‘पावसातला सह्याद्री’ आणि निसरड्या वाटेवरच्या नोंदी…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जयदेव डोळे
  • ‘पावसातला सह्यादी शरद पवार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस पावसातला सह्यादी शरद पवार Pavsatala Sahyadri Sharad Pawar शरद पवार Sharad Pawar

भारतीय राजकारणी एक तर आत्मचरित्र लिहीत नाहीत वा कुणा लेखकाला हाताशी धरून आत्मकथनही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आणि त्यांच्या राजकारणात लपाछपी खूप असल्याचा संशय अनेकांना येतो. अशा संशयी वातावरणात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद बळकावताच स्वतःची एकांगी, एकतर्फी कौतुके भरपूर छापून घेतली. कॉमिक्स काय, कविता काय अन चरित्रे काय! आज मोदी पुस्तकरूपाने प्रत्येक दुकानात उपलब्ध असतात. ते प्रचंड आत्मलुब्ध, बढाईखोर आणि सत्याला चकवा देणारे आहेत. त्यांच्याभोवती भाट आणि स्तुतिपाठक हेच जमतात. त्यांना स्वतःलाही अशी माणसे विशेष आवडतात. त्यातच गेली सात वर्षे अवघी प्रसारमाध्यमे आपल्या मांडीखाली दाबून त्यांच्याकडून हे पंतप्रधान सपशेल गोडवे गाऊन घेतात. त्यामुळे भारताचा राजकीय इतिहास पडताळताना मोदी इतक्यांदा समोर येत राहतील की, ते कुणी थोर, महान वा अजेय पुढारी होते, असे कुणालाही वाटेल. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नावावर ना काही सेवा, संस्था वा विकास. पंतप्रधान झाल्यावर तर गुजरातेत मुख्यमंत्री म्हणून जे करून ठेवले ते पोकळ व दिखाऊ असल्याचे दिसू लागले. मूळचे प्रचारकच मोदी, तेवढे कार्य मात्र त्यांना अजूनही उत्तम जमते!

भाजपच्या बव्हंश नेत्यांचे असेच आहे. मुळात रा.स्व.संघ काही उभारण्याच्या किंवा विकास अथवा सुधारणा यांच्या कार्यासाठी जन्माला आला नाही. त्यामुळे भाजपचे सारे राजकारण काँग्रेस व अन्य पक्षांची नक्कल करण्यात संपते. नोकरशाही, पक्षांतर करणारे कार्यकर्ते आणि दडपशाही, ही त्यांची अवजारे. ते जे करतील ते सारे भाजपच्या नावावर जमा होत जाते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची अशी स्थिती नाही. स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, भाषावार प्रांतरचनेची आंदोलने, समाजवाद-समता-न्याय यांचा प्रभाव आणि धर्मनिरपेक्ष वर्तन, यांमुळे या पक्षांचे नेते व कार्यकर्ते संस्थात्मक आणि विकासात्मक अशा विधायक राजकारणावर आपले स्थान उभे करतात. ते भक्कम टिकाऊ असतेच. खेरीज ते सहिष्णू, समजूतदार, संतुलित असते. लोकांना जबाबदार असते. म्हणूनच शरद पवारांना ‘लोक माझे सांगाती’ असे सांगताना आनंद व अभिमान वाटतो. लोकही या नेत्याबद्दल आपली भलीबुरी मते मांडताना सावध असतात. भक्तांसारखे एकदम तुटून पडत नाहीत की, बचावासाठी खोटे बोलतील.

पण जवळपास प्रत्येक नेत्याविषयी काही मिथके जमा होतात. बुवा आणि महाराज यांचे प्रस्थ व धंदा अशा मिथकांवर, चमत्कारांवर, तथाकथित साक्षात्कारांवर वधारतात. लोकशाहीला धर्मराष्ट्राचा पर्याय द्यायचा असल्याने खुद्द मोदी व संघ परिवार मिथकांवर फार जोर देतात. इतिहास, वास्तव याऐवजी दंतकथा, मिथ्यकथा, प्रवाद यांची गुंफण करून हे लोक हव्या त्या व्यक्तीला मोठेपण बहाल करतात. खोटारडेपणा त्यांचे व्यक्तिमहात्म्य रंगवत राहतो. मोदी अशाच मार्गाने एक मिथक बनू पाहत आहेत. योगी आदित्यनाथही त्याच वाटेवर आहेत. लोकशाही प्रजासत्ताक ऐकीव अन बनावट कार्यकर्तृत्वावर फार काळ तग धरत नाही. तिथे लोकांशी रोकडा, थेट संबंध असतो. हा/ही मी, हे माझे काम अशा रोखठोक बोलीवर लोकशाही चालते; चाललीही पाहिजे. बोलणे व पडताळा बरोबरीने चालत लोकांपर्यंत जायला हवेत.

