‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत. 
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
  • ‘तोत्तोचान’चं मराठी व इंग्रजी मुखपृष्ठ
  • Fri , 22 March 2019
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो तोत्तोचान Tottochan तेत्सुको कुरोयानागी Tetsuko Kuroyanagi

‘तोत्तोचान’ हे प्रचंड गाजलेलं आणि जगातील बहुतेक भाषेत अनुवादित झालेलं जपानी पुस्तक. तेत्सुको कुरोयानागी या जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार महिलेनं ते लिहिलं. म्हटलं तर ते तिच्या बालपणीचं अनुभवविश्व. या अनुभवