‘नदीष्ट’ : अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव मुखर करणारी कादंबरी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनिता यलमटे
  • ‘नदीष्ट’चं मुखपृष्ठ
  • Fri , 19 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस नदीष्ट Nadishta मनोज बोरगावकर Manoj Borgaonkar

जेव्हा एखाद्या कवीला वाटतं की, आपल्याला हवा असणारा मोठा अवकाश कवितेतून अभिव्यक्त करता येणार नाही, तेव्हा तो कादंबरीतून अभिव्यक्त होतो. असंच काहीसं मूळच्या कवी असणाऱ्या मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीत जाणवतं.

ही कादंबरी प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनात लिहिलेलं आत्मकथनच आहे. नदी, तिचं भव्य पात्र, मंदिर, भोवतालचं जंगल, घाटाच्या पायऱ्या, मासेमारी करणारे भोई, पुजारी, जनावरं चारायला नेणारे गुराखी, एवढंच नव्हे तर दुष्कर्म करणाऱ्यांनाही नदी ओटीत कशी घेते, अशी कितीतरी वर्णनं लेखकानं खूप ताकदीनं जीवंत केली आहेत. लेखकाचा व नदीचा कादंबरी लिहिण्यापुराता सहवास होता असं कुठेच जाणवत नाही. याउलट वर्षानुवर्षं लेखक नदीचा ‘नादिष्ट’ असल्याचं जाणवत राहतं. कितीतरी बारकावे लेखकानं रेखाटले आहेत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री लेखक नदीवर पोहायला येतो. तेव्हा या नदीच्या ओढीनंच आलेली अनेक पात्रं लेखकाला भेटत जातात. खरं पाहता आपल्या पांढरपेशा समाजात लेखकाला भेटलेल्या या पात्रांना कुठलाच चेहरा नसला तरी लेखक या उपेक्षित माणसांमध्ये आपसूकपणे गुंतत जातो. कारण ही सगळीच माणसं नदीवर जीव लावणारी असतात, तर लेखक नदीवर जीव ओवाळणारा!

नदीवर भेटलेली भिकारीन सकीनाबी लेखकाचा जीव वाचावा म्हणून सावध करते, तर लांबपर्यंत पोहत गेल्यावर लेखकाचं बरं-वाईट तर झालं नाही ना, म्हणून दोन-अडीच तास अस्वस्थ झालेले कालूभैया व पुजारी नदीमुळेच जोडले गेलेले. नवस फेडणाऱ्या स्त्रीवर आपल्या डोळ्यासमोर बलात्कार झाला आणि आपण जीवाच्या भीतीनं काहीच करू शकलो नाही म्हणून बलात्कारी पोट्यापेक्षा स्वतःला जास्त अपराधी समजणारा बामनवाड म्हणतो की, त्या दिवशी त्या बाईच्या अश्रूसमोर नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. कादंबरी वाचताना काळीज गलबलून येणारे असे अनेक प्रसंग अस्वस्थ करून जातात. विस्कटलेल्या त्या बाईला घरी जाऊनही नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागला असेल, तेव्हा तिला या दोन्हीपैकी कोणता बलात्कार अधिकचा असहाय्य झाला असेल? हा लेखकानं स्वतःला विचारलेला प्रश्न वाचकालाही अंतर्मुख करून जातो.

लेखकाला पोहण्याचे धडे देणारे दादारावही तितकेच भावून जातात. सख्खी आई वारल्यानंतर गोदावरी आईनं जवळ घेतल्याचं सांगताना खूपच भावूक होतात. ‘मी काही मेलेल्या मायचं दूध पिलो नाही’, हे किती मर्दानीपणानं आपण सांगतो, पण एका दमात नदी पार करणारे दादाराव मात्र आपण तान्हे असताना मृत आईला कसा पान्हा फुटला, हे वाचताना काळीज गलबलून येतं.

एके ठिकाणी मात्र मला लेखकाचं कमालीचं आश्चर्य वाटतं. ते म्हणजे स्वतः विज्ञानवादी असूनही अंधविश्वासानं ‘व्हर्जिन’ जागेवरची वाळू काढायची, हे खूळ डोक्यात घेऊन जीव कमालीचा धोक्यात घालणारा लेखक पोहण्याच्या थरारक कसरती करताना अंगावर काटा उभा राहतो. इतकं धाडस दाखवणारा लेखक मात्र अविरतपणे होत असलेल्या वाळू उपशानं कमालीचा अस्वस्थ होतो. लेखकाला नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भासारखा वाटतो. त्यामुळे तो म्हणतो, ‘नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ’. पण अविरत होणाऱ्या वाळू उपशानं नदीला होणारी जखम लेखकाला थेट गर्भपातानं स्त्रीला झालेल्या इजेसारखीच भासते. या प्रतिमेतून लेखकाच्या गाभ्यातील मुळातला कवी हळूवारपणे डोकावतो.

कादंबरीला वेगळं वळण मिळतं ते नदीवर भेटलेल्या भिकाजी व सगुणामुळे. मध्येच लेखकाला सर्पमित्र प्रसादही भेटतो. अस्सल विषारी कोब्रा कोवळ्या वयात कसा आपण पकडला याचं वर्णन ऐकताना जाणवत राहतं की, एखाद्या कौशल्याला वयाचंही बंधन नसतं!

कादंबरीभर एक जाणवत राहतं की, लेखकाला नदीचा तर नाद आहेच, पण इथं भेटणाऱ्या समाजातील दुर्लक्षित माणसांचं भावविश्व उलगडण्याचाही अनामिक छंद दिसतो. असाच भेटलेला भिकाजी हा भिकारी पण रोज अंघोळ करणारा, मोजकं पण शुद्ध मराठी बोलणारा, पूर्वाश्रमीचा पीडित पण परिस्थितीनं भिकारी बनला असावा, हे लेखक हेरतो. त्याच्या अंतरी दडलेलं गूढ खोलण्यासाठी त्याच्यासोबत जेवण करताना लेखकाला अजिबात संकोच वाटत नाही. रानमांजराला पाहून ताबा सुटलेला भिकाजी आपल्या दुर्दैवी भूतकाळातील अपराधाचं ओझं मानगुटीवर घेऊन निरर्थक जीवन जगत असतो. मुलीचा पापा घेताना दारूचा वास आल्यानं मागे सरकणाऱ्या आपल्याच लेकराचा अनवधानानं आपल्या हातून झालेला अंत भिकाजीला जनातून व स्वतःच्याच मनातून उठवणारा ठरतो. बहिणीचं वांझपण, तिचा दुर्दैवी अंत आणि तिच्या विरहात आईचं संपणं, या दुःखगाठी भिकाजीच्या बायकोनंही कधी हळूवारपणे खोलल्या नाहीत. संतती होण्यापर्यंतचं नवरा-बायकोचं अंथरुणातील नातं मूल झाल्यावर मात्र किती बेगडी होतं, त्यातूनच दारूचं वाढलेलं व्यसन आणि मांजरीचा ‘फोबिया’ कसा घात करतो, हे सर्व आपल्या जिव्हारी लागतं.

एक स्त्री वाचक म्हणून मला हा प्रसंग खूपच जिव्हारी लागला. आपल्याच इवल्याशा लेकराचा चेंदामेंदा करणाऱ्या भिकाजीबद्दल आधी वाटणारी सहानुभूती क्षणभर तिरस्कारात परावर्तित झाली. भलेही ती अनवधानातील चूक असेल, पण रक्ताच्या थारोळ्यातील कोवळ्या बाळाला पाहून कोणती बायको हत्याऱ्याच्या बाजूनं उभी राहील? पंधरा वर्षाच्या शिक्षेनंतरही तो आजन्म अपराधाचं ओझं बाळगतोय म्हणून त्याच्याबद्दल वाईट वाटतं. लेखकानं त्याला बोलतं करून काहीतरी त्याचं ओझं कमी केलं, पण त्याच्या बायकोला दोष न देता ‘तिचीही काहीतरी बाजू असेलच की’ या विधानातून सामंजस्यही दाखवलं आहे.

‘नदीष्ट’मध्ये ठळकपणे जाणवत राहिली ती ‘सगूणा’. तिला कादंबरीची नायिकाच म्हणावं लागेल. समाजाच्या दृष्टीनं तिरस्कृत, भयावह व स्त्री-पुरुष या जातीत न बसणारा घटक म्हणजे ‘तृतीयपंथी’. खरं तर आज नदी व तृतीयपंथी हे दोन्हीही जागतिक प्रश्न आहेत, तरीही ते उपेक्षितच आहेत. या लोकांबद्दल सभ्य लोकांना नेमकी भीती वाटते की, तुच्छता हेही ठरवणं अवघडच. ‘नदीष्ट’मध्ये सगूणाची लेखकाशी झालेली भेट कादंबरीला उत्कंठतेच्या शिगेला पोहचवते. रेल्वेत, रस्त्यावर, बाजारात व यात्रेत भेटणाऱ्या या कम्युनिटीला आपण चोरून चोरूनच पाहतो. अशाच चोरून पाहून दूर पळून जाणाऱ्या लेखकाला सगूणानं ‘खरा हिजडा कोण?’ हा प्रश्न खूपच भेदक व व्यापक अर्थानं विचारला होता. तेव्हा लेखकाप्रमाणेच वाचकालाही विचार करावा लागतोच की, ‘खरा हिजडा कोण?’

तृतीयपंथीयात दीक्षा देण्याची अघोरी प्रथा प्रथमच वाचनात आली. अंगावर काटा आणणारी ही प्रथा खरंच गरजेची आहे का? तृतीयपंथीयांवर आपलं घर, गाव व समाज सोडून परागंदा होण्याची वेळ का यावी? आपल्याकडे दिव्यांग मुलांना कुटूंब व समाज हद्दपार करतो का? याउलट अपंगत्वाचं कटू सत्य स्वीकारून इतर मुलांइतकेच अधिकार आपण या मुलांना देतो. मग याच न्यायानं आपण तृतीयपंथीयांना का वागवत नाही, असे अनेक प्रश्न ही कादंबरी मुखर करते.

सगुनाने लेखकासमोर आपल्या मनाची ‘भडास’ काढते. पण अनेक विचार करायला लावणाऱ्या गोपनीय गोष्टींचाही उलगडा करते. आपण ही एक-दोघांना ‘हिजडा’ बनवण्यात सहभागी झाल्याचे सांगत सगूणा म्हणते, ‘केवळ ही कामं आमची बिरादरीच करते असं नाही, तर या समाजातले कितीतरी लोक हे काम करतात’. विचार करायला लावणारे अनेक प्रश्न सगुणा संवेदनशील लेखकासमोर उभे करते.

आईच्या भेटीच्या ओढीतूनच सगुणा नदी जवळ करते, पण लेखकाला सगुणाच्या भेटीची तीव्र ओढ का लागली होती, हा प्रश्न लेखकाला स्वतःलाही पडतो. पण पुढे जाणवत राहतं की, लेखकाला सगूणाच्या अंतर्मनाच्या खोल डोहातील ‘व्हर्जिन’ जागेवरचा ‘अनटच्ड’ गुंता खोलायचा होता.

खरं तर हे आत्मकथन असलं तरी लेखक कुठेच नायकाच्या भूमिकेत दिसत नाही. लेखकाचं खाजगी जीवन कुठेच उघड होत नाही. फक्त एके ठिकाणी पत्नीचा उल्लेख होतो. बाकी अप-डाऊन्सच्या नोकरीतून लेखकाचा व्यवसायही कळत नाही. लेखकानं नायकत्व बखूबीनं टाळलं आहे.

लेखक लिहितो तो एक सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. स्वातंत्र्याच्या सातव्या दशकात आपण जगत असताना आजही समाजपरिघाबाहेरच्या अशा अनेक अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव ‘नदीष्ट’ ही कादंबरी मुखर करते. नदीच्या काठावर चित्रित होणारा हा मानवी जीवननकाशाच आहे. मनोज बोरगावकर यांची चेहराविहीन माणसांवर असणारी अपार मानवतावादी निष्ठा ‘नदीष्ट’मधून दृग्गोचर होते. त्यामुळे ‘नदीष्ट’ मराठी कादंबरीत मौलिक भर टाकते, यात शंकाच नाही.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5009/Nadishta

.............................................................................................................................................

लेखिका अनिता यलमटे कथाकार आहेत.

anitayelmate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......