पुरुषोत्तम बोरकरांची मराठी साहित्यात ओळख राहिली, यापुढेही राहील त्यांच्या तीन कादंबऱ्यांमुळेच!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • पुरुषोत्तम बोरकर आणि ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’, ‘आमदार निवास रूम नं. १७५६’, ‘मेड इन इंडिया’ या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे
  • Tue , 23 July 2019
  • ग्रंथनामा शिफारस पुरुषोत्तम बोरकर Purushottam Borkar मेड इन इंडिया Made in India आमदार निवास रूम नं. १७५६ Amdar Niwas Room No. 1756 १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी 15 August Bhagile 26 January

‘मेड इन इंडिया’, ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ आणि ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ यांसारख्या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या लिहून मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर (वय ६३) यांचं १७ जुलै २०१९ रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या या तीन अफलातून कादंबऱ्या या तशा आकारानं लघुकादंबऱ्या म्हणाव्यात अशाच आहेत. बोरकरांनी पैशाच्या गरजेपोटी ‘कमिशन रायटिंग’ पुष्कळ केलं. पण त्यांची खरी ओळख राहिली, यापुढेही राहील, ती या कादंबऱ्यांमुळेच. त्या कादंबऱ्यांची ही थोडक्यात ओळख.

.............................................................................................................................................

१) मेड इन इंडिया, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८७

पुरुषोत्तम बोरकर यांची ‘मेड इन इंडिया’ ही पहिली कादंबरी ऐंशीच्या दशकात प्रकाशित झाली. तेव्हा ती तिच्या वेगळेपणामुळे पुष्कळ गाजली. या कादंबरीला राज्य सरकारच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’नं ‘दशकातील सर्वोत्कृष्ट कादंबरी’ म्हणून या कादंबरीचा १९९२मध्ये गौरव केला.

“१९८०च्या दशकातल्या एका जबरदस्त परिणामकारी कादंबरीचा उल्लेखही अनिवार्य आहे. ती म्हणजे पुरुषोत्तम बोरकर यांची ‘मेड इन इंडिया’. खरं तर ‘कोसला’ जिथे संपते, तिथूनच ‘मेड इन इंडिया’ सुरू होते. ‘कोसला’सारखंच आभाळाएवढं ओझं डोक्यावर घेऊन कादंबरीचा नायक विदर्भातल्या आपल्या गावी ‘बरोब्बर खुंटापाशी येऊन’ उभा राहिला आहे. त्याचं गावातलं आयुष्य, बरोबरीनंच दिसत राहणारा निसर्गाचा ऱ्हास, त्याबाबत फार काही करता न आल्याची खंत ही एखाद्या ठसठसत्या जखमेसारखी, वेदनेसारखी पूर्ण कादंबरीभर आपल्याबरोबर राहते. अस्सल वैदर्भीय भाषेत मधून ‘मले समजे ना, की आपल्या लहानपणी वातावरणाचे प्रतिध्वनी होयेले मिठ्ठू, भोर्या, तितर, चिळ्या, कोकीळ, कोयशे कुठी गेले? की येन्ड्रीन संस्कृतीनं नष्ट केलं याईले?’ असे प्रश्न नायकाला कादंबरी‌बर छळतात. रूढ अर्थाने नाही, तरी रोजच्या जगण्यात ग्रामीण भारत निसर्गापासून कसा तुटत चालला आहे, याचा अस्वस्थ ताळेबंद ही कादंबरी मांडते. अगदी शेवटालाही, आपल्याच कल्पित मरणाचं स्वप्न नायक पाहतो. ते असं : ‘माह्या अनुरेतूनच हिर्वेगार डार्क ग्रीन श्वासोच्छवास अविरत उमटत रहातीन. या आसमंतात. मी असं चक्र होऊन जाईन या सृष्टीचं. या मातीचं.’ ” - संतोष शिंत्रे (पर्यावरण पत्रकार व कथाकार)

२) आमदार निवास रूम नं. १७५६, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९९

‘मेड इन इंडिया’नंतर जवळपास एका तपानं बोरकरांचीआमदार निवास रूम नं. १७५६’ ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. आमदार निवासातल्या एका खोलीत काय चालतं याविषयीची ही कादंबरीही ‘मेड इन इंडिया’सारखीच भाषा, शैली आणि विषय या निकषांवर अफलातून म्हणावी अशीच आहे.

“पोपटराव हे पात्र केवळ आमदार निवासातच वावरते असे नव्हे, तर ते अखिल भारतीय आणि जागतिक राजकारणाच्या पातळीवरही तितक्याच लीलया संचार करताना आपणास दिसते, भेटते. खरे तर मुळं उखडलेल्या नायकाची, त्याच्या भोवतीच्या तशाच माणसांची ही कहाणी! एक गुदमरलेपण, घुसमट, चक्रव्यूहात अडकल्यानंतरची कोंडीग्रस्तता म्हणजेच हे लेखन! एक्स्पायरी डेट निघून गेलेल्या आणि म्हणूनच जीवनाला कवडीमोल लेखणाऱ्या एका तरुणाचे हे आत्मकथन एक अजबच अनुभव आपल्याला देते. एका थर्डक्लास आयुष्याचे म्हणूनच ते एक फर्स्ट क्लास प्रात्यक्षिक वाटते! दिव्याखालचा अंझार भोगणाऱ्या माणसांची ही गाथा आपणास हसवत हसवत अस्वस्थ करून सोडेल यात शंकाच नाही!” (कादंबरीच्या मलपृष्ठावर मजकूर, ब्लर्ब)

३) १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी, सायन पब्लिकेशन्स, पुणे, २००९

बोरकरांच्या ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये जसं एका दशकाचं अंतर होतं, तसंच दशकभराचं अंतर त्यांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या तिसऱ्या आणि शेवटच्या कादंबरीमध्येही राहिलं आहे. ‘आमदार निवास रूम नं. १७५६’नंतरची ही बोरकरांची तिसरी कादंबरी. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या दोन्ही कादंबऱ्या पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं प्रकाशित केल्या, तर ही कादंबरी पुण्याच्याच सायन पब्लिकेशन्सनं प्रकाशित केली. २००९ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजच्या महाराष्ट्राचा वेध घेण्याच्या प्रयत्न करते.

“ही कादंबरी म्हणजे २०१९ सालानंतरच्या म्हणजे जवळपास एका तपानंतरच्या महाराष्ट्राचे एक भेदक व्यंगचित्रण. भविष्यातील राजकीय, कला आणि सांस्कृतिक जगावर जळजळीत भाष्य करणारा हा एक विनोदी उपरोधपटच म्हणायला हवा. लेखकाच्या स्वानुभवातून उतरलेले, नावीन्यपूर्ण आणि वाचकाला खिळवून ठेवणारे, वरवर विनोदी वाटणारे पण आतून काळीज कुरतडणारे हे लेखन म्हणजे एक विराट शोकांतिकाच म्हटली पाहिजे. आपल्या भोवतालचे वास्तव एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडत नव्या पिढीला सजग आणि सचेत करणारे हे लेखन म्हणजे या मातीची, या देशाची अफलातून कुंडलीच होय!” - नितीन कोत्तापल्ले (लेखक-प्रकाशक)

‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या कादंबऱ्यांसारखी प्रसिद्धी किंवा चर्चा बोरकरांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या कादंबरीच्या वाट्याला आली नाही. पण ही कादंबरीही तितकीच वेगळी आणि अफलातून आहे. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळाले, तसेच या कादंबऱ्यांचा समावेश विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्येही केला गेला. आकाशवाणीवरून त्यांचं अभिवाचन, सादरीकरणही झालं. ‘मेड इन इंडिया’चं एकपात्री नाट्यलेखन बोरकरांनी केलं. त्याचेही हजाराच्या घरात प्रयोग सादर झाले आहेत.

तर अशा हा बोरकरांच्या तीन वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या!

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......