राजकारणातील ‘सोबतीच्या करारा’ची निश्चित ‘एक्स्पायरी डेट’ नसली, तरी ती आपल्या सोयीनुसार ‘एक्स्पायर’ व्हावी, ही इच्छा सर्वच जोडीदारांची असते!
पडघम - देशकारण
मंदार काळे
  • सीपीएम, काँग्रेस, भाजप, शिवसेना, जद (यू), राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल या पक्षांची बोधचिन्हे
  • Mon , 02 December 2019
  • पडघम राजकारण सीपीएम CPM काँग्रेस Congress भाजप BJP शिवसेना Shivsena जद (यू) JDU राष्ट्रवादी काँग्रेस NCP जनता दल Janta Dal

भारतीय राजकारणात आघाडीचे, युतीचे राजकारण नवीन नाही. स्वबळावर सत्ताधारी झालेल्या सरकारांची संख्या दोन वा त्याहून अधिक पक्षांच्या आघाडी/युती/फ्रंट सरकारांच्या संख्येहून फारच कमी दिसते. केंद्रात तर १९८४ नंतर २०१४ साली, जेमतेम का होईना, पण पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार प्रथमच स्थापन झाले. उरलेला बहुतेक सर्व काळ देशात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकारच सत्ताधारी होते.

१९७१ सालापर्यंत स्वबळावर सरकार स्थापन करणार्‍या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी अ‍ॅंटी-काँग्रेसिझमचा विचार मांडायला सुरुवात केली. जेपींच्या नेतृत्वाखाली १९७७मध्ये स्थापन झालेले जनता पक्षाचे सरकार हा या राजकारणाचा पहिला विजय होता. हे सरकार तांत्रिकदृष्ट्या जरी एका पक्षाचे असले, तरी त्यात परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांची मोट बांधलेली होती. या जनता पक्षात जनसंघ हा अति-उजवा पक्ष सामील होता, प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त सोशलिस्ट पार्टीसारखे समाजवाद ही विचारधारा मानणारे पक्ष, स्वतंत्र पक्षासारखा भांडवलदार धार्जिणा म्हटला जाणारा पक्ष, चरणसिंग यांचा भारतीय क्रांती दल, तसेच काँग्रेसचे अनेक फुटीर गट सामावून घेतले होते. वैचारिकदृष्ट्या विसंगत असलेल्या पक्षांच्या आघाडीचे हे स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले सरकार होते. जेमतेम तीनच वर्षे टिकलेल्या या सरकारमुळे एक मात्र झाले की, ‘काँग्रेसेतर वाद’ हा राजकीय विचार म्हणून रुजला. केंद्रीय राजकारणातून तो राज्यांच्या राजकारणातही झिरपला. तोवर विरोधक अथवा काँग्रेसमधील फुटीर गट काँग्रेसला फार हादरे देऊ शकले नव्हते. पण आता वैचारिक विरोधकांशी आघाडी करून सत्ता मिळवता येऊ शकते, यश मिळू शकते हे निर्णायकरित्या सिद्ध झाले. विविध राज्यांतून स्वबळावर सरकार स्थापन करण्याइतकी ताकद नसलेल्या महत्त्वाकांक्षी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी हळूहळू काँग्रेसपासून स्वतंत्र होत राजकारण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देशभर काँग्रेसच्या घसरणीला सुरुवात झाली आणि देशात आघाड्यांचे आणि स्थानिक पक्षांचे राजकारण प्रबळ होत गेले. 

आघाड्यांचे राजकारण हे बहुधा विशिष्ट विचारसरणीशी बांधील नसलेल्यांच्या अधिक सोयीचे आहे. राजकीय विरोधक म्हणून लढल्यानंतरही एकत्र येताना विचारसरणीचा अडथळा त्यांच्या समोर नसतो. स्थानिक पक्षांबाबत हे अधिक सुकर होते. कारण राज्याचे हित, प्रादेशिक अस्मितेची जपणूक हा समान मुद्दा त्यांच्या आघाडीच्या झेंड्याचा खांब म्हणून कायमच वापरता येत असतो.  पण अनेकदा या आघाड्या अथवा फ्रंट हे ‘समान विचारसरणी’च्या आधारे स्थापन झाल्याचे दावे केले जातात. बंगालमधील लेफ्ट फ्रंट ही वैचारिक अक्षावर एकाच बाजूला असलेल्यांची आघाडी आणि महाराष्ट्रात ‘हिंदुत्व’ या समान धाग्याने जोडले गेल्याचा दावा करणारी युती ही अशा आघाड्यांची  दोन ठळक उदाहरणे आहेत. 

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमधूनच बाहेर पडलेला असल्याने वैचारिकदृष्ट्या काँग्रेसशी जोडला गेलेला आहे. थोडक्यात सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अनुक्रमे भाजप आणि काँग्रेस यांची स्थानिक राजकारणाला प्राधान्य देणारी उपांगे आहेत असे म्हटले तर ते फारसे गैर ठरू नये. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप युती या दोन आघाड्या गेली ३० वर्षे परस्परांविरोधात लढत आहेत. आणि यामुळेच आज भाजपशी फारकत घेऊन सेना दोन काँग्रेससोबत जाते किंवा राष्ट्रवादीचे अन्य आमदार आपोआप ‘मागुते’ येतील असे गृहीत धरून भाजपा त्यांच्यासोबत औट-दिवसाचे सरकार स्थापन करते, तेव्हा महाराष्ट्रीय राजकारणाची घडी विस्कटते आणि अभद्र, अनैतिक युती-आघाडीचे आरोप-प्रत्यारोप सुरू होतात.

एक आघाडी अथवा युती मोडली नि नवी आकाराला आली, की नव्या समीकरणातील लाभधारक बाजू त्या घडामोडींचे समर्थन करणार, आणि त्यात सत्ता अथवा आपली राजकीय भूमी गमावलेली बाजू नव्या समीकरणाला ‘अनैसर्गिक’, ‘अपवित्र’ अथवा ‘अभद्र’ म्हणून जाहीर करणार, हे अपरिहार्यपणे घडत असते. अमुक एक युती अथवा आघाडी नैसर्गिक आहे किंवा अनैसर्गिक आहे, हे दावे केवळ ज्यांचे त्या बदलातून नुकसान होते त्यांच्याच सोयीचे असतात हे बहुतेकांना ठाऊक असतेच. फक्त ते उघडपणे मान्य न करता आघाडी करताना अथवा युती मोडताना आपण नैतिक वर्तन करत आहोत, असा दावा अट्टाहासाने केला जात असतो. राजकारणात विचारसरणींचा लोप होत असताना ‘आमची विचारसरणी समान आहे म्हणून आमची युती वा आघाडी ‘नैसर्गिक’ आहे’ हा दावा केवळ सत्तेच्या गणितावरची रंगसफेतीच असतो. पण समजा तशी नैसर्गिक वगैरे आहे असे मानले, तरी ती कायम ठेवणे कितपत उपयुक्त असते? ती मोडण्याची कारणे काय? सामान्य माणसे ‘सत्तालोलुप सगळे’ असे म्हणून झटकून टाकतात तितके ते सरळसोट असते का? या घडामोडींमागे, सत्तेचे अथवा राजकारणातील ‘सोबतीचे करार’ करणे आणि मोडणे यात खरोखरच नैतिक, अनैतिक असे असते का? स्वार्थांच्या संघर्षात केवळ एक बाजू स्वार्थी, सत्तालोलुप असे म्हणता येते का? आणि एकुण गोळाबेरीज म्हणजे राजकारण आणि सत्ताकारणाच्या घडामोडींमध्ये अशा सोबतीच्या करारांचे स्थान काय याचा वेध घ्यावा लागतो. तात्कालिक, त्या विशिष्ट एका राजकीय समीकरणाचे विश्लेषण करण्याऐवजी राजकारणात केल्या जाणार्‍या अशा ‘सोबतीच्या करारां’कडे व्यापक प्रक्रिया म्हणून पाहता येईल का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, एखाद्या राजकीय समीकरणाच्या निषेध-समर्थनापलीकडे ती प्रक्रिया समजून घेता येते का, हे तपासून पाहायला हवे.

आपल्या पक्षाला नेत्रदीपक यश मिळाले म्हणून ‘आम्ही विरोधी पक्ष संपवू’ ही घोषणा करणार्‍यांना निदान लोकशाहीत, निवडणुकीच्या मार्गाने घडवणे हे जवळजवळ अशक्यच असते. निदान जोवर स्वबळावर संपूर्णपणे सत्ता ताब्यात येत नाही तोवर तर ही घोषणा विरोधकांना आपल्या विरोधात एकवटण्यास उद्युक्त करून आपल्या पायावर पाडून घेतलेला धोंडा असतो. कारण राजकारण हे नेहमीच एक सत्तासमतोलाकडे सरकत असते. एका पक्षाने अतिरिक्त बळ मिळवले की, विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि सत्तासमतोलाला पुन्हा एकवार त्याच्या गुरुत्वमध्याकडे नेण्यासाठी नवी समीकरणे निर्माण होतात.

१९७१मध्ये काँग्रेसमधील फुटीनंतरही इंदिरा गांधी यांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर १९७७ मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला. १९८४ मध्ये राजीव गांधींच्या अभूतपूर्व अशा यशानंतर जनता दलाच्या नेतृत्वाखाली लढलेला ‘नॅशनल फ्रंट’ हा भाजप आणि डाव्या आघाडीच्या पाठिंब्यावर सत्तारूढ झाला. या वेळी काँग्रेसला जवळजवळ चाळीस टक्के मते मिळूनही केवळ विरोधकांच्या परस्पर-सहकार्याने त्यांच्या जागा निम्म्याहून अधिक घटल्या होत्या. या दोनही वेळा समाजवादी विचारसरणीशी नाते सांगणार्‍यांनी जनसंघ, भाजपसारख्या धर्माचे राजकारण करणार्‍यांशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या या ‘अभद्र’ युतीबद्दल बोलले गेले होते, आजही ‘त्यांनी माती खाल्ली’ असे केंद्रातील राजकारणात स्वत: अदखलपात्र झालेले कम्युनिस्ट लिहीत असतात. तेव्हा टीका करणारे मधु लिमये यांच्यासारखे धर्मनिरपेक्षता अथवा समाजवादी मूल्ये मानणारे अथवा तसा दावा करणारे होते. एककल्लीपणे काँग्रेसविरोधाच्या तत्त्वाच्या आहारी जात आपण दुसरा भस्मासुर उभा करत आहोत असे धोक्याचे इशारे त्यांच्यासारख्या काही जणांनी दिले होते. पण त्या क्षणी सत्ताकारणात अक्राळविक्राळ वाढून बसलेल्या काँग्रेसला सत्ताच्युत करणे हे विरोधी पक्षांचा एकमेव उद्दिष्ट होते. ‘Kill a demon today, deal with the devil tomorrow’ या उक्तीला अनुसरून या वैचारिकदृष्ट्या विसंगत ‘सोबतीच्या करारा’चे समर्थन तेव्हाच्या सत्ताधार्‍यांकडून दिले जात होते. 

पुढे यातून भाजपसारखा धर्माधिष्ठित राजकारण करणारा पक्ष प्रबळ झाला. म्हणजेच यातून धोक्याचे इशारे देणार्‍यांचे दावे द्रष्टेपणाचेच ठरले. पण दुसर्‍या बाजूने पाहता त्यांचे काँग्रेसला दुबळे करण्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य झाले असे म्हणावे लागेल. कारण १९८९ नंतर आजपर्यंत, म्हणजे ३० वर्षे काँग्रेस कधीही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलेली नाही. याउलट त्या राजकारणातून उभा राहिलेला भाजप आज १९७१च्या काँग्रेसप्रमाणे स्वबळावर ३००चा आकडा पार करून गेला आहे. राजीवजींची ४०४ खासदारांची, इंदिराजींचा ३५२ची कामगिरी जरी त्यांना साध्य करता आलेली नसली, तरी भारतीय राजकारणाचा मुख्य अक्ष म्हणून त्यांनी आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे १९७७, १९८९च्या काँग्रेसेतर राजकारणाची जागा आता भाजपेतर राजकारणाने घेतली आहे. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील तीनही प्रमुख भाजपेतर पक्षांनी एकत्र येणे हे त्याचेच निदर्शक आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आघाडी साकार होते आहे. वैचारिकदृष्ट्या परस्पर-विरोधी असलेल्यांची ही ‘अभद्र हातमिळवणी’ आहे, भाजपद्वेषातून तयार होणारी विजोड युती (गेली पाच वर्षे ‘मोदीद्वेष’ म्हटले गेले जात होते. पण आता स्थानिक राजकारणात तरी भाजप = मोदी हे समीकरण मागे पडताना दिसते आहे.) वगैरे आरोप होत आहेत. जे साधारणपणे जनता पक्षाच्या प्रयोगाच्या वेळी झालेल्या आरोपांशी नाळ जोडणारे आहेत, 

एक बाजू प्रबळ होऊन सत्तासमतोल बिघडू लागला की, ज्यांची राजकीय भूमी घटते आहे, असे राजकीय प्रवाह, प्रसंगी वैचारिक भूमिकांतील अंतर्विरोध दूर ठेवूनही, एकत्र येतात नि प्रबळ बाजूला तोंड देतात. पण पंचाईत अशी असते की, प्रबळ विरोधकांपासून आपली राजकीय भूमी वाचवतानाच ती आपल्या सहकारी पक्षासोबत वाटून घ्यावी लागत असते. आणि तिथे तो जोडीदार प्रबळ होऊन बसला की, ती परत मिळवणे अवघड होत जाते. तेथील स्थानिक कार्यकर्तेही साथ सोडून जोडीदार पक्षाकडे अथवा विरोधकांकडे सरकू लागतात. थोडक्यात जोडीदार असणे हे आपली भूमी टिकवणे आणि विस्तार करणे या हेतूंना पडलेले कुंपण असते. त्यामुळे विरोधकांप्रमाणेच जोडीदाराचे बळही आपल्या दृष्टीने घातक ठरेल, इतके वाढू न देणे आवश्यक असते. आणि तसे घडू लागले तर प्रसंगी त्याचा हात सोडून, त्याला शह देण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणीही उपयुक्त ठरू शकते.

महाराष्ट्रात सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या दोन जोड्या गेली काही दशके बस्तान बसवून आहेत. राष्ट्रवादी हा तर काँग्रेसमधून फुटून निघालेला पक्ष असल्याने त्याची नाळ काँग्रेसशी जोडलेली आहेच. तर सेना आणि भाजप हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परस्परांचे सोबती आहेत. असे असूनही काही वेळा युती अथवा आघाडी मोडून निवडणुका लढल्या गेल्या आहेत. त्यात जागावाटपाचे घोडे चार-दोन जागांवर अडले हे केवळ वरवरचे कारण असते. सोबत निवडणुका लढवण्याबरोबरच विरोधात निवडणुका लढवणेही आपापली ताकद अजमावण्यासाठी, वाटपाचे दान नव्याने पाडण्यासाठी हे केले जाते. जोवर सोबत राहूनही त्या जोडीला सत्ता बरीच दूर राहते, तोवर शक्य त्या सार्‍या तडजोडी करत सोबत कायम राहते. कारण यात सत्तेच्या वर्तुळात मिळवण्याजोगे एक विरोधी पक्षनेतेपदापलीकडे फार काही नसते. पण येऊ घातलेल्या सत्तेचे क्षितिजावर दर्शन घडले की, सोबतीच्या कराराचा कस लागणे सुरू होते. सत्ता जेव्हा येईल तेव्हा तिच्यामधील अधिकाधिक वाटा आपल्या पदरी पडावा यासाठी एकदिलाने चाललेल्या जोडीमध्ये आपसातले डावपेच अधिक तीव्र होतात. एकाच वेळी जोडीने सत्तेची अंतिम रेषा पार करायची, पण त्या तीन पायांच्या शर्यतीमध्ये ती रेषा पार करणारे पहिले पाऊल आपले असावे, जोडीदाराचे नसावे यासाठी खटपटी चालू होतात.

१९९५ला सेना-भाजप युतीचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे दोन्ही पक्ष कधी आघाडी, तर कधी बिघाडी पद्धतीने लढत होते. तेव्हा ही जोडी सत्तेच्या जवळ होती, तेव्हा त्यांचा आटापिटा हा अंतिम रेषेपलीकडचे पहिले पाऊल माझे असावे यासाठी चालू होता. तेव्हा युती एकत्रितरीत्या लढूनही आघाडीसमोर मात खात असल्याने, सत्तेपासून दूर राहत असल्याने त्यात बेबनाव होण्याचे फारसे कारण नव्हते. त्या काळी एकत्र लढण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढवून काही वेळा अधिक जागा मिळवू शकतात असा दावा केला जाई. कारण दोनपैकी एका पक्षाचा उमेदवार पसंत नसलेल्या, पण मूळ काँग्रेसी मुशीतल्या मतदाराला दुसरा पर्याय उपलब्ध होत होता. त्यामुळे काँग्रेसविरोधी मते एकवटून राष्ट्रवादीचा उमेदवार पुन्हा काँग्रेसच्या सत्तेलाच हातभार लावत होता. हाच प्रयोग २०१४ ते २०१९ या काळात सत्ताधारी नि विरोधी असे दोन्ही राजकीय अवकाश बळकावून करत आहेत, असा दावा काही राजकीय विश्लेषक करत होते. सत्तेत राहूनही भाजपवर सर्वाधिक टीका सेनेकडूनच होत असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही हिंदुत्ववादीच अशी योजना करून शेवटी दोन्ही बाजूंची मते युतीच्या दावणीला बांधता येणार होती.

आघाडी मोडून निवडणुका लढवल्याने आपआपल्या प्रभावक्षेत्रात आपल्याच खासदार, आमदार, नगरसेवक यांना सत्तेची अधिक पदे देऊन पकड कायम ठेवणे शक्य होत असते, तर दुसरीकडे जिथे आपण दुय्यम आहोत, तिथे एकवार स्वतंत्र लढून आघाडी/युतीमध्ये मिळणार्‍या वाट्याहून अधिक उमेदवार निवडून आणता आले तर पुढच्या वेळी पुन्हा सोबत येताना अधिक वाटा मागता येतो. २०१४ मध्ये लोकसभेत सेनेशी युती करून केंद्रात सत्ता स्थापन केल्यावरही भाजप विधानसभेत स्वतंत्र लढणे पसंत करतो ते नेमके याचसाठी. केंद्रात सत्ताधारी असल्याने, मोदींचा करिष्मा असल्याने आपल्या वाट्याच्या ११७ ऐवजी अधिक जागा लढवून यशाचे प्रमाण सेनेच्या तोडीसतोड जागा मिळवल्या, तर पुढच्या विधानसभेला युती करताना अधिक वाटा मागता येईल हा हेतू होता. तेव्हा युती तुटल्याचे खापर तेव्हा सेनेवर फोडले किंवा इतर कारणे काहीही सांगितली असली, तरी भाजप स्वतंत्रपणे लढणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

२०१४च्या विधानसभेत मोडलेली युती भाजप २०१९च्या लोकसभेमध्ये पुन्हा जोडून घेतो, तेव्हा ती त्यांच्या पक्षाच्या धोरण ठरवणार्‍यांची धरसोड वृत्ती नसते. विधानसभेत मोठा भाऊ कोण याचे गणित त्यांनी बदलण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले असले, तरी लोकसभेत सेनेचा हात सोडून स्वबळावर लढण्याची वेळ अद्याप आलेली नाही याचे ते भान असते. लोकसभेत स्वबळावर जेमतेम बहुमत मिळालेल्या भाजपला अजून पल्ला गाठेपर्यंत शक्य तितके सोबती हवे असतात. त्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना साफ धोबीपछाड मारले, त्या नीतीशकुमारांना त्यांनी बिहारमध्ये विधानसभेत मुसंडी मारल्यावर पुढच्या लोकसभा निवडणुकीत सम-समान वाटपासह सोबत घेतले गेले ते यासाठीच. हे गणित चोख जमवून लोकसभेला स्वबळावर प्रथमच तीनशेचा टप्पा पार केल्यानंतर, भाजप काही सहकारी पक्षांचे पंख कापण्यास सज्ज झाला. त्याचाच एक टप्पा म्हणून महाराष्ट्रात समान जागावाटपाचे आश्वासन झिडकारून सेनेपेक्षा तब्बल चाळीस जागा भाजपने अधिक मिळवल्या. मागच्या लोकसभेच्या तुलनेत भाजपचा आलेख चढता राहिल्याने भाजप हा मोठा भाऊ आहे, हे मान्य करत सेनेला नमते घ्यावे लागले. याचा अर्थ युतीमध्ये सेनेने प्रथमच आपली राजकीय जमीन गमावली  होती. हा सारा घटनाक्रम भाजपने सेनेला मागे रेटत नेल्याचेच सिद्ध करणारा होता.

त्याचप्रमाणे आज निकालाची स्थिती पाहता सेनेने ‘भाजपसाठी दरवाजे उघडे आहेत, मुख्यमंत्री आमचा हे मान्य केले तर त्यांच्यासोबत जाण्यास ना नाही’ किंवा ‘उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणून युती तुटली’ वगैरे कितीही बतावणी केली, तरी विधानसभेचे बलाबल पाहता भाजपपासून वेगळे होण्याची मिळालेली संधी त्यांनी साधली हेच सत्य आहे. दोन निवडणुकांत भाजपने मारलेली मुसंडी, विधानसभेत नागपूर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतून जागावाटपांच्या पातळीवरच सेनेला दिलेला भोपळा आणि मुंबईसारख्या सेनेच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला समान वाटा, ही सेनेसाठी धोक्याची घंटा होती. आपली अधिक भूमी गमावू नये यासाठी सेनेला भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आणि स्वत: त्यांच्यापासून स्वतंत्र उभे राहणे गरजेचे झाले होते. त्यात स्वत:ला सत्ता मिळाली तर सत्तेसह अथवा विरोधात उभे राहून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या ठिकाणी गमावलेली भूमी परत हस्तगत करण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. असे करण्यात युतीमुळे होणारा फायदा गमावताना, हातचे सोडून पळत्या पाठीमागे जाण्याचा धोकाही होताच. विरोधकांशी हातमिळवणी करण्याने सत्ता तर हातात येते आणि मुख्य म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून त्याआधारे त्यांच्या होणार्‍या वाढीला पायबंदही घालता येतो. भाजपने बेलगामपणे वैचारिक विरोधकांच्या गोटातील लोकप्रतिनिधींसाठी आपले दरवाजे सताड उघडे ठेवून ‘इनकमिंग फ्री’चा बोर्ड लावून आपली राजकीय नैतिकता केवळ ‘बोलाचीच कढी’ आहे, हे स्पष्ट केले होते. सेनेने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आघाडीशी राजरोसपणे संसार थाटला आहे. केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वत्र राजकीय भूमीच नव्हे तर आपले शिलेदारही गमावत चाललेल्या आघाडीला तर राजकीय नैतिकता नावाचे गुलबकावलीचे फूल सांभाळत बसणे परवडणारे नव्हतेच.

इथे केवळ या चार पक्षांकडे न पाहता इतर पक्षांची वाटचालही पाहिली तर सोबतीच्या करारात अनुस्यूत असणारी ही दोन तत्त्वे - राजकीय भूमी राखण्यासाठी सोबत आणि तिच्या विस्तारासाठी किंवा बलप्रदर्शनासाठी फारकत - दिसून येतील. लोकसभेला आणि विधानसभेला कोणतीही युती वा आघाडी टाळून स्वबळावर लढणारी ‘वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ आहे, असा काँग्रेसने वा विरोधकांनी आरोप केला असला, तरी एका राजकीय पक्षाने स्वबळावर जवळजवळ सर्व जागा लढवाव्यात यामागे इतर कुणाला मदत करावी एवढा मर्यादित उद्देश नसतो. त्यात आपली राजकीय भूमी तपासणे, आपले बळ सिद्ध करणे आणि नंतर त्याआधारे भविष्यात आघाडी अथवा युतीमध्ये वाटा मागणे हा उद्देश असतो. एका नव्या पक्षाला काँग्रेस-राष्टवादी आघाडी देऊ करेल, त्या जागांची संख्या आपले नऊ संभाव्य खासदार यांच्या विरोधामुळे पडले किंवा हे सोबत असते तर अजून तीस-एक आमदार अधिक देऊन गेले असते हे त्यांना दिसून आल्यावर त्यांनी देऊ केलेल्या जागांमध्ये बराच फरक पडणार होता. लोकसभेला तब्बल ४२ लाख मते घेतलेला हा पक्ष विधानसभेला आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ घेऊन सिद्ध होता. परंतु विधानसभेलाही त्यांनी हाच स्वबळाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंगाशी आला. लोकसभेला मिळालेल्या मतांमध्ये लक्षणीय घट होऊन त्यांची वाटाघाटीची ताकद उलट घटलेली दिसली. पण असे असूनही महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाचवा कोन ही जागा त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेकडून हिसकावून घेतली आहे. एक संभाव्य पर्याय म्हणून मतदार त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहू लागले आहेत.

याउलट रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे भाजप महायुतीमध्ये काय झाले आहे ते पाहता येईल. त्यांचे एका हाताच्या बोटावर मोजता येतील उमेदवारही भाजपच्या चिन्हावर लढल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपचेच होते. इतकेच नव्हे तर त्या पाचपैकी चार उमेदवार तर भाजपनेच निवडले होते. माळशिरसमध्ये भाजयुमोचे उपाध्यक्ष राम सातपुते यांनी आरपीआय उमेदवार म्हणून अर्ज भरला. पाथ्रीमध्ये मोहन फड‍यांना भाजपप्रवेश रोखून त्यांना आरपीआय उमेदवार बनवून तांत्रिकदृष्ट्या त्यांचा मतदारसंघ त्यांना देण्यात आला. यांपैकी मोहन फड पराभूत झाले असले, तरी सातपुते यांच्यासह राजेश पवार (नायगांव) हे देखील निवडून आले. पण हे दोनही आमदार तांत्रिकदृष्ट्या भाजपचे आमदार असल्याने विधिमंडळात भाजपचा विधिमंडळ पक्षनेता हाच त्यांचा नेता असेल आणि भाजपच्या प्रतोदांनी काढलेले व्हिप त्यांना बंधनकारक असतील. याशिवाय शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर, रासपचे राहुल कुल, ‘स्वाभिमानी पक्षा’चे नितेश राणे, किनवटचे भीमराव केराम (रासप),  या सार्‍यांनीच भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरले. एका अर्थी या छोट्या पक्षांना आता विधिमंडळात प्रातिनिधित्व उरलेले नाही. भाजपने तिथे या सहकारी पक्षांना गिळून टाकले आहे.

भाजपसोबत जाण्यातील हा धोका वेळीच ओळखून भाजपसोबतची आघाडी मोडून स्वबळावर अथवा अन्य कुणासोबत जाऊन आपले बळ राखलेल्या नेत्यांमध्ये ओडिशामध्ये नवीन पटनाईक, आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या जोडीला बिहारमध्ये नीतिशकुमार यांचे नावही घेता येईल. किंबहुना या ‘तोडा आणि जोडा’ तंत्राचे सर्वांत मोठे लाभधारक म्हणून नीतीशकुमार यांचेच नाव घेता येईल. समाजवादाचा टेंभा मिरवतानाच त्यांनी प्रथम लोहियांच्या काँग्रेसेतर राजकारणाची कास धरत उघडपणे हिंदुत्ववादी राजकारण करणार्‍या भाजपच्या एनडीएशी घरोबा केला. मोदींच्या उदयानंतर त्यांच्या विस्तारवादाच्या धोक्याची जाणीव होऊन २०१४च्या लोकसभेपूर्वी भाजपशी फारकत घेतली. त्याचवेळी वेगळे झालेल्यानवीन पटनाईक यांची फारकत त्यांना जोरदार फायदा देऊन गेली असली तरी तो प्रयोग नीतीशकुमार यांच्या अंगाशी आला. त्यांना जेमतेम दोन खासदारांवर समाधान मानावे लागले. तर त्यांच्या तुलनेत दुय्यम मानलेल्या पासवानांच्या पक्षाने भाजपसोबत जाऊन सहा खासदार निवडून आणले. स्वतंत्र राहिलो तर मोदींचा हा झंझावात आपल्याला पाचोळ्यासारखा उडवून देणार हे ओळखून, नीतीशकुमार यांनी आपले कट्टर विरोधक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाशी युती करून विधानसभेत मोदी-पासवान यांच्या एनडीएला अस्मान दाखवले. पण वर्तुळ पुरे करण्याची घाई असलेल्या नीतीशकुमार यांनी नव्या आघाडीत दुय्यम होतो आहे, असे पाहताच पुन्हा कोलांटी मारून भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. या खटाटोपात महत्त्वाचे म्हणजे २०१९च्या लोकसभेत समसमान जागा पदरात पाडून घेतल्या, त्या विधानसभेतील यशाच्या आणि सत्तेच्या बळावरच. त्या अर्थी ‘राजकीय नैतिकतेशी ऐशीतैशी’ म्हणत त्यांनी दोनही बाजूंशी केलेल्या आघाडीतून आपले राजकीय दाम चोख वसूल केले आहेत, असे म्हणावे लागेल.

