'आविष्कार' या नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे उर्फ काकडेकाका यांचे काल मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. जवळपास सात दशके प्रायोगिक रंगभूमीची अव्याहत सेवा करणारा मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे काकडेकाका. त्यांचं ‘अमका’ हे कार्यकथन पाचेक वर्षांपूर्वी मौज प्रकाशन गृह व आविष्कार यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलं आहे. त्यातील हा संपादित अंश...
............................................................................................................................................
१.
१९६३ साली ‘रंगायन’ची दोन नाटकं रंगभूमीवर आली. शिवाय आधीचे एकांकिकेचे प्रयोगही सुरू होते. तेंडुलकरांची दोन नाटकं ‘मी जिंकलो, मी हरलो’ आणि ‘कावळ्यांची शाळा’! तेंडुलकर ‘रंगायन’चे हक्काचे नाटककार. पण त्यांचं नाटक करण्याचा निर्णय उच्च पातळीवर व्हायचा आणि ते करायचं ठरल्यावर आम्हाला कळायचं. ते कळताच आम्ही कलाकार, कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागायचो. त्याप्रमाणे ‘मी जिंकलो, मी हरलो’ नाटकातील कलाकारांची निवड झाली. डॉ. लागू ‘मादी’पासून ‘रंगायन’मध्ये काम करत होतेच. त्यांचीच निवड मुख्य भूमिकेसाठी झाली, हे ओघानं आलंच. नायकाच्या पत्नीच्या भूमिकेसाठी स्वत: विजयाबाई. शिवाय दत्ता भट, मनुताई केंकरे, राजा बापट, जयश्री बांगर व आम्ही छोट्या छोट्या भूमिकांसाठी. आश्चर्य म्हणजे यातल्या नायकाच्या गायक-मित्राच्या भूमिकेसाठी प्रथमच सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे असणार होते. बहुतेक ते प्रथमच नाटकात काम करणार होते आणि सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का देणार होते. नाटकाचं नेपथ्य असणार होतं राम शितूत यांचं.
नाटकाचा केंद्रिबदू म्हणजे त्यातील नायक माधव. त्याच्याभोवती हे नाटक फिरत राहते. माधवने नाटकांतून कामं करू नयेत, नोकरी करावी म्हणून सासरे नोकरीतील बढतीसाठी प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी एका उच्चपदस्थाशी बोलणी करण्याकरता त्यांना घरी बोलावले आहे. त्याच दिवशी नेमका माधवच्या नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. प्रयोग अतिशय यशस्वी ठरलाय. त्या धुंदीत ठरल्या वेळी माधव घरी येत नाही. त्यामुळे संघर्षांची ठिणगी पडते. माधवचं अभिनंदन करण्यासाठी त्याचा मित्र गायक-नट शेख्या घरी आलेला आहे. घरातलं वातावरण तणावग्रस्त आहे. नाटकातलं काम चांगलं झालं म्हणून शेखर माधवचं अभिनंदन करतो. यशाच्या धुंदीत माधव बोलून जातो : ‘मी खर्डेघाशी करायला जन्माला नाही आलो. माझा आत्मा मला सापडलाय. मी नोकरी सोडणार आहे. रंगभूमी हाच माझा व्यवसाय असणार आहे.’ संसार आणि नाटक हा या संघर्षांचा मूळ गाभा. नाटकांमागून नाटकं, त्यांचे प्रयोग, दौरे, त्यातील नायकांचे अनुभव, घरी गरोदर अनू, दारिद्रय तशात नाटकातील कुणा स्त्रीकलाकाराबरोबरच्या त्याच्या ‘संबंधा’बद्दल गैरसमज पसरल्याने, घरातील आर्थिक ओढाताणीमुळे अनू आणि माधव यांचं भांडण विकोपाला जातं. त्या आवेगात माधव ‘नाटक सोडलं’ म्हणून सांगून जातो. पण..
नंतर त्यानं माध्यम बदललंय. त्याचं चित्रपटातील विनोदी काम सर्वांना आवडलंय. सत्कार सोहळे चाललेत. घरी आनंदी आनंद आहे. पैसा, प्रसिद्धी, गाडी, बंगला यांचं स्वप्नरंजन चाललंय. अन् नायकाच्या मनात द्वंद्व सुरू झालंय. कुठं जायचं होतं आणि कुठं आलोय? आपण हरलो आहोत, याची जाणीव होते. घरच्यांना वाटतं- आपण जिंकलो!
डॉ. लागू रविवारी पुण्याहून आले की सबंध दिवस तालमी व्हायच्या. एरवी रोज संध्याकाळी डॉक्टर ज्यात नसतील अशा प्रसंगांच्या तालमी व्हायच्या. दत्ता भट त्यावेळी खादी ग्रामोद्योग संस्थेत कामाला होते. त्यांचं ऑफिस इरला येथे- म्हणजे विलेपार्ले पश्चिम भागात. ते ऑफिस संपवून भुलाभाई इन्स्टिट्यूटला यायचे. मीही ऑफिसमधून यायचो. भट थकलेले असायचे. बरोबर डबा आणलेला असायचा. मला बोलवायचे- ‘काकडे, ये. थोडं खाऊ. तरतरी येईल.’ डब्यात कधी त्यांची आवडती बाजरीची भाकरी अन् ठेचा असायचा. आम्ही आवडीने खायचो. रविवारच्या तालमीसाठी कधी विजयाबाईंच्या घरून, कधी माझ्या घरून डबा यायचा. प्रभा (माझी बायको) घेऊन यायची. आम्हाला बाहेर हॉटेलात कपभर चहा घेणंदेखील तेव्हा परवडायचं नाही; खाणं तर दूरच. मात्र, एकदा सर्वजण तालमीला उभे राहिले की, तहानभूक हरपलेली असायची. वसंतराव देशपांडेही पुण्याहून यायचे.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत नाही, तर नाशिकला विकास सिनेमा थिएटरमध्ये झाला. २० ऑक्टोबर १९६३ ला. प्रयोग संपला आणि आम्ही एकमेकांचं अभिनंदन करून आनंद व्यक्त करू लागलो. नाशिकचे पोट्र्रेट फोटोग्राफर व ‘होनाजी बाळा’ नाटकाचे दिग्दर्शक बाळासाहेब काळे आले होते. त्यांच्याशी विजयाबाईंनी चर्चाही केली. नाटक त्यांना आवडलं होतं. पण डॉक्टरांच्या बाबतीत त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा रागच आला. डॉक्टर त्या भूमिकेला योग्य नाहीत, असं त्यांचं म्हणणं. खरं तर डॉक्टरांच्या कामामुळे आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. मग बाळासाहेबांनी असं का म्हणावं? त्यांच्या डोळ्यांसमोर शरद तळवलकर तर नसावा? अर्थात बाळासाहेबांचा तो अधिकार होता. प्रयोगाविषयी प्रेक्षकांची अनेक मतं असू शकतात. ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे.
मुंबईला आल्यानंतर मी प्रयोग लावण्याचा सपाटाच लावला. विजयाबाईंच्या म्हणण्यानुसार, सहा प्रयोग करून आपण थांबायला हवं. पण पहिल्यापासूनच मला हे पटत नव्हतं. आपली नाट्यकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य असायला हवं, आणि आपल्याकडं ती व्यवस्था नसेल तर ती उभी करायला हवी असं मला वाटत असे. अगदी ‘शितू’पासून मी हे करत आलो आहे. आज मागे वळून पाहताना वाटतं- इतकं यशस्वी नाटक ‘ससा आणि कासव’ फक्त सहा प्रयोगांत आम्ही थांबवलं असतं तर? तसंच ‘मी जिंकलो, मी हरलो’च्या बाबतीतही झालं असतं तर? अर्थात यावरून विजयाबाईंशी आमचे मतभेद असले तरी ते प्रामाणिक होते.
‘मी जिंकलो..’चे पुणे-मुंबई असे आम्ही प्रयोग सुरू ठेवले. मुंबईत साहित्य संघ, दर रविवारी सकाळी भारतीय विद्याभवन, दादरला त्यावेळी नाट्यगृह नव्हतं म्हणून मग बालमोहन विद्यामंदिरच्या पहिल्या मजल्यावरील छोट्या नाट्यगृहात, शिवाय दादर शिवाजी पार्क येथील ब्राह्मण साहाय्यक संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये आम्ही प्रयोग करत असू. या नाटकाच्या यशाची वार्ता महाराष्ट्रभर पसरली. अगदी नागपूरपर्यंत. ती ऐकून नागपूरच्या धनवटे रंगमंदिरचे व्यवस्थापक भाऊ सप्रे यांचा निरोप घेऊन एक गृहस्थ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रविवारी सकाळी विलेपार्ले येथील रामानंद सोसायटीतील माझ्या घरी आले. पायांत झिजलेल्या चपला, लेंगा-शर्ट व काखेत शबनम बॅग. मी त्यांचं स्वागत केलं. थोडा वेळ ते बसले. मग म्हणाले, ‘मी बागडे. नागपूरचा. सप्रेसाहेबांचा निरोप घेऊन आलोय. ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकाचे प्रयोग नागपूरला व्हावेत. आणि विदर्भातील काही मोक्याच्या शहरांत!’
मग आम्ही दौऱ्याच्या आर्थिक बाबींवर सविस्तर चर्चा केली. इतक्या लांबचा पहिलाच दौरा असल्यामुळे मी खूश होतो. आर्थिक गणितं जुळवत होतो. सर्वांना विचारून आपण तारखा नक्की करू या, असं मी त्यांना म्हटलं. नागपूरला दोन, अकोला, अमरावती आणि अजून एक प्रयोग- असे पाच प्रयोग बागडे करू इच्छित होते. ‘रंगायन’ला त्यासाठी पदरमोड करावी लागणार नव्हती. सगळे प्रयोग कॉन्ट्रॅक्टचेच असणार होते. एवढं ठरवून बागडे नागपूरला निघून गेले. फेब्रुवारी १९६४ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रयोग होऊ शकत होते. तसं मी भाऊसाहेब सप्रेंना कळवलं. आता नागपूपर्यंत सेट व कलाकार या सर्वांना घेऊन कसं जायचं व परत आणायचं, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आतासारख्या त्यावेळी नाटक कंपन्यांकडे बसेस नव्हत्या. मात्र एक बस होती- राष्ट्र सेवादलाची. सेवा दलाच्या कलापथकाच्या कार्यक्रमांसाठी प्रा. वसंत बापट यांनी ती तयार करून घेतली होती. मी चौकशी केली. बस मिळत होती. बसच्या कॅरिअरवर नाटकाचा सेट जाणार होता आणि आत कलाकार-तंत्रज्ञ. बसमध्ये अगदी पाठीमागे तिघांसाठी झोपण्याकरता तीन बर्थ होते.
दोन दिवसांनी दौऱ्यावर निघायचं म्हणून सकाळी मी भुलाभाईवर गेलो आणि धक्कादायक बातमी समजली. सुन्न झालो. तिथेच बसून राहिलो. मेंदू बधीर झाला. विजयाबाईंचे यजमान हरीन खोटे यांचा हार्ट अॅटॅकने अकाली मृत्यू झाला होता. आणि पुढचं दु:खद चित्र डोळ्यांसमोर दिसू लागलं. आजच्यासारखे मोबाइल नसल्यामुळं मी लगेच फाऊंटनला गेलो. तार ऑफिसात जाऊन पहिली तार नागपूरला सप्रे यांना केली. दौरा पुढं ढकलण्यात आला.
मी आणि अरविंद देशपांडे कुलाब्याला दुर्गाबाईंच्या घरी ‘गुलिस्तान’वर गेलो. तेंडुलकर, श्री. पु. भागवत आलेले होतेच. मी लांब उभं राहून नुसतं बघत होतो. बाईंना भेटायचं, बोलायचं धैर्य माझ्यात नव्हतं. त्याच वेळी विचार करत होतो… आता पुढं काय? स्वप्नातही घडू नये असं घडून गेलं होतं. श्री. पु., तेंडुलकर बाईंचं सांत्वन करत होते. पुढं काय, या प्रश्नाचं उत्तर तेव्हा तरी कुणाकडेच नव्हतं. अरविंदही अबोल झाला होता. त्यालाही काय बोलावं, कळत नव्हतं.
२.
ही घटना घडण्यापूर्वी ‘रंगायन’चं अजून एक नाटक ५ डिसेंबर ६३ ला राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रंगभूमीवर आलं होतं. तेंडुलकरांचं ‘कावळ्यांची शाळा’. दिग्दर्शन अर्थातच बाईंचं. नेपथ्य मात्र यावेळी बाबा पार्सेकर यांनी केलं होतं. हेच नाटक ‘गृहस्थ’ नावाने दामू केंकरे यांनी साहित्य संघाच्या नाट्यमहोत्सवात ५५ साली केलं होतं. तालमीअभावी ते सपशेल आपटलं होतं. तेंडुलकरांनी नंतर त्याचं पुनर्लेखन केलं. विषय अगदी साधा. सी. ए. च्या शेवटच्या परीक्षेसाठी अभ्यासाला निवांत शांतता हवी म्हणून नायक आपल्या मित्राच्या घरी येतो; पण होतं उलटंच. शांत, निवांत वेळ मिळत नाहीच; सारखी कावकाव मात्र होत राहते. तेंडुलकरांनी अनेक प्रसंगांतून, व्यक्तिरेखांतून हा कावकावचा गदारोळ, कर्कश आवाज चारी बाजूंनी असा वाढवत नेलाय, की नायक बाळ्या ओरडून ओरडून ‘खामोश, खामोश, शांतता.. शांतता!’ असं कोकलतोय. पण या त्या गदारोळात त्याचा आवाज कुठल्या कुठं विरून जातो. आणि नाटकाचा शेवटचा पडदा पडतो. असं हे धमाल नाटक.
बाईंनी ते इतकं मस्त दिग्दर्शित केलं होतं, की यंव रे यंव. नाटकाच्या तालमी भुलाभाईच्या हिरवळीवर व्हायच्या. कारण यातली पात्रांची बेसुमार गर्दी. लहान मुलं, मोठी, म्हातारी. आणि पार्श्वसंगीतासाठी ढाणढाण वाजणारा शशांक लालचंद याचा ऑर्केस्ट्रा. सगळी पाश्चात्त्य वाद्यं. बाकीच्या वादकांची नावं आता आठवत नाहीत. मात्र, किरण शांतारामचं नाव आठवतं. परवा भेटला तेव्हा या नाटकाची आठवण काढली, तर म्हणाला, ‘काय मजा असे! त्यावेळेला तालमी करताना खूप मजा यायची.’ एखादा कलाकार चांगलं काम करायला लागला की, बाईंना त्याचा लगेचच कळवळा यायचा. मग त्या मला हाक मारायच्या.. ‘अरुऽऽऽण’ हा ‘रुऽऽ’ दीर्घ झाला की आम्ही एकमेकांकडे बघायचो. ‘अरे, तो बघ किती दमलाय. त्याला जरा दूध दे रे.’ मी मग त्या तयारीला लागायचो. तर आमचा विजय दाते मला खडसवायचा- ‘काकडे, काही नको जाऊस.’ अन् मग बाईंना म्हणायचा, ‘आम्हीही सगळे इथं उन्हातच तालमी करतोय. तेही सगळे दमतायत. मग यालाच का दूध?’ विजय दाते फार परखड बोलायचा. सर्व कामं मात्र चोख करायचा. विशेषत: हिशेबाला चोख.
अशाच पद्धतीने तालमी होत होत्या. बाईंना वाटायचं- हा कमी पडतो. नीट जमत नाही. खूप कॉन्शस होतोय. मग बाईंची नारायण पैला हाक- ‘नारायऽऽऽण.’ हा ‘य’ लांबला की नारायण हातातली अर्धी सिगारेट विझवायचा. आमची सर्वांची एकमेकांशी नेत्रपल्लवी व्हायची. नारायण हळूच डोळा घालायचा. ‘आयला, आज कुणावर तरी गदा आहे!’ मग ते काम नारायण त्या कलाकाराशी अगदी गोड गोड बोलून बिनबोभाट पार पाडायचा.
नाटकाचा पहिला प्रयोग प्रेक्षक सभासदांसाठी भारतीय विद्याभवनमध्ये होता. आम्ही सगळे जीव तोडून काम करत होतो. मधून मधून हशे येत होते. पण तालमीत जी मजा यायची बघणारांना, तसं काही प्रयोगात होत नव्हतं. आमचा प्रयोग तर चोख झाला. प्रत्येक प्रयोगानंतर आमचे हितचिंतक प्रेक्षक रंगपटात येऊन प्रयोगावर आपलं मत द्यायचे. चांगलं-वाईट. मात्र प्रामाणिकपणे. पण ‘कावळ्याच्या शाळे’च्या प्रयोगानंतर रंगपटात कुणीच फिरकलं नाही. बाई रागावल्या. ‘हे काय, कुणीच कसं नाही आलं आत रंगपटात नेहमीप्रमाणे?’ आम्ही आपले पाहत राहिलो आणि आवराआवरी सुरू केली.
पुढे स्पर्धेसाठी प्रयोग केला. तोही चांगला झाला. आणखी एक प्रयोग मी दादरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या तळमजल्यावरील ओपन एअर नाट्यगृहात केला. तिथे विंगेत जागा अपुरी. त्यामुळे वादकांना बसवायचं कुठं? शशांक लालचंद म्हणाला, ‘आम्ही वर मंडपाच्या बाजूला.. विंगांच्या वरच्या जागेत बसतो.’ जिथे उभे राहून पडदे सोडले जातात, वर घेतले जातात अशा जागी बसून, खाली प्रयोग सुरू आहे तो बघत त्यांनी चांगल्या प्रकारे वेळ निभावून नेली. त्यांना आणि आम्हालाही हा एक नवा अनुभव होता.
३.
एक महिना-दीड महिन्यात बाई सावरल्या. आम्हाला आनंद झाला. पुन्हा चैतन्य संचारलं. ‘मी हरलो, मी जिंकलो’चे प्रयोग आम्ही पुन्हा सुरू केले. आणि पुन्हा माझी धावपळ सुरू झाली. सालये यांच्याकडे जाऊन जाहिराती देणं... साहित्य संघात, रविवारी सकाळी भारतीय विद्याभवनात, कधी दादरला, पुण्याला- असा प्रयोग लावण्याचा मी पुन्हा सपाटा लावला.
नाटकाची रौप्यमहोत्सवी प्रयोगापर्यंत मजल गेली. बातमी सर्वत्र पसरली. त्यावेळी तेंडुलकर ‘मराठा’मध्ये उपसंपादक होते. आचार्य अत्रे यांना या प्रयोगाला बोलवावं असं आम्हाला वाटत होतं. तेंडुलकरांना तसं म्हणालो तर ‘या’ म्हणाले, ‘साहेबांची गाठ घालून देतो.’ मी निमंत्रण घेऊन गेलो. अत्र्यांच्या खोलीत सगळीकडे कपाटंच कपाटं. पुस्तकांनी भरलेली. मध्ये भलंमोठं टेबल. समोर खुर्च्या. मी त्यांना नाटकाला येण्याचं आमंत्रण दिलं. म्हणालो, ‘तेंडुलकरांच्या नाटकाचा रौप्यमहोत्सव आम्ही साजरा करतोय. आपण आलात तर आम्हाला खूप आनंद होईल.’ ‘प्रचंड’ असं आचार्य अत्रे यांचं वर्णन तेंडुलकरांनी केलेलं आहे. ते म्हणाले, ‘आम्ही ऐकलंय… चांगली नाटकं लिहितो तो. जरूर येऊ.’
रविवारी सकाळी भारतीय विद्याभवनमध्ये आचार्य अत्रे येणार म्हणून मी बाहेर वाट पाहत उभा होतो. आणि खरोखरच ते आले. आपल्या ऑस्टिन कारमधून उतरले. सुटाबुटात. वर डोक्यावर नुसतीच ठेवलीय अशी वाटावी अशी फेल्ट हॅट. मी त्यांचं स्वागत केलं आणि पहिल्या रांगेत नेऊन त्यांना बसवलं. लगेच प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहायची माझी पहिल्यापासूनची सवय. (अद्यापपर्यंत ती कायम आहे.) माझी एन्ट्री तिसऱ्या अंकात. म्हणून मग मी अधूनमधून प्रेक्षकांत डोकवायचो. हशा-टाळ्यांनी नाट्यगृह दुमदुमत होतं. प्रयोग संपला. पण अत्रे काहीच बोलले नाहीत. त्यांना कारपर्यंत पोचवून आलो. तेंडुलकरांना म्हणालो, ‘साहेब काहीच बोलले नाहीत प्रयोगाबद्दल.’
अन् दुसऱ्या दिवशी ‘मराठा’मध्ये तेंडुलकरांच्या नाटकावर अग्रलेख!
त्या अग्रलेखाची आम्ही अक्षरश: पारायणं केली. जल्लोष केला सर्वांनी मिळून. आचार्य अत्र्यांचे आभार मानायला ‘मराठा’मध्ये गेलो. तेंडुलकर होतेच बरोबर. मी आणि तेंडुलकर त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो. मी अदबीनं उभं राहून म्हणालो, ‘आपण तेंडुलकरांच्या नाटकावर अग्रलेख लिहिलात. आम्हाला खूप आनंद झाला.’ नाटककाराच्या नाटकावर अग्रलेख मराठी पत्रकारितेत प्रथमच लिहिला गेला होता. पुढं म्हणालो, ‘आपले आभार मानायला मुद्दाम आलो.’ आणि एकदम गडगडाट झाला- ‘मूर्ख आहात.’ मी घाबरलो. तेंडुलकरांकडे पाहू लागलो. आपलं काही चुकलंय का, असा मनात विचार आला... तोच पुन्हा गडगडाट.. ‘मूर्ख आहात. एवढी चांगली नाटकं करता, पण ते लोकांना कळायला नको? नाटक चांगलं आहे म्हणून बोंब मारत जा. एवढं चांगलं काम करताय. लोकांपर्यंत ते पोचायला हवं.’ अगदी खरं बोलत होते ते. माझी खटपट तीच होती पहिल्यापासून. प्रेक्षकांपर्यंत नाट्यकृती पोचली पाहिजे. पण साहेब म्हणाले तसं बोंब मारणं मात्र काही जमलं नाही. नेमस्तपणे जेवढं करता येईल तेवढं मात्र करत आलोय.
आणि एके दिवशी नागपूरहून बागडे आले. आले ते दुपारी जेवायच्या वेळेसच. जेवण झाल्यावर म्हणाले, ‘चला, दिवसाची निश्चिती झाली.’ असा ठेकेदार नाटकाचे प्रयोग ठरवायला आला होता. पण माझा विश्वास भाऊसाहेब सप्रे यांच्या शब्दावर होता. ‘मी जिंकलो, मी हरलो’चे सगळे प्रयोग काँट्रॅक्टनेच असणार होते. त्यात ‘एक होती राणी’चाही प्रयोग नागपूरला करावा असं ठरलं. तारखा ठरवताना असं आढळून आलं की, श्रीकांत मोघे नागपूरला एक दिवस उशिरा पोहोचणार होता. वसंतराव देशपांडे यांच्या ऐवजी आता श्रीकांत मोघे काम करत होता. वसंतरावांची बदली दूर आसामात झाली होती. मग आम्ही ठरवलं- पहिल्या दिवशी ‘एक होती राणी’चा प्रयोग अंगावर करायचा व पुढचे दोन प्रयोग ‘मी जिंकलो’चे! ‘काँट्रॅक्ट’ तेच असणार होते. बागडे यांच्याबरोबर दिवसभर बसून सविस्तर दौऱ्याचा प्लॅन आखला आणि मग सगळ्यांना सांगून ठरवून टाकलं. लगेचच राष्ट्र सेवादलाच्या ऑफिसात जाऊन बसही ठरवली. १५ दिवसांचा मोठा दौरा असणार होता विदर्भात. पहिले तीन दिवस नागपुरात. नंतर भंडारा, वणी, गजानन महाराजांचं केडगाव, धुळे, जळगाव, अमरावती, नंदुरबार, अकोला. प्रायोगिक काय किंवा व्यावसायिक काय, नाटकाचा एवढा मोठा दौरा प्रथमच होणार होता.
मला आठवतं त्याप्रमाणे डिसेंबरमध्ये हा दौरा आखला होता. दौऱ्याची तयारी करून पुढची जुळवाजुळव करण्यासाठी मी दोन दिवस आधीच नागपूरला गेलो होतो. भाऊ सप्रेंना भेटलो. त्यांनी निवास-भोजनाची व्यवस्था चोख करून ठेवली होती. ‘एक होती राणी’तील कलाकार रेल्वेने येणार होते आणि प्रयोग करून परत जाणार होते. त्यांना तिकिटं काढून दिली होती. त्याची चिंता नव्हती. ‘मी जिंकलो’चे कलाकार, तंत्रज्ञ बसने येणार होते. शितूत, विजय दाते, प्रभाकर गोखले, रघु पाटील यांची बॅकस्टेजची माणसं, इलेक्ट्रिशियन भिकू… भिकू हा एक अवलिया होता. तो आमच्या सगळ्या नाटकांची विडंबनं मस्त करायचा. गुजराती असूनही. विशेषत: ‘मादी’ एकांकिकेची.
मुंबईहून सर्व सामान भरून निघायला कदाचित उशीर झाला असावा. आणि प्रवास करणाऱ्यांना कळलं असावं की, बस काही ठरल्या वेळेला नागपूरला पोचू शकत नाही. म्हणून नाशिकहून त्यांनी मला तार केली. सकाळी मी धनवटे रंगमंदिरातील सप्रेंच्या ऑफिसात पोहोचलो तेव्हा सिगारेट ओढत सप्रेच सचिंत चेहऱ्याने माझी वाट पाहत थांबले होते. म्हणालो, ‘काय झालं?’ त्यांनी तार हातात ठेवली. आली का पंचाईत! म्हणजे ‘एक होती राणी’चा प्रयोग रद्द करावा लागणार होता. प्रेक्षकांचे पैसे परत द्यावे लागणार होते. या सगळ्याची चर्चा करत आम्ही सप्रेंच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. अन् काय आश्चर्य! बाहेर आवाज आला म्हणून आम्ही दोघेही बाहेर आलो.. पाहतो तर आमचीच बस आली होती! क्षणात काळजी दूर पळाली. उत्साहाने त्यांच्या स्वागतासाठी पुढे झालो. सगळी तयारी झालेलीच होती. धनवटे रंगमंदिरच्याच वरच्या मजल्यावर निवास-भोजनाची सोय केली होती. आता प्रयोग निश्चित होणार होता. एक घोर मिटला.
चौकशी केली तेव्हा दत्ता भट सांगायला लागले, ‘नाशिक सोडलं आणि पांचाळ यांनी ज्या वेगात बस सोडली! मी शेवटच्या स्लीपर बर्थवर लवंडलो होतो. झोप लागत नव्हती. ज्या वेगात पांचाळ बस चालवत होते त्यानं धडकीच भरली. सगळे आपापल्या खुर्चीत पेंगत पेंगत झोपले होते. सगळा रस्ता मोकळा मिळाला होता. कुठेच वाहनांची गर्दी नव्हती. मी मात्र सारखा काळजीत होतो. पांचाळांचा गाडीवरचा ताबा सुटला तर काय होईल याची.’ पण पांचाळांना अशा गोष्टींची सवय असावी. मी पांचाळांचे आभार मानले. नाशिक ते नागपूर ते नॉनस्टॉप आले होते. त्यानंतर दौराभर पांचाळ आमच्यातलेच एक होऊन गेले. सेवा दलातलंच वातावरण इथंही आहे असं त्यांना वाटलं असावं. नेहमी हसत-खेळत. कामाच्या वेळी शिस्तीत.
रात्री प्रयोगाला हाऊसफुल्ल गर्दी होती. गॅलरीतही प्रेक्षक तुडुंब भरले होते. नागपूरच्या प्रेक्षकांविषयी ऐकून होतो की, त्यांना नाटक नाही आवडलं तर खुर्च्यावर उलट तोंड करून डग्गा बडवीत बसतात. प्रयोगाचा विचका होतो. खरं-खोटं कुणास ठाऊक. पण ही आख्यायिका प्रचलित होती त्यावेळी. ‘एक होती राणी’च्या प्रयोगाला मात्र असं काही झालं नाही. प्रयोग संपल्यावर काही शेरे मात्र ऐकायला मिळाले- ‘मुंबईत खपलं नाही म्हणून इथं विकायला आलात का?’ वगैरे वगैरे.
पण दुसऱ्या दिवशी असं होणार नव्हतं. ‘मी जिंकलो’चा प्रयोग होता. नागपूरचे ‘मी जिंकलो, मी हरलो’चे दोन्ही प्रयोग हाऊसफुल्ल गेले होते. प्रेक्षकांना ते मनापासून आवडले होते. तशा प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोचत होत्या. ‘झिम्मा’मध्ये बाईंनी लिहिलंय की, या नाटकामुळे मराठी रंगभूमीला आणखी एक नाटककार मिळाला- महेश एलकुंचवार. पण महेशनी स्वत:च हे आधी लिहून ठेवलेलं आहे.
४.
पासष्ट साल उजाडलं अन् आम्ही दुसऱ्या नाटकाच्या तयारीला लागलो. कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांच्या ‘यशोदा’ या नाटकाच्या तालमींना आता सुरुवात झाली होती. यशोदेला लग्नापूर्वीच दिवस गेलेत. त्यामुळं घरात हलकल्लोळ माजलाय. यशोदा कुणाचंच नाव सांगायला तयार नाही. तिच्या सुटकेसाठी मग सगळ्यांचेच प्रयत्न सुरू होतात. ‘श्रीमंत’ नाटकातही हीच समस्या आहे. कुमारी मातेची. पण दोन्हीत फरक आहे. त्यांतील व्यक्तिरेखांत, वातावरणात, मांडणीत, भाषेत. यशोदा कोकणातील साध्या गरीब कुटुंबातली, तर मथू श्रीमंताघरची. मुख्य म्हणजे ही दोन्ही नाटकं विजयाबाईंनीच दिग्दर्शित केलीत आणि त्यांतील महत्त्वाच्या भूमिकाही! ‘श्रीमंत’मध्ये श्रीधर काही अटींवर मथूशी लग्न करायला तयार होतो, तर ‘यशोदा’मध्ये वेंधळ्या, पुरुषत्व हरवलेल्या विठोबाशी यशोदेचं लग्न लावून ही समस्या सोडवली जाते. तेंडुलकरांची शहरी भाषा, तर श्री. ना. पेंडसे यांची कोकणी बोली.
मुख्य कलाकार- विजयाबाई, आशा दंडवते, मामा पेंडसे, डॉ. लागू आणि प्रथमच नाटकात काम करत असलेली कुमुद लेले (नंतरची कुमुद शंकर). नाटक चार अंकी. खरं म्हणजे चार प्रवेश. दोन स्थळं : घर आणि व्याघ्रेश्वराचं देऊळ. नेपथ्यकार आमचा राम शितुत. त्याने व्याघ्रेश्वराच्या देवळासाठी फक्त गोल खांब उभे करून ते सूचित केलं होतं. त्यावेळी लिनोलियम काप्रेट मिळायचं. त्याची वरची बाजू रंगीत, चकचकीत, तर पाठीमागची बाजू खरबरीत, करड्या रंगाची. शितूतने उलट्या बाजूने हे लिनोलियम काप्रेट गोल करून खांब उभे केले आणि देवळाच्या मंडपाचा भाग सूचित केला. शितूत हरहुन्नरीच.
भारतीय विद्या भवनमध्ये रंगीत तालमी आणि प्रयोगही आम्ही केले. या नाट्यगृहात प्रकाश नियंत्रण प्रेक्षकांच्या उजव्या हाताच्या पहिल्या विंगेच्या वरून गॅलरीतून केलं जात असे. अगदी परवा-परवापर्यंत. म्हणजे नाटक खाली विहिरीत पाहिल्यासारखं पाहून प्रकाश नियंत्रण करावं लागे. प्रकाश नियंत्रणाच्या बाजूलाच एक दार आहे. तिथून गॅलरीत जाता येतं. शिरूभाऊ तालमींना, प्रयोगांना यायचे, पण समोरून-जवळून नाटक पाहायचे नाहीत. गॅलरीत प्रेक्षक नसायचे. शिरूभाऊ गॅलरीत बसून बघायचे. मी मधून मधून शितूतला मदत करायला स्टेजवरील पाठीमागच्या जिन्याने गॅलरीत जात असे. एकदा असाच गेलो.. आणि नाटक चालू असताना हुंदके दिल्याचा आवाज मधून मधून येऊ लागला. मी हळूच गॅलरीच्या दरवाजातून पाहिलं- तर शिरूभाऊ तोंडावर हात ठेवून हुंदके देताहेत. मी न बोलता खाली रंगमंचावर गेलो. कुणालाच त्याबद्दल बोललो नाही. नाटककार आपली नाटकं कशा पद्धतीने बघतात, हा अनुभव मात्र मला असाच येत गेला.
यातील छोटी, पण महत्त्वाची विठोबाची भूमिका मी करायचो. रंगमंचावर दहा-पंधरा मिनिटंच; आणि काही थोडी वाक्यं. पण व्यक्तिरेखा साकार करताना खूप प्रयत्न करावे लागले. पालथी मांडी घालून बसणं, बायकी बोलणं, वेंधळेपणा हे सगळं आतून यायला हवं. ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं. विठोबाची मानसिकता साकारताना पुरुषत्व हरवलेलं, नपुंसक व्यक्तित्व यायला हवं असायचं. ते खूप कठीण होतं. शिवाय ते सहज, स्वाभाविक वाटायला हवं. कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायलाच नको. विजयाबाई, डॉ. लागू हे कसलेले अभिनेते. मामांचं काम मी प्रथमच पाहत होतो. व्यावसायिक रंगभूमीवरील ते एक प्रथितयश कलाकार. पण आमच्या प्रायोगिक नाटकात इतके समरसून गेले, की आम्हाला ते फार जवळचे वाटायला लागले. आमच्यातलेच. या थोर कलाकारांपुढे कुमुद लेले आणि आशा दंडवते यासुद्धा कुठेच कमी पडल्या नाहीत. व्याघ्रेश्वराच्या देवळातील प्रवेशात डॉ. लागू आणि आशा दोघे आमनेसामने येत. पण तोडीस तोड.
आता मधून मधून ‘यशोदा’चे प्रयोग, कधी एकांकिका असे आमचे उपक्रम सुरू होते. ६५ जरा यथातथाच गेलं. ‘यशोदा’ नाटकाचे प्रयोग का कुणास ठाऊक- थांबवण्यात आले. अरविंद पहिल्यापासून साहित्य संघाच्या नाटकांतून कामं करत होता. ६४ साली त्याने तेंडुलकरांचं ‘सरी ग सरी’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्याचे प्रयोगही बऱ्यापकी चालू होते. विजयाबाईंनी दुर्गा खोटे प्रॉडक्शनची काही जबाबदारी स्वीकारली होती. त्या जाहिरातींची निर्मिती करायच्या. नंतर बाई प्रताप शर्मा यांच्या इंग्लिश नाटकाच्या तालमींना जायला लागल्या. तिथेच त्यांची फारुख मेहताशी ओळख झाली आणि ६५ च्या डिसेंबरात त्यांनी फारुख मेहतांशी विवाह केला. डॉ. लागूही डिसेंबर ६५ मध्ये पूर्व आफ्रिकेला गेले.
आम्ही काही काळ पोरके झालो. नाटकांचे प्रयोग होत नव्हते. नवीन काही घडत नव्हतं. सुरुवातीला जे ‘यशोदा’ नाटक झालं होतं, तेही आता थांबलं होतं. अशा वेळी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी फॉर्म पाठवायची वेळ आली. बाई व्यग्र होत्या. अरविंद आता पहिल्यांदाच रंगायनचं नाटक दिग्दर्शित करणार होता. सरिता पदकींचं ‘बाधा’ नाटक स्पर्धेला करायचं ठरलं. त्यामुळे आता तालमींत वेळ जाऊ लागला. पुन्हा आम्ही कामाला जुंपलो. ‘बाधा’चा प्रयोग मात्र आज मला दिसत नाही. कलाकार कोण होते, तेही आठवत नाही. पण ‘बाधा’चे दोनच प्रयोग झाले. एक आमच्या ‘हितचिंतक’ प्रेक्षक सभासदांसाठी अन् दुसरा स्पध्रेतला प्रयोग. बस्स.
५.
६६ साल भाकड जाणार की काय, अशी काळजी वाटत असतानाच श्रीपुंनी चिं. त्र्यं. खानोलकरांचं एक महत्त्वाचं नाटक बाईंना वाचायला दिलं. खानोलकर ‘मौजे’चेच लेखक. त्यांच्या ‘रात्र काळी घागर काळी’, ‘कोंडुरा’ या कादंबऱ्या गाजल्या होत्या. बाईंनी व श्रीपुंनी निर्णय घेतला- खानोलकरांचं ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगायनतर्फे रंगभूमीवर आणायचं. नाटकाच्या तालमी सुरू होणार होत्या. खानोलकरांबरोबर मीही जात होतो. पात्रांची निवड सुरू होती. खानोलकरांना वाटायचं, त्यात मी एक छोटी भूमिका करावी. मी ‘मला नाटकात काम द्या,’ असं कुणालाच कधी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही. वाटत असे- काम करावं. पण नाटक होतंय यातच आनंद वाटायचा.
‘एक शून्य बाजीराव’ची तयारी होत होती. पण मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. मी कामाला लागलो. मुंबईत भर उन्हाळ्यात २८ मे ६६ रोजी विल्सन कॉलेजच्या छोट्या सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग झाला. अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. त्या सभागृहात तर विशेषच. (कारण हवा खेळायला तिथं फारशी जागाच नव्हती.) बाईंनी सांगितलं, ‘अरे, पंखे घेऊन या.’ त्यावेळी हाताने वारा घ्यायचे पंखे मिळायचे. गिरगावात जाऊन तसे पंखे आणले. येणाऱ्या प्रेक्षकांना नाटक पाहता पाहता पंख्याने वारा घेता यावा म्हणून प्रत्येकाला ते दिले.
‘एक शून्य बाजीराव म्हणजे माधव वाटवे’ हेच समीकरण रूढ झालं! पहिला प्रयोग झाला. शेवटच्या प्रवेशात माधव म्हणजे बाजीरावला विषप्राशनामुळे अंगाचा दाह होतोय. त्यात त्याचं ते शेवटचं स्वगत.. मनाला आणि शरीराला थकवा आणणारं. माधवचं तेच झालं होतं. नाटक संपलं नि प्रचंड थकलेला, घामाघूम झालेला माधव वाटवे रंगपटात शांत डोळे झाकून बसला होता. बाईंनी सांगितलं, ‘अरुण, रंगपटात कुणालाही सोडू नकोस.’ मी बाहेर उभा होतो. ‘काही वेळाने भेटा..’ असं सर्वाना विनवीत होतो. एवढ्यात प्रत्यक्ष नाना (केशवराव दाते) समोर उभे. काय बिशाद माझी त्यांना अडवायची. उलट, त्यांना हाताला धरून आत घेऊन गेलो. नाना पाहतायत तर माधव डोळे मिटून शांत खुर्चीवर बसलेला. नाना त्याच्या जवळ गेले. थांबले. त्याच्याकडे पाहिलं. आणि शांतपणे हातातल्या पंख्यानं त्याला वारा घालू लागले. माझा कंठ दाटून आला. दोन पिढ्यांचे दोन महान कलाकार. मोठ्या पिढीच्या कलाकाराने दुसऱ्या पिढीच्या कलाकाराला दिलेली ही दाद! नि:शब्द.. अंत:करणापासूनची! नाना नंतर विजयाबाईंशी बोलले माधवविषयी. पण माझं लक्ष नव्हतं तिकडे. माझ्या डोळ्यासमोरचा तो प्रयोग.. त्यातून बाहेर येऊच नये असं वाटायला लावणारा.
आता या नाटकाचे प्रयोग करायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. पण प्रयोग होत नव्हते. पूर्वीसारखा निर्णय घेऊन मी प्रयोग लावू शकत नव्हतो. अरविंदला म्हणालो, ‘रंगायन करत नसेल तर मी प्रयोग करतो. पण या नाटकाचे प्रयोग व्हायला हवेत.’ अरविंद, विजयाबाई दोघेही संस्थेचे कार्यवाह. निर्णय झाला. परवानगी मिळाली. प्रयोगाचं मानधन म्हणून काही रक्कम रंगायनला द्यायचं मी कबूल केलं. थिएटर ठरवून कामाला लागलो. खानोलकर बरोबर होते. खरं तर त्यांचाच मोठा आधार वाटत होता. त्यांनाही प्रयोग व्हावेत असं वाटायचं. मग आम्ही पहिली धाड घातली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर. संभाजी कदम, हणमंते यांना एकेक तिकिटांचं पुस्तक दिलं. आग्रह केला- ती खपवायचा. त्यांचंही आश्वासन मिळालं. एवढ्या पैशांत आता थिएटर भाडं सुटणार होतं. नंतर खानोलकरांचे मित्र रायभान जाधव माहीमला राहायचे- त्यांच्या घरी गेलो. ते सनदी अधिकारी. त्यांनी तिकिटं तर घेतलीच, पण थोडंसं आर्थिक सहाय्यही दिलं. तो प्रयोग प्रेक्षकांना चक्रावून गेला.
दुसऱ्या प्रयोगाच्या वेळी आमच्या ओळखी संपत आल्या म्हणून तिकिटं जास्त खपली नाहीत. आता बुकिंगवरच भिस्त. खर्च निघाला, पण रंगायनला द्यायला पैसे कमी पडले. म्हणून मग अरविंदला भेटलो. म्हणालो, ‘पैसे कमी आहेत, पुढच्या प्रयोगाला देईन.’ मग मीटिंग झाली. त्यात अरविंद एवढंच म्हणाला, ‘काकडे आपलाच कलाकार आहे. नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर नाही. तेव्हा ती रक्कम माफ करावी.’ हे लिहीत असताना मला दोन ओळी आठवल्या-
हाती नाही बळ । दारी नाही आड।
त्याने फूलझाड । लावू नये॥
सृजन प्रसवायचं, पण त्याचं संगोपन करण्याची कुवत आपल्यात नाही, याची प्रकर्षांने जाणीव होत राहिली. त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती. प्रयोगांना संजीवनी मिळण्यासाठी आड (विहीर) खोदावे लागणार होते. आजवर तेच करत आलोय.
‘एक शून्य बाजीराव’ हे चिं. त्र्यं. खानोलकर यांचं पहिलंच नाटक. खानोलकरांची प्रतिभा रुजली, उगवली कोकणाच्या मातीत. पानाफुला आली मुंबईत. तिची मशागत केली श्रीपुंनी. खानोलकरांच्या लेखनाचा झपाटा अचंबित करणारा. एकटाकी. एका रात्रीत पांढऱ्या कागदावर सुवाच्य अक्षरांत लिहिलेला नाटकाचा संपूर्ण अंक दुसऱ्या दिवशी त्यांनी मला दिला होता. नाटकाचं नाव होतं : ‘ललित नभी चार मेघ’! खानोलकर मराठी रंगभूमीवर धूमकेतूसारखे चमकून गेले. रसिकमनावर आपला साहित्यिक ठसा कायम ठेवून!
‘एक शून्य बाजीराव’चा विषय पाहिला तर तसा साधाच वाटणारा. मुंबईतील एक नाटक कंपनी आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग दूरच्या गावात सादर करण्यासाठी आली आहे. दिग्दर्शक व नाटकाकाराचंही हे पहिलंच नाटक. नाटकाचं थ्रिल म्हणून नाट्यव्यवसायात आलेली गौरी या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारतेय. तिच्यावर बाजीराव प्रेम करतो. त्याच्या ‘मृच्छकटिक’ नाटकाचा शेजारच्या गावी प्रयोग आहे. तो करून तो इथं आलेला आहे.. त्याच भूमिकेच्या वेशात. गौरी त्याला झिडकारते. त्याचा स्पर्श ओंगळणारा, किळसवाणा आहे, असं त्याला सांगते. याच गावात दहा वर्षांपूर्वी ती ‘शारदा’ नाटक करायला आली असताना गावच्या इनामदारानं -अप्पारावानं तिला लग्नाची मागणी घातलेली असते. पण गौरीने ती झिडकारलेली असते.
नाटक अनेक पातळ्यांवर फिरत राहतं. नाटकातल्या नाटकाचं नाटक अशी त्याची वीण आहे. खानोलकरांना नाटकाची बांधणी जमत नाही, ते क्राफ्टस्मन नाहीत, आतून येईल तसे ते लिहीत जातात.. असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. पण या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांची समज किती सकस आहे हे जाणवतं.
हे नाटक म्हणजे फक्त बाजीराव : माधव वाटवे. त्याच्या अभिनयाबद्दल गौरीच म्हणते- ‘नाटकात नटाच्या पंचेंद्रियांचं एक दिव्य इंद्रधनुष्य व्हायला हवं. बाजीराव, तू नाटकात उतरलास की तुझंही तेच होतं.’
माधव वाटवे यांनी सर्व खानोलकरी स्वगतांचं, भाषेचं सोनं केलं. रंगायनच्या काळातील दोन महान कलाकार- दत्ता भट, माधव वाटवे. दोघेही माझे सहकारी हा माझ्यासाठी भाग्ययोग! ‘झाले मृगजळ आता जलमय’ असे सांगत दत्ता भट निघून गेले. सुखासमाधानानं. माधव अकाली गेला. एक महत्त्वाचं कार्य अर्धवट सोडून. नाट्यकलेवर तो ग्रंथ लिहिणार होता. आता तो ग्रंथ होणे नाही, आणि आपण तो वाचणे नाही.
‘एक शून्य बाजीराव’ म्हणजे काव्यात्म प्रतीकात्मकता. भाषासौष्ठव. बाजीरावचा प्रवेशच एका हातात व्हायोलिनची केस व दुसऱ्या हातात वाकडीतिकडी काठी घेऊन! व्हायोलिनच्या केसला तो शवपेटी म्हणतो, तर ती काठी वारसाहक्कानं त्याच्याकडे आलीय! या काठीचा आणि व्हायोलिन केसचा बाजीरावच्या व्यक्तिमत्त्वाशी काय संबंध आहे? तो आहे मात्र! कुणीतरी शोधायला हवा.
‘एक शून्य बाजीराव’चा प्रयोग अजून माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे. डोळ्यांच्या पटलांवर कोरलाय. डोळे मिटतील तेव्हाच तो पुसला जाणार.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment