‘सावट’ : हा सिनेमा पूर्ण दोन तासांचा चित्तथरारक प्रवास आहे
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘सावट’चं पोस्टर
  • Sat , 06 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie सावट Saavat

सरळ-सोप्या वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा प्रचंड गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट असतात. अशा गोष्टीचा एक पदर उलगडून बघताना दुसरा पदर आपोआप समोर येतो. मग पुन्हा तिथून एक अनपेक्षित गोष्ट सुरू होते. अशा अनेक घटना-घडामोडीचं चक्र सतत आसपास फिरत असतं. डोळे उघडे ठेवून त्या घटनांचा अन्वयार्थ लावता आला की, क्लिष्ट गोष्टी नकळत सोप्या होत जातात. इथं सोपं आणि क्लिष्ट असं द्वंद चालू असतं. या द्वंदातून पुढे येते ती सत्याची झाकलेली बाजू. अशा वेळी शोध, धडपड, स्वत्व, संघर्ष, आव्हान हे सगळी फक्त शब्द राहत नाहीत, तर आयुष्याचं वास्तव बनतात.

‘सावट’ हा एक असाच सिनेमा आहे, ज्यात सामाजिक वास्तव मांडलं आहे. दिग्दर्शक सौरभ सिन्हा यांचा हा सिनेमा पूर्ण दोन तासांचा चित्तथरारक प्रवास आहे. समाजात असलेल्या अंधश्रद्धा हा सिनेमाच्या कथेचा विषय आहे. सिनेमाची कथा निव्वळ मनोरंजनात्मक नाही, तर सामाजिक वास्तव आहे. अंधश्रद्धाचा पहिला बळी असते ती स्त्री. २१व्या शतकातही समाज अंधश्रद्धाच्या विळाख्यात बंदिस्त आहे. ‘करणी’, ‘भानामती’, ‘चेटकीन’ यांसारख्या अंधश्रद्धा समाजात पाय रोवून बसलेल्या आहेत. ग्रामीण भागात अंधश्रद्धाचे निष्पाप जीव मोठ्या प्रमाणात बळी ठरतात. मात्र जेव्हा या अंधश्रद्धाचा उलगडा होत जातो, तेव्हा त्यामागची वास्तव परिस्थितीसमोर येते. अंधश्रद्धाचा वापर कशा पद्धतीनं केला जातो. त्यामागची कारणं काय असतात, यावर सिनेमा अचूक आणि परिणामकारकरीत्या भाष्य करतो.  

सिनेमाची कथा कालसुंसगत आहे. ती रहस्यमय पद्धतीनं पुढे सरकत जाते. त्याचाही सिनेमावर सकारात्मक परिणाम होतो. कथेची मांडणी सिनेमाचा तोल सुटू देत नाही. त्यामुळे सिनेमात कंटाळवाणं असं काही नाही. स्त्री आणि अंधश्रद्धा यांचा संबंध दाखवताना दिग्दर्शकानं अतिशयोक्ती टाळली आहे. सिनेमाची कथा अंधश्रद्धावर आधारित असली तरी त्याला जोडून येणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परिघावर फिरते. म्हणून पडद्यावरचं मनोरंजन आणि वास्तव यांच्यात गुंफलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

सिनेमातले संवाद अधिक प्रभावी आहेत. रोमांचक कथेला अधिक रोमांचक करणारे आणि त्याचवेळी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे हे संवाद चपखल आहेत. मात्र तांत्रिक बाबीमध्ये असलेला गडदपणा अनेकदा निरस वाटतो. सिनेमात गाणी नाहीत, मात्र त्याचा परिणाम कथेवर जाणवत नाही. कथेची लयबद्धता टिकून ठेवण्यात दिग्दर्शक आणि पटकथा लेखकानं घेतलेली मेहनत चढउतारासहित दिसून येते.

पूर्वार्धात कथा थोडी डगमगते. कलाकारांचा अभिनय कथेला सावरून घेतो. उत्तरार्धातदेखील कथा थोडी लय सोडते. पण अभिनय ही सिनेमाची मजबूत बाजू आहे. श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे या कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. स्मिता तांबेची सशक्त भूमिका सिनेमाला चार चाँद लावते. तिचे संवाद आणि अभिनय गुंतवून ठेवतात. स्त्रीप्रधान सिनेमे सिनेसृष्टीत अधूनमधून येत असतात. मात्र ‘सावट’ या स्त्रीप्रधान सिनेमाचं वेगळंपण म्हणजे मुख्य भूमिकेत असलेली स्त्री ही शोषणाला विरोध करणारी प्रवृत्ती आहे. ती सामाजिक वास्तवाशी परिचित आहे. पण तिला मिळालेल्या अधिकारांमुळे तिच्या अंगी तितकाच कणखरपणा भरलेला आहे.

दिग्दर्शक सौरभ सिन्हा आणि सिनेमाची निर्माती टीम यांचा हा प्रयोग अनेक विषयांना एकत्रपणे पडद्यावर मांडतो. रहस्यमय पद्धतीनं रंगवलेली कथा आणि दिग्दर्शकाच्या सामाजिक जाणिवा आपल्याला खिळवून ठेवतात.

मराठी सिनेमात असे विषय हाताळले जाणं ही काळाची गरज आहे. सिनेमा एक मोठं माध्यम आहे ज्यामुळे कुठलाही विषय समाजापर्यंत सृजनशील कलाकृतीच्या माध्यमातून मांडता येऊ शकतो. या माध्यमाच्या मर्यादा असल्या तरी त्याची शक्तीस्थळं ओळखून अधूनमधून असे ज्वलंत आणि वास्तवाजवळ जाणारे विषय हाताळले पाहिजेत. या मार्गावर जाणारा ‘सावट’ हा एकदा बघावा असा सिनेमा आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एका देशामधल्या समूहानं एकाकी पडत जाण्याची प्रक्रिया एका कोवळ्या मुलाच्या एकाकी पडत जाणाऱ्या आयुष्याशी इतकी तादात्म्य पावते की, त्यातून एक थंडपणा संपूर्ण चित्रपटात झिरपत जातो

टोकाची दृश्यं एकाच वेळी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाली, तर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’मध्ये एकीकडे दिसणारा एखाद्याला भोसकल्यावर त्यालाच आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करणारा सैनिक आणि दुसरीकडे दिसणारा युद्धबंदी जाहीर झाल्यावर कागदोपत्री युद्ध संपायला वेळ असल्यामुळे युद्ध सुरू ठेवायला लावणारा एका बटालियनचा प्रमुख. हे नक्की कशाचे द्योतक आहे? ही कुठली मूल्यव्यवस्था आहे? .......

‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’ : आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं अर्थपूर्ण नाटक

हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे. आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे.......

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......