिवस आले नसते

तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि भारत… एक धावता दृष्टीक्षेप  

‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे

..................................................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhalwankarb@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......