‘तुडवण’ : ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांची सोनोग्राफी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘तुडवण’चे मुखपृष्ठ
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तुडवण Tudavan कैलास दौंड Kailas Daund

कैलास दौंड ‘पाणधुई’, ‘कापूसकाळ’ या कादंबऱ्यांनंतर ‘तुडवण’च्या निमित्ताने पुन्हा वाचकांसमोर आले आहेत. दोनशे पंचेचाळीस पानांच्या अवकाशात सामावलेली ही कलाकृती आकृतीबंधाच्या विविध छटांना स्पर्श करते.

गोडजळगाव खेड्यातला नवनाथ सावंत नावाचा एक शेतकरी. त्याला नारायण व यमुना ही दोन मुले. अतिशय कमी असलेल्या कोरडवाहू शेतीत कष्ट करून तो आपला उदरनिर्वाह भागवतो, पण आपल्यावर आलेली संकटे मुलांवर येऊ नयेत म्हणून दोघांनाही शिकवतो. गरिबीमुळे मुलीचं शिक्षण दहावीनंतर बंद करावं लागतं. मुलगा नारायण मात्र प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे व उपलब्ध नोकरीच्या कमी संधीमुळे डी.एड.सोबतच पात्रता चाचणी परीक्षा अनिवार्य केली जाते. त्यात नारायण अनुत्तीर्ण होतो. कुटुंबाला आर्थिक मदत करावी म्हणून तो टेम्पोवर कापूस भरण्यासाठी जातो, चंदन लाकूड चोरून विकतो, मोठ्या वाहनावर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो आणि शेवटी शेती विकून एखादी टेम्पो घेऊन जगण्यासाठी धडपडतो. पण सगळीकडे हाती निराशाच येते. गावातील एका जुन्या विहिरीचा गाळ काढताना त्याचा अपघातानं दुर्दैवी अंत होतो.

ही कथा कमी-जास्त स्वरूपात सगळीकडे, खेड्यापाड्यात, आजूबाजूला आपणास सतत पाहावयास मिळते. त्यामुळे त्यात काही नवीन नाही. पण ही कादंबरी कथा वाचकासमोर ठेवून थांबत नाही, तर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची चिरफाड करते. त्यातील सूक्ष्म निरीक्षण समोर ठेवून कोरडवाहू शेती शेतकऱ्याला विकू देत नाही आणि जगू देत नाही, या महत्त्वपूर्ण निष्कर्षाला आणून सोडते.

नारायण नवनाथ सावंत हा या कादंबरीतला मुख्य नायक. पण आपण समजतो तसा तो ‘नायक’ नाही. त्याला आपण खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रतिनिधी मानूया. कारण तो आपल्या कल्पनेतील बुद्धिमान नायक असता तर टीईटी परीक्षा पास झाला असता, बुलेट गाडी घेताना, शेती विकत घेताना फसला नसता. नीतिमान राहिला असता, तर चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात सहभागी झाला नसता. या सगळ्या कल्पना चित्रपटात चांगल्या वाटतात. वास्तवात ग्रामीण भागात नारायणसारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आपल्याला दिसतात. म्हणून परंपरेने चालत आलेल्या चित्रपटासारखी ही कादंबरी आशावाद निर्माण करत नाही.  

या कादंबरीत नवनाथ, राधाक्का, नारायण, यमुना, नागेश तोडकर, अंकुश, मुकादम हरिभाऊ, इक्रम  राहुल्या, बाल्या, तुकाराम, सुदाम, रुपली, सुभाष, शरद अशी अनेक पात्रे येतात. ही सगळी पात्रे आपल्या आयुष्यात आलेली संकटे सहन करत जगतात. यातील काही दयाळू आहेत, तर काही बेरकी. काही निष्पाप आहेत, तर काही चतुर. काही अहोरात्र कष्ट करणारी आहेत, तर काही फुकट खात बसणारी. परंतु या सगळ्या पात्रात एक समानता आहे. ती म्हणजे या कोणत्याही पात्रात  अमानवी शक्ती, दैवी शक्ती नाही तर सहज आजूबाजूला दिसणारी प्रवृत्ती आहे.

नवनाथ सावंतला वाटते शेती विकणे पाप आहे. मुलगा शिकवून काही उपयोग झाला नाही. तो दिवस-रात्र कष्ट करतो. कर्ज न काढता मुलीचे लग्न करतो. शेवटी जेव्हा त्याच्या भावनांना ठेच पोहोचते, तेव्हा तो घर सोडून निघून जातो. त्याचं काय झालं ते कुणालाच कळत नाही. राधाक्का नारायणची आई. नारायण तिला अक्का व वडिलांना तात्या म्हणतो. राधाक्का खूप मेहनती. सतत कामात गुंतून राहते. मुलीला घेऊन अहोरात्र शेतात कष्ट करते. मुलगा काम करत नाही, ऐकत नाही याचा तिलाही राग येतो, पण तिचं मन हळवं. ती कळत-नकळत मुलाला मदत करते. कादंबरीच्या शेवटी शेवटी तर तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. शेती जाते, नवरा घर सोडून निघून जातो, मुलगा मरून जातो, सून माहेरी निघून जाते. भविष्यात नातवाला (नारायणचा मुलगा प्रकाश) उभं करण्यासाठी त्याला घेऊन ती पुण्याला जाण्यासाठी घराबाहेर पडते.

कादंबरीचं मुख्य पात्र आहे नारायण सावंत. शिक्षण घेतलेला, पण टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेला हा तरुण. तो नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो, खाजगी संस्थेत मुलाखत देतो, संस्थेवाले नोकरीत घेण्यासाठी त्याला डोनेशन मागतात. त्यासाठी त्याला शेती विकाविशी वाटते. पण शेती विकण्याचा विषय घरी निघताच प्रचंड शिव्या मिळतात. गावातील इतर मुलांप्रमाणे तो रिकामटेकडा फिरत नाही. त्याला काहीतरी काम करावंसं वाटतं. म्हणून गावातील काही मित्रांच्या मदतीने टेम्पोमध्ये कापूस भरण्याच्या मजुरीवर जातो. ते काम संपतं. त्यानंतर तो गावातील एका माणसाच्या मदतीनं चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात मदत करतो.

नंतर उल्हासनगर येथे एका ट्रकवर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो. वडापाव खाऊन दिवस काढतो. आपल्या भावनांचा विचार न करता बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच तुकारामने सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करतो. पण संसारसुख फार मिळत नाही, तिला सोडून परत शहरात एक वर्षे काढतो. शेवटी आईच्या मदतीने शेती विकून टेम्पो घेण्याचा विचार करतो. शेती विकली जाते, पण मोबदल्यात मिळालेल्या पैशाचा योग्य विल्हेवाट लागत नाही, उलट वडील घरातून निघून जातात, तर हा विहिरीचं काम करताना स्वतःचा जीव गमावतो. गावातील बेरकी सरपंच, पैसावर डोळा असलेला शेटजी, मेव्हण्याला लुटणारा तुकाराम, मित्रप्रेम मदत करणारे रावश्या, बाल्या, सुदाम्या, अंकुश अशी अनेक पात्रे आपापल्या प्रकृतीधर्माप्रमाणे वर्तन करताना दिसून येतात.

या कादंबरीचं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान तिच्या भाषाशैलीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा, शिरूर कासार, गेवराई परिसरातील बोलल्या जाणाऱ्या नागरी बोलींमुळे ही कादंबरी पकड घेते. बोलीभाषेतील शब्दसंपत्ती, म्हणी, वाक्प्रचार, प्रतिमा यामुळे भाषिक सौंदर्य वाढले आहे. आयचचं, आघाप, आरदूळ, ईरवाळी, इसाब, करडांना, तरट, कन्हर, दुण्या, मपलं, बाटुक, पव्हरी, वसका, वारली, रोख, माळवं बिट्या, डंगाळ्या... यासारखे असंख्य शब्द या कादंबरीत येतात.

यासोबतच स्वप्नातून झोपडपट्टीला लागलेली आग आणि त्यासाठी होत जाणारे गढूळ राजकारण, वृत्तपत्रीय जाहिरात कात्रण, मुलाखतीचा नमुना, लग्नातील जागरण, यासारख्या भाषिक संरचनेची मोडतोड करून कादंबरी प्रयोगशीलतेकडे वाटचाल करते आहे.

कादंबरीच्या बलस्थाना सोबतच काही कळत-नकळत मर्यादा लेखकांच्या हातून झालेल्या दिसून येतात. उदा. नारायण कमावलेल्या पैशातून बहिणीला कपडे न घेता तो मोबाईल विकत घेतो. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. हा प्रसंग कादंबरीत दोन ठिकाणी आलेला आहे. पान १०९ व ११७वर. त्यामुळे वाचक काही काळ संभ्रमात पडतो. नारायण सुशिक्षित असूनही चाळीस हजाराची गाडी विकत घेताना कोणतीच कागदपत्रे तपासून घेत नाही, शेती विकत घेतल्यावर जरी  नातेवाईकाची वारस म्हणून नोंद असली तरी संपूर्ण निकाल त्यांच्याच बाजूने लावून शेती जाणे, हे  फारसं पटत नाही. अर्थात याला काही मर्यादा किंवा कादंबरीचे उणीवा म्हणता येत नाहीत, त्यामध्ये बदल करणे लेखकाला सहज शक्य होते, असे वाटून जाते.

ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. एकीकडे नोकरी लागत नाही, दुसरीकडे शेतीचे काम येत नाही. अशा परिस्थितीत तरुणांची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का ना घाट का’ अशी झाली आहे. अशा तरुणाची मनाची घालमेल शब्दांत पकडणं अत्यंत कठीण बाब आहे. त्यातही बोलीभाषा मृत पावत असताना त्या बोलीभाषेतच समकालीन वर्तमान उतरवून मांडणं नक्कीच कौतुकास्पद आहे. या बाबतीत लेखकाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे.

..................................................................................................................................................................

‘तुडवण’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5176/Tudawan

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......