‘लुकिंग फॉर मिस सरगम’ : संगीतक्षेत्रातील शोषणाच्या कथा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
वासंती दामले
  • ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि गायिका-लेखिका शुभा मुदगल
  • Thu , 11 June 2020
  • ग्रंथनामा दखलपात्र लुकिंग फॉर मिस सरगम Looking for Miss Sargam शुभा मुदगल shubha mudgal

शुभा मुदगल या शास्त्रीय संगीताच्या, सुफी संगीताच्या व सुगम संगीताच्या जाणकार. संगीतक्षेत्रातील त्यांच्या संशोधनपर लिखाणाची माहितीही होती. त्यामुळे त्यांच्या संगीतक्षेत्राशी संबंधित कथासंग्रहाची माहिती मिळाल्यावर वाचण्याची उत्सुकता वाटली. त्यांच्या ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ या कथासंग्रहातील सातही कथा संगीतात करिअर करणाऱ्याने किंवा त्यात गम्य असणाऱ्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजेत. आपल्याला वाटत असतं की, संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्यानं खूप रियाज करून आपल्या सुरांना लखलखीत, धारदार बनवलं की, यश त्याच्या/तिच्या मागेमागे येईल. गाण्यातला रियाज करून जाणकारांमध्ये मान्यता मिळाल्यानंतरही या क्षेत्रात किती शोषण असू शकतं, याचं चित्रण या पुस्तकात लेखिकेनं केलं आहे.

या पुस्तकातील शोषणाचे प्रकार लेखिकेच्या अनुभवांवर व निरीक्षणांवर आधारित आहेत, यात काही शंका नाही. यात लेखिकेने जे सांगितले आहे, त्याचे पुरावे असणं शक्य नाही; पण वाचताना आपल्याला मनोमन पटतं की, हे सर्व सत्य आहे. कारण अत्यंत बारकाईनं निरीक्षणं आलेली आहेत. असं शोषण जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात होतं, हे आपल्याला माहीत असतं. संगीतक्षेत्रातल्याही थोड्याबहुत गोष्टी आपल्या कानावर आलेल्या असतात, पण तरीही या पुस्तकाचं महत्त्व अनेक कारणांमुळे वाटतं. कारण नव्या कलाकाराला यातून एक सावधगिरीचा संदेश मिळू शकतो.  

या पुस्तकात एकंदर सात कथा आहेत. यातील प्रत्येक कथेतून शोषणाचा एक वेगळा पैलू आपल्या समोर येतो. पहिली कथा आहे- ‘अमन बोल’ नावाची. श्वेता बन्सल ही कथानायिका कॉर्पोरेट क्षेत्रातील नमुनेदार व्यक्ती आहे. गोडबोली, खमकी, पण छाप पडेल असं व्यक्तिमत्त्व नसलेली, मात्र बेधडकपणे स्वतःचं काम करवून घेऊ शकणारी. कॉर्पोरेटमध्ये अशा व्यक्ती आपल्याला दिसतात. भारत व पाकिस्तानातील काळाच्या ओघात मागे पडलेल्या दोन गायकांच्या इगोला कुरवाळत ती त्यांच्याकडून स्वस्तात गाऊन घेते, याचं वेधक वर्णन या कथेत आहे. ते दोघंही स्वत:च्या स्वार्थाचा हिशोब करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.

दुसरी गोष्ट आहे – ‘फॉरेन रिटर्न’. यातील आसावरी आपटे यशस्वी शास्त्रीय संगीत गायिका आहे. सर्वसाधारणपणे लोकांना वाटत असतं की, परदेशी आमंत्रणं आली की, कलाकार भरपूर बिदागी कमावून येतात. शिवाय नाव पण होतं. उत्तम गाणाऱ्या आसावरीचीही तीव्र इच्छा असते की, आपणही कुठेतरी परदेशी जावं. सरकारी यंत्रणेतर्फे जाण्याचा ती प्रयत्न करते, पण त्यातील खाचखळगे काही काळानं तिच्या लक्षात येऊन ती आपली इच्छा खोलवर गाडून टाकते. काही काळानं तिच्याकडे रियाजासाठी येणारा तबलजी तिला आशा दाखवतो आणि ती अमेरिकेला जाते. तिथले तिचे अनुभव वाचत असताना अंगावर काटा उभा येतो.

‘तान कप्तान’ ही मीरतसारख्या छोट्या शहरातील एका छोट्या गायकाला एक लबाड, पण चतुर व्यावसायिक त्याच्या छोट्या आकांक्षांना फुलवत कसा गंडा घालतो, याची कथा आहे. लेखिकेने मिरतवासी गायकाचं छोटेपण, त्याची दडलेली महत्त्वाकांक्षा, पण त्याच वेळी त्याचा साधाभोळा स्वभाव, हे सर्व वेगवेगळ्या घटनांतून उत्तम प्रकारे उभं केलं आहे.

सध्या सगळ्याच म्युझिक कंपन्यांवर कठीण वेळ आली आहे. टिकून रहायचं असेल तर नव्या पिढीला आवडेल असं संगीत दिलं पाहिजे, असं त्यांना सतत ऐकवलं जात असणार. नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांत हे बदल झपाट्यानं झाले आहेत. कंपनीतील वरिष्ठांनाही हे मनोमन जाणवतं. म्हणून ते दोन तरुण ‘संगीतकारां’ना आपल्या मिटिंगला आमंत्रित करतात. ते आपल्या कल्पना या वरिष्ठांसमोर मांडणार असतात. आणखी एक तरुण, ज्याला संगीतात आई-वडिलांनी करिअर करू दिलेलं नसतं, तो निदान संगीतक्षेत्रात नोकरी करण्याच्या उद्देशानं आमंत्रित असतो. त्या बैठकीत ते तरुण संगीतकार अशा काही भन्नाट कल्पना वरिष्ठांसमोर ठेवतात की, ते सर्व वरिष्ठांच्या आकलनापलीकडचं ठरतं. हे सर्वच जण एका परंपरेत, एका संस्कृतीत वाढलेले असतात, त्यांना ‘ना आगा ना पीछा’ पद्धतीचं संगीत उमजत नाही. लेखिकेलाही या नव्या संगीताबद्दल सहानुभूती नाही हे कळतं. संगीतक्षेत्रात नोकरी करण्यासाठी आलेला तो तरुण, त्याच्या समोर घडलेला सगळा ड्रामा बघून या क्षेत्रात नोकरी करायची नाही, हा निर्णय घेतो. म्हणून कथेचं नाव आहे – ‘फेअरवेल टू म्युझिक’.

याच्या पुढली कथा ‘पद्मश्री’ मिळवण्यासाठी एका तबलजीची धडपड चित्रित करते. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून दिल्लीला आलेला तबलजी मंझूर रहमानी बऱ्यापैकी संगत करणारा तबलजी झालेला असतो. आयुष्यात त्याची एकच इच्छा बाकी असते की, आपल्याला ‘पद्मश्री’ मिळावी. म्हणजे गावात एकमेव ‘पद्मश्री’वाला म्हणून मिरवता येईल. त्यासाठीची त्याची चाललेली धडपड आणि झालेली फसगत आपल्याला चटका लावून जाते.

सिनेमासृष्टीत स्वत:ला महान समजणारे निर्माते बरेच असतात. त्यापैकी एक निर्माता गायिकेसमोर मोठा आढ्यताखोर प्रस्ताव ठेवतो की, त्याच्या नव्या सिनेमासाठी नुकताच तिने - जो अल्बम उत्तर प्रदेशातील लग्नाच्या गाण्यांचा रेकॉर्ड केलेला असतो त्यापैकी - एक गाणं गावं. ही गाणी शोधण्यासाठी त्या गायिकेने खूप मेहनत घेतलेली असते. गाणी पारंपरिक असली तरी तिला ती कुणीतरी विश्वासानं दिलेली असतात. ती जेव्हा या बाबतीतील परवानग्या, तिची बिदागी वगैरे व्यावसायिक बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा निर्मात्याचा अहंकार दुखावला जातो. ‘ ‘मी स्टार्स बनवतो’ मला असे प्रश्न कोण विचारू शकतं? कुणीही माझ्याशी पैशाच्या गोष्टी करत नाही,’ असं तो बोलतो. त्याला तिच्याकडून फुकटात गाऊन घ्यायचं असतं. ती नम्र नकार देते.

शेवटची गोष्ट ही अशीच नवोदित गायक शिवेन्द्रच्या वेगळ्या तऱ्हेच्या फसवणुकीबद्दल आहे.

सर्वच कथांबद्दल सांगणं या परिचयात्मक लेखात आवश्यक नाही, पण या सर्व कथा वेगवेगळ्या असल्यानं त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगावंसं वाटलं. शिवाय विषय अतिशय वेगळा आहे. यातील फसवले गेलेले नायक-नायिका साधे आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते. लेखिकेचं निरीक्षण दांडगं आहेच, पण कथा फुलवण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व कथांना निराळी रंगत देतं.

या पुस्तकाचं शीर्षक ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ असं आहे. ही ‘मिस सरगम’ अनेक कथांतून डोकावतं, पण तिची कुठलीच कथा नाही, पण खरं तर आहेही.

लुकिंग फॉर मिस सरगम : स्टोरीज ऑफ म्युझिक अँड मिसअ‍ॅडव्हेंचर - शुभा मुदगल

स्पिकिंग टायगर, नवी दिल्ली, २०१९.

पाने – २०५,  मूल्य – ४९९ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखिका वासंती दामले मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......