खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 June 2021
  • पडघम सांस्कृतिक खाद्यसंस्कृती Food Culture वशट मासे Fish मटण Mutton

शाळेत असताना वडील मला अनेकदा आमच्या दुकानाशेजारी असलेल्या ‘समाधान’ हॉटेलात घेऊन जात असत. तिथं आम्ही सकाळी बटाटावडा, पुरी-भाजी किंवा संध्याकाळी घावन खात असू. त्या हॉटेलचा तो गोलाकार गरमागरम बटाटावडा, लाल रंगाचा रस्सा, त्यावर बारीक चिरून टाकलेला कांदा आणि शेजारी लिंबूची कापलेली एक फोड. साधारणतः एका वेळी ताटात दोन बटाटेवडे असायचे आणि गिऱ्हाईकाने न मागता दुसऱ्यांदा रस्सा वाढण्याचा शिरस्ता असायचा. रस्स्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी काही जण बटाटेभजेही खात असत. घराबाहेरच्या खाद्यसंस्कृतीची मला झालेली ही पहिली ओळख. आजही त्या बटाटावड्याची आणि चमचमीत रश्श्याची चव माझ्या तोंडात रेंगाळत असते.

श्रीरामपुरातली सोमैया हायस्कूलशेजारची आमची बोरावके चाळ मिश्र जातीधर्मांची होती. तिच्या एका टोकाला बैठी पाच-सहा घरे होती. तिथले भाडेकरू ब्राह्मण, मारवाडी, माळी आणि एक मुसलमान कुटुंब होते (पेशाने तांबोळी असलेले). चाळीच्या मध्ये एकमजली इमारतीत स्वतः चाळमालक बोरावके, माळी, मारवाडी आणि गुजराती घरे होती. चाळीच्या दुसऱ्या टोकाला कुडाच्या असलेल्या चार घरांत दोन मुसलमान, एक मराठा आणि आमचे ख्रिस्ती कुटुंब होते. या चाळीच्या समोरच्या बाजूला स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कुडाच्या घरांत पिठाची गिरणी चालवणारे एक मुसलमान कुटुंब, चार माळी कुटुंबे, एक गवळी आणि सुकी मासळी विकणारे एक कोमटी कुटुंब राहायचे.

वेगवेगळ्या जातीधर्मांच्या, सामाजिक-आर्थिक स्तर भिन्न असलेल्या या कुटुंबांची खाद्यसंस्कृतीही पूर्ण वेगळी होती, हे सांगायला नकोच. आमच्या एका बाजूचे आणि समोरचे शेजारी मुसलमान होते, बाकीचे शेजारी माळी आणि मराठा असल्याने आसपासची सर्वच घरे तशी मांसाहारी होती.

समोरच्या चव्हाण नावाच्या माळी घरात आणि आमच्या घरात कालवणाची, सुक्या भाज्यांची दुपारी आणि रात्री देवाणघेवाण चालू असायची. रविवारी, बुधवारी आणि शनिवारी ही देवाणघेवाण ठप्प व्हायची. कारण या दिवशी आमच्याकडे ‘मटण’ असायचे. (ग्रामीण भागात ‘मटण’ ही संज्ञा सर्वसामान्य नाम म्हणून वापरली जाते, जसे कोंबडीचे मटण, बकरीचे मटण इत्यादी.) “ख्रिस्ती लोक एक वेळ रविवारी चर्चमध्ये मिस्साला जाण्याचे टाळतील, मात्र त्या दिवशी त्यांच्या घरी मटणाचा बेत  कधीही चुकणार नाही’’, अशी एक जुनी म्हण आहे. 

तर या दिवसांत आमच्या घरात काय शिजत असायचे, हे शेजाऱ्यापाजाऱ्यांना माहीत असायचे, मात्र त्याबद्दल कधीही नाराजी किंवा नापसंती व्यक्त होत नसायची.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दिवाळीला समोरच्या आणि बाजूंच्या माळी-मराठ्यांच्या घरांतून आमच्याकडे आणि शेजारच्या मुसलमानांच्या घरी फराळाच्या पराती यायच्या. नाताळाला आमच्याकडून सगळ्या शेजाऱ्यांना गोड फराळ जायचा आणि रमझान ईदच्या दिवशी आम्हां सर्व शेजाऱ्यांकडे त्या तीन मुसलमान घरांतून शीर-कुर्म्याची भांडी पोहोचती व्हायची. त्या घरांत लग्न वा दुसऱ्या काही निमित्ताने जेवण दिले जायचे, तेव्हा बिर्याणी किंवा लाल रश्शाचे चमचमीत मटण कालवण चाखायला आसपासच्या घरांतली कितीतरी माणसे यायची. ‘मटण खावे तर मुसलमानांच्या हातचे’ असा कौतुकाचा बोलबाला असायचा. इतरांची आगळीवेगळी खाद्यसंस्कृती स्वीकारून सहजीवनाची ती पद्धत आजही कायम आहे. 

नगरपालिकेच्या खटोड शाळेत मी सहावीत असताना बळीराम नेरे हा माझा क्लासमेट माझ्या घरी राहायला आला. तो मराठा होता. त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई एका खेड्यात सरकारी नोकरीत होती. तो घरात आल्यापासून ‘त्या’ तीन दिवशी त्याच्यासाठी वेगळे कालवण किंवा भाजी होऊ लागली. त्याच्याबरोबर माझीही त्या मटणाच्या कालवणावरची वासना उडाली. वर्षभराने तो आपल्या आईकडे राहायला गेला, तरी नंतर माझ्यासाठी ‘त्या’ ठराविक दिवशी दाळ किंवा काहीतरी खळगुट करावे लागायचे, ते अगदी मी दहावीनंतर घर सोडेपर्यंत. (या परिसरात शाकाहारी लोकांना ‘खळगुठे’ असेही म्हटले जायचे!) 

मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या मामाच्या गावी घोगरगावला एकदा मामेभाऊ शाहूबरोबर गेलो होतो. श्रीरामपूर तालुक्यात मुठेवाडगाव येथे उन्हाळ्यात पार कोरडी असलेली गोदावरी ओलांडून पार करून आम्ही दोघे भामाठाणला पोहोचलो. चालतचालत संध्याकाळी ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्तीवर गेलो. शेतावरची कामे आटोपल्यावर शाहूची थोरली बहीण, मालनबाई तिथे आपल्या नवऱ्या-मुलासह ऊसतोडणीच्या कामाला आपल्या बैलगाडीसह आली होती. त्या वस्तीवर सगळीकडे ऊसाच्या लांबलांब वाड्यांनी बांधलेल्या खोपट्या होत्या. त्यात थोड्याशा सामानासाठी, काही भांड्यांसाठी आणि इनमिन दोनतीन जणांना बसण्यासाठी जागा होती. स्वयंपाक तर बाहेर दगडांच्या चुलीवर व्हायचा.

शाहूला आणि मला पाहून मालनबाई हरखून गेली. आपल्या माहेरच्या पाहुण्यांना म्हणून तिने लागलीच खोपटीत दोरीवर वाळत टाकलेल्या चान्या घेतल्या, साफ केल्या आणि चुलीवरच्या उकळत्या पाण्यात शिजायला टाकल्या. दर चार-पाच दिवसांनंतर ऊसतोडणीची जागा बदल्यावर सगळे बिऱ्हाड बैलगाडीवर टाकून हिंडणारे ऊसतोडणी कामगार मीठ, मिरची आणि तेल याशिवाय किती वस्तू सोबत बाळगणार? खोपीत दोरीवर सुकवून ठेवलेले मांसाचे तुकडे म्हणजे चान्या. त्या ऐनवेळी कुणाचाही पाहुणचारासाठी उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी चान्या हीच पक्वाने होती. त्या खायची ती माझी पहिली आणि शेवटचीच वेळ.

फादर होण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी मी सातारा जिल्ह्यात कराडला फादर प्रभुधर यांच्या ‘स्नेहसदन’ आश्रमात राहून अकरावी केली. त्या संपूर्ण वर्षभराच्या काळात या आश्रमात योगासने शिकावी लागली. तिथे मांसाहार पूर्णतः वर्ज्य होता. इतका काळ - अगदी एक आठवडाभरही - मी कधीही शाकाहारी राहिलो नव्हतो.   

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बारावीला गोव्यातल्या जेसुईट लोयोला हॉल पूर्व-नोव्हिशिएटमध्ये राहायला गेलो, तेथे कराडच्या अगदी उलट स्थिती. बुधवारच्या दुपारचा अपवाद सोडता वर्षभर दुपारी आणि रात्री फक्त मांसाहारी आणि तेसुद्धा केवळ बीफ असायचे. पोर्तुगीज बोलणारा आमचा मेस्ता फ्रान्सिस आठवड्याभर बीफची नारळ घालून केलेली घट्ट मसालेदार शाकुती, कटलेट्स, समोसे, चिली-फ्राय, रोस्ट असे इतके वेगवेगळे पदार्थ बनवायचा की, एक डिश आठवड्यात क्वचितच रिपिट व्हायची! हा बीफचा पुरवठा पणजी मार्केटमध्ये दर शुक्रवारी बंद असायचा, म्हणून गुरुवारीच नेहमीपेक्षा दुप्पट बीफ आणले जायचे.

