काल जेएनयूमध्ये कुणी हिंसाचार केला?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुषा घोष आणि तोडफोडीची दृश्यं
  • Mon , 06 January 2020
  • पडघम देशकारण जेएनयू JNU अभाविप ABVP

काल रात्री जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात प्रवेश करून तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. त्यात जवळपास २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. चेहऱ्यावर रुमाल बांधून व हातात दंडुके, रॉड घेऊन या कार्यकर्त्यांनी मुला-मुलींच्या वस्तीगृहात घुसून मारहाण केली. त्यांच्या खोल्यांची नासधूस केली. रस्त्यावरून धुमाकूळ घालत असताना ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘आरएसएस जिंदाबाद’ यासारख्या घोषणा ते देत होते, असे एका विद्यार्थिनीने एनडीटीव्हीच्या वार्ताहरांना सांगितले. त्याचबरोबर गेटवर पोलीस असताना, त्यांच्या संमतीने जेएनयु कॅम्पसमध्ये त्यांना सोडण्यात आले. याचा अर्थ जेएनयू प्रशासन, पोलीस यंत्रणा, अभाविप यांच्या संगनमताने हा पूर्वनियोजितपणे हल्ला केलेला होता, हे सिद्ध होते. पण एनडीटीव्ही वगळता इतर प्रसारमाध्यमांतून, जेएनयू प्रशासनाकडून तसेच पोलीस यंत्रणेकडून हा विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आहे, असे स्वरूप या गुंडगिरीला देण्यात येत आहे.

कोणत्याही कारखान्यात आपल्या न्याय हक्कासाठी कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष चालू असताना मालकलोक कारखान्यातील काही कामगारांना हाताशी धरून एखादी नामधारी युनियन स्थापन करतात आणि तिच्या मार्फत, पोलिसांच्या मदतीने बहुसंख्य कामगारांची युनियन असलेल्या कामगारांवर हल्ले करून त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करतात. हा कामगार संघटनांचा नित्याचा अनुभव आहे. पण मालक व पोलीस यंत्रणा हा दोन युनियनमधील संघर्ष आहे, अशी बतावणी करत असतात. तसलाच हा प्रकार आहे.

खरं तर जेएनयूमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून तेथील फी वाढीच्या व इतर मागण्यांसाठी  प्रशासनाविरुद्ध शांततामय मार्गाने आंदोलन चालू आहे. पण प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. खरा संघर्ष जेएनयू व त्याचे प्रशासन यांच्यातच आहे. असे असताना प्रशासनाच्यावतीने, पोलिसांमार्फत अभाविपने हस्तक्षेप करून या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला करण्यात आला आहे.

असाच हल्ला साधारण एक महिन्यापूर्वी जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर, तेथील वस्तीगृहात व तेथील वाचनालयात घुसून खुद्द पोलिसांनी केला होता. तेव्हापासून ते कॅम्पस आजपर्यंत बंद होते. आजच उघडणार, ते या जेएनयूच्या नवीन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. तो हल्ला खुद्द दिल्ली पोलिसांनी केला होता. त्याला केंद्र सरकारचे पूर्ण पाठबळ होते, तर आताचा हल्ला त्याच दिल्ली पोलिसांच्या मदतीने अभाविप या संघटनेने केला आहे. जवळपास ५०च्या संख्येत असलेल्या गुंडांपैकी एकालाही पोलीस अद्यापपर्यंत अटक करू शकलेली नाही. त्यांच्या संरक्षणात त्यांना जसे कॅम्पसमध्ये सोडण्यात आले, तसेच त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्याचे चित्रणसुद्धा टीव्हीवर पाहायला मिळते.

या हल्ल्याचा निषेध विरोधी पक्ष संघटनांच्या नेत्यांनी तर केलाच आहे, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या हल्ल्याला आतून सहानुभूती असलेल्या सत्ताधारी पक्ष संघटनेच्या मंत्र्यांनी, पुढाऱ्यांनीसुद्धा केलेला आहे. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा, राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नये, असा मानभावी सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

खरे तर भाजप सत्तेत आल्यापासूनच जेएनयू व तत्सम विद्यापीठांच्या मागे हात धुवून लागली आहे. त्यांना कष्टकरी लोकांना उच्चशिक्षण देणारी ही विद्यापीठे बंदच पाडायची आहेत. पण आपल्या अस्तित्वासाठी चिवटपणे ही विद्यापीठे झुंजत आहेत. त्यात जेएनयू आघाडीवर आहे. ती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील किरकिरच बनली आहे. येनकेनप्रकारे त्यांना हे विद्यापीठ बंद पाडायचे आहे. हा हल्ला त्याचाच एक भाग आहे. निदान अशा मारहाणीने तरी घाबरून जाऊन विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील, आई-वडील आपल्या अपत्त्यांना जिवाच्या भीतीने बोलावून घेतील, असे त्यांना वाटते.

अभाविप या संघटनेने विद्यापीठातील डाव्या संघटनांनीच हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांचेही अकरा विद्यार्थी गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरे तर यात जखमी झालेले सर्व डाव्या संघटनांचे विद्यार्थी आहेत. तेथील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुषा घोष या एआयएसए या डाव्या संघटनेच्या आहेत. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे. तेव्हा डाव्या संघटनांनी बाहेरून गुंड आणून आपल्याच कार्यकर्त्यांवर हल्ले केले?

या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटल्या आहेत. विविध शहरांतील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी आपापल्या ठिकाणी सनदशीर मार्गाने, शांततेने आंदोलने करत आहेत. सत्ताधारी पक्षाने सीएए व एनआरसी विरोधात जे देशभर आंदोलन चालू आहे, त्यावरून आपले लक्ष हटवून आता या प्रकरणाकडे वळवले आहे.

ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यात सत्ताधारी पक्ष माहीर आहे, हेच यातून सिद्ध होते!

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......