‘हां, ये मुमकिन है’ : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. प्रताप विमल केशव
  • डॉ. तरु जिंदल आणि त्यांच्या इंग्रजी व मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Wed , 10 June 2020
  • ग्रंथनामा शिफारस तरु जिंदल Taru Jindal हां ये मुमकिन है A Doctor's Experiments in Bihar

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तळमळीनं काम करणार्‍या डॉ. तरु जिंदल या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने ‘हां, ये मुमकिन है : एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात जे चित्र उभे केले आहे ते विस्मित करणारे आहे. डॉ. जिंदल यांनी दोन वर्षं बिहारमध्ये मागास भागात काम करताना जे अनुभवले, परिस्थितीत बदल घडवण्यासाठी जे प्रयत्न केले, ज्या आव्हांनाचा सामना केला आणि जे बदल घडवून आणले, याचा प्रवास म्हणजे हे पुस्तक.

या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात दुष्काळासाठी कुख्यात असलेल्या मोतीहारी जिल्हा रुग्णालयात केलेले काम व अनुभव आणि दुसर्‍या भागात मसाढी (पटना जिल्ह्यातील एका गाव) येथील काम व अनुभव. या दोन्ही भागात डॉ. जिंदल यांनी बिहारमधील अनुभवांबरोबरच स्वत:ची जडणघडण, कुटुंब, पती-घर-संसार, वैद्यकीय शिक्षण घेतानाचे अनुभव यांचाही आढावा घेतला आहे. या दोन्ही भागांना जोडणारा मधला दुवा म्हणजे नेपाळ भूकंपाच्या वेळी त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव.

भाग एक - मुक्काम मोतीहारी

भारतात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या दृस्तीने मागासलेल्या राज्यांचं वर्गीकरण करताना ‘बिमारू’ हा शब्दप्रयोग केला जातो. हा शब्द बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांसाठी वापरला जातो. डॉ. रवीकान्त सिंह यांची ‘डॉक्टर फॉर यू’ ही स्वयंसेवी संस्था अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. ही संस्था बिहार सरकारबरोबर विविध आरोग्य प्रकल्पांच्या माध्यमातून जोडली गेली आहे. डॉ. जिंदल यांनी या ‘बीमारू’ राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या बिहार राज्यातल्या अत्यंत मागासलेल्या मोतीहारी जिल्ह्याची निवड एक आव्हान म्हणून केली. त्यांनी ‘डॉक्टर फॉर यू’ या एनजीओच्या ‘गायनाकोलॉजिस्ट कन्सल्टंट’ म्हणून तिथल्या शासकीय रुग्णालयात काम २०१४ साली काम सुरुवात केली. त्या अगोदरची त्यांची दहा वर्षं मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेण्यात (पदव्युत्तर शिक्षण सायन हॉस्पिटलमधून झाले) गेली. त्यांच्यावर वैद्यकीय शिक्षण घेत असल्यापासून ‘सेवांकुर’ या संस्थेचा प्रभाव होता.

दवाखान्याची परिस्थिती अतिशय वाईट असते आणि त्याचा परिणाम रुग्णासेवेवर होत असतो. वॉर्डबॉय, परिचारिका व डॉक्टर्स काम करण्यास इच्छुक नाहीत, हे समजल्यावर काही काळ डॉ. जिंदल नैराश्यग्रस्तही होतात. पण काही चांगले काम करता येते का, याचे पर्यायही शोधतात.

शंभर वर्षांपूर्वी मोतीहारी जिल्ह्यातील चंपारण भागात तेव्हा पन्नाशीत असलेल्या महात्मा गांधींनी नीळ उत्पादक शेतकर्‍यांसाठी इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह केला होता. गांधींच्या याच पावलावर पाऊल टाकत ही ३० वर्षांची तरुण डॉक्टर पडझड झालेल्या आरोग्यव्यवस्थेत ‘लहानसा बदल’ करण्यासाठी कामाला लागते. जाड कातडीच्या व्यवस्थेविरुद्ध लढ्याची सुरुवात स्वतःपासून करते आणि तीही सत्याग्रहाच्या मार्गाने. डॉ. जिंदल स्वच्छतेसाठी स्वतःच्या हातात झाड़ू घेतात, तेव्हा लाजून दवाखान्यातील स्वच्छता कर्मचारी मदतीला येतात.

डॉ. जिंदल एका बाळंतीणीचा जीव अतिशय मेहनतीनं वाचवतात, तेव्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ आश्चर्यचकित होऊन पाहत राहतो. डॉ. जिंदल रुग्णालयात छोटे-छोटे बदल करायला सुरू करतात, त्यातून कर्मचारी वर्गात आत्मविश्वास निर्माण होत जातो. त्यांचे प्रत्यक्ष काम बघून नर्स व दवाखान्याचे प्रशासक सोबतीला येतात आणि रुग्णालयाचे रूप पालटून लागते.

मोतीहारी जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या सोबत असलेला शिकाऊ आयएएस अधिकारी यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली. पण हॉस्पिटलमधील स्वच्छताकर्मी, वॉर्डबॉय, मावशी, परिचारिका, डॉक्टर व इतर कार्यालयीन कर्मचारी वर्ग यांची एकत्र मोट बांधण्याचं सर्वांत अवघड काम डॉ. जिंदल यांनी यशस्वीपणे केलं. त्यांना सुरुवातीला दवाखान्यातल्या डॉक्टरांचा अल्प प्रतिसाद मिळतो. तेव्हा त्या सामान्य प्रसूती करण्याचं प्रशिक्षण नर्सला देतात. त्यामुळे प्रसुतीकक्षाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन रुग्णालयाबद्द्ल लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार होतं. नॉर्मल डिलिवरीचं प्रमाण वाढतं. डॉ. जिंदल यांनी फक्त सहा महिने मोतीहारी जिल्हा रुग्णालयात काम केलं. पण त्यातून जो पायंडा पाडला गेला, त्याचं फळ म्हणून त्या रुग्णालयाला तीन वर्षांनी बिहारमधील सर्वांत चांगले सरकारी रुग्णालय म्हणून केंद्र सरकारचा ‘कायाकल्प’ पुरस्कार मिळाला.

मोतीहारीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. जिंदल यांची सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करण्याची तळमळ बघून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणार्‍या ‘आशा’ कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्याचंही सविस्तर रोचक वर्णन या पुस्तकात आहे. त्यांच्या या कामामुळे गरोदर मातांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत झाली. बिहारच्या सांस्कृतिक रूढी-परंपरांचा जनतेच्या आरोग्यशी कसा संबंध आहे, हेही त्यांनी नमूद केलं आहे.

भाग दोन - मुक्काम पोस्ट मसाढ़ी

डॉ. जिंदल मोतीहारीमधील प्रकल्प संपल्यावर महाराष्ट्रात परत येतात आणि तीन-चार महिने महात्मा गांधी मेडिकल कॉलेज सेवाग्राम, वर्धा येथे अध्यापनाचे काम करतात. पण या काळात बिहारमधील आरोग्य समस्या त्यांना अस्वस्थ करत राहतात. परिणामी त्या पुन्हा बिहारला जाण्याचा निर्णय घेतात. या वेळी त्या काम करण्यासाठी मसाढ़ी हे गाव निवडतात. हे गाव बिहारची राजधानी असलेल्या पटनापासून फक्त २५ किलोमीटरच्या अंतरावर असलं तरी विकासापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचा अनुभव डॉ. जिंदल यांना येतो. गांधीजीनी सांगितलं होतं- ‘गावाकडे चला’ व डॉ. आंबेडकरांनी सांगितलं होतं- ‘शहराकडे चला’. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांमधील विरोधाभासासोबत डॉ. जिंदल काम करताना ‘स्व’चा अर्थ शोधतात आणि तो ‘स्व’ अजून मोठा करण्याचा प्रयत्न करतात.

डॉ. जिंदल मुंबईतून बिहारमधील मसाढ़ी या गावात गेल्या, पण या गावातील शेकडो लोक कामासाठी मुंबईसारख्या महानगरांमध्ये गेले होते. त्यांना गावात आरोग्य केंद्र उभारत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘डॉक्टर फॉर यू’चे डॉ. रवीकान्त सिंह काही दानशूर लोकांकडून आर्थिक मदत मिळवतात आणि आपलं तीन मजली घर आरोग्यकेंद्र चालवण्यासाठी देतात.

ग्रामीण भागातील प्रत्यक्ष काम करताना मिळालेल्या अनुभावातून डॉ. जिंदल यांना हे समजतं की, आरोग्य समस्या या पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था, सरंजामी व आर्थिक परिस्थितीच्या उपज असतात. गावातील गरोदर मातांचा प्रश्न, बाळंतपण व मुलांचं कुपोषण याबाबतचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. या व्यतिरिक्त त्या गावातील इतर साधारण रुग्णही (वैद्यकीय भाषेत याला ‘जनरल प्रॅक्टिस’ असं म्हणतात) पाहत असतात. हातात झाड़ू घेऊन गाव स्वच्छ करतात, सामूहिक शेतीतून भाजीपाला पिकवतात. या सर्व कामांतून त्या गावातील लोकांचा विश्वास जिंकतात.