या सार्‍या पक्षीय खेळात कार्यकर्त्यांचे, स्थानिक नेत्यांचे काय होते. त्यांची केवळ फरफट होते की, त्यांनाही त्यातून लाभ मिळतो असे आनुषंगिक प्रश्रांची उत्तरे शोधावी तर जे पक्षीय पातळीवर दिसते तेच कार्यकर्त्यांच्या पातळीवर दिसून येते. काही कार्यकर्त्यांना अन्य पक्षाची सोबत हवी असते, तर काहींना ती बिलकुल नको असते. यात सत्तेच्या स्थानिक गणिताचा मोठा वाटा असल्याने काही वेळा पक्षाचे धोरण आघाडीचे तर काही स्थानिक नेत्यांचे नेमके उलट असे दिसून येते. विशेषत: आघाडीच्या राजकारणामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना मतदारसंघ गमावण्याचा धोका निर्माण होतो. अशा नेत्याला आघाडी होऊ नये अशीच इच्छा असते. दुसरीकडे ज्याला उमेदवारीची नि मतदारसंघाची बव्हंशी खात्री आहे, अशा नेत्याला आघाडी होऊन आपल्या विजयाची शक्यता आणखी वाढावी अशी इच्छा असते. युती-आघाडीमुळे मतदारसंघ गमावलेले नेते मग थेट विरोधकांशी संधान बांधून काही पदरात पाडून घेत पक्षांतर करतात. त्या पक्षांतराने पुन्हा त्या मतदारसंघातील राजकीय गणित बदलते आणि राजकीय घुसळण चालूच राहते.

थोडक्यात सांगायचे तर युती-आघाड्यांचे राजकारण हे सत्तासमतोलाच्या, पक्षवाढीच्या आणि नेत्यांच्या नेतृत्वाचे बस्तान बसणे, या विविध कारणांभोवती फिरत असते. तिथे सत्तासंपादन हेच प्रमुख उद्दिष्ट असते. राजकीय अस्तित्व टिकले तरच विचारांची रुजवणूक करण्यास भूमी मिळते, हे बहुतेक राजकीय पक्षांना ठाऊक असते. त्या सत्तेसाठी विजोड आघाड्यांच्या तडजोडी केल्या जातात, त्यातून विरोधकांबरोबरच सोबत्यावरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. पुढे हे सत्ता साधनच साध्य झाल्याने विचारांशी नाळ बव्हंशी झेंड्यापुरती उरते. पण तरीही ‘विचारांशी तडजोड नाही’ म्हणत सत्तेपासून कायम दूर राहात आपल्या विचारांना पोथीतले सुविचार करून ठेवणार्‍यांहून या सत्तालोलुप तडजोडवाद्यांची त्या क्षेत्रातील व्यावहारिक यशाची टक्केवारीही कणभर अधिकच राहत असते. याशिवाय राजकारणाबाहेर राहून आपल्याला हवी ती आघाडी झाली की ती ‘नैसर्गिक’ आणि गैरसोयीची झाली ती ‘अनैसर्गिक’ अथवा ‘अभद्र’ अशा मूल्यमापनाच्या पिंका टाकणारे या सार्‍या चक्राबद्दल अनभिज्ञ असतात. राजकारणातील प्रत्येक सोबतीच्या कराराची निश्चित एक्स्पायरी डेट नसली तरी ती आपल्या सोयीनुसार एक्स्पायर व्हावी ही इच्छा सर्वच जोडीदारांची असते. ती निरंतर टिकावी अशी इच्छा असणारे भाबडे मोजकेच.

............................................................................................................................................

लेखक मंदार काळे तरुण अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......