त्या काळात भाकरी किंवा चपातीचे कधी दर्शन घडले नाही. सकाळी नाश्त्यासाठी कडक भाजलेले गोलगोल उंडो पाव आणि रात्री साधे पाव असा मेन्यू असायचा. त्या सत्तरच्या दशकात गोव्याला बीफचा पुरवठा बेळगावातून व्हायचा, आजही होतो. गेली अनेक वर्षं गोव्यात आणि कर्नाटकातही भाजपचे सरकार असले तरी यात काहीही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रात पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या पराभवानंतर भाजप-शिवसेनेचे सरकार २०१४ साली आले. या युतीच्या सरकारचा पहिला महत्त्वाचा निर्णय होता-मागील १९ वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेला गोवंश हत्याबंदीचा ठराव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा आणि मंजुरीनंतर तातडीने हा कायदा महाराष्ट्रात अमलात आणण्याचा. एक नवी खाद्यसंस्कृती प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. देशात केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयाच्या कारणाने उत्तर भारतात ‘मॉब लिंचिंग’ होण्याच्या घटना यानंतरच सुरू झाल्या.  

यावरून एक अलीकडची घटना आठवली. गोव्यात सांकवाल येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी नावेलीजवळच्या बस स्टॉपजवळ उभा होते. शेजारीच एक पासरो म्हणजे छोटेसे किराणा दुकान होते. जवळच्या शाळेच्या मैदानावरून धावत एक विद्यार्थी आला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, “अंकल, माका एक बीफ पॅटीस दी!” ते ऐकून मी चमकलोच, पण लगेच लक्षात आले की, मी आता गोव्यात आहे, महाराष्ट्रात नाही.

या घटनेनंतर काही महिन्यांनी गोव्यातून सिस्टरताई आली आणि आल्याआल्या मला म्हणाली, “मी खिमा आणला आहे. फ्रिजमध्ये लगेच ठेवून दे.” ते ऐकून मी विचारात पडलो, पण काही बोललो नाही. तो खिमा गोव्यातून महाराष्ट्रात आणणे हा कायद्यानुसार दारू आणण्यापेक्षाही भयंकर गुन्हा आहे, हे मी तिला सांगितले नाही. 

गोव्यातील आमच्या जेवणात नाताळ, ईस्टर तसेच सेंट इग्नेशियस लोयोला, सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्तांनिमित्त पोर्कपासून म्हणजे डुकराच्या मासांपासून केलेले सोरपोतेर, विंदालू, सॉसेजेस अशा पोर्तुगीज वळणाच्या डिशेस असायच्या. आठवड्यातून काही दिवस मासे आणि अंडी यांचाही रतीब असायचा.

किंग प्रॉन्स हा माशांचा एक प्रकार मला आवडत नसायचा. प्रॉन्स बिर्याणीतून मी ते प्रॉन्स ताटात वेगळे काढून ठेवायचो. हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी बसून मी वेगळ्या वाटीत काढून ठेवलेले ते किंग प्रॉन्स मटकावण्यासाठी इतर मुलांची स्पर्धा सुरू झाली. कारण फाईव्ह स्टार हॉटेलांत असलेल्या मागणीमुळे किंग प्रॉन्स अत्यंत महागडे असत, आजही यात बदल झालेला नाही. त्यानंतर किंग प्रॉन्स खाणे मी सुरू केले.

केंद्रात आणि गोव्यातही भाजप हा एकच पक्ष सत्तेवर असला तरी हा पक्ष गोव्यातील खाद्य आणि पेय संस्कृतींबाबतचे नैतिक किंवा कायदेशीर नियम आपली सत्ता असलेल्या इतर राज्यांत किंवा देशभर लागू करण्याचा विचारही कधी करणार नाही. गोव्यात अगदी मॉलमध्येही दारू विकली जाते आणि प्रत्येक मांसाहारी हॉटेलांत बसल्या बसल्या गिऱ्हाईकांपुढे काचेचे ग्लास ठेवले जातात, हे अनेकांनी अनुभवलेले असेलच.  

पत्रकार म्हणून नोकरीला लागल्यावर पणजीला सान्त इनेजपाशी असलेल्या ताळगावला मी राहत असताना माझ्या घरमालकाची म्हातारी आई वारली, तेव्हाची घटना आठवते. मयतीला लोक जमले होते. काही वेळानंतर आम्हा सर्वांच्या हातात फेणीचे ग्लास आणि खाण्यासाठी उकडलेले छोले देण्यात आले, तेव्हा मी थक्कच झालो. किरीस्तांव लोकांच्या घरी किंवा रस्त्यातल्या चौकापाशी असलेल्या क्रुसासमोर कुठल्याही कारणानिमित्त रोझरीची प्रार्थना आणि लदाईन (लितानी) असायची, तेव्हाही अल्तारासमोरच्या मेणबत्त्या विझवण्याआधीच फेणी किंवा उर्राकचे ग्लास आणि उकडलेल्या छोल्यांचे ताट फिरवले जाई. हळूहळू या प्रकारांची सवय झाल्यावर त्याचे आश्चर्य व वैषम्य वाटेनासे झाले. गोव्यात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथेही ख्रिस्ती कुटुंबांतील लग्नांत मांसाहारी पदार्थ असतातच. पाहुणे मंडळींच्या जेवणाच्या प्रत्येक टेबलांवर काचेचे ग्लासही असतात.  

खाण्यावरून शरमिंदा होण्यासारखा एक खूप जुना प्रसंग आठवतो. कॉलेजची सुट्टी संपल्यावर श्रीरामपूरहून मी गोव्याला झेलम एक्सप्रेसने निघालो. १९७०च्या दशकाच्या त्या काळात मिरज ते वॉस्को द गामा या मार्गावर मिटरगेज रेल्वे होती. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग मिरजला संपल्यावर तेथून लोंढा-मार्गे वॉस्कोची मिटरगेज रेल्वे पकडावी लागे. या मार्गावर प्रवास केलेल्यांनी ‘दूधसागर धबधबा’ पाहिला असेलच. सह्याद्री घाटात अत्यंत संथ गतीने चालणाऱ्या या मीटरगेज रेल्वेबाबत जुन्या पिढीतील लोक अनेक गंमतीदार किस्से सांगत. जसे की, दूधसागर धबधब्यापाशी या चालत्या गाडीतून उतरून, छायाचित्र काढून, परत मागच्या डब्यात चढणे शक्य होते.

हा, तर या प्रवासासाठी आईने बाजरीच्या भाकरी आणि माझ्या आवडीची लाल मिरच्यांची सुकटाची चटणी कापड्यात बांधून दिली होती. गाडीने मिरज सोडल्यावर डब्यात वरच्या बर्थवर बसून रात्री नऊच्या दरम्यान मी त्या कापडाची गाठ सोडली, दोनतीन घास खाल्ले असतील तोच त्या डब्यातील अनेक प्रवाशांच्या एकापाठोपाठ सटासट शिंका सुरू झाल्या आणि एकच गोंधळ झाला. ‘कुणी वशट पदार्थ आणला?’ असे प्रश्न सुरू झाले. घाबरून मी गडबडीने ती सुकटाची चटणी झाकली. मात्र भूकेने भीतीवर मात केली आणि थोड्याथोड्या वेळाने एकेक घास घेत मी माझे जेवण संपवले. त्यानंतर सुकट, सुके बोंबील असे वशट खाद्यपदार्थ प्रवासात कधी आणायचे नाही, असा कानाला खडा लावला.   

पुणे श्रमिक पत्रकार संघ आपल्या सात्त्विक आहाराच्या आग्रहाविषयी असाच प्रसिद्ध आहे. ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीत १९४०च्या दशकात नथुराम गोडसे होता. नंतरच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी या संघटनेचे अध्यक्ष होते. (१९८०च्या दशकात मीसुद्धा या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत होतो.) संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी सर्व सदस्यांना भोजन दिले जाते. त्याचा मेन्यू वर्षानुवर्षे केवळ श्रीखंड-पुरी, आमरस, फदफदे असा ठेवून पत्रकार संघाने खाद्यसंस्कृतीबाबत आपले सोवळे कायम राखले आहे. इतरांच्या आवडीचा ‘तामसी आहार’ म्हणजे चिकन बिर्याणी किंवा किमान अंडा-करीचा बेत ठेवण्याचा काही सदस्यांचा आग्रह आजतागायत मान्य झालेला नाही.

