ग्रामीण भागातील आजचे वास्तव अनुभवण्यासाठी ‘तहान’ ही मुळातून वाचावी अशी साहित्यकृती आहे!       
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • ‘तहान’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 June 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो तहान Tahaan सदानंद देशमुख Sadanand Deshmukh

कथा-कादंबरीकार सदानंद देशमुख यांची ‘तहान’ ही कादंबरी २२-२३ वर्षांपूर्वीची. तिचं आजच्या दृष्टीकोनातून केलेलं हे वाचन...

..................................................................................................................................................................

प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची ‘तहान’ ही साधारणतः २०५ पानांची कादंबरी. नावाप्रमाणेच ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य’ केंद्रस्थानी ठेवणारी ही कथा. एकाच गावच्या छोट्या कॅनव्हासवर उलगडणारी पण सगळ्या रंगांच्या छटा वाचकाच्या मनावर बिंबवणारी. एक अतिशय साध्या ग्रामीण भागातली चौकोनी कुणबी कुटुंबाच्या अवतीभवती फिरणारी ही कथा. यात नात्यांची गुंतवळ नाही, पण विचारांचं द्वंद्व आहे. भरमसाठ व्यक्तिचित्रं नाहीत, मोजकीच आहेत, पण व्यावहारिक आहेत, ती व्यवस्थित वाचकाच्या मनावर ठसतात. कथानक वाचकाला आपल्यात खोल खोल सामावून घेत अपेक्षित वळणं घेऊ लागताच अनपेक्षित वळणावर आणून सोडते. पुढे काय? हा प्रश्न त्याला भेडसावत राहताना कादंबरी संपते.

या अर्थानं ही एक 'अनऑर्थोडॉक्स', अपारंपरिक कादंबरी आहे. पण ती एक प्रश्न मनात ठेवून जाते कदाचित यातच या कादंबरीचं साफल्य आहे. तो प्रश्न असा- कॅनोनायझेशन नेमकं कशाचं? जुन्याचं का नव्याचं, वर्षानुवर्षं तरलेल्या शहाणपणाचं, का हुंदडणाऱ्या अल्लडपणाचं, हे ठरवण्याची ही वेळ, शं नो वरुणः'

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ही कादंबरी वाचून एक किस्सा ताजा होतो. अपारंपरिक पद्धतीने फ्रेंच सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या गोदा (Godard) या प्रसिद्ध डायरेक्टरला एकदा मुलाखतकर्त्यानं विचारलं, ‘बट शुअरली यू अग्री मिस्टर गोदा, दॅट फिल्म्स शुड हॅव अ बिगिनिंग, अ मिडल पार्ट अँड एन एन्ड?’ तर ते म्हणाले, ‘एस, बट नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर.’

या कादंबरीची भाषा कुठेही आपला ग्रामीण बोली पोत सोडत नाही, हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पूर्ण कथा एकसंध असल्याचं जाणवतं, उगाच वाचकाला एकदा भाषेचं वळण कळल्यावर उड्या माराव्या लागत नाहीत, नाही तर मध्येच जर प्राध्यापकी प्रमाण भाषा वापरली असती, तर हा अस्सलपणा कमी झाला असता.       

एका गावातलं एक कुणबी चौकोनी कुटुंब, प्रमुख राघोजी शेवाळे, बायको रामकोर, मुलगा बबन आणि मुलगी वर्षा. गावातल्या विहिरी आटल्या, दुष्काळ पडला, तसं पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण वाढली. त्यात, बबनला पैसे कमावण्याची संधी दिसली. गावापासून चार किलोमीटरवर गारमाळात विहिरीला भरपूर पाणी होतं, पण त्या आडवळणाला कोणी जायचं नाही कारण पाणी घेऊन वर येताना एकमेव रस्त्यावर लागणारा पिराचा चढ भल्याभल्यांना धापा टाकायला लावत होता, या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटं झालं होतं, तिथं बैल पाणी घेऊन तो चढून येणं अशक्य होतं, पण बबनचे बैल त्याच्या बापानं निगुतीनं सांभाळले होते. दोन्ही बैल उमदे हत्तीसारखे दिसायचे. त्याने तात्काळ आपली तगडी बैलजोडी याकामी जुंपली, कणा मोडणाऱ्या पिराच्या चढाखालील विहिरीतून पाणी शेंदून आपल्या छबिल्या आणि मुरल्याच्या जीवावर पाण्याचा धंदा सुरू केला.

सगळे त्याच्या पाण्यासाठी रांगा धरू लागले, कारण त्या चढाखालून पाणी वाहून आणण्याचं जिगर अन्य कोणाच्या बैलजोडीत नव्हतं. इथंच बाप-लेकात संघर्षाची ठिणगी पडली. औताला ज्या बैलांना जुंपायचं, ज्यांचं चारा पाणी वेळेवर करून काळजी वाहायची त्यांच्या पाठीवरून पाणी वाहण्याचा धंदा त्याला हमाली वाटू लागला आणि बबनला रोज मिळणारा, हाती खेळणारा पैसा हेच सर्वस्व वाटू लागले. त्याच्या पैशावर घरात टीव्ही, सोन्याची पोत, रोजचं चांगलं जेवण येतंय, हे पाहून त्याची आई रामकोर त्याचीच बाजू लावून धरू लागली, बहीण वर्षा पण पाठीशी उभी राहू लागली आणि आपल्या बैलांना पाणी वाहून खंगून जाताना पाहून राघोजी मनाच्या खोल खोल विहिरीचा तळ खंगाळून चुळूकभर उमेद शोधत राहिला. त्याचं सांगणं घरात कोणी मनावर घेतलं नाही, उलट त्यालाच बाजूला सारलं. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बबनचा धंदा जोरात असताना तो गावातील लोकांच्या डोळ्यात खुपू लागतो, त्याच्यापाठी पाण्यासाठी लागणाऱ्या रत्ना या देखण्या मुलीकडे पाहून लोकांना त्याचा हेवा वाटू लागतो. मग गावातील काही लोक बबनला रत्नासोबत रंगेहाथ पकडतात आणि तिच्या बापाला पण त्यांचं लफडं दाखवतात. काकुळतीला आलेल्या बबनचं हवालदाराकडून आणि बातमीदाराकडून ब्लॅकमेलिंग इथं सुरू होतं. दरम्यान बननने बैलजोडीकडे आणि बापाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं, त्यामुळे ज्यांच्या जीवावर तो पाण्याचा पैसा ओढून आणतो, ते आधीचे उमदे बैलच आता सापळे होऊन जातात. त्याने अधिक ड्रम्स वाहता यावेत म्हणून नव्याने केलेल्या रबरी टायरच्या लोखंडी गाडीला ते खेचू शकत नाहीत. बाजूच्या गावात आग लागते. त्यामुळे मोठे सरकारी अधिकारी आणि राजनेते त्यागावात भेट देऊन परतताना या गावातील लोक ‘पाणी मोर्चा’ काढतात, त्यात हाणामारी होते, राघोजीच्या पायाला जबर मार लागतो, फ्रॅक्चर होते. बबनचा खर्च वाढतो, आमदनी कमी होते कारण मोर्च्याच्या नंतर गावात सरकारी टँकर्स सुरू होतात म्हणून बबनच्या पाण्याची मागणी आटते, आणि त्याचे गिऱ्हाईक तुटते, नवीन टँकरवाले बबन गावात तयार होतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जखमी राघोजी आपल्या मरणासन्न बैलांकडे पाहत डोळे मिटत असता त्याला वाईट स्वप्न दिसते, तहानेने व्याकूळ तो, बायको आणि बैल कोरड्या घशाने कुठेतरी आत खोल खोल पाण्याच्या आशेने खेचले जातात आणि इतक्यात लचावणाऱ्या कावळ्यांचा कावs sकावs s आवाज व्यापून राहतो. अशा संज्ञा-प्रवाहात कादंबरी संपते, पण तोपर्यंत वाचक त्यात पार खोल खोल गेलेला असतो.

पैसा हेच सर्वस्व मानून माणूस नीतिमत्ता विसरत चालला आहे, चंगळवादाच्या मागे लागून साधे जगणे अवघड करून बसला आहे. या उपभोक्तावादाचं वाढतं ओझं आता त्याला पेलवेनासं झालं आहे. त्यात विकासाच्या नावाखाली त्याच्या तोंडाला प्रशासनिक आणि राजकीय यंत्रणांकडून पानं पुसली जाताहेत आणि त्याला भाकरी पुरवणारा जमिनीचा भेगाळलेला तृषार्त तुकडा एका गर्तेसारखा खोल होऊन त्यालाच आपल्यात सामावू पाहात आहे, हे सगळं चित्र ही कादंबरी पुढ्यात ठेवते. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर सत्तरी उलटूनही आजून भयाण वास्तव फेर धरून आहे याची जाणीव गडद होत राहते, ग्रामीण भागातील आजचे हे वास्तव अनुभवण्यासाठी ‘तहान’ ही मुळातून वाचावी अशी साहित्यकृती आहे.       

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......