साधारणपणे भाट, खुशामतखोर, चापलूस मंडळी सत्ताधाऱ्यांचे कोणतेही काम, स्वभाव, निर्णय, बोलणे, अशा काही गोष्टी मिथकात बदलवून लोकांवर प्रभाव टाकत असते. बऱ्याचदा चतुर नेते अशी कृत्ये वा स्वभावदर्शन मुद्दाम करून त्याचे मिथक तयार करतात. बनेलपणा खूपदा मिथकांच्या तळाशी असतो. हिशोबी आणि संस्मरणीय घटनांवरून नेते त्यांना हवी ती प्रतिमा घडवतात.

शरद पवार अशा प्रतिमांपासून दूर असत. कारण यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची कारकीर्द मिथकांविना संपून गेली. त्यांनी प्रसारमाध्यमेही फार वापरली नाहीत. यशवंतराव मूळचे मार्क्सवादी. त्यांनी त्यांचे राजकारण अमानवी, चमत्कारी वा तीर्थप्रसादाचे कधी केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र वाह्यात अन बनावट पुढाऱ्यांपासून बचावला. पवारही धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा जपणारे. त्यांच्याही प्रतिमा, दंतकथा, आख्यायिका बनल्या नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या सभेत पवारांनी सरंजामशाहीला पायउतार केले, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. यशवंतराव कोल्हापूर-सातारा-नागपूर येथील सरंजामदारांना कधीही जवळ करत नसत. अगदी गरीब, सामान्य घरांतील कार्यकर्ते यशवंतरावांनी राजकारणात आणले. काँग्रेसची समाजवादी, गरीबनिष्ठ ओळख टिकवून ठेवली. वारशापेक्षा विचार अन गादीपेक्षा खादी त्यांनी प्रत्येकांत बघितली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भर पावसात पवार उभे राहिले. भिजत भिजत बोलले. त्यांचे वय, प्रकृती, वेळ, तडफ यांचा परिणाम झालाच. पण त्याहीपेक्षा आपल्याकडून एका सरंजामदाराला उमेदवारी दिल्याचा पश्चात्ताप त्यांनी व्यक्त केला. आपला पक्ष आधुनिकता व पुरोगामित्व यांच्या मार्गावर अडखळला व राजेशाहीकडे वळला याबद्दलची चूक त्यांना पटली. ऐन प्रचारात असे कोणी बोलत नसते. पवार बोलले. अगदी खरे बोलले. एका बेजबाबदार, बेभरवशाच्या माणसाला त्यांनी मते देऊ नये, असे सांगितले.

सातारच्या त्या सभेवर ‘पावसातला सह्याद्री शरद पवार’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. तो पवारांचे एक मिथक तयार करणारा आहे. त्या सभेने महाराष्ट्राची निवडणूक (विधानसभा २०१९) कशी फिरली अन पवारांनी कशी एकहाती जीत मिळवली, याविषयी काही मराठी पत्रकारांनी फेसबुक आदी मंचांवर जे लिहिले त्याचे हे संकलन होय. मराठी पत्रकार आपापल्या पत्रांत तसे कधी कोणाचे मिथक रचत नसतात. मात्र फेसबुकादी मंचांवरचे अनिर्बंध अन बेताल स्वातंत्र्य त्यांना फार मोहवते असे दिसते. मिथक निर्मितीमागे पत्रकार नसले पाहिजे. पत्रकार एखाद्या ललित लेखकाप्रमाणे लिहू लागले की, अडचण होते. प्रसंग खरा, अनुभवही सच्चा, पण लिखाणाचा उद्देश आख्यायिका अथवा मिथक तयार करायला होतो आहे, हे जरा विसंगतच.

त्यातच बहुसंख्य पत्रकार संघाशी फटकून वागणारे. संघाचे टीकाकार. त्यामुळे खोटा इतिहास, बनाव मिथक आदी तयार करण्यात नापास. तरीही एका पावसाळी सभेचा प्रसंग निवडून अवघ्या महाराष्ट्राचे सत्तेचे राजकारण कसे फिरले, याची साऱ्यांनी घेतलेली दखल मनोरंजक आहे. खुद्द पवारांचेही चांगले रंजन झाले असेल!

‘गोदी मीडिया’ देशाची इतकी हानी करतो आहे की, ती येत्या ५० वर्षांतही भरून येणार नाही. त्याने विरोधकांना अदृश्य केलेले. मोदी सरकार, भाजप व संघपरिवार यांचे दडवलेले वास्तव... प्रत्येकाने शरणागत आणि हतबल झाल्याखेरीज (केंद्रातली सत्ता) जिणे सहज करणार नाही, अशा हवा केलेली. त्यामुळे देशावर कोणी अजेय व अभेद्य राज्य करतो आहे, अशी खात्रीच पटलेली. तेवढ्यात सातारी जर्दा तळहातावर आला अन त्याने पाऊस, सत्ताधारी, सरंजामदार यांची मुजोरी दाढेखाली सारून एक पिचकारी मारली. भयंकर खोटारड्यांची सत्ता असह्य झाल्याचे अनेकांना जाणवत होते.

पवारांना ती जाणीव तीव्रतेने झाली. चिकाटी, आशावाद, प्रयत्नवाद त्यांनी सोडला नाही. नेता असाच असतो. मोदी नेता नाहीत, कधीही नव्हते. त्यांनी सर्वत्र ‘पॅराशूट लँडिंग’ केलेले आहे. सत्ताकेंद्रे चलाखीने वापरून त्यांनी जरब बसवलेली आहे. त्यांना ‘हांजी, हांजी’ आवडते. तसे पवारांचे नाही.

या संग्रहात त्यांना प्रतिकूल असाही मजकूर त्यांचे कौतुक करता करता लिहिलेला आहे. श्रीरंजन आवटे हा तरुण विश्लेषक लिहितो, “बाबासाहेबांच्या नावाचे समर्थन केले म्हणून त्यांना थेट प्रतिगामी म्हणता येत नाही. हमीद दलवाईंना पाठिंबा दिला म्हणून बावनकशी पुरोगामी म्हणता येत नाही. पुरोगामी, प्रतिगामी, उजवे-डावे अशा कप्प्यांत पवारांना बंद करता येत नाही. व्यवहारी, मुरब्बी पद्धतीने पण शक्य तितक्या प्रागतिकतेसह पुढे जाणारे राजकारणी म्हणून मला शरद पवारांचे नेतृत्व मोलाचे वाटते.”

‘महाराष्ट्र टाइम्स’ला न पचलेले पुरोगामी पत्रकार विजय चोरमारे सांगतात, “साताऱ्यात पाऊस सुरू झाल्यावर ना लोक विचलित झाले, ना नेते मंडळी. कदाचित सगळ्यांनाच या म्हाताऱ्याची जादू ठाऊक असावी. हा म्हातारा काहीही करामत करू शकतो, असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट घडली तरी त्याला शरद पवार जबाबदार आहेत, असं म्हणण्याची पद्धत रूढ झाली होती. पंचवीस वर्षांपूर्वी अनेक आरोपांतून तावूनसुलाखून निघाल्यानंतर ‘किल्लारीचा भूकंप मी घडवला, एवढाच आरोप माझ्यावर व्हायचा राहिलाय’, असं शरद पवार जाहीरपणे म्हणायचे. असा शक्तिमान माणूस आपल्या शक्तीनं पाऊस थांबवू शकतो, असं व्यासपीठावरच्या कुणाला वाटलं असल्यास नवल नाही. म्हातारा पाऊस थांबवू शकत नव्हता, परंतु पाऊसही म्हाताऱ्याला थांबवू शकला नाही, विचलित करू शकला नाही… साताऱ्याची ही सभा म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीतलं सर्वोच्च शिखर होतं… जेव्हा सगळं संपलंय असं वाटायला लागतं, तेव्हा स्वत:ला शरद पवार समजून मैदानात उतरा, हा प्रेरणामंत्र महाराष्ट्राला दिला.”

अशाच थाटाचे लेख या संग्रहात आहेत. ते लिहिताना पवारांची दुसरी बाजू दाखवायचे अस्फुट प्रयत्न त्यात आहेत. असे लिखाण मोदींना त्यांच्याविषयी मुळीच खपले नसते. कारण त्यांची संघाच्या साच्यातली घडण! तो साचा अत्यंत अरुंद, चिंचोळा व हवाबंद आहे. पवार महाराष्ट्राच्या सुधारकी-क्रांतिकारक-मवाळ असा संमिश्र हवेचे अपत्य आहेत. काही लेखकांनी त्यांना कशी मिथकीय विशेषणे दिली आहेत ते पहा – ‘वास्तवातला सुपरमॅन’ (उदय मोहिते), ‘छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणारा कुटुंबप्रमुख’ (अश्विनी सातव-डोके), ‘द ग्रेट पॉलिटिकल वॉरियर’ (मोहन म्हसकर-पाटील), ‘असा राजयोद्धा होण नाही’ (हरिश केंची), ‘बाजीगर ओ बाजीगर’ (विजयकुमार स्वामी)!

अमेय तिरोडकर, वसंत भोसले, ज्ञानेश महाराव या तिघांचे लेख राजकारण, व्यक्तित्व, अंत:प्रवाह अशा वेढ्यांतून पवारांचे यश उत्तम टिपतात. त्याने आपली राजकीय समज वाढते. प्रवीण बर्दापूरकर यांनीही ‘जोर का झटका धीसे से लगे’ असे म्हणत पवारांचे यथार्थ वर्णन केले आहे. सुप्रिया सुळे यांचा ‘माझे लढवय्ये बाबा’ असा चांगला आत्मकथनात्मक लेख आहे. एक पिता त्याच्या प्रिय कन्येला कसा दिसतो, हे त्यातून आपण जाणतो.

आवर्जून मुलीला राजकारणात प्रस्थापित करणारा हा पिता काँग्रेसच्या महाराष्ट्रीय राजकारणात फार दुर्मीळ. एरवी बहुतांश स्त्रियांना गौशात ढकलणारे, नाही तर त्यांच्या नावाने आपलेच घोडे दामटवणारेच.... समाजवादी, साम्यवादी, शेकाप, रिपब्लिकन या पक्षांत तरी वेगळे काय घडले?

तरुण पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ यांची या संग्रहामागची धडपड आणि संपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांची जुळवाजुळव आणि कल्पकता पानोपानी आढळते. असा संग्रह सचित्र, रंगीत आणि आकर्षक असावा लागतो, तसा तो झाला आहे. मिथक रचताना ते टिकेल असे रचावे लागते. एका प्रसंगाने कलाटणी मिळालेल्या अशा पुस्तकाची इतिहास दखल घेत असतो. पण का काही अभ्यास अथवा संशोधनात्मक आढावा नव्हे. हा काही इतिहास नाही. कारण त्यात तपशील, बारकावे, माहिती, नोंदी नाहीत. आहेत त्या उत्स्फूर्त, आनंदी, भावनिक प्रतिक्रिया. मराठी मनाच्या त्या असल्याने त्या सतर्क आणि ठामपणे मांडल्या गेलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हजारो डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेल्या एका घटनेच्या अनुषंगाने एका राजकीय नेतृत्वाचे महत्त्व आणखी पक्के करण्याचा हा प्रयत्न खोट्या, बनावट प्रसंगातून मिथके रचणाऱ्या संघपरिवाराशी पूर्णपणे पंगा घेतो.

महाराष्ट्र व बंगाल हेच दोन प्रांत देशाच्या राजकारणाला कलाटणी देतात, हे आपण गेल्या दीडर्शे वर्षांत पाहिलं आहे. त्याचाच हे पुस्तक एक भाग आहे. (बंगालीत आता ‘प्लास्टरच्या पायाची लाथ’ असे पुस्तक आले की झालेच तसे!)

‘पावसातला सह्यादी शरद पवार’ : संपादन – चन्नवीर भद्रेश्वरमठ

प्रकाशक – सतीश दत्तात्रय पवार, पुणे

पाने – १९२, मूल्य – ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......