पंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • पंकजा मुंडे
  • Sat , 24 July 2021
  • पडघम राज्यकारण पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे भाजप देवेंद्र फडणवीस

लोकसभेची सदस्य असलेल्या, सख्खी बहीण प्रीतम यांना नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे बऱ्याच अस्वस्थ आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर दिल्लीहून मुंबईला परतल्यावर केलेल्या भाषणात आणि ‘दिव्य मराठी’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अस्वस्थता, रोष आणि संभाव्य बंडखोरीही मोठ्या चतुराईनं व्यक्त केलेली आहे. पंकजा या काही भाजपच्या साध्या नेत्या नाहीत. त्या तीन वेळा विधानसभेच्या सदस्या होत्या. एक पूर्ण टर्म कॅबिनेट मंत्री होत्या. पक्षाच्या राज्यातल्या सुकाणू (कोअर) समिती तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि त्यांच्याकडे मध्य प्रदेश या एका महत्त्वाच्या राज्याचं प्रभारीपदही आहे.

याचा अर्थ राजकारणाच्या क्षितिजावर दीर्घ काळ राहण्याची संधी पंकजा यांना आहे. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे, त्या भाजपचे दिग्गज नेते, ज्यांनी महाराष्ट्रात पक्ष रुजवला, फुलवला आणि सत्तेच्या सोपानावर नेऊन बसवला असं समजलं जातं, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा कन्या आहेत. मात्र, ही अस्वस्थता म्हणा की, रोष व्यक्त करताना म्हणा की, संभाव्य बंडखोरीचे संकेत देताना, हे का घडलं, याच्या मुळाशी त्या जात नाहीयेत, ही खरी मेख आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई, संचित आणि राजकीय भांडवल महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या विशाल वटवृक्षासारखं पसरलेलं आहे. त्यांच्या नावाची मोहिनी अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे आणि भविष्यातही ती असेलच. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गोपीनाथ मुंडे यांनी शून्यातून राजकारणाला सुरुवात केली. प्रचंड मेहनत घेत त्यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि निवडणुकीतील विजय समीप आणून ठेवला. त्यासाठी तब्बल तीन वेळा वणवण फिरत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला. राज्यातल्या प्रत्येक गाव-तांडा-वाडीपर्यंत संपर्क प्रस्थापित केला, कार्यकर्त्यांचं घट्ट जाळं विणलं हे लक्षात घ्यायला हवं.  

मात्र, एक निसर्गनियम पंकजा यांनी लक्षात घेतलेला नाही आणि तो म्हणजे, विशाल वृक्षाच्या सावलीतील झाडं मोठी होत नाहीत; मनाप्रमाणे बहरतही नाहीत. मोठं होण्यासाठी, बहरण्यासाठी स्वत:चं जे कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, ते करण्यासाठी त्या छोट्या झाडाला यश येत नाही. अगदी तसंच पंकजा यांच्याबाबतीत झालं आहे.

मुद्दा स्पष्ट करून सांगायचा  तर, गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याई/भांडवलाच्या बाहेर जाऊन त्यांच्या परळी या विधानसभा मतदारसंघात तरी पुरेसा राजकीय प्रभाव पंकजा निर्माण करू शकल्या आहेत का, हे शोधायला हवं.

पंकजा यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. २००९मध्ये त्यांना सुमारे ९७ हजार मते मिळाली आणि त्या सुमारे ३६ हजारांचं मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानभुतीची लाट असूनही २०१४च्या निवडणुकीत पंकजा यांच्या विजयाचं मताधिक्य २६ हजारांवर आलं. २०१९च्या निवडणुकीत त्यांच्या मतांत सुमारे पाच हजारांनी घट झाली आणि त्यांचा सुमारे ३१ हजार मतांनी पराभव झाला. असं का घडलं आणि ते यापुढे घडू नये यासाठी खरं तर नियोजन करण्याऐवजी पुन्हा पंकजा भावनेच्या आहारी गेल्या. धनंजय मुंडे यांनी छत्तीस हजारांचं मताधिक्य तोडून त्यांचं स्वत:चं विजयी मताधिक्य मधल्या काळात प्रस्थापित केलं. हे का घडलं, हे पंकजा यांनी शोधण्याचा प्रयत्न करायला हवा होता.

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर सैरभैर झालेल्या त्यांच्या अनुयायांना शोकावेगातून बाहेर काढून पक्षाच्या यशाच्या मार्गावर चालण्यासाठी उद्युक्त करण्याची किमया करताना पंकजा यांनी दाखवलेला संयम विलक्षण आणि वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जिद्द, दृढ असल्याचं संघर्ष यात्रेच्या काळात दिसलं होतं. पण, अजूनही त्याच ‘इमोशनल ट्रॅप’मधे पंकजा अडकलेल्या आहेत. म्हणून सत्तेत असूनही ना त्या मराठवाड्याच्या नेत्या झाल्या, ना त्यांच्या नेतृत्वाची बीजं, या काळात राज्यभर अंकुरली गेली.

पंकजा यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर महाराष्ट्र आणि मराठवाडा तर सोडाच परळी विधानसभा मतदारसंघातील तरी गाव न् गाव पिंजून काढत मतदारांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केल्याचं अजून तरी दिसलेलं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करताना पारंपरिक मतदारांसोबतच समाजातील बहुजन, दलित आणि अल्पसंख्याकांनाही सोबत घेतलं. समाजातले सत्तेपासून कायमच वंचित राहिलेले असे विविध गट एकत्र करून पक्षाचा तोंडवळा बदलवून टाकण्यात त्यांना जे यश लाभलं आणि पक्ष विस्तारत गेला व त्यांचंही नेतृत्व उजळत गेलं. पंकजा मात्र एका विशिष्ट जातीच्याच कळपात तर अडकून पडल्या नाहीत ना? असा प्रश्न सहाजिकच त्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत.

त्या नाव न घेता ज्यांचा उल्लेख ‘कौरव’ असा करतात त्यांच्या (पक्षी : देवेंद्र फडणवीस) नेतृत्वाभोवती पक्षातले केवळ ब्राह्मणच नव्हे तर बहुजन, मागासवर्गीय आणि मराठा नेत्यांचा गोतावळा जमलेला आहे. (२०१९च्या  विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयी १०५पैकी तब्बल ३७ उमेदवार बहुजन, ३५ मराठा, १८ एससी/एसटी आणि  केवळ ७ ब्राह्मण तसंच अन्य उच्चवर्णीय आहेत!)  आणि या गोतावळ्याची मोट या कथित ‘कौरवा’ने अशी काही घट्ट बांधली आहे की, भारतीय जनता पक्ष विधानसभेतला सर्वांत मोठा पक्ष बनलेला आहे.

गोपीनाथ मुंडे अगदी शेवटपर्यंत मी भाजपचा ‘कार्यकर्ता’ आहे असं म्हणत असत. पंकजा मात्र स्वत:चा उल्लेख ‘नेता’ असा करतात आणि स्वत:ला ‘नेता’च म्हणवून घेतात. कार्यकर्त्यांची ‘आई’ असाही स्वत:चा उल्लेख त्या करतात. भाषणातही त्या ‘मी’, ‘माझं’, ‘मला’ आणि ‘मुंडेसाहेबांची पुण्याई’ या पलीकडे फारशा जात नाहीत. कष्ट करून कर्तृत्व गाजवून जो नेता होतो, त्याच्या नेतृत्वाची मोहिनी गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी विरोधकावरही दीर्घ काळ राहते.

ज्यांचा उल्लेख पंकजा ‘कौरव’ असा करतात, ते राज्यभर सतत पक्षासाठी वणवण फिरतात आणि पंकजा मात्र परळी विधानसभा मतदारसंघासाठीही आठवड्यातले चार दिवस देत नाहीत. हे वास्तव केवळ भाजपच्याच नाही तर सत्ताधारी पक्षाच्याही लक्षात आलेलं आहे. मतदारांनी आपल्याला का नाकारलं, याचा आत्मशोध घेण्याऐवजी पंकजा स्वप्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारख्या वागतात, हे विसरता येणार नाही आणि ते पक्षातल्याही नेते व कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही हेही तेवढचं खरं.

राजकारण- मग ते कोणत्याही पक्षाचे असो प्रत्येकाला एक ‘गॉडफादर’ वरिष्ठ स्तरावर निर्माण करावा लागतो. गोपीनाथ मुंडे यांचं कर्तृत्वचं असं होतं की, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन यांच्यासारखे गॉडफादर कायम गोपीनाथरावांच्या पाठीशी होते. स्वकर्तृत्वाने असा एखादा गॉडफादर जर दिल्लीत निर्माण केला असता आणि महाराष्ट्रभर नेते, कार्यकर्त्यांचं मोहोळ स्वत:भोवती निर्माण केलं असतं, तर आज असं पक्षात एकटं पडण्याची आणि ‘मला कुणी संपवू शकत नाही’ असं अरण्यरुदन करण्याची वेळ पंकजा यांच्यावर आली नसती.

‘पक्षाच्या संदर्भात मी कोणतीही नाराजी किंवा अस्वस्थता व्यक्त केलेली नाही, बंडखोरीचे संकेत दिलेले नाहीत’ असं पंकजा नक्कीच म्हणू शकतात, म्हणाल्याही आहेत. कारण त्यांचं भाषण हा चतुर राजकीय वक्तृत्वाचा अप्रतिम नमुना आहे. ‘ही नाराजी ही अस्वस्थता कार्यकर्त्यांची आहे’, असं पंकजा जेव्हा म्हणतात, तेव्हा कार्यकर्त्यांकडून ‘हे’ वदवून घेण्यासाठी काय करावं लागतं, हे राजकारणात आणि राजकारणाच्या परिघात वावरणाऱ्या सर्वांना ठाऊक आहे, यांचा विसर त्यांना पडावा हे आश्चर्यच आहे.

पंकजा पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, म्हणजे राष्ट्रीय नेत्या आहेत आणि नाराजी/अस्वस्थतेचं  कारण असलेला मंत्रीमंडळ दिल्लीत झाला आहे, म्हणून त्यांना हे शक्तिप्रदर्शन मुंबईऐवजी दिल्लीत घडवून आणता आलं असतं. मुंबईत कार्यकर्त्यांनी काढलेला नाराजीचा सूर आणि दिलेल्या घोषणांचे आवाज दिल्लीतच उमटायला हवे होते!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अगदी खरं सांगायचं तर, पंकजा यांनी जरी संभाव्य बंडखोरीचे संकेत दिले असले, अस्वस्थता व्यक्त केली असली तरी अन्य राजकीय पर्यायही त्यांच्यासमोर फारसे नाहीत. धनंजय मुंडे असल्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाऊ शकत नाहीत. काँग्रेस पक्ष प्रभावशून्य झाला आहे आणि त्या पक्षात त्यांना स्थान नाही. मनसेच्या बाबतीत सांगायचं तर ‘नेता कोण?’ या एका मुद्द्यावर एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.

राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा. मात्र सर्व बाजूने कोंडीत सापडलेल्या वाघाला शिवसेना आपल्या कळपात सामील करून घेईल की नाही, याची शक्यता कमीच आहे. इथे ‘शक्यता कमी’ असा शब्दप्रयोग केला आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या अटीतटीवर प्रवेशही मिळू शकतो, असा घेता येईल!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......