भगवतीचरण वोहरा : २६ वर्षी शहीद झालेले भगतसिंग यांचे महत्त्वाचे साथीदार
संकीर्ण - श्रद्धांजली
कल्पना पांडे
  • डावीकडे भगवतीचरण वोहरा, उजवीकडे त्यांच्या पत्नी दुर्गावती आणि साथीदार यशपाल
  • Thu , 28 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली भगवतीचरण वोहरा भगतसिंग चन्द्रशेखर आझाद यशपाल सुखदेव

आज २८ मे, क्रांतिकारक भगवतीचरण वोहरा यांचा ९०वा हौताम्य दिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी…

..................................................................................................................................................................

भगतसिंग यांचे महत्त्वाचे साथीदार भगवतीचरण वोहरा यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये ४ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला. ते गुजराती ब्राह्मण होते. त्यांचे वडील पंडित शिवचरण वोहरा रेल्वेत उच्चपदस्थ अधिकारी होते. इंग्रजांनी त्यांना ‘रावसाहेब’ ही मानद पदवी बहाल केली होती. त्या वेळी टंकलेखनाच्या मशीन नसल्याने भगवतीचरणचे आजोबा आग्र्याला उदरनिर्वाहासाठी लिहिण्याचे काम (किताबत) करायचे. त्यांचे पूर्वज गुजरातवरून आगरा आणि तिथून लाहोर येथे येऊन स्थायिक झालेले होते. वोहरा (संस्कृत उद्गम : व्यूह) या आडनावाचा उर्दू अर्थ ‘व्यापारी’ असाही होतो. भगवतीचरण यांचा परिवार लाहोरच्या मुस्लीमबहुल भागात ब्राह्मणी काम सोडून धंदा-व्यवसाय करत असल्याने त्यांचं आडनाव ‘वोहरा’ पडलं असा अंदाज आहे.

भगवतीचरण १९१८ साली फक्त १४ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न पाचवीपर्यंत शिकलेल्या ११ वर्षीय दुर्गावती देवींशी लावून दिलं. विज्ञान विषयांतून इंटर केल्यानंतर भगवतीचरण यांनी असहकार आंदोलनात उडी घेतली. भगतसिंग, सुखदेव आदी या आंदोलनात होते. चौरीचौराच्या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी एकतर्फी पद्धतीनं आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे निराश झालेल्या तरुणांत भगवतीचरणही होते.

त्यानंतर त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली. तिथं त्यांची ओळख भगतसिंग व इतर अनेक सहकार्‍यांशी झाली. ते ‘देशाचे पारतंत्र्य व मुक्तीचे प्रश्न’ या नावानं अभ्यास गट चालवायचे. भगतसिंग व सुखदेव त्याचे प्रमुख सदस्य होते. १९२३ साली ‘नौजवान भारत सभा’ या संघटनेची स्थापना भगतसिंग यांच्या पुढाकारानं करण्यात आली. भगवतीचरण यांना त्याचे प्रचार सचिव नियुक्त करण्यात आलं. नौजवान भारत सभेचं काम लोकांमध्ये क्रांतिकारक विचारांचा प्रसार करणं हे होतं. भगवतीचरण, भगतसिंग, सुखदेव, धन्वंतरी, एहसान इलाही, पिंडीदास सोढी हे सभेचे कार्यक्रम आखण्यापासून सभा करण्यासाठी सतरंज्या लादून फिरणं, टाकणं, उचलणं ही सर्व कामं करायचे.

ही संघटना राजकीय व्याख्यानांव्यतिरिक्त सामाजिक भोज आयोजित करायची. यात सर्व धर्माच्या व जातीच्या लोक बोलावून खिचडीसारखं साधं जेवण सर्वांनी एकत्र बसून, एकमेकांना वाढून खायचं असा कार्यक्रम असायचा. नौजवान भारत सभेने जाणीवपूर्वक ‘वंदे मातरम’, ‘सत-श्री अकाल’, ‘अल्लाहू अकबर’ या धार्मिक छटा असलेल्या घोषणांऐवजी ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘जय हिंद’, ‘हिंदोस्तान जिंदाबाद’ या सर्वसमावेशक व धर्मनिरपेक्ष स्वरूपातल्या घोषणा वापरण्याचं ठरवलं.

गदर आंदोलनात १९१४ साली फाशी देण्यात आलेले क्रांतिकारी कर्तारसिंग सराभा यांचं एक छोटं छायाचित्र भगतसिंग नेहमी आपल्या खिशात ठेवायचे. नौजवान भारत सभेनं एकदा धाडस करून सराभा यांचा स्मृती कार्यक्रम लाहोरच्या ब्रॅडले हॉलमध्ये ठेवला. भगवतीचरण यांनी स्वतःच्या पैशातून छोट्या छायाचित्रापासून त्याचं एक मोठं चित्र बनवून घेतलं. त्या चित्रावर पांढर्‍या रंगाचा खादीचा पडदा लटकवण्यात आला. या वेळी भगवतीचरण यांच्या मुख्य भाषणानं वातावरण भारावून सोडलं. त्यांच्या पत्नी दुर्गावती आणि सुशीला दीदी या नौजवान भारत सभेच्या कार्यकर्तीने आपलं बोट कापून त्याच्या शिंतोड्यानं तो पांढरा पडदा रंगवला आणि मरेपर्यंत स्वातंत्र्यासाठी काम करण्याची शपथ घेतली.   

दुर्गावती यांनी भगवतीचरण वोहरा यांच्या कामात प्रत्येक वेळी साथ दिली. क्रांतिकारक हालचाळींमुळे भगवतीचरण यांना बर्‍याच वेळी फरार व भूमिगत राहावं लागायचं. या काळात त्यांच्या गैरहजेरीतही त्यांच्या घरी आर्थिक व इतर मदतीसाठी क्रांतिकारकांची ये-जा सुरू असायची. या अनोळखी लोकांना येता-जाता पाहणार्‍यांनी दुर्गावती यांच्या चारित्र्याविषयी अपचर्चा पसरवल्या. हा अपमान पचवून या दाम्पत्यानं आपल्या घराची दारं नेहमी क्रांतिकारकांना जेवण, शरण व आर्थिक मदतीसाठी खुली ठेवली. त्या दिवसांत लाहोरमध्ये त्यांच्याकडे तीन घरं होती, लाखोंची संपत्ती आणि हजारोंची बँक शिल्लक होती, परंतु त्यांनी या सगळ्या सुखसुविधा नाकारून स्वातंत्र्यासाठी अनेक अडचणी असलेला क्रांतिकारक मार्ग निवडला.

भगतसिंग यांनी दिल्ली व कानपूर या ठिकाणी संघटना वाढवली होती. काकोरी कटात अटक झालेल्या क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी एक योजना तयार केली जात होती. काकोरी अटकेनंतर संघटना कमजोर झाली होती. भगतसिंग पंजाबच्या बाहेर ये-जा करायचे. पंजाबचं नेतृत्व जयचंद्रच्या हाती देण्यात आलं, पण तो निष्क्रिय होता. त्याला नेतृत्वपदी येण्यात भगवती अडचण वाटायचे. कारण त्यांना सक्रियता अपेक्षित होती. भगवतीचरण बराच पैसा संघटनेसाठी खर्च करायचे, पण काहीच होत नसल्याने ते कंटाळले होते.

आंदोलनात क्रम व नियोजन नसल्याने जमवण्यात आलेला पैसा असाच खर्च होऊन जायचा. पेशावरमधून लाहोरमध्ये येणारी पुस्तकं आणि निधी भगवतीचरण यांच्याच घरी यायचा. काकोरीच्या क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी कट करणारे म्हणून भगवतीचरण आणि यशपालवर वॉरंट काढण्यात आले होते. दोघे फरार होते.

जयचंद्रने परिस्थितीचा फायदा घेत भगवतीचा काटा काढण्यासाठी अफवा उडवली की, तो पोलिसांचा खबरी आहे. आंदोलनात उलटतपास करण्यासाठी वेळ नव्हता. लोक या अफवेवर विश्वास ठेवून भगवतीकडे संशयाने पाहू लागले. भगतसिंगची स्थिती यादरम्यान फार विचित् झाली होती. एकतर त्यांचा जवळचा मित्र पोलिसांचा खबरी बनल्याची बातमी होती, दुसरीकडे जयचंद्र आल्यापासून संघटनेचे काम विस्कळीत झाले होते. रशियन क्रांतीच्या काळात जारची माणसं क्रांतिकारकांना पकडण्यासाठी स्वतः जारविरोधात कट रचायचे, असे उल्लेख सगळ्यांच्या वाचनात आले होते. भगवतीचरण सीआयडीत असल्याचा प्रचार इतका वाढला की, नौजवान भारत सभा आणि काँग्रेसपर्यंतही पोहोचली. सगळीकडे कानावर पडायचं की- ‘विश्वस्त सूत्रांकडून हा माणूस खबरी असल्याची माहिती मिळाली आहे’.

काकोरी कटात अटक झालेल्या क्रांतिकारकांना सोडवण्याचा बेत सुरू असताना पंजाबकडून कोणतीही मदत उभी होत नसल्याने त्यांना जेलमधून बाहेर काढण्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. जयचंद्र पंजाब भागात नौजवान सभेचे प्रमुख होते, पण ते कोणतीही हालचाल करायचे नाहीत. पण त्यांनी त्याचं खापर भगवतीचरण यांच्यावर फोडलं. त्यांच्याबद्दल वेगानं खोटा प्रचार सुरू केला. त्यामुळे लाहोरमध्ये संघटनेची बांधणी अशा प्रकारे करण्याचं ठरवण्यात आलं की, ज्याचा कोणताही सुगावा भगवतीचरणला लागणार नाही. पण मोठी अडचण हीच होती की, भगवतीचरणला संघटनेच्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. त्यात जयचंद्रचा व्यवहार असा होता की, ते दाखवत भगवतीचरण ही धूर्त आणि चलाख व्यक्ती आहे. कोणतीही योजना ठरवली जात असताना जयचंद्र आपल्या ओठावर बोट ठेवून म्हणायचा भगवतीला माहीत पडून जाईल आणि तसंच व्हायचं.

भगतसिंग द्विधा मन:स्थितीत होते. त्यांचा भगवतीचरणवर पूर्ण विश्वास होता, पण दुसरीकडे त्यांच्यामुळे त्यांना संघटनेच्या सर्व कामात अडचणी जाणवायच्या. भगतसिंगला संघटनेच्या कामात व्यतिगत मैत्रीला आड येऊ द्यायचं नव्हतं. भगतसिंग या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, भगवतीचरणला मारून टाकलं पाहिजे, नाहीतर आपल्या संघटनेच्या कामात नेहमी अडथळे येत राहतील. या एका माणसामुळे सगळं बरबाद होत आहे, पण तरीही त्यांचा विश्वास बसत नव्हता की, भगवतीचरण सीआयडीत आहे.

यशपाल यांचं भगवतीचरण यांच्या घरी येणं-जाणं होतं. त्यामुळे एक दिवस भगतसिंग यशपाल यांना चिडून बोलले, ‘‘तुझं नेहमी त्याच्याकडे येणं-जाणं असतं. मस्त खाऊन-पिऊन येतो. गपाड्या मारून येतो, पण तुला हे माहीत करता येत नाही का, तो सीआयडीचा माणूस आहे म्हणून.” यशपाल म्हणाले, ‘‘मी प्रयत्न करून पाहिला, पण मला काही सापडलं नाही, आणि सगळे लोक जर त्याला सीआयडीचा समजत आहेत, तर मी तरी कसं नाकारू?’’ एके दिवशी भगतसिंग यांनी यशपालला एक भरलेलं पिस्तुल दाखवून गंभीरपणे म्हटलं, ‘आता मी त्याला गोळी मारणार आहे.’ यशपालने म्हटलं, ‘जबाबदारी तुझीच असेल.’ भगतसिंग गप्प झाले. त्यानंतर एक दिवशी यशपालला भगतसिंग भगवतीचरणच्या घरी दिसले. भगवतीचरण बनियानमध्ये पोटावर हात फिरवत गप्पा मारत होते. त्याविषयी यशपाल यांनी लिहिलं आहे की, भगतसिंगचा चेहरा अंतर्द्वंद्वानं जळत होता. भगवतीवर त्यांचा असलेला विश्वास, भगवतीचरण यांची निश्चलता, चातुर्य आणि संघटनेच्या हितात ते सामंजस्य बसवू पाहत होते.

यानंतर संघटनेत अशा चर्चा झाल्या की, यशपाल त्यांच्या घरी नेहमी येत जात असतो म्हणून त्यानेच मारावं. यशपालना ‘हो’ म्हटल्याशिवाय इलाज नव्हता. एक दिवस सुखदेव यशपालकडे आले आणि म्हणाले, ‘भगवतीचरणचा काहीतरी इलाज केला पाहिजे.’ यशपालने विचारलं – ‘म्हणजे काय करायला पाहिजे’. सुखदेव म्हणाले, ‘त्याला सध्या भगतसिंग दुसऱ्या शहरात घेऊन गेला आहे. तू त्याच्या घरी जा आणि सगळ्या कागदपत्रांची शोधाशोध घे आणि बघ काही मिळते का.’ यशपालने खूप हिमत करून त्यांच्या घरी गेले. दुर्गाभाभी घरी होत्या. त्यांना खिशातली एक औषधाची पुडी देऊन ते औषध बारीक करून देण्याविषयी सांगितले. त्या आत गेल्यावर त्यांनी प्रत्येक अलमारीची तपासणी केली. पुष्कळ ठिकाणी त्यांनी लिहिलेली टिपणे विखुरली होती. 'रिवोल्युशन आज द बर्थ राईट ऑफ एवरी सलेव्ह नेशन' या लिखाण, पंजाबच्या गदर परतीच्या आंदोलनाची प्रशंसा करणारं लिखाण... यातलं काही लिखाण भगवतीचरण यांनी अगोदरही यशपालना वाचून दाखवलं होतं. नंतर त्यांनी सुखदेवला तपशील सांगितला. तोपर्यंत भगवतीचरणला मारण्याचा ठोस निर्णय झालेला नव्हता. नंतर भगवतीचरणबद्दल अफवा पसरली गेली, असं लक्षात येऊ लागलं.

सायमन कमिशनचा विरोधात निदर्शनं करत असताना लाला लजपतराय यांच्यासोबत नौजवान भारत सभेचे तरुण कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी होते. पोलिसांच्या निर्दयी लाठीमारात जखमी होऊन लाला लजपतराय शहीद झाले. तेव्हा त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचं भारत नौजवान सभेनं ठरवलं. सांडर्सला गोळ्या घालून लालाजींच्या होतात्म्याचा बदला घेण्यात आला. त्यानंतर भगतसिंगसह सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी धाडसत्र सुरू झालं. अनेक कार्यकर्ते भूमिगत होऊ लागले. भगवतीचरण यांचावर मेरठ खटल्यामध्ये अटक वॉरंट निघाल्यामुळे ते आधीच भूमिगत झाले होते. त्या वेळी भगतसिंगची सांडर्स यांच्या वधासंदर्भात शोधाशोध सुरू होती. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी भगतसिंग यांना लाहोरबाहेर पडणं भाग होतं. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली.

भगतसिंगने आपले केस व दाढी कापली, पण त्यांच्या दिसण्यात फारसा फरक पडला नाही. गोळी चालवताना त्यांना काही पोलिसांनी बघितलेलं होतं, त्यांचं रेखाचित्र पोलिसांकडे असल्याने अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज होती. मदत मागण्यासाठी म्हणून सुखदेव रात्री आठ वाजता दुर्गाभाभीकडे गेले आणि म्हणाले की, एका व्यक्तीला पोलिसांपासून वाचवून लाहोरच्या बाहेर काढायचं आहे. तुम्ही त्याची पत्नी बनून त्याच्याबरोबर जाल का? दुर्गावती यांना तेव्हा ही अनामिक व्यक्ती आपला क्रांतिकारी मित्र भगतसिंगच आहे, याची कल्पना नव्हती. ते एकमेकांना ‘कॉम्रेड’ म्हणून हाक मारायचे. दुर्गाभाभींना त्यांच्या घरी येणार्‍या प्रत्येक सहकार्‍याविषयी इतका विश्वास होता की, त्यांनी पकडल्या जाण्याची आणि देशद्रोहाच्या दंडाची प्रचंड शक्यता व कल्पना असूनही लगेच ‘हो’ म्हटलं. नंतर तिथं भगतसिंग हजर झाले आणि त्यांनी योजना समजावून सांगितली. रात्रभर मुक्काम करून सकाळी कलकत्ता मेलने ते रवाना झाले. या वेळी भगतसिंग यांनी कॉलर वर करून लांब असा ओव्हरकोट परिधान करून आपली हॅट जरा चेहर्‍यावर ओढून घेतली होती आणि भगवतीचरण यांचा तीन वर्षीय मुलगा शचीन्द्रला घेतलं होतं. दुर्गाभाभी चेहर्‍याला रंगरंगोटी करून उंच टाचेची सॅंडल घालून खटखट चालत भगतसिंग सोबत निघाल्या. राजगुरू त्यांचे नोकर बनले. या वेळी भगतसिंगकडे भरलेलं पिस्तुल होतं. पोलिसांना जराही संशय आला असता तर नक्कीच गोळीबार झाला असता. आणि असं घडलं असतं तर लहानग्या शचीन्द्र व दुर्गाभाभी यांचे जीव जाऊ शकले असते, पण तरीही त्यांनी न घाबरता मोठी हिमत दाखवली.

भगवतीचरण कलकत्त्यात लपलेले होते. त्यांना स्टेशनवर भगतसिंग भेटले. त्यांच्यासोबत आपली पत्नी व मुलाला पाहिल्यावर ते त्यांच्या खांद्यावर कौतुकानं हात ठेवून म्हणाले, ‘तुला आज ओळखलं.’ या साहसपूर्ण घटनेनं त्यांचा पत्नीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला.       

संसदेत भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी कमी क्षमतेचा बॉम्ब भिरकावून पत्रकं फेकत घोषणाबाजी केली. त्यांना बोस्टन जेलमध्ये कैदेत ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांनी सुखदेव आणि राजगुरू यांना अटक करण्यात आली. या सर्वांना सोडवण्यासाठी भगवतीचरण, चन्द्रशेखर आझाद, यशपाल, दुर्गावती यांनी एक योजना बनवली. भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आदींना एकत्र जेव्हा लाहोर तुरुंगातून कोर्टात नेण्यासाठी बाहेर आणलं जाईल, तेव्हा सेंट्रल जेलच्या दारावरच अचानक हल्ला करून त्यांची सुटका करायची असं ठरलं. पहारा कडक असल्यानं या कामासाठी शक्तीशाली बॉम्बची आवश्यकता होती. भगवतीचरण यांना बॉम्ब बनवण्याची कला अवगत होती. बॉम्ब किंवा इतर साहित्य आणताना कमी धोका असावा म्हणून जेल जवळच एके ठिकाणी खोटं नाव धारण करून हे लोक भाड्याच्या बंगल्यात राहू लागले. 

तिथं बॉम्बचे कवच व रसायने गोळा करून पुढच्या काही दिवसांमध्ये बॉम्ब बनवले गेले. बॉम्बचा खोल नीट रसायने लावून सुकवणं आणि ट्रीगर फिट करण्याची जबाबदारी यशपालची होती. त्या दिवशी ट्रीगर ढिला होता. यशपाल बाहेर गेले होते, पण उपयोगात आणण्यापूर्वी त्याची चाचणी गरजेची होती म्हणून भगवतीचरण, बच्चन आणि सुखदेवराज हे परीक्षणासाठी बॉम्ब सोबत घेऊन रावी नदीच्या किनारी गेले. भगवतीचरण यांना ट्रीगर ढिला असलेला बॉम्ब लक्षात आल्याने त्यांनी तो ठेवून दिला. पण सुखदेवराज गमतीने म्हणाले, “तुम्हाला भीती वाटत असेल तर मला द्या.” भगवतीचरण म्हणाले, “असं काहीच नाही, जे माझ्यासाठी आहे तेच तुझ्यासाठीही आहे.” मागे हो’ असं म्हणून त्यांनी बॉम्ब फेकला, पण ट्रीगर बरोबर नसल्याने तो हातातच फुटला. त्यात ते इतके जखमी झाले. त्यांचा एक हात मनगटापासून वेगळा झाला. दुसर्‍या हाताची बोटे तुटून पडली, चेहर्‍यावर पुष्कळ ठिकाणी घाव झाले. पोटाच्या उजव्या बाजूला छिद्र होऊन रक्त निघू लागलं आणि डाव्या बाजूनं आतडी बाहेर आली.

पोलिसांची नजर चुकवून रक्तानं माखलेल्या क्षतविक्षत भगवतीचरण यांना उचलून नेणं शक्य नव्हतं. म्हणून सुखदेवराज बच्चन यांना तिथंच पहारर्‍यावर ठेवून मोठ्या दु:खात राहत्या ठिकाणी आले. यशपाल छैलबिहारी यांना आपल्यासोबत घेऊन रावी नदीच्या किनार्‍यावर असलेल्या जंगलात पोहोचले. भगवतीचरण यांच्या पोटात मोठं छिद्र पडून त्यातून रक्त येत होतं. पोटातून आतडी बाहेर आली होती. स्काउटिंगचं प्रशिक्षण घेतलेल्या त्या क्रांतिकारकांनी त्यांना जंगलातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला.    

यशपाल यांनी आपल्या ‘फांसी के फंदे तक’ या पुस्तकात नमूद केलं आहे की, “जखमी अवस्थेत भगवतीचरण म्हणाले- ‘मला दु:ख आहे की भगतसिंगला सोडवण्यात मी योगदान करू शकलो नाही. हे मरण दोन दिवस पुढे ढकललं गेलं असतं तर काय बिघडलं असतं?... भगतसिंगला सोडवण्याचा प्रयत्न थांबता कामा नाही.’ ”

रात्र झाली होती. छैलबिहारीला त्यांच्याजवळ सोडून सुखदेव, यशपाल परत शहरात येऊन तिथल्या क्रिश्चन कॉलेजच्या वसतिगृहातल्या देवराज सेठी आणि सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन (नंतर ते हिन्दी साहित्यात ‘अज्ञेय’ नावाने प्रसिद्ध झाले) या दोघांना त्यांना उचलण्यासाठी सोबतीला घेऊन पुन्हा काळोख्यात घनदाट जंगलात पोहोचले. भगवतीचरण शहीद झाले होते आणि अंधारात भीतीमुळे छैलबिहारी पळून गेले होते.

समोरचं दृश्य पाहून सगळ्यांना रडू कोसळलं. यशपाल म्हणाले, “आपल्या बहादूर नेत्याला शेवटची सलामी देऊया.” २८ मे १९३० रोजी वयाच्या २६ वर्षी भगवतीचरण शहीद झाले.  

हे सर्व लोक मृतदेहावर चादर टाकून पुन्हा किरायावर घेतलेल्या आपल्या बंगल्यावर पोहोचले. तोवर चन्द्रशेखर आझाद परतले होते. घरी छैलबिहारी, मदनगोपाल, दुर्गावती यांना मोठं काळीज करून बातमी देण्यात आली. दुर्गावती मन मोकळं करून रडूही शकत नव्हत्या, कारण आवाज झाला तर लोक जमले असते आणि सर्व क्रांतिकारकांची सुरक्षितता धोक्यात आली असती. आझाद यांनी नेहमीच्या वेळी घराचे दिवे विझवले. ही रात्र सर्व क्रांतिकारकांनी जागून काढली. दुसर्‍या दिवशी उजेड होण्याच्या अगोदरच चन्द्रशेखर यांनी बाहेर पडण्यासाठी संगितलं. दुर्गावती या वेळी त्यांच्यासोबत अंधारात बाहेर पडू शकत नव्हत्या. शेवटी यशपाल, चंद्रशेखर आणि बच्चन हे जंगलाकडे निघाले. रक्तामुळे मृतदेहावर मोठमोठ्या मुंग्या जमल्या होत्या. त्यांच्यासोबत फावडं किंवा कुदळ नसल्याने ते खोदकाम करून मृतदेह पुरू शकत नव्हते. जाळण्यात पोलिसांचा धोका होता. शेवटी नाइलाजानं चादरीत शव बांधलं गेलं. आणि पाण्यात मृतदेह तरंगून वर येऊन नये म्हणून मोठे दगड त्या चादरीत टाकून भगवतीचरण यांना जलसमाधी देण्यात आली. नंतर सर्व जण घरी परतले आणि मोठ्या मनानं सर्वांनी आपल्या लाडक्या क्रांतिकारकाला आदरांजली दिली.

या घटनेमुळे यशपाल स्वतःलाच दोषी मानत राहिले. भगवतीचरणच्या मृत्यूवर चन्द्रशेखर आझाद म्हणाले की, त्याचा उजवा हात कापला गेला आहे. यानंतर अनेक दिवस योजना आणि जेल परिसराचा अभ्यास चालू राहिला. काही दिवसांनी जेलबाहेर सर्वांनी तयारीही केली, परंतु भगतसिंग यांनीच प्रतिसाद न दिल्याने पोलिसांची गाडी पुढे निघून गेली. चंद्रशेखर आझाद शहीद झाल्यानंतर भगतसिंग म्हणाले, ‘‘आमचा तुच्छ बलिदान साखळीचा दुवा मात्र आहे ज्याचं सौन्दर्य कॉम्रेड भगवतीचरण वोहरा यांच्या शोकांतक पण अभिमानास्पद आत्मत्याग आणि आमचे प्रिय योद्धा ‘आझाद’ यांच्या गरिमापूर्ण मृत्यूने बहरून आलं आहे.”

..................................................................................................................................................................

लेखिका कल्पना पांडे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य आहेत.

kalpanasfi@gmail.com     

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......