लाल श्याम शाह यांचा वारसा चालवण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारतासाठी आणि प्रेरणा मिळवण्यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे!
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘लाल श्याम शाह’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक लाल श्याम शाह Lal Shyam Shah सुदीप ठाकूर Sudeep Thakur रामचंद्र गुहा Ramachandra Guha

“लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो,” असे इतिहासकार, चरित्रकार, स्तंभलेखक रामचंद्र गुहा ज्या पुस्तकाबद्दल म्हणाले आहेत, त्याचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. मूळ पुस्तकाला गुहा यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

...............................................................................................................................................................

चरित्रलेखन हा आपल्या देशातील एक अविकसित साहित्यप्रकार आहे. आपण भारतीय लोक जिवंत असलेल्या माणसांचे गुणगान करतो. पण कुणा दिवंगत व्यक्तीच्या बाबतीत अधिकारवाणीने लिहिणे आपल्याला जमत नाही. अर्थात, आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांची चरित्रात्मक म्हणावीत अशी पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यातील थोडीच पुस्तके विद्वत्ता आणि साहित्य या कसोट्यांवर उतरतात. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद व अन्य काही नायकांवर अशी पुस्तके लिहिली गेली आहेत. परंतु अशा अनेक उल्लेखनीय व्यक्ती आहेत, ज्यांना अखिल भारतीय पातळीवर ओळख प्राप्त झालेली नाही आणि त्यांच्या जीवनाच्या बाबतीत योग्य प्रकारे लिहिलेही गेलेले नाही. उदाहरणेच सांगायची तर ई.एम.एस. नंबूद्रीपाद, मास्टर तारासिंह, वाय.एस. परमार, ज्योती बसू, एन.टी. रामाराव आणि शेख अब्दुल्ला. वरील प्रत्येकाने अनुक्रमे केरळ, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या इतिहासाला आकार देण्यासाठी गांभीर्याने योगदान दिले आहे. मात्र या मोठ्या व्यक्तींपैकी कुणाच्याही बाबतीत संशोधनपर किंवा अभ्यासपूर्ण लिहिले गेलेले चरित्र अद्याप उपलब्ध झालेले नाही.

ही कमतरता केवळ राजकीय किंवा सार्वजनिक जीवनापुरतीच मर्यादित नाही. आपला साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहासदेखील इतक्याच विपन्नावस्थेत आहे. उदाहरणार्थ बहुश्रुत शिवराम कारंथ, बांगला लेखिका व कार्यकर्त्या महाश्वेतादेवी, जागतिक स्तरावर ठसा उमटवणारे संगीतकार रविशंकर यांची चांगली चरित्रे वाचायला मला आवडतील, पण ती उपलब्ध नाहीत.

भारतातील उत्तम चरित्रलेखनाच्या अभावाबद्दल दु:ख व्यक्त केल्यानंतर, मला हेही सांगितले पाहिजे की, लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

आदिवासी हा भारतीय समाजातील सगळ्यात वंचित वर्ग आहे. त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, ही मुसलमानांपेक्षा आणि दलितांपेक्षाही अधिक अनिश्चित आहे. आपल्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये ते अधिकच काठावर ढकलले गेलेले आहेत. जमीनदार घराण्यात जन्मलेले लाल श्याम शाह, स्वतः विलासी आणि आरामदायक जीवन जगू शकले असते. तरीही त्यांनी आपल्या समाजातील लोकांची सेवा करणे पसंत केले. आदिवासी सभेचे नेता या नात्याने त्यांनी, जमीन आणि जंगलावरील आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण केले. आदिवासींचा इतिहास आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी संघर्ष केला. मध्य भारतातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे केले. आदिवासी लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांचा खूप सन्मान करत होते.

लाल श्याम शाह यांनी दशकानुदशके ज्या विभिन्न चळवळी केल्या, त्याबाबत सुदीप ठाकूर या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका लढवल्या, त्याच्या हकिगतीही या पुस्तकात आहेत. काही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता, तर काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणुका जिंकल्यानंतरही त्यांनी सिद्धान्ताच्या आधारावर राजीनामे दिले हेही यात आले आहे. आदिवासींना संविधानाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारे अपयशी ठरली, हेच मुख्य कारण त्यामागे होते. निवडणुकीच्या राजकारणाव्यतिरिक्त ज्या आंदोलनांचे नेतृत्व शाह यांनी केले होते, त्यात नैसर्गिक संसाधनांवरील आदिवासींचे हक्क व अधिकार यावर त्यांनी जोर दिला होता. विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात जी आंदोलने झाली होती, त्यातही लाल श्याम शाह आघाडीवर होते. यासंदर्भात सुदीप ठाकूर यांनी बरीच तपशीलासह माहिती दिलेली आहे.

लाल श्याम शाह हे विचारवंत तर होतेच, पण कार्यकर्तादेखील होते. त्यांना आदिवासींच्या स्थितीबरोबरच कायदेशीर चौकटीचीही चांगली समज होती. ते नेहमीच (आणि हे खरेही आहे) असा युक्तिवाद करत असत की, एकीकडे संविधानाने देशाचे राष्ट्रपती व विविध राज्यांचे राज्यपाल यांना आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षक बनवले आहे, तर दुसरीकडे या उच्च पदावर बसलेल्यांनी आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवून आदिवासींना अधिक शक्तिशाली आर्थिक वर्गाच्या दयेवर सोडून दिलेले आहे.

स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या लाल श्याम शाह यांनी स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधून घेणे अविवेकपूर्ण मानले. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते, पण आयुष्यभर ते राजकीयदृष्ट्या सक्रीय राहिले. त्यामुळेच, १९७५ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने त्यांना अटक केली होती आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले होते. पण अशा घटनांमुळे ते घाबरले नाहीत आणि थांबलेही नाहीत. १९८०च्या दशकात (तेव्हा त्यांच्या वयाची साठी उलटलेली होती) ते ‘जंगल बचाओ, मानव बचाओ’ या आंदोलनात सक्रीय झाले. आणि जल, जंगल, जमीन यावरील आदिवासींच्या अधिकारासाठी लढा दिला. कारण स्थानिक अर्थव्यवस्थेचे हे तीन आधारस्तंभ आहेत. शिवाय, ही अशी तीन संसाधने आहेत, ज्यांची लूटमार बाहेरील माणसे सातत्याने करत असतात. मार्च १९८६मध्ये लाल श्याम शाह यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते सक्रीय राहिले, लढत राहिले.

सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे. लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना स्वत:च्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वभिमानासाठी संघर्ष केला.

लाल श्याम शाह यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......