‘तुडवण’ : ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांची सोनोग्राफी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘तुडवण’चे मुखपृष्ठ
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तुडवण Tudavan कैलास दौंड Kailas Daund

कैलास दौंड ‘पाणधुई’, ‘कापूसकाळ’ या कादंबऱ्यांनंतर ‘तुडवण’च्या निमित्ताने पुन्हा वाचकांसमोर आले आहेत. दोनशे पंचेचाळीस पानांच्या अवकाशात सामावलेली ही कलाकृती आकृतीबंधाच्या विविध छटांना स्पर्श करते.

गोडजळगाव खेड्यातला नवनाथ सावंत नावाचा एक शेतकरी. त्याला नारायण व यमुना ही दोन मुले. अतिशय कमी असलेल्या कोरडवाहू शेतीत कष्ट करून तो आपला उदरनिर्वाह भागवतो, पण आपल्यावर आलेली संकटे मुलांवर येऊ नयेत म्हणून दोघांनाही शिकवतो. गरिबीमुळे मुलीचं शिक्षण दहावीनंतर बंद करावं लागतं. मुलगा नारायण मात्र प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे व उपलब्ध नोकरीच्या कमी संधीमुळे डी.एड.सोबतच पात्रता चाचणी परीक्षा अनिवार्य केली जाते. त्यात नारायण अनुत्तीर्ण होतो. कुटुंबाला आर्थिक मदत करावी म्हणून तो टेम्पोवर कापूस भरण्यासाठी जातो, चंदन लाकूड चोरून विकतो, मोठ्या वाहनावर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो आणि शेवटी शेती विकून एखादी टेम्पो घेऊन जगण्यासाठी धडपडतो. पण सगळीकडे हाती निराशाच येते. गावातील एका जुन्या विहिरीचा गाळ काढताना त्याचा अपघातानं दुर्दैवी अंत होतो.

ही कथा कमी-जास्त स्वरूपात सगळीकडे, खेड्यापाड्यात, आजूबाजूला आपणास सतत पाहावयास मिळते. त्यामुळे त्यात काही नवीन नाही. पण ही कादंबरी कथा वाचकासमोर ठेवून थांबत नाही, तर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची चिरफाड करते. त्यातील सूक्ष्म निरीक्षण समोर ठेवून कोरडवाहू शेती शेतकऱ्याला विकू देत नाही आणि जगू देत नाही, या महत्त्वपूर्ण निष्कर्षाला आणून सोडते.

नारायण नवनाथ सावंत हा या कादंबरीतला मुख्य नायक. पण आपण समजतो तसा तो ‘नायक’ नाही. त्याला आपण खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रतिनिधी मानूया. कारण तो आपल्या कल्पनेतील बुद्धिमान नायक असता तर टीईटी परीक्षा पास झाला असता, बुलेट गाडी घेताना, शेती विकत घेताना फसला नसता. नीतिमान राहिला असता, तर चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात सहभागी झाला नसता. या सगळ्या कल्पना चित्रपटात चांगल्या वाटतात. वास्तवात ग्रामीण भागात नारायणसारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आपल्याला दिसतात. म्हणून परंपरेने चालत आलेल्या चित्रपटासारखी ही कादंबरी आशावाद निर्माण करत नाही.  

या कादंबरीत नवनाथ, राधाक्का, नारायण, यमुना, नागेश तोडकर, अंकुश, मुकादम हरिभाऊ, इक्रम  राहुल्या, बाल्या, तुकाराम, सुदाम, रुपली, सुभाष, शरद अशी अनेक पात्रे येतात. ही सगळी पात्रे आपल्या आयुष्यात आलेली संकटे सहन करत जगतात. यातील काही दयाळू आहेत, तर काही बेरकी. काही निष्पाप आहेत, तर काही चतुर. काही अहोरात्र कष्ट करणारी आहेत, तर काही फुकट खात बसणारी. परंतु या सगळ्या पात्रात एक समानता आहे. ती म्हणजे या कोणत्याही पात्रात  अमानवी शक्ती, दैवी शक्ती नाही तर सहज आजूबाजूला दिसणारी प्रवृत्ती आहे.

नवनाथ सावंतला वाटते शेती विकणे पाप आहे. मुलगा शिकवून काही उपयोग झाला नाही. तो दिवस-रात्र कष्ट करतो. कर्ज न काढता मुलीचे लग्न करतो. शेवटी जेव्हा त्याच्या भावनांना ठेच पोहोचते, तेव्हा तो घर सोडून निघून जातो. त्याचं काय झालं ते कुणालाच कळत नाही. राधाक्का नारायणची आई. नारायण तिला अक्का व वडिलांना तात्या म्हणतो. राधाक्का खूप मेहनती. सतत कामात गुंतून राहते. मुलीला घेऊन अहोरात्र शेतात कष्ट करते. मुलगा काम करत नाही, ऐकत नाही याचा तिलाही राग येतो, पण तिचं मन हळवं. ती कळत-नकळत मुलाला मदत करते. कादंबरीच्या शेवटी शेवटी तर तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. शेती जाते, नवरा घर सोडून निघून जातो, मुलगा मरून जातो, सून माहेरी निघून जाते. भविष्यात नातवाला (नारायणचा मुलगा प्रकाश) उभं करण्यासाठी त्याला घेऊन ती पुण्याला जाण्यासाठी घराबाहेर पडते.

कादंबरीचं मुख्य पात्र आहे नारायण सावंत. शिक्षण घेतलेला, पण टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेला हा तरुण. तो नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो, खाजगी संस्थेत मुलाखत देतो, संस्थेवाले नोकरीत घेण्यासाठी त्याला डोनेशन मागतात. त्यासाठी त्याला शेती विकाविशी वाटते. पण शेती विकण्याचा विषय घरी निघताच प्रचंड शिव्या मिळतात. गावातील इतर मुलांप्रमाणे तो रिकामटेकडा फिरत नाही. त्याला काहीतरी काम करावंसं वाटतं. म्हणून गावातील काही मित्रांच्या मदतीने टेम्पोमध्ये कापूस भरण्याच्या मजुरीवर जातो. ते काम संपतं. त्यानंतर तो गावातील एका माणसाच्या मदतीनं चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात मदत करतो.

नंतर उल्हासनगर येथे एका ट्रकवर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो. वडापाव खाऊन दिवस काढतो. आपल्या भावनांचा विचार न करता बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच तुकारामने सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करतो. पण संसारसुख फार मिळत नाही, तिला सोडून परत शहरात एक वर्षे काढतो. शेवटी आईच्या मदतीने शेती विकून टेम्पो घेण्याचा विचार करतो. शेती विकली जाते, पण मोबदल्यात मिळालेल्या पैशाचा योग्य विल्हेवाट लागत नाही, उलट वडील घरातून निघून जातात, तर हा विहिरीचं काम करताना स्वतःचा जीव गमावतो. गावातील बेरकी सरपंच, पैसावर डोळा असलेला शेटजी, मेव्हण्याला लुटणारा तुकाराम, मित्रप्रेम मदत करणारे रावश्या, बाल्या, सुदाम्या, अंकुश अशी अनेक पात्रे आपापल्या प्रकृतीधर्माप्रमाणे वर्तन करताना दिसून येतात.

या कादंबरीचं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान तिच्या भाषाशैलीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा, शिरूर कासार, गेवराई परिसरातील बोलल्या जाणाऱ्या नागरी बोलींमुळे ही कादंबरी पकड घेते. बोलीभाषेतील शब्दसंपत्ती, म्हणी, वाक्प्रचार, प्रतिमा यामुळे भाषिक सौंदर्य वाढले आहे. आयचचं, आघाप, आरदूळ, ईरवाळी, इसाब, करडांना, तरट, कन्हर, दुण्या, मपलं, बाटुक, पव्हरी, वसका, वारली, रोख, माळवं बिट्या, डंगाळ्या... यासारखे असंख्य शब्द या कादंबरीत येतात.

यासोबतच स्वप्नातून झोपडपट्टीला लागलेली आग आणि त्यासाठी होत जाणारे गढूळ राजकारण, वृत्तपत्रीय जाहिरात कात्रण, मुलाखतीचा नमुना, लग्नातील जागरण, यासारख्या भाषिक संरचनेची मोडतोड करून कादंबरी प्रयोगशीलतेकडे वाटचाल करते आहे.

कादंबरीच्या बलस्थाना सोबतच काही कळत-नकळत मर्यादा लेखकांच्या हातून झालेल्या दिसून येतात. उदा. नारायण कमावलेल्या पैशातून बहिणीला कपडे न घेता तो मोबाईल विकत घेतो. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. हा प्रसंग कादंबरीत दोन ठिकाणी आलेला आहे. पान १०९ व ११७वर. त्यामुळे वाचक काही काळ संभ्रमात पडतो. नारायण सुशिक्षित असूनही चाळीस हजाराची गाडी विकत घेताना कोणतीच कागदपत्रे तपासून घेत नाही, शेती विकत घेतल्यावर जरी  नातेवाईकाची वारस म्हणून नोंद असली तरी संपूर्ण निकाल त्यांच्याच बाजूने लावून शेती जाणे, हे  फारसं पटत नाही. अर्थात याला काही मर्यादा किंवा कादंबरीचे उणीवा म्हणता येत नाहीत, त्यामध्ये बदल करणे लेखकाला सहज शक्य होते, असे वाटून जाते.

ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. एकीकडे नोकरी लागत नाही, दुसरीकडे शेतीचे काम येत नाही. अशा परिस्थितीत तरुणांची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का ना घाट का’ अशी झाली आहे. अशा तरुणाची मनाची घालमेल शब्दांत पकडणं अत्यंत कठीण बाब आहे. त्यातही बोलीभाषा मृत पावत असताना त्या बोलीभाषेतच समकालीन वर्तमान उतरवून मांडणं नक्कीच कौतुकास्पद आहे. या बाबतीत लेखकाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे.

..................................................................................................................................................................

‘तुडवण’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5176/Tudawan

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......