‘ग्रामसंस्कृती’ समजून घेण्यासाठी ही ‘ग्रामशिदोरी’ दिशा देणारी ठरेल!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘ग्रामशिदोरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस ग्रामशिदोरी Gramshidori केशव सखाराम देशमुख Keshav Sakharam Deshmukh

‘पाडा’, ‘चालणारे अनवाणी पाय’, ‘अथक’, ‘गाभा’, ‘तंतोतंत’ या कवितासंग्रहांमुळे कवी डॉ. केशव सखाराम देशमुख परिचित आहेत. ‘ग्रामशिदोरी’ हा त्यांचा ललितलेखसंग्रह नुकताच सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. दै. ‘ॲग्रोवन’मध्ये साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.  

या पुस्तकात एकूण सत्तेचाळीस लेखांचा समावेश असून त्यातून जुन्या आठवणी, मातीचा गंध, अस्वस्थ करणारे वर्तमान, चिंतनशीलता, नकळत केलेला उपदेश, परिवर्तनाचा ध्यास, शिक्षणाचे महत्त्व, माणसाचे ममत्व, स्वभावातील अंतरंग, गावशिवाराचे नातेसंबंध आणि जगण्यातील दिलखुलासपणे अशा जीवन अनुभूतीच्या विविध पैलूंचा आविष्कार घडतो.

साधी भाषा, छोटी वाक्यं, प्रभावी उदाहरणं, पाच-दहा मिनिटांत वाचून पूर्ण होणारे लेख हे या संग्रहाचे वेगळेपण आहे. लेखक मुळात कवी असल्यामुळे प्रत्येक लेखात काव्यमय तरलता आहे.

लेखकाने ज्या जुन्या आठवणी नोंदवलेल्या आहेत, त्यांनी एकूण पुस्तकाचा एक तृतीयांश भाग व्यापला आहे. चुलीवरच्या भाकरी, बालपणी जत्रेत घेतलेला आनंद, गावातील पंचांनी दिलेला न्याय, आठ दिवस चालणारे लग्नसमारंभ, म्हशीच्या पाठीवर बसून रुबाबदार फिरणे, गाई-म्हशी-बैल-कोंबड्या-शेळ्या-कुत्रे-मांजर हा गोतावळा, पावसात मनसोक्त भिजणे, आलटून-पालटून घातलेला सदरा किंवा पैसे नसतानाही साजरी केलेली दिवाळी... या सगळ्या अनुभूती आपल्याला नकळत बालपणात, भूतकाळात घेऊन जातात. आणि हे अनुभव आपलेच आहेत असे वाटू लागते. आणि हेच या लेखांचे सामर्थ्य  आहे. याचा अर्थ लेखक फक्त आठवणी सांगून थांबत नाही, तर जीवन व जगणे अतिसुंदर होण्यासाठी नकळत उपदेशही करून जातो. उदाहरणार्थ- छोट्या छोट्या गोष्टींमुळे जी माणसे अबोलपणा धरतात, त्याविषयी लेखक अतिशय मार्मिक भाष्य करतो. तो म्हणतो-

“येता-जाता नमस्कार केला नाही म्हणून अबोला धरणे, नवरा-बायकोमध्ये खटका उडाला म्हणून अबोला धरणे, उसने पैसे दिले नाही म्हणून, लग्नात मानपान दिला नाही म्हणून, त्यालाच का बोलतो मला का बोलत नाही म्हणून, अशा अबोला धरण्याला फारसा अर्थ नसतो. संवाद हे जगण्याचं छान औषध आहे.” (पृ.८५)

तसाच ‘शिक्षणातील भावना व शिक्षणातील भूमिका स्वच्छ असली पाहिजे.’ (पृ.६९), ‘रिकामटेकडेपणा आणि आळस हे दोघे एकत्र आले की आयुष्याचा नाश व्हायला फार वेळ लागत नाही’ (पृ.७७), ‘तुमच्या डोक्यामध्ये असलेले प्रश्न घेऊन लोकांत जाऊ नका, लोकांत जा आणि तेथील प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा.’ (पृ.८२), ‘भाकर यंत्रामधून जन्म घेत नाही, फ्लॅटच्या गच्चीवर निर्माण होत नाही. माती बिगर भाकरीची निर्मिती होऊ शकत नाही’ (पृ.४९) यांसारख्या अनेक विधानांतून वाचक चिंतनशील बनतो. ते हे या लेखनाचे बलस्थान आहे.

दर शनिवारी वाचकांसाठी तयार केलेली ही ‘शिदोरी’ असल्याने काही लेखांत पुनरुक्तीचा दोष आलेला आहे. पण हा दोष भाषिक अंगाने असला तरी संवेदनशील मन संस्कारशील करण्यासाठी या दोषाच्या ‘डोसा’ची गरज वारंवार जाणवते. विषयानुरूप आलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार आणि कविता यांमुळे हे पुस्तक मनाला आनंद देणारे, भावसौंदर्य टिपणारे ठरले आहे.

ही ग्रामशिदोरी वाचकांना चिंतन करायला भाग पाडणारी व दिशा देणारी आहे. मुख्य म्हणजे ग्रामसंस्कृती समजून घेण्यासाठी ही ‘ग्रामशिदोरी’ दिशा देणारी ठरेल.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......