‘शिवाजी कोण होता?’प्रमाणे ‘असा होता टिपू सुलतान’ घराघरात पोहचवायला हवे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शीतल चव्हाण
  • ‘असा होता टिपू सुलतान’चं मुखपृष्ठ
  • Fri , 15 November 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस असा होता टिपू सुलतान Asa Hota Tipu Sultan सरफराज अहमद Sarfraj Ahamad

इतिहासाचं आणि महापुरुषांच्या चरित्राचं विकृतीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण करत भावनेचं राजकारण केलं जात आहे. अशा काळात सरफराज अहमद यांचं टिपू सुलतानाचा खरा इतिहास मांडून सांस्कृतिक दहशतवादाला सुरुंग लावणारं ‘असा होता टिपू सुलतान’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, ही मोठी आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांना ‘मुसलमानांविरुद्ध लढणारा हिंदू राजा’ अशा प्रतिमेत अडकवून त्यांची रयतेच्या कल्याणकारी स्वराज्याची व्यापक संकल्पना झाकली गेली. तद्वतच टिपूलाही हिंदूद्वेष्टा, माथेफिरू अन मूलतत्त्ववादी ठरवून बदनाम केलं गेलं.

टिपूचं मूळ धर्मसहिष्णू, अभ्यासू, इंग्रजी वसाहतवादाचे भयानक परिणाम ओळखून त्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी पराक्रमाची पराकाष्टा करणारं, शोषणावर आधारित इंग्रजी व्यापार व उत्पादनपद्धतीला पर्याय म्हणून सहकारी - समाजवादी तत्त्वावर आधारित अन तंत्रज्ञानाची जोड असलेली नवी उत्पादन व्यववस्था आणणारं, शिक्षण - शेती अन उद्योगधंदे याबाबत कमालीची दूरदृष्टी असणारं, जगातील अनेक प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करून लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था उभी करणारं, शेती क्षेत्राला मुबलक सिंचन व्यवस्था पुरवून शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय/ व्यापाराला चालना देणारं व्यक्तिमत्त्व झाकून ठेवण्यात आलं.

ज्या इंग्रजांविरुद्ध लढण्यात टिपूनं हौतात्म्य पत्करलं, त्या इंग्रजांच्या निगराणीत लिहिलेला चुकीचा इतिहास संदर्भ म्हणून वापरत तथाकथित इतिहासकारांनी टिपूला चुकीच्या पद्धतीनं रंगवण्यात आपल्या लेखण्या कशा झिजवल्या आणि खरा टिपू कोण अन कसा होता, हे भक्कम पुराव्यानिशी मांडण्यात सरफराज यशस्वी झाले आहेत. 

इतिहास म्हणजे फक्त भुतकाळातील घटनांचा लेखाजोखा म्हणून वाचायचा नसतो, तर इतिहासाचा अभ्यास करून समाजाच्या बदलाचे नियम, सामाजिक बदलांमागील प्रेरणा समजून घ्यायच्या असतात, हे सांगणारा कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धान्त प्रसिद्ध आहे. ‘आजवरच्या इतिहासकारांनी जग कसे आहे याचेच नुसते वर्णन केले, पण प्रश्न आहे तो जग बदलण्याचा!’ असंही मार्क्स म्हणतो. सरफराज यांच्या पुस्तकात इंग्रजांच्या वसाहतवादामुळे भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वात झालेले बदल अधोरेखित केले आहेत आणि या बदलांमुळे होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी टिपू सर्व आघाड्यांवर पर्यायी मार्ग तयार करतो याचं विवेचन केलं आहे. म्हणूनच इंग्रजांची त्या वेळची वसाहतवादी प्रवृत्ती खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकिकरण, वित्तीय भांडवलशाही या नव-साम्राज्यवादी रूपात आज सर्वसामान्यांसमोर हैदोस घालत असतानाच्या काळात टिपूचा इतिहास, हा या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारा आणि मार्गदर्शक आहे. 

भांडवली व्यवस्था ही अचानक आलेली नाही. सरंजामशाहीच्या पोटात बदलती उत्पादन पद्धती आणि बदलते उत्पादन सबंध याचा परिपाक म्हणून ती जन्माला आली आणि वाढीस लागत लागत आजच्या गुंतागुंतीच्या स्वरूपापर्यंत पोहचली. ज्याप्रमाणे सरंजामशाहीच्या पोटात भांडवशाहीचा उदय झाला, तद्वतच भांडवलशाहीतले अंतर्विरोध टोकाला जाऊन भांडवलशाहीच्या पोटातच नव्या व्यवस्थेच्या उदयाची अपरिहार्यता निर्माण होते. हे सगळे बदल आपसूक होत नाही, तर ते घडवून आणण्यासाठी श्रमिक वर्गाला इतिहासाचा मागोवा घेत, त्यातून प्रेरणा घेत मार्गक्रमण करावं लागतं. ही प्रेरणा जुन्या राजेशाही व्यवस्थेतूनही मिळू शकते. या प्रेरणेचे स्त्रोत छत्रपती शिवाजी आणि टिपू सुलतानही असू शकतात, हे यानिमित्तानं लक्षात घ्यायला हवं. राजेशातील महापुरुषांच्या इतिहासाला पुन्हा आणि खऱ्या अर्थानं प्रकाशित करून प्रेरणा निर्माण करणाऱ्या लिखाणाचं स्वागत व्हावयास हवं. 

सरफराज यांच्या लिखाणाचं अजून एक वैशिष्ट्य असं की, त्यांच्या प्रत्येक मांडणीमागे भक्कम पुरावे आणि संदर्भ आहेत. टिपू हा मुसलमान होता आणि म्हणून वाईट होता हा एकच संदर्भ (!) घेऊन टिपूची बदनामी करणाऱ्या उतावळ्या अन् प्रचारकी लोकांचा खोटारडेपणा सरफराज जागोजागी उघड करतात.

टिपू, निझाम आणि पेशवे या भारतातल्या सत्तांनी एकत्र येऊन इंग्रजी वसाहतवादाविरुद्ध लढावं असं ठरलेलं असताना टिपूला विश्वासात न घेता ‘सालबाईचा तह’ करून इंग्रजांना मदत करणारे पेशवे देशद्रोही नाहीत का? मंदिर अन देवी - देवतांच्या मूर्त्या फोडणारे मुस्लीम राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे, तर मग श्रृंगेरीच्या मठावर हल्ला करून तिथल्या सरस्वतीची मूर्ती फोडणारे सांगलीकर पटवर्धन धर्मद्रोही नाहीत का? सांगलीकर पटवर्धनांनी फोडलेल्या त्याच श्रृंगेरीच्या मठाच्या दुरुस्तीसाठी मदत करणारा टिपू हिंदूद्वेष्टा कसा? तब्बल १००हून अधिक मंदिरांना जमिनी, देणग्या अन् दिवाबत्तीसाठी पैसा देणारा टिपू धर्मांध अन माथेफिरू कसा? आपल्या पदग्रहणाच्या वेळीच ‘इकरारनामा’ मांडून त्यात प्रजेत धर्म व वंशभेद करणार नाही, असं सांगणारा टिपू नंतर प्रजेला खुश करण्यासाठी धर्मसहिष्णुतेचं सोंग घेणारा कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुराव्यासह देत सरफराज यांनी खोटा इतिहास रचणाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे. 

टिपू सुलतानचा खोटा इतिहास खोडून काढत खरी आणि वास्तविक मांडणी करण्याबरोबरच सरफराज यांनी टिपूबाबत माहीत नसलेल्या अनेक घटना प्रकाशात आणल्या आहेत. टिपूने देशातला पहिला साखर कारखाना उभारला, ‘फौजी अखबार’ या नावानं देशातलं पहिलं वृत्तपत्र चालू केलं, जेकोबियन क्लब गणराज्याची स्थापना करून आपला स्वतंत्र ध्वज फडकावला, जनगणना करून शिक्षण सक्तीचं केलं, विद्यापीठाची स्थापना केली, जखमी सैन्याला दवापाणी करण्यासाठी व्यक्तिगत लक्ष युनानी आणि आयुर्वेदिक आरोग्य सुविधा पुरवली, प्रशासनात लोकभाषेचा वापर केला, स्वतंत्र ग्रंथालय उभारून अनेक विषयावर पुस्तकं लिहिली - प्रकाशित केली,  नवीन तंत्रज्ञानाचा वापर असणारे अनेक कारखाने उभारले, धरण बांधून त्यातल्या पाण्यावर शेतीचं उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना करात सवलत दिली, बॅंका उभारल्या, लोकांकडून भाग भांडवल जमा करून उद्योग उभारले अन छोट्या गुंतवणूकदारांना जास्त नफा दिला, सरकारी उच्च पदावर नेमणुका करताना धर्म अन वंशावरून भेदभाव केला नाही, इतर धर्माचे पंडित, स्वामी यांचा आदर केला, स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली, मनुष्यहानी नको म्हणून शत्रू सैन्याला सोडून द्यावं असे हुकूम दिले.

टिपूबाबतच्या अशा अनेक नवीन बाबी सरफराज पुराव्यानिशी समोर आणतात. हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश सरफराज आणत नाहीत किंवा अतिशयोक्ती करत नाहीत. ख्रिश्चन पादऱ्यांच्या धर्म प्रचारावर टिपूनं निर्बंध आणले, हे मान्य करतात अन् त्यामागचे राजकीय कारणही समजावून सांगतात. 

टिपूनं सक्तीनं धर्मांतर घडवून आणलं हा दावा कसा तथ्यहीन आहे, हेही समजावून देतात. एका विशिष्ट समाजाला अन् त्या समाजातील महापुरुषांना बदनाम करण्याचा काही शक्तींचा डाव सरफराज या तरुण लेखकाला अस्वस्थ करतो. पण या अस्वस्थतेला सरफराज विधायक वळण देतात आणि अभ्यासावर, संशोधनावर, संदर्भ अन पुराव्यावर आधारीत इतिहासाची नव्यानं मांडणी करतात. आपल्या समाजातील महापुरुषाला बदनामीतून मुक्त करण्यासाठीच नाही तर त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आजच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लिहितात ही फार कौतुकाची बाब आहे. 

शोषक विरुद्ध शोषित हाच मानव जातीच्या इतिहासातील खरा संघर्ष असताना सर्वसामान्य लोकांमध्ये जात, धर्म, पंथ अन वंश या कृतिम विभागणीद्वारे फूट पाडणाऱ्या शक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा खरा इतिहास आजही मार्गदर्शक आणि रिलेव्हंट आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ हे छोटेखानी पुस्तक लिहून शिवाजीमहाराज घराघरात पोचवले. त्याच पद्धतीनं सरफराज यांचं ‘असा होता टिपू सुलतान’ हे पुस्तकही सर्वदूर पोहचावं. पिळवणूक करणाऱ्या व्यवस्थेला अन पिळवणुकीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाला धार्मिक-जातीय वळण देत दाबू पाहणाऱ्या शक्तींना मुळासकट उपटून फेकण्यासाठी हा इतिहास प्रेरणादायी ठरो!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 November 2019

शीतल चव्हाण,

टिपूने हिंदूंच्या कत्तली केल्या हे आम्हांस माहितीये. त्याला फुकटचा डोक्यावर चढवून ठेवायला हिंदू मेल्या आईचं दूध प्यालेले नाहीत. हिंदू लिंगायत महिलांचे स्तन छाटणारा टिपू म्हणे धर्मसहिष्णु. फार छान. जे कळायला पाहिजे ते कळलं आम्हांस.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Sandesh Bhagat

Sat , 16 November 2019

पूस्तक मार्केट मध्ये आलं आहे का ? कुठे मिळेल


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......