डॉ. जिंदल यांना ग्रामीण भागातील अमानवी व विषमतावादी जातीभेदाचा वाईट अनुभव येतो. त्यांची एक जमेची बाजू ही होती की, त्या सवर्ण होत्या. अन्यथा त्यांना आधीच वेगळ्याच प्रश्नांना भिडावं लागलं असतं. गावातील अनेक सांस्कृतिक बारकावे समजून घेऊन, त्या संस्कृतीविषयीचे आपले मतभेद कायम ठेवून त्या गावाशी एकरूप होतात. येणार्‍या रुग्णाच्या घरी जाऊन त्याची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती समजून घेतात आणि त्यानुसार गावातील जनतेसमोर प्रश्न हाताळण्यासाठी पर्याय उभा करतात. यालाच वैद्यकशास्त्रात ‘कम्युनिटी फिजीशियन’ असं म्हणतात.

मसाढ़ीतील आरोग्यकेंद्रात काम करताना ‘जनस्वास्थ्य सहयोग’ (बिलासपुर), ‘स्वस्थ स्वराज’ (कालाहांडी-ओड़ीशा), ‘सर्च’ (गडचिरोली) किंवा ‘जामखेड़’ (अहमदनगर)चे आरोग्याचे मॉडेल उपयोगी पडत होते. पण प्रत्येक ठिकाणी सामाजिक व आर्थिक परिस्थिती वेगळी असते, तशीच तिथेही होती. त्यामुळे सध्याच्या बदललेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीत डॉ. जिंदल अतिशय कष्टाने ‘मसाढ़ी’ मॉडेल उभं करतात.

नेपाळमध्ये भूकंप झाला तेव्हा डॉ. जिंदल आरोग्यपथकाच्या माध्यमातून तिथंही मदतकार्य करण्यासाठी जातात. नेपाळने अतिशय प्रभावी शासकीय आरोग्य यंत्रणा व काम करणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून जनतेला आरोग्यसेवा पुरवल्याचं वर्णन या पुस्तकात डॉ. जिंदल यांनी केलं आहे. वैद्यकीय शिक्षणात ‘प्रिवेंटिव्ह सोशल मेडिसिन’ (पीएसएम) नावाचा विषय असतो. त्याच्या पहिल्याच धड्यात डॉ. विर्चोचं वाक्य आहे - ‘Medicine is social science and politics is medicine on large scale.’ (वैद्यकीयशास्त्र हे समाजशास्त्र आहे. राजकारण हा मोठ्या पातळीवरील उपचार आहे). नेपाळमध्ये सत्तांतर होऊन कम्युनिस्ट सरकार सत्तेत आलं आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत चांगले बदल झाले, याची प्रचिती डॉ. जिंदल यांना आली.

‘मसाढ़ी’ मॉडल विकसित होत असताना नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी मंजूर होतं. डॉ. जिंदल यांना पिट्यूटरी ट्यूमर या कष्टसाध्य आजारानं ग्रासलं. त्यामुळे अत्यंत मेहनतीनं उभं केलेलं काम अर्धवट सोडून उपचारासाठी त्यांना उपचारासाठी मुंबईला परत यावं लागलं. या आजारातून त्या लवकर बऱ्या होवोत ही सदिच्छा.

ग्रामीण भागात काम करू इच्छिणार्‍या सेवाभावी डॉक्टरांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खासकरून महिलांना या पुस्तकातील अनुभव समृद्ध करतो आणि प्रेरणाही देतो. रमा हर्डीकर – सखदेव यांनी या पुस्तकाचा सुबोध मराठी अनुवाद केला आहे.

..................................................................................................................................................................

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष : ‘हां, ये मुमकिन है’ – डॉ. तरु डॉ. जिंदल

अनुवाद : रमा हर्डीकर – सखदेव

रोहन प्रकाशन, पुणे

पाने – २८६, मूल्य – ३२५ रुपये.

..................................................................................................................................................................

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष : ‘हां, ये मुमकिन है’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5203/Haan-Ye-mumkin-Hain

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. प्रताप विमल केशव डॉक्टर आहेत.

pratap20s@yahoo.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......