अजूनकाही
जेरेड डायमंड यांच्या ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ या बहुचर्चित पुस्तकात मानवजातीचा तेरा हजार वर्षांचा संक्षिप्त इतिहास सांगितला आहे. खूप मोठा आवाका असलेल्या, मानवी भूतकाळाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणाऱ्या उत्कंठावर्धक आणि रंजक अशा या पुस्तकाचा नुकताच मधुश्री पब्लिकेशनने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. हा अनुवाद सविता दामले यांनी केलेला आहे. या पुस्तकाची ही झलक...
..................................................................................................................................................................
इतिहासातले ‘आहे रे आणि नाही रे’ वर्ग
बहुतेक मानवी इतिहास हा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन गटांतील असमान संघर्षाचाच बनला आहे. शेतीची शक्ती पाठीशी असलेले आणि नसलेले लोक किंवा वेगवेगळ्या काळात ज्यांनी ती ताकद कमावली, ते लोक यांच्यातला हा संघर्ष होता. पृथ्वीवरील बर्याच मोठमोठ्या भागात शेती-पशुपालनाचा उदयच झाला नाही. कारण तिथं पर्यावरणाची साथ नव्हती, असं म्हटलं तर त्यात आश्चर्य वाटायला नको. आजही त्याच पर्यावरणीय घटकांमुळे तिथं अन्नोत्पादन घेणं कठीण किंवा अशक्य आहे. उदाहरणार्थ, लिखित इतिहासपूर्व काळात उत्तर अमेरिकेच्या आर्क्टिक प्रदेशात शेती किंवा पशुपालन यांचा विकास होऊ शकला नाही, तर युरेशियाच्या आर्क्टिक प्रदेशात केवळ रेनडिअरचे कळप पाळणं शक्य झालं. त्याचप्रमाणे मध्य ऑस्ट्रेलिया किंवा पश्चिम अमेरिकेच्या काही भूभागांत पाण्यापासून खूप दूर वाळंवटात शेती-पशुपालन करणं कुणाला सुचलं नाही वा जमलंही नाही.
परंतु पर्यावरणसुलभ काही भागात अगदी आधुनिक काळापर्यंत शेती-पशुपालन का सुरू झालं नसावं, हा प्रश्न मात्र बुचकळ्यात पाडतो. आज ते भाग जगातले शेती-पशुपालनाचे सर्वांत समृद्ध प्रदेश आहेत. त्यातील सगळ्यात उल्लेखनीय प्रदेश आहेत कॅलिफोर्निया, अन्य पॅसिफिक राज्यं, अर्जेंटिनातील पंपास कुरणे, वायव्य आणि आग्नेय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील केप प्रदेश. युरोपियन वसाहतवादी तिथं पोचेपर्यंत तिथले स्थानिक लोक शिकार आणि जंगली खाद्य गोळा करूनच जीवन कंठत होते. ख्रिस्तपूर्व ४००० सालच्या जगाचे - म्हणजे शेती-पशुपालनास प्रारंभ झाल्यानंतर काही हजार वर्षांनंतरच्या - आपण निरीक्षण करू शकलो, तर आजची कित्येक धान्यकोठारं त्या काळात नव्हतीच, हे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. त्यात अमेरिकेचा उर्वरित भाग, इंग्लंड, फ्रान्सचा बहुतेक भाग, इंडोनेशिया आणि विषुववृत्तीय आफ्रिकेचा सर्व भाग एवढे प्रदेश मोडतात. शेती-पशुपालन अगदी सुरुवातीला कुठे झालं ते आपण पाहू लागतो, तेव्हा आश्चर्याचा दुसरा धक्का बसतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आधुनिक काळातील धान्यकोठारांचे प्रदेश तर ते नाहीतच, परंतु त्यातले काही भाग तर आजच्या घडीला कोरडे किंवा पर्यावरणीयदृष्ट्या ढासळलेले प्रदेश आहेत : इराक आणि इराण, मेक्सिको, ऍण्डीजचा प्रदेश, चीनचे काही भाग आणि आफ्रिकेतील साहेल भाग हे त्यात मोडतात. आजच्या घडीला अगदीच बाजूला पडलेल्या या भूप्रदेशांत सर्वांत पहिलं शेती-पशुपालन का विकसित झालं असावं? तसंच आजच्या अत्यंत सुपीक शेतकी प्रदेशांत आणि कुरणांत ते तेव्हा विकसित न होता नंतरच्या काळात का झालं?
शेती-पशुपालनाचा उदय ज्यामुळे झाला, त्या साधनांतील भौगोलिक फरकही अवाक् करणारे आहेत. काही ठिकाणी ते स्वतंत्रपणे उदयास आले, कारण तिथल्या स्थानिक लोकांनी स्थानिक वनस्पतींना आणि पशूंना माणसाळवलं. तर बर्याच ठिकाणी दुसरीकडे माणसाळवलेली पिकं आणि पशू आणून शेती-पशुपालन सुरू झालं. लिखित इतिहासपूर्व काळात जी ठिकाणं स्वतःहून शेती-पशुपालन करू शकली नाहीत, तिथं दुसरीकडून पिकं आणि पाळीव पशू आणल्यावर मात्र भरपूर अन्नोत्पादन होऊ लागलं. पण मग तिथल्या लोकांनी स्वतःहून वनस्पतींना आणि पशूंना माणसाळवले का नाही? तसं करून ते शेतकरी आणि गुराखी का बनले नाहीत?
..................................................................................................................................................................
निएंडरथाल मानवांचे मेंदू हे आपल्यापेक्षा थोडेसे मोठेच होते
सुरुवातीच्या होमो सेपियन्सच्या सांगाड्यांचे अवशेष आणि त्यांनी बनवलेली ओबडधोबड दगडी हत्यारं सोडली, तर त्यांनी निर्माण केलेली कला, हाडांपासून बनवलेली हत्यारं किंवा अन्य कुठलीही वस्तू सापडलेली नाही. त्या काळात ऑस्ट्रेलियात एकही माणूस नव्हता, त्यामागचं उघड कारण म्हणजे आशियातून तिथं जाण्यास नौका लागली असती. त्याशिवाय दोन्ही अमेरिकांतही मानव पोचला नव्हता, कारण तिथं पोचण्यासाठी अमेरिका खंडालगतच्या युरेशियाच्या भागात (सैबेरियात) अगोदर पोचावं लागलं असतं, शिवाय नौकाही लागली असतीच. (सध्याची उथळ ‘बेरिंग समुद्रपट्टी’ - दोन जमिनींतली पाण्याची चिंचोळी पट्टी - सैबेरियाला अलास्कापासून वेगळं करते. हिमयुगामध्ये पाण्याची पातळी वारंवार वाढायची आणि कमी व्हायची. त्यामुळे त्या जागी कधी समुद्रपट्टी असायची, तर कधीकधी कोरड्या जमिनीचा रुंद, आंतर्खंडीय पूल असायचा.) तथापि नौकाबांधणी आणि सैबेरियाच्या अतीथंड हवेत टिकाव धरून राहणं, हे सुरुवातीच्या होमो सेपियन्सच्या ताकदीपलीकडचं होतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पाच लाख वर्षांनंतर आफ्रिका, पश्चिम युरेशिया आणि पूर्व आशिया येथील मानवी सांगाड्यांत फरक दिसू लागला. त्यानंतर १,३०,००० वर्षं ते ४०००० वर्षं या काळात युरोप आणि पश्चिम आशियात सापडलेल्या बहुसंख्य मानवी सांगाड्यांना ‘निएंडरथाल मानवा’चे सांगाडे असं म्हटलं जाऊ लागलं. कधीकधी त्यास ‘होमो निएंडरथालेन्सिस’ ही सेपियन्सपेक्षा स्वतंत्र अवस्था म्हणूनही गणली गेली. ‘एप’सदृश दिसणारे, गुहेत राहणारे ओबडधोबड मानव म्हणून त्यांची भरपूर व्यंगचित्रं काढली गेली असली, तरी निएंडरथाल मानवांचे मेंदू हे आपल्यापेक्षा थोडेसे मोठेच होते. आपल्या मृत नातलगांना पुरण्याची, आजाऱ्यांची काळजी घेण्याची प्रथा त्यांच्यात होती. तसे पुरावे मागे सोडणारे ते पहिले मानव होते. तरीही त्यांची दगडी हत्यारं अत्यंत ओबडधोबड होती, असंच म्हणावं लागेल. तसंच त्या हत्यारांना ठराविक आकारही नव्हते, ज्या योगे त्या त्या हत्यारांचं स्वतंत्र कार्य ओळखता आलं असतं.
..................................................................................................................................................................
इतिहासातील नैसर्गिक प्रयोग
न्यूझीलंडपासून ५०० मैल पूर्वेस कॅंथम्स बेटे आहेत, त्यावर मोरिओरी लोक शतकानुशतकं मुक्तपणे राहत होते. परंतु त्यांच्या स्वातंत्र्यास डिसेंबर १८३५मध्ये खग्रास ग्रहण लागलं, कारण त्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी बंदुका, सोटे आणि कुर्हाडी घेतलेले ५०० माओरी लोक जहाजातून अवतरले. त्यांच्यापाठोपाठ ५ डिसेंबर रोजी आणखी ४०० माओरी आले. हे गट मोरिओरींच्या वस्त्यांतून फिरू लागले, फिरता फिरता घोषणा करू लागले की, ‘तुम्ही लोक आता आमचे गुलाम आहात.’ प्रतिकार करणार्यांना त्यांनी ठार मारून टाकलं. खरं तर मोरिओरींनी संघटित प्रतिकार केला असता, तर ते सहजच माओरींचा पराभव करू शकले असते. कारण त्यांचं प्रमाण दोनास एक असं होतं. परंतु मोरिओरींची परंपराच मुळी शांततामार्गे वाद सोडवण्याची होती. म्हणून त्यांनी सभा घेऊन ठरवलं की, आपण लढायचं नाही, तर त्याऐवजी शांतता आणि मैत्रीचा हात पुढे करू. आपली साधनसंपत्ती त्यांच्याशी वाटून घेऊ.
परंतु मोरिओरीनी समेटाचा हात पुढे करण्याअगोदरच माओरींनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. त्यानंतर पुढील काही दिवसांत त्यांनी शेकडो मोरिओरींना ठार मारलं. त्यातल्या काहींना शिजवलं आणि खाऊनही टाकलं. बाकीच्यांना गुलाम बनवलं. त्यातल्याही बहुतेकांना आपल्या लहरीनुसार ठार मारून टाकलं. एका वाचलेल्या मोरिओरी माणसानं आठवण सांगितली आहे. ती अशी की, “माओरी लोकांनी अक्षरशः शेळ्यामेंढ्याची करावी तशी आमची कत्तल केली.... आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही झुडपांकडे पळालो. जमिनीतल्या खबदाडांत आसरा घेतला. शत्रूपासून वाचण्यासाठी दिसेल तिथं गेलो. परंतु कशाचाच उपयोग झाला नाही. त्यांनी आम्हाला शोधून शोधून ठार मारलं. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं काही काही पाहिलं नाही...’’ एका माओरी जेत्यानं स्पष्टीकरण देताना म्हटलं, “आम्ही तर आमच्या प्रथेनुसार त्या जमिनीचा ताबा घेतला. आम्ही सर्वच माणसांना पकडलं. कुणीही आमच्या तावडीतून सुटलं नाही. काही आमच्यापासून दूर पळाले, त्यांना आम्ही ठार मारलं. बाकीच्यांनाही ठार मारलं. पण त्याचं काय? आम्ही आमची परंपराच तर पाळत होतो.’’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मोरिओरी आणि माओरी यांच्यातील संघर्षाच्या या निष्ठूर फलिताचा अंदाज सहजच बांधता येण्यासारखा होता. मोरिओरी ही खूपच छोटी जमात होती. शिकार आणि जंगलातील खाद्य गोळा करून पोट भरणाऱ्यांची आडबाजूची वसाहत होती. त्यांचं तंत्रज्ञान आणि हत्यारं अगदीच साधी होती. त्यांना लढाईचा काहीच अनुभव नव्हता. कणखर नेतृत्व किंवा संघटन यांचाही त्यांच्याकडे अभावच होता. तर न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरून आलेले माओरी हल्लेखोर दाट वस्तीच्या, हिंसक लढाया-ग्रस्त शेतकी समाजातून आले होते. त्यांचं तंत्रज्ञान आणि हत्यारं अधिक प्रगत होती. नेतेही अधिक जहाल होते. साहजिकच हे दोन गट आमनेसामने आले, तेव्हा माओरींनी मोरिओरींची कत्तल केली. त्या उलट प्रकार झाला नाही.
गन्स, जर्म्स अँड स्टील’ - जेरेड डायमंड,
मराठी अनुवाद सविता दामले
मधुश्री पब्लिकेशन, पुणे
मूल्य - ५०० रुपये
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment