‘नदीष्ट’ : अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव मुखर करणारी कादंबरी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनिता यलमटे
  • ‘नदीष्ट’चं मुखपृष्ठ
  • Fri , 19 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस नदीष्ट Nadishta मनोज बोरगावकर Manoj Borgaonkar

जेव्हा एखाद्या कवीला वाटतं की, आपल्याला हवा असणारा मोठा अवकाश कवितेतून अभिव्यक्त करता येणार नाही, तेव्हा तो कादंबरीतून अभिव्यक्त होतो. असंच काहीसं मूळच्या कवी असणाऱ्या मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीत जाणवतं.

ही कादंबरी प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनात लिहिलेलं आत्मकथनच आहे. नदी, तिचं भव्य पात्र, मंदिर, भोवतालचं जंगल, घाटाच्या पायऱ्या, मासेमारी करणारे भोई, पुजारी, जनावरं चारायला नेणारे गुराखी, एवढंच नव्हे तर दुष्कर्म करणाऱ्यांनाही नदी ओटीत कशी घेते, अशी कितीतरी वर्णनं लेखकानं खूप ताकदीनं जीवंत केली आहेत. लेखकाचा व नदीचा कादंबरी लिहिण्यापुराता सहवास होता असं कुठेच जाणवत नाही. याउलट वर्षानुवर्षं लेखक नदीचा ‘नादिष्ट’ असल्याचं जाणवत राहतं. कितीतरी बारकावे लेखकानं रेखाटले आहेत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री लेखक नदीवर पोहायला येतो. तेव्हा या नदीच्या ओढीनंच आलेली अनेक पात्रं लेखकाला भेटत जातात. खरं पाहता आपल्या पांढरपेशा समाजात लेखकाला भेटलेल्या या पात्रांना कुठलाच चेहरा नसला तरी लेखक या उपेक्षित माणसांमध्ये आपसूकपणे गुंतत जातो. कारण ही सगळीच माणसं नदीवर जीव लावणारी असतात, तर लेखक नदीवर जीव ओवाळणारा!

नदीवर भेटलेली भिकारीन सकीनाबी लेखकाचा जीव वाचावा म्हणून सावध करते, तर लांबपर्यंत पोहत गेल्यावर लेखकाचं बरं-वाईट तर झालं नाही ना, म्हणून दोन-अडीच तास अस्वस्थ झालेले कालूभैया व पुजारी नदीमुळेच जोडले गेलेले. नवस फेडणाऱ्या स्त्रीवर आपल्या डोळ्यासमोर बलात्कार झाला आणि आपण जीवाच्या भीतीनं काहीच करू शकलो नाही म्हणून बलात्कारी पोट्यापेक्षा स्वतःला जास्त अपराधी समजणारा बामनवाड म्हणतो की, त्या दिवशी त्या बाईच्या अश्रूसमोर नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. कादंबरी वाचताना काळीज गलबलून येणारे असे अनेक प्रसंग अस्वस्थ करून जातात. विस्कटलेल्या त्या बाईला घरी जाऊनही नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागला असेल, तेव्हा तिला या दोन्हीपैकी कोणता बलात्कार अधिकचा असहाय्य झाला असेल? हा लेखकानं स्वतःला विचारलेला प्रश्न वाचकालाही अंतर्मुख करून जातो.

लेखकाला पोहण्याचे धडे देणारे दादारावही तितकेच भावून जातात. सख्खी आई वारल्यानंतर गोदावरी आईनं जवळ घेतल्याचं सांगताना खूपच भावूक होतात. ‘मी काही मेलेल्या मायचं दूध पिलो नाही’, हे किती मर्दानीपणानं आपण सांगतो, पण एका दमात नदी पार करणारे दादाराव मात्र आपण तान्हे असताना मृत आईला कसा पान्हा फुटला, हे वाचताना काळीज गलबलून येतं.

एके ठिकाणी मात्र मला लेखकाचं कमालीचं आश्चर्य वाटतं. ते म्हणजे स्वतः विज्ञानवादी असूनही अंधविश्वासानं ‘व्हर्जिन’ जागेवरची वाळू काढायची, हे खूळ डोक्यात घेऊन जीव कमालीचा धोक्यात घालणारा लेखक पोहण्याच्या थरारक कसरती करताना अंगावर काटा उभा राहतो. इतकं धाडस दाखवणारा लेखक मात्र अविरतपणे होत असलेल्या वाळू उपशानं कमालीचा अस्वस्थ होतो. लेखकाला नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भासारखा वाटतो. त्यामुळे तो म्हणतो, ‘नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ’. पण अविरत होणाऱ्या वाळू उपशानं नदीला होणारी जखम लेखकाला थेट गर्भपातानं स्त्रीला झालेल्या इजेसारखीच भासते. या प्रतिमेतून लेखकाच्या गाभ्यातील मुळातला कवी हळूवारपणे डोकावतो.

कादंबरीला वेगळं वळण मिळतं ते नदीवर भेटलेल्या भिकाजी व सगुणामुळे. मध्येच लेखकाला सर्पमित्र प्रसादही भेटतो. अस्सल विषारी कोब्रा कोवळ्या वयात कसा आपण पकडला याचं वर्णन ऐकताना जाणवत राहतं की, एखाद्या कौशल्याला वयाचंही बंधन नसतं!

कादंबरीभर एक जाणवत राहतं की, लेखकाला नदीचा तर नाद आहेच, पण इथं भेटणाऱ्या समाजातील दुर्लक्षित माणसांचं भावविश्व उलगडण्याचाही अनामिक छंद दिसतो. असाच भेटलेला भिकाजी हा भिकारी पण रोज अंघोळ करणारा, मोजकं पण शुद्ध मराठी बोलणारा, पूर्वाश्रमीचा पीडित पण परिस्थितीनं भिकारी बनला असावा, हे लेखक हेरतो. त्याच्या अंतरी दडलेलं गूढ खोलण्यासाठी त्याच्यासोबत जेवण करताना लेखकाला अजिबात संकोच वाटत नाही. रानमांजराला पाहून ताबा सुटलेला भिकाजी आपल्या दुर्दैवी भूतकाळातील अपराधाचं ओझं मानगुटीवर घेऊन निरर्थक जीवन जगत असतो. मुलीचा पापा घेताना दारूचा वास आल्यानं मागे सरकणाऱ्या आपल्याच लेकराचा अनवधानानं आपल्या हातून झालेला अंत भिकाजीला जनातून व स्वतःच्याच मनातून उठवणारा ठरतो. बहिणीचं वांझपण, तिचा दुर्दैवी अंत आणि तिच्या विरहात आईचं संपणं, या दुःखगाठी भिकाजीच्या बायकोनंही कधी हळूवारपणे खोलल्या नाहीत. संतती होण्यापर्यंतचं नवरा-बायकोचं अंथरुणातील नातं मूल झाल्यावर मात्र किती बेगडी होतं, त्यातूनच दारूचं वाढलेलं व्यसन आणि मांजरीचा ‘फोबिया’ कसा घात करतो, हे सर्व आपल्या जिव्हारी लागतं.

एक स्त्री वाचक म्हणून मला हा प्रसंग खूपच जिव्हारी लागला. आपल्याच इवल्याशा लेकराचा चेंदामेंदा करणाऱ्या भिकाजीबद्दल आधी वाटणारी सहानुभूती क्षणभर तिरस्कारात परावर्तित झाली. भलेही ती अनवधानातील चूक असेल, पण रक्ताच्या थारोळ्यातील कोवळ्या बाळाला पाहून कोणती बायको हत्याऱ्याच्या बाजूनं उभी राहील? पंधरा वर्षाच्या शिक्षेनंतरही तो आजन्म अपराधाचं ओझं बाळगतोय म्हणून त्याच्याबद्दल वाईट वाटतं. लेखकानं त्याला बोलतं करून काहीतरी त्याचं ओझं कमी केलं, पण त्याच्या बायकोला दोष न देता ‘तिचीही काहीतरी बाजू असेलच की’ या विधानातून सामंजस्यही दाखवलं आहे.

‘नदीष्ट’मध्ये ठळकपणे जाणवत राहिली ती ‘सगूणा’. तिला कादंबरीची नायिकाच म्हणावं लागेल. समाजाच्या दृष्टीनं तिरस्कृत, भयावह व स्त्री-पुरुष या जातीत न बसणारा घटक म्हणजे ‘तृतीयपंथी’. खरं तर आज नदी व तृतीयपंथी हे दोन्हीही जागतिक प्रश्न आहेत, तरीही ते उपेक्षितच आहेत. या लोकांबद्दल सभ्य लोकांना नेमकी भीती वाटते की, तुच्छता हेही ठरवणं अवघडच. ‘नदीष्ट’मध्ये सगूणाची लेखकाशी झालेली भेट कादंबरीला उत्कंठतेच्या शिगेला पोहचवते. रेल्वेत, रस्त्यावर, बाजारात व यात्रेत भेटणाऱ्या या कम्युनिटीला आपण चोरून चोरूनच पाहतो. अशाच चोरून पाहून दूर पळून जाणाऱ्या लेखकाला सगूणानं ‘खरा हिजडा कोण?’ हा प्रश्न खूपच भेदक व व्यापक अर्थानं विचारला होता. तेव्हा लेखकाप्रमाणेच वाचकालाही विचार करावा लागतोच की, ‘खरा हिजडा कोण?’

तृतीयपंथीयात दीक्षा देण्याची अघोरी प्रथा प्रथमच वाचनात आली. अंगावर काटा आणणारी ही प्रथा खरंच गरजेची आहे का? तृतीयपंथीयांवर आपलं घर, गाव व समाज सोडून परागंदा होण्याची वेळ का यावी? आपल्याकडे दिव्यांग मुलांना कुटूंब व समाज हद्दपार करतो का? याउलट अपंगत्वाचं कटू सत्य स्वीकारून इतर मुलांइतकेच अधिकार आपण या मुलांना देतो. मग याच न्यायानं आपण तृतीयपंथीयांना का वागवत नाही, असे अनेक प्रश्न ही कादंबरी मुखर करते.

सगुनाने लेखकासमोर आपल्या मनाची ‘भडास’ काढते. पण अनेक विचार करायला लावणाऱ्या गोपनीय गोष्टींचाही उलगडा करते. आपण ही एक-दोघांना ‘हिजडा’ बनवण्यात सहभागी झाल्याचे सांगत सगूणा म्हणते, ‘केवळ ही कामं आमची बिरादरीच करते असं नाही, तर या समाजातले कितीतरी लोक हे काम करतात’. विचार करायला लावणारे अनेक प्रश्न सगुणा संवेदनशील लेखकासमोर उभे करते.

आईच्या भेटीच्या ओढीतूनच सगुणा नदी जवळ करते, पण लेखकाला सगुणाच्या भेटीची तीव्र ओढ का लागली होती, हा प्रश्न लेखकाला स्वतःलाही पडतो. पण पुढे जाणवत राहतं की, लेखकाला सगूणाच्या अंतर्मनाच्या खोल डोहातील ‘व्हर्जिन’ जागेवरचा ‘अनटच्ड’ गुंता खोलायचा होता.

खरं तर हे आत्मकथन असलं तरी लेखक कुठेच नायकाच्या भूमिकेत दिसत नाही. लेखकाचं खाजगी जीवन कुठेच उघड होत नाही. फक्त एके ठिकाणी पत्नीचा उल्लेख होतो. बाकी अप-डाऊन्सच्या नोकरीतून लेखकाचा व्यवसायही कळत नाही. लेखकानं नायकत्व बखूबीनं टाळलं आहे.

लेखक लिहितो तो एक सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. स्वातंत्र्याच्या सातव्या दशकात आपण जगत असताना आजही समाजपरिघाबाहेरच्या अशा अनेक अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव ‘नदीष्ट’ ही कादंबरी मुखर करते. नदीच्या काठावर चित्रित होणारा हा मानवी जीवननकाशाच आहे. मनोज बोरगावकर यांची चेहराविहीन माणसांवर असणारी अपार मानवतावादी निष्ठा ‘नदीष्ट’मधून दृग्गोचर होते. त्यामुळे ‘नदीष्ट’ मराठी कादंबरीत मौलिक भर टाकते, यात शंकाच नाही.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5009/Nadishta

.............................................................................................................................................

लेखिका अनिता यलमटे कथाकार आहेत.

anitayelmate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......