अजूनकाही
‘नाथपंथी डवरी गोसावी’ या भटक्या जमातीतील कालिदास शिंदे यांचं ‘झोळी’ हे आत्मकथन नुकतंच समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. त्याला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
‘झोळी’ हे आत्मकथन वाचकांच्या समोर ठेवत आहे. मी अठरा विश्व दारिद्रय असलेल्या भिक्षेकरी ‘नाथपंथी डवरी गोसावी’ या भटक्या जमातीत जन्माला आलो. भटकंती तर आमच्या पाचवीला पूजलेली आहे. आमचे जीवन भटकंती करून जगणे असे आहे. माझा समाज आजही भिक्षेवरच पूर्णपणे अवलंबून आहे. आमचे दुसऱ्याच्या दारात जाऊन बारा घरचा तुकडा मागितल्याशिवाय पोटच भरत नाही. आमची भिक्षेशिवाय चूल पेटत नाही. जमातीचा जोगी गावातून भिक्षा मागून पाला-बिऱ्हाडावर येत नाही, तोपर्यंत पालावरचं लहान लेकरूसुद्धा पोटाच्या भूकेसाठी तडफडते.
हा समाज पारंपरिक लोककला, लोकसंस्कृती जपणारा, मुख्य प्रवाहातील समाजासाठी धार्मिक सेवा, धार्मिक पूजा, गोंधळ विधी सादर करत आला आहे. पिढ्यानपिढ्या हे नाथपंथी जीवन स्वीकारले असल्यामुळे त्या तत्त्वज्ञानानुसार कोणत्याही गोष्टींचा लोभ, हव्यास न पाळता नि:स्वार्थी वृत्तीने समाजात प्रबोधनाचे काम करत आपले योगदान देत आला आहे.
त्या बदल्यात या समाजाला काय मिळाले, तर काखेला झोळी! आजवर आमच्या काखेची झोळी थांबलेली नाही. त्यामुळे आमच्यात अपेक्षित विकास व सामाजिक परिवर्तन होऊ शकलेले नाही. तसेच आम्हाला विकासाच्या कोणत्याच प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आतापर्यंत माझ्या समाजाच्या वाट्याला फक्त अवहेलना, अपमानच आला आहे.
आज बाह्य समाजात आमची ओळख काय आहे, असे कोणासही विचारले, तर ते सहजपणे सांगतात की, भिक्षेकरी! माझ्या समाजाने पिढ्यानपिढ्या दिलेल्या सामाजिक, धार्मिक योगदानाचे फळ म्हणजे ‘भिक्षेकरी’ म्हणून मिळालेली ओळख.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
महाराष्ट्रात पारंपरिक लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि ‘गोंधळ विधी’ पार पाडण्यासाठी डवरी गोसावी, नाथपंथी गोंधळी यांना आमंत्रण दिले जाते. हा पारंपरिक गोंधळ विधी संपन्न झाल्यावर मात्र त्यांना काहीच किंमत नसते. तो वर्तमान व भविष्यकाळात सर्व बाजूंनी दुर्लक्षितच राहतो. या समाजाकडे धार्मिक पारंपरिक पूजा करणारे या नात्याने जरी बघितले जात असले तरी त्यांचा वापर आजवर मनोरंजनासाठीच होत आला आहे. लोकांचे मनोरंजन करून मिळणारा मोबदला तुटपुंजा असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी झोळी घेऊन लोकांचा उंबरा पूजल्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या जवळ नसतो.
आजवर विवाहप्रसंगी पूजापाठ करणारा, धार्मिक कार्य करणारा प्रस्थापित समाज त्यांचे योगदान देत आला आहे. परंतु हे विवाह झाल्यावर पुढील देवदेवता पूजन, नाथचे व देवीचे गोंधळ विधी जागरण करण्यासाठी डवरी गोसावी, भराडीच का लागतो? हे कार्य दुसऱ्या कोणत्याही समाजाकडे देता आले असते, तर का दिले गेले नाही? या कार्याच्या मोबदल्यात या समाजाला ‘बैत’ म्हणून वंजळ-पसा धान्य बिदागी म्हणून मिळते. या पलीकडे आमची गरज मुख्य प्रवाहातील समाजाला कवडीमोल राहिली आहे.
माझे कुटुंब ‘लोकांची हागणदारी, ती आपली वतनदारी’ मानणारं आहे. या वतनाचे इमाने-इतबारे लोकसंस्कृती व धर्मजागृती करण्यासाठी मुखात गाणी आणि हातात डवर, संभळ, तुणतुणे घेऊन समाजात प्रबोधन करत आहे. परंतु त्याच्या अंगी असणारी कला, कौशल्ये, गायन, वादन आज कालबाह्य झालं आहे. त्यामुळे फक्त भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी त्यांच्या जीवनाची अधिकच परवड होत आहे. या पोटाच्या भुकेसाठी ते भारतभर भटकत परागंदा झाले आहेत. भटकंतीच्या जीवनामुळे त्यांच्या भावी पिढीचे आयुष्य अंधारात आहे. या मुलांना न गाव, न रहिवासी पुरावा, न रेशनकार्ड.
त्याचबरोबर ज्या भुईच्या तुकड्यावर हा समाज उभा आहे, त्या पायाखालील जमिनीवरसुद्धा आपला हक्क व अधिकार त्याला सांगता येत नाही. त्याला माणूस म्हणून जीवन मिळत नाही. आजवर त्याची दाद कोणीही घेतलेली नाही. आपली लोकशाही पुतळ्याप्रमाणे उभी आहे, तिची हालचाल होताना दिसत नाही. कारण इथे फक्त या जमातीच्या मतांची गणता होते, परंतु त्यांच्या डोक्यांची मोजदाद कुठेच होताना दिसत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विमुक्त व भटक्या जमातींवर एकूण पन्नास आत्मकथने प्रकाशित झाली आहेत. या पन्नास आत्मकथनांमधली बहुतेक विमुक्त जमातीविषयी आहेत. त्यांत ‘माजी गुन्हेगार जमाती’ म्हणून असणारा सामाजिक कलंक यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आजही विमुक्त जमातीवर गुन्हेगारीचा लागलेला कलंक पिच्छा सोडताना दिसून येत नाही. यातील काही जमाती बहुसंख्येने गावकुसाबाहेर आणि गावगाड्यामध्ये स्थायिक झालेल्या आहेत. सध्या विमुक्त जमातीमधील समाजबांधव आपली पालं-बिऱ्हाडं घेऊन तुरळक भटकेपणाचे जीवन जगताना दिसून येतात. सद्यस्थितीत या विमुक्त जमाती श्रमाची कामे व पारंपरिक कौशल्ये यांचा आधार घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत.
दुसऱ्या बाजूला बघितले तर भिक्षेकरी भटक्या जमातीमधील आत्मकथने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी प्रकाशित झालेली आहेत. यातील माझा समाज हा पारंपरिक गोंधळ ही कला सादर करून लोकसंस्कृतीचा गाढा ओढत आहे. तसेच पिढ्यानपिढ्या काही भटक्या जमाती देवदेवता व पशू-प्राणी घेऊन भिक्षा मागून परावलंबी जीवन जगत आले आहेत. सध्याही तेच आत्मसन्मानहीन जीवन जगत आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
विमुक्त जमातींच्या आत्मकथानांतून त्यांचा जीवन परिचय व संघर्ष वाचकांसमोर आला आहे. मी या आत्मकथनात आजही माझा समाज ९५ टक्के उपेक्षा सहन करत भटकंतीचे उपेक्षित जीवन जगत आहे. माझ्या समाजात एका बाजूला पोट भरण्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. ज्याला शिकायचे आहे, त्याला परिस्थितीमुळे शिक्षण मिळत नाही, हे मांडले आहे. माझ्या आई-वडिलांचे जीवन पूर्ण भटकंतीचे होते.
मी भिक्षेकरी समाजात पाला-बिऱ्हाडात राहून पी.एचडी. पदवी मिळवण्यासाठी जो संघर्ष केला, तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तो वाचकांना नक्कीच आवडेल.
झोळी - डॉ. कालिदास शिंदे
समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर
पाने - ३५२
मूल्ये – ५०० रुपये.
..................................................................................................................................................................
कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ या आत्मकथनासाठी संपर्क क्रमांक - 9823985351
kalidasmsw@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment