स्मगलर किंग बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकली तेव्हा...
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया
  • Fri , 29 May 2020
  • पडघम माध्यमनामा सुकुर नारायण बाखिया Sukur Narain Bakhia

अडतीस वर्षांपूर्वी बरोबर या दिवशी म्हणजे २९ मे  १९८२ रोजी गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेल्या फोर्ट आग्वादमध्ये एक खूप नाट्यमय घटना घडली होती. शनिवारी रात्री घडलेल्या त्या घटनेची पूर्वतयारी निश्चितच काही दिवस किंवा काही तास आधी करण्यात आली होती. अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या फोर्ट आग्वादच्या मोठ्या बुरुजाजवळ आणि आसपासच्या परिसरात रविवारी पहाटेपर्यंत कुणीही नव्हतं. नाही तरी १९८०च्या दशकात फोर्ट आग्वादपाशी तशी वस्तीही नव्हती आणि लोकांची वर्दळ तर अजिबात नव्हती. शनिवारी रात्रीच्या अंधारातच एक अगदी मोठ्या किमतीचं पाखरू पिंजऱ्यातून अलगद उडून पसार झालं होतं. फोर्ट आग्वाद तुरुंगात, तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि मुख्य म्हणजे तुरुंगाच्या मागच्या उंच बुरुजापाशी त्या चोवीस तासांत काय शिजत होतं वा सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काय खडाजंगी होत होत्या, ते गोव्यातील आम्हा पत्रकारांना रविवारी आख्ख्या दिवसभर कळालंही नव्हतं.

सोमवारच्या म्हणजे ३१ मे १९८२च्या अंकात ‘दमणचा स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया याचे फोर्ट आग्वाद तुरुंगातून पलायन’ अशी दैनिक ‘गोमंतक’ने आठ कलमी बातमी देऊन सर्वांना धक्का दिला होता. गोमंतकचे वार्ताहर सुरेश काणकोणकर यांनी दिलेली ती ‘एक्स्ल्युझिव्ह’ बातमी होती.

पणजी येथील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून मी वर्षभरापूर्वी रुजू झालो होतो. आमच्या  दैनिकातील इतर दोन ज्येष्ठ बातमीदार २० वर्षं या क्षेत्रात होते. मी  नुकतंच विशीत पदार्पण केलं होतं, तर ते दोघं पंचेचाळीसच्या आसपास होते. नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मला तोपर्यंत मिळालं नव्हतं. दरमहा साडेतीनशे रुपये पगार व्हॉउचरवर मिळायचा, म्हणजे इतरांसारखा न्या. पालेकर वेतन आयोगानुसार पगार मला अजून मिळत नव्हता. त्यामुळे तेथील बातमीदारीत मला तेव्हा लिंबूटिंबूचंच स्थान होतं.

आदल्या दिवशी म्हणजे रविवारी दोन्ही ज्येष्ठ बातमीदारांपैकी एकजण साप्ताहिक सुट्टीवर होते. मी रविवारी कामावर होतो, तरी नेहमीप्रमाणे नसल्यासारखाच होतो. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मी ऑफिसला आलो, आमचा पेपर वाचला. गोमंतक, नवप्रभा आणि मडगावहून प्रसिद्ध होणारे ‘राष्ट्रमत’ ही मराठी दैनिकं चाळली. तोपर्यंत आमच्या ऑफिसातील सन्नाटा आणि तणाव माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता. मुख्य संपादक बिक्रम व्होरा, वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार आणि ते दोन ज्येष्ठ वार्ताहर यांच्यात काय गरमागरम चर्चा झाली, ते मला कळणं शक्य नव्हतं.

दुपारी डेस्कवरचे, समवयस्क सहकारी आणि इतर कर्मचारी येऊ लागले, तेव्हाच ऑफिसातील तापलेल्या वातावरणाची मला जाणीव झाली. त्या काळात गोवा, दमण आणि दीव एक केंद्रशासित प्रदेश होता. सुकुर नारायण बाखिया हा दमण येथील स्मगलर मुंबईतील हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार आणि करीम लाला यांच्याबरोबरीनं तस्करी जगात दरारा राखून होता. आखाती आणि इतर देशांतून समुद्रमार्गानं सोन्याची तस्करी हा त्यांचा एकमेव उद्योग असायचा. दाऊद  इब्राहिम, अरुण गवळी वगैरे डॉन यांचा तोपर्यंत उदय झाला नव्हता. आपल्याला कोणी पकडू शकत नाही, कारण आपल्यावर कुठलेच आरोप नाहीत, कुठलेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत, अशी दर्पोक्ती मिरवणाऱ्या बाखियाला दोन महिन्यांपूर्वीच अटक करण्यात गोवा पोलिसांना यश मिळालं होतं. Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्यांतर्गत बाखियाला अटक करण्यात आली होती.

पोर्तुगीजांच्या गोव्यातील राजवटीत मोठे गुन्हेगार आणि गोवा मुक्तीसाठी झगडणारे गोव्यातील आणि भारतातील राजकीय नेते याच हाय सेक्युरिटी तुरुंगात डांबले जात असत. गोवामुक्तीसाठी भारतातील कार्यकर्त्यांची तुकडी घेऊन गोव्याच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये वगैरे समाजवादी नेत्यांना १९५५च्या नंतर या फोर्ट आग्वाद तुरुंगातच दीर्घ कारावासात ठेवण्यात आले होते. गोवा सोडून मी पुण्याला स्थायिक झालो आणि १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला नानासाहेब आणि शिरुभाऊंच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा या दोघांनीही फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या करावासातील आपल्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘गोमंतक’ने तसेच औरंगाबादच्या दैनिक ‘मराठवाडा’च्या रविवारच्या पुरवणीत जयदेव डोळे यांनी त्या मुलाखती प्रसिद्ध केल्या होत्या.

तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाच्या पलायनामागे फार मोठं नाट्य घडलं होतं. हे पलायन ही गोव्यासाठीच नव्हे तर मुंबई आणि संपूर्ण देशासाठी मोठी खळबळजनक आणि सनसनाटी बातमी होती. दुदैवानं डेम्पो उद्योगसमूहाच्या मालकीच्या असलेल्या आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ आणि मराठी जुळं भावंड ‘नवप्रभा’ या दैनिकांत यासंदर्भात एकही ओळ छापून आली नव्हती! आमची खूपच नाचक्की झाली होती.

या स्मगलर किंगच्या पलायनामागचा कालक्रम आणि त्यातील नाट्य नंतर काही दिवसानंतर हळूहळू उलघडत गेलं.

बाखियाने आपल्या अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याला तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे नाहीत असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे बाखियाची सुटका होणं अटळ होतं. मात्र बाखियासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर तो सोडणं गोवा पोलिसांच्या अगदी जीवावर आलं होतं. त्याशिवाय गुजरात पोलिसांनाही अनायासे प्रगट झालेला हा स्मगलर आपल्या ताब्यात घ्यायचा  होता. त्यामुळे अटक वॉरंट घेऊन गुजरात पोलिसांची एक तुकडी शनिवार २९ मे १९८२ रोजी फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य दरवाजापाशी बाखियाची वाट पाहत ठाण मांडून होती.

मात्र फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांनी बाखियाला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यास आधी सरळसरळ ठाम नकार दिला आणि त्यानंतर  टाळाटाळ करायला सुरुवात केली. बाखियाला सोडण्यासाठी आवश्यक असलेली गोवा प्रशासनाची रिलीज ऑर्डर अजून आपल्याकडे आली नाही, असं तुरुंगाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. गुजरातच्या पोलिसांना तुरुंगात येऊन बाखियाला ताब्यात घेण्याची मागणी फेटाळण्यास आली. त्यासाठी कोर्टाची ट्रान्सफर ऑर्डर असायला हवी होती, असा दुसरा आक्षेप होता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 कायद्यांतर्गंत तुरुंगात असलेल्या काहींची सुटका करण्यात आली. मात्र सुटका झालेल्या त्या कैद्यांमध्ये बाखिया नव्हता! गुजरातच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली, तेव्हा बाखियाची कधीच सुटका करण्यात आली आहे, असं तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगून बॉम्बगोळा टाकला आणि आपले हात झटकले!!

तुरुंगाधिकाऱ्यांच्या त्या घोषणेनं मोठा हल्लाकल्लोळ माजला. बाखिया कधी आणि कसा बाहेर पडला, तो आता कुठे आहे, याविषयी कुणालाच काहीही माहिती नव्हती. गुजरात पोलिसांबरोबरच गोवा पोलीस अधिकारीसुद्धा याविषयी पूर्ण अंधारात होते.

नंतर उघडकीस आलेली माहिती आताच्या टीव्ही चॅनेलच्या भाषेत बोलायची झाल्यास अत्यंत धक्कादायक होती. शनिवारी रात्रीच फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांच्या संगनमतानं बाखियाला तुरुंगाच्या एका बाजूला नेऊन तिथं शिडी लावून त्या किल्ल्याच्या बुरुजाच्या बाहेर जाण्यास मदत करण्यात आली होती. तुरुंगाबाहेर वाट पाहत असलेल्या एका टॅक्सीनं बाखिया कळंगुट बिचवर पोहोचला. तेथून एका छोट्याशा नावेनं प्रवास करत एका ठिकाणी रात्रभर मुक्काम करून तो अज्ञातस्थळी रवाना झाला.

जवळजवळ चोवीस तास घडत असलेल्या या नाट्यमय घडामोडींनी रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान गोवा प्रशासन आणि पोलीस खातं अगदी खडबडून जागं झालं. रविवार सुट्टीचा दिवस असूनही सरकारी वरिष्ठ अधिकारी बाखियाचं नेमकं झालं काय याची चौकशी करत होते.

आणि या खळबळजनक घडामोडींचा बहुधा रविवार असल्यानं गोव्यातील आम्हा पत्रकारांना मात्र थांगपत्ताही नव्हता. रविवारी निम्मे पत्रकार साप्ताहिक सुट्टीवर होते आणि ड्युटीवर असलेले पत्रकार आपल्या हातातल्या स्टोरी बँकमधल्या शिल्लक बातम्या देण्यात आणि संध्याकाळी पोलीस राऊंडच्या बातम्यांवर अवलंबून होते. त्या काळात मोजक्याच पत्रकारांकडे लँडलाईन फोन होते. शिवाय कुठल्याही सरकारी वा पोलीस अधिकाऱ्यांकडे सुट्टीच्या दिवशी अगदी किरकोळ चौकशीसाठी फोन करणं शिष्टाचाराला धरून नव्हतं. ते अधिकारी घरी असतीलच वा फोन घेतीलच याची काही शाश्वती नसायची.

नेमक्या याच गोष्टींनी गोव्यातील त्यावेळच्या मोजून चार असलेल्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांच्या बहुसंख्य वार्ताहारांचा घात केला आणि गोमंतकच्या सुरेश काणकोणकर यांना वगळता कुणालाही ही देशपातळीवरची मोठी खळबळजनक घटना कळली नाही! त्यामुळेच गोमंतक वगळता तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाचं पलायन ही बातमी गोव्यातील इतर कुठल्याही दैनिकात नव्हती.

त्या सोमवारी म्हणजे ३१ मे रोजी गोमंतक वगळता इतर दैनिकांच्या कार्यालयात फटाक्यांची किती आतषबाजी झाली याची मला कल्पना नाही. या प्रकरणात गोवा सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्याचाच परिपाक म्हणून बाखियाच्या पलायनानंतर तीन-चार दिवसांतच फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य अधिक्षकांच्या घरी लाचलुचपत खात्यानं धाड टाकली. त्यांच्याकडील लाखभर रोकड रक्कम आणि काही सोनं जप्त करून त्यांना अटक केली. त्या वेळी फोर्ट आग्वाद तुरुंगातच कैदी म्हणून काही महिने राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. मात्र बाखियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आपण कायद्यानुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार कारवाई केली, असाच त्यांचा दावा होता. या प्रकरणात त्यांच्यावर दोषारोप दाखल झाल्याचे वा कुठलीही कारवाई झाल्याचे मला आठवत नाही.

यथावकाश सुकुर नारायण बाखियाला पुन्हा अटक करण्यात आली. काही काळाने स्मगलर हाजी मस्तानप्रमाणेच बाखियानेही गुन्हेगारी जगातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

बाखिया पलायन प्रकरणानंतर मी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये नऊ वर्षं आणि औरंगाबादच्या ‘लोकमत टाइम्स’मध्ये एक वर्ष क्राईम रिपोर्टरची जबाबदारी सांभाळली. मात्र रविवारी आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी क्राईमच्या आणि इतर बातम्या मिळवताना बाखियाचं पलायन आठवून पोटात नेहमी गोळा यायचा. गोव्यात काम आटोपून रात्री घरी जाण्याआधी पोलिसांकडे फोन केल्यावर तिकडून ‘पात्राव, सोगळे शांत असा मरे, आज कायच ना, तू काळजी करू नाका, हांव नायटींक ड्युटीवर असा, कितें गडबड झाल्याक आंव तुका सांगता’ असं उत्तर येऊनही शंकेची पाल कायम चुकचुकायची. घरी लँडलाईन फोन नसल्यानं सायकलनं ताळेगावला रात्री साडेआठला घरी परतल्यावर इतरांशी संपर्क पूर्ण तुटायचा.

त्यातच पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार फरारी चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडल्याची बातमी नेमकी रविवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजता सुदैवानं मला मिळाली होती आणि माझी नोकरी शाबूत राहिली होती!

आजच्या टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या जमान्यात ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी तरुण आणि इतर वयाच्या बातमीदारांचा चाललेला आटापिटा पाहताना स्मगलर किंग सुकुर नारायण बाखियाचं ते पलायन आणि फरारी चार्ल्स शोभराजची रात्री झालेली अटक या दोन्ही बातम्या अनेकदा हमखास आठवतात. 

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......