याच्या अगदी उलट मुंबईतील ‘प्रेस क्लब’ची मानसिकता आहे! तिथं ‘व्हिजिटर’ म्हणून पाहुणचार घेतलेले मुंबईबाहेरचेही अनेक जण कौतुकाची भावना बाळगून असतात.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ने ऐंशीच्या दशकात मला बल्गेरियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पाठवले होते. तेव्हा आम्हा ३० जणांच्या भारतीय तुकडीमध्ये दिल्ली दूरदर्शनमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्या दौऱ्यात मांसाहारी पदार्थांत पोर्क म्हणजे डुकराच्या मांसाचा समावेश असेल या भीतीने तीन महिन्यांच्या या काळात या गृहस्थाने साधे अंडा ऑम्लेटसुद्धा खाल्ले नव्हते!

पूर्ण शाकाहारी असलेले माझ्या परिचयातील एक जण कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये शांघायला दोन महिने होते. तेथून परतून आज तीन वर्षे झाली तरी शांघाय नाव काढताच तिथे खाण्याचे झालेले हाल आठवून आजही त्यांना पोटात मळमळल्यासारखे होत असते.  

मुंबई-पुण्यातल्या इराणी हॉटेलांनी आपली स्वतःची वेगळी खाद्यसंस्कृती जपली होती. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यातले गरवारे पुलाजवळचे हॉटेल गुडलक आणि लकी रेस्टाँरंट ही इराणी हॉटेल्स देव आनंद, दिलीप कुमार वगैरे अभिनेत्यांची आवडती ठिकाणे होती. आता बंद झालेले लकी रेस्टाँरंट हे मस्काबन, चाय, खिमा पाव, चिकन मसाला, चिकन बिर्याणीसाठी प्रसिद्ध होते. नव्वदच्या दशकात आम्ही सडेफटिंग पत्रकारही तिथे बसायचो, तेव्हाही या अभिनेत्यांच्या नावांची तेथे हमखास उजळणी व्हायची.

नॉन-व्हेज समोसा आणि मस्काबन यामुळे पुणे कॅम्पातले हॉटेल ‘महानाझ’ खवय्यांचे आवडते होते. मी नोकरीला असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’चे ऑफिस तेव्हा या ‘महानाझ हॉटेल’च्या समोरच्या अरोरा टॉवर्समध्ये होते. पुणे कॅम्पात अनवाणी पायाने हिंडल्यानंतर चित्रकार मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेन या हॉटेलमध्ये विसाव्यासाठी बसलेले मी पाहिले आहे. त्यांच्या अशा भेटीमुळे आम्हा पत्रकारांना हमखास एक सॉफ्ट स्टोरी मिळायची.  

हवेतल्या प्रवासातील खाद्य आणि पेय संस्कृतीची तर वेगळीच मजा असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईतून पॅरिसच्या दिशेने आमच्या विमानाने उड्डाण केले आणि पंधरा-वीस मिनिटांतच ट्रे घेऊन आलेल्या एयर होस्टेसने मला विचारले- ‘काय घेणार तुम्ही?’ ट्रेकडे निरखून पाहत मी विचारले- ‘व्हॉट चॉइसेस आय हॅव्ह?’ तिने हसत म्हटले- ‘फ्रुट ज्यूस, वाईन, शॅम्पेन...’. ‘तर मग मी शॅम्पेन घेईन!’ मी लगेच म्हटले.

छोट्या आदितीने फ्रुट ज्यूसची ऑर्डर दिली. मात्र माझा उत्साहित झालेला चेहरा पाहून पत्नी, जॅकलीननेही शॅम्पेनची ऑर्डर दिली आणि तिचा ग्लासही माझ्यासमोर ठेवला.

मुंबई ते पॅरिस हा सहा तासांचा तसा कंटाळवाणा प्रवास मग अगदी मजेत गेला, हे सांगायलाच नको. ते तीन आठवडे फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये फिरताना विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि पेये यांचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला. या वेगळ्या खाद्य आणि पेय संस्कृतींच्या देशांत वावरताना कधीही ‘होम सिक’ झाल्यासारखे वाटले नाही.      

‘व्हेन इन रोम, डू ऍज द रोमन्स डू’ ही म्हण रोममध्ये आणि युरोपातल्या इतर ठिकाणी सुट्टीवर असताना मी, जॅकलीनने आणि मुलगी आदितीने पुरेपूर अमलात आणली होती. तिथल्या एक युरोला मिळणाऱ्या बिनसाखरेच्या आणि बिनदुधाच्या काळ्या कॉफीची लवकरच आम्हाला सवय झाली. रोममध्ये असताना पास्ता आणि पिझ्झा आदितीने मनसोक्त खाल्ला.  

दोन वर्षांपूर्वी ‘सकाळ टाइम्स’च्या वतीने थायलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या परिषदेत सहभागी झालो. भारतातले आम्ही सहा आणि जगभरातील सुमारे सत्तर पत्रकार त्या वेळी थायलंड सरकारचे पाहुणे म्हणून उपस्थित होतो. प्रवासाआधी थायलंडच्या मुंबईतील वकिलातीने माझ्या आहाराविषयी विचारणा केली, तेव्हा उपलब्ध तीन पर्यायांमध्ये मांसाहारी आणि शाकाहारी या नेहमीच्या दोन पर्यायांशिवाय ‘जैन पद्धती’चा तो तिसरा शाकाहारी पर्याय पाहून मी उडालो होतो! 

अशा भिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या खाद्य आणि पेय संस्कृतीबद्दल खरे तर काही आक्षेपही नसावा. ज्याला जे खावे, प्यावेसे वाटेल त्याबद्दल आडकाठी नसावी. खाद्यसंस्कृतीनुसार कुणी स्वतःला, आपल्या समाजाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये.

मात्र तसे होण्याऐवजी आजही आहारपद्धतीवरून नाके मुरडली जातात. हल्ली तर खाद्यसंस्कृतीनुसार शेजारी निवडला जातो. काही शहरांत त्यानुसार स्वतंत्र इमारती आणि राहण्याच्या कॉलनीही उभारल्या जात आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते.   

अर्थात कुणाला अन्न म्हणून केवळ वनस्पती आणि फळफळावळ पसंत असू शकेल, तर कुणाला प्राणी-पक्षी म्हणजे मांसाहार आवडीचा असेल. त्याशिवाय आहारनिवडीत भौगोलिक संदर्भ महत्त्वाचे असतात. थंड प्रदेशातील इस्किमोंना ताज्या भाजीपाल्याऐवजी मासे, रेनडिअरचे दूध आणि मांसावर गुजराण करावी लागते. भुईमुगाचे पीक होणाऱ्या परिसरात जेवणाच्या पदार्थांत शेंगदाण्याचा मुबलक वापर होतो आणि त्याच पद्धतीने कोकणात नारळाचा!

चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहांवर वसती निर्माण करण्याची आस बाळगणाऱ्या मानवाला तिथल्या परिस्थितीनुसार आपला आहार बदलावा लागणार आहेच! की, तिकडेही खाद्यसंस्कृतीबाबत आपण अशीच कडवी भूमिका कायम ठेवणार आहोत?  

 ..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

अली खान महमुदाबाद यांच्या पोस्टमुळे धोका नाहीय, तर कुणी टीका केली की, ज्या प्रकारे त्याचा ‘आवाज बंद’ करण्याचा संघटित प्रयत्न होतोय, त्याचा(च) ‘खरा धोका’ आहे

काही वेळा काही गोष्टी आपल्याला वाटतं तशा नसतात, आणि काही वेळा आपल्याला जे सांगितलं गेलं किंवा जे आपण शिकलो, ते चुकीचंच होतं, असं वाटायला लागतं. कारण काही अतिज्ञानी लोक अगदी त्याच्याविरुद्ध काहीतरी सांगतात आणि आपल्याला हे कसं कळलं नाही, किंवा कुणी निदान सांगितलं का नाही, असं वाटायला लागतं. या अतिज्ञानी लोकांना ते कसं कळतं, कुणास ठाऊक! पण होतं काय की, त्यांच्या या (अगाध) ज्ञानप्रकाशामुळे आपल्याला दिपून जायला होतं.......

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, अशा ‘पाटा-वरवंट्या’खाली युरोप चिरडला जात आहे

युरोपमधील एके काळच्या दोन सामर्थ्यवान देशांतल्या निवडणुका नुकत्याच जवळजवळ एकाच वेळी पार पडल्या. दोन्ही देशांत सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला. त्यावरून ‘सत्ताधारी पक्षांविरुद्ध बंड’ (anti-incumbancy) असं उथळ निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. हे बंड कुठल्या एका पक्षाविरुद्ध नसून परिस्थितीविरुद्ध होतं. आणि या परिस्थितीला सर्व मुख्य पक्ष जबाबदार आहेत, या भावनेतून जनतेनं सर्वच मुख्य पक्षांना झिडकारलं.......