श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललितलेखनावर आधारित अभिवाचनाची भन्नाट व्हिडिओ-मालिका
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 29 May 2020
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो श्रीनिवास विनायक कुलकर्णी Shrinivas Vinayak Kulkarni डोह Doh डोह : एक आकलन Doh - Ek Akalan

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक आहेत. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. नुकतेच त्यांच्या ‘डोह’ या पुस्तकाविषयीचे ‘डोह : एक आकलन’ हे विजया चौधरी यांनी संपादित केलेले पुस्तक मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केले आहे. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या पुस्तकाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘पाण्याचे पंख’ या पुस्तकांबद्दल दुर्गाबाई भागवत यांनी १९८९च्या ललितच्या दिवाळी अंकात लिहिले आहे - “श्रीनिवास कुलकर्णी यांची प्रतिमा त्यांच्या जीवनातल्या अनुभवांच्या नितळपणावर आधारलेली आहे.

- जरा वळुनि पाहता मागुती

कितीक हृदये सदा चरकल्याविना राहती

ही केशवसुतांची उक्ती एकदा वाचल्यावर विसरता येणार नाही अशी; जरब जन्मभर मनामनावर बसवणारी. माणसाला धोक्याचा कंदील दाखवावा तर केशवसुतांनीच. भले भले या चरकण्याच्या अनुभवातून पिळून निघाले आहेत नि हमेशा निघताना मी पाहते आहे. पण अशीही काही व्यक्तिमत्त्वे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत, की त्यांना चरकावे लागतच नाही. ही पारदर्शक वाटावीत इतकी स्वच्छ माणसे आहेत. ही काही कुणी सुप्रसिद्ध नाहीत हे ओघानेच आले. पण ती सामान्यांच्या जगात आहेत नि ती आहेत म्हणूनच आपल्याला सुख वाटते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी अशांपैकीच एक आहेत. अंतर्बाह्य एक, लाजवट वृत्तीचे. पक्क्या निश्चयाचे. चिंतन, जीवन नि लेखन एकरूप झालेले. म्हणूनच त्यांच्या लेखनावर लिहिणे सोपे नाही. इतके दिवस मला म्हणूनच काही लिहिता आले नाही. आजही त्यांच्या लेखनप्रपंचाला केवळ स्पर्श करत मी हे लिहिते आहे. गाभ्यापर्यंत पोहोचणे मला अजून जमत नाही; कारण गाभ्याजवळ गेले की, तिथे अनेक अनुभवी आत्म्यांची गर्दी दिसते. तिच्यात हरवून जाते.”

अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार उजागर करण्याचा प्रयत्न २०१३ साली हिमांशू स्मार्त या नाटककाराने कालदर्शिकेच्या माध्यमातून केला होता. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा महिने, प्रत्येक महिन्याला सुसंगत असा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातील उतारा आणि या दोन्हींचा आशय अजून घन करणारी रिचा वोरा या चित्रकर्तीची पेंटिंग्ज, असा हा अफलातून प्रयोग होता.

त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना या कालदर्शिकेच्या प्रकाशकांनी म्हटलं आहे की, “ऋतुमानानुसार बदलत जाणारी निसर्गसृष्टी आणि तिच्याशी असणारे मानवी जीवनाचे संवादी अनुसंधान हा श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या लेखनामधला एक प्रबळ धागा आहे. वर्तमानात आपण या सृष्टीपासून विलग झालेलो आहोत. ही कालदर्शिका आपल्याला खिडकीबाहेर पसरलेल्या ऋतुशी जोडून टाकेल आणि त्यातला उतारा ऋतुचा अनुभव अधिकच समृद्ध करेल. प्रत्येक वेळी उतरा ऋतुशी संबंधित असेलच असे नाही, परंतु उताऱ्याची ऊर्जा घेऊन आपण सृष्टीशी, तळठाव घेणारा, आत्मिक सांधा जोडू शकू. आमचा हा प्रयत्न सृष्टीची हाक आणि आपले अंत:करण यांमधला दुवा ठरेल अशी आम्हाला आशा आहे.”

मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग होता.

आता ‘सृजनशाळा’ या संस्थेने हाच प्रयोग काहीशा वेगळ्या अंगाने पुन्हा सादर केला आहे. २५ एप्रिल ते २८ मे २०२० या दरम्यान दर तीन दिवसांनी या संस्थेने एक व्हिडिओ आपल्या यु-ट्युब चॅनेलवर प्रकाशित केला आहे. हे व्हिडिओ अभिवाचनाचे आहेत. वेगवेगळ्या १२ कलाकारांनी हे अभिवाचन केले आहे. यातील साहित्य निवडले आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातून. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या बारा महिन्यांच्या अनुषंगाने कुलकर्णी यांच्या साहित्यातील लेखनाचे अंश निवडून त्यांचं अभिवाचन करण्याची ही कल्पना ‘कालदर्शिके’च्या कल्पनेसारखीच, किंबहुना त्याहून भन्नाट आहे.

प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हिमांशू स्मार्त यांच्या कालदर्शिकेतील पेंटिंग व मजकुराचं पानही दिलं आहे. हे बाराही व्हिडिओ दीड ते अडीच मिनिट एवढ्या कालावधीचे आहेत. कोल्हापूरचे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सृजनशाळा यांचा हा कल्पक प्रयोग आवर्जून पाहावा, इतरांशी शेअर करावा असाच आहे. हे अभिवाचन हा समीक्षेचा विषय नाही, तो अनुभवण्याचा आहे.

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ‘खिडकी’ हेच आपल्या जगण्याचं, आनंदाचं निधान झालं आहे. खिडकीबाहेर प्रत्येक ऋतुत नवी रूप पांघरणारी सृष्टी नेमकी कशी असते, याचं विलोभनीय दर्शन या व्हिडिओमधून होतं... तेही प्रत्येक मराठी महिन्यानुसार...

प्रत्येक महिन्यानुसारच्या व्हिडिओ लिंक्स पुढीलप्रमाणे -

चैत्र

वैशाख

ज्येष्ठ

आषाढ

श्रावण

भाद्रपद

अश्विन

कार्तिक

मार्गशीर्ष

पौष

माघ

फाल्गुन

..................................................................................................................................................................  

‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan

..................................................................................................................................................................  

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................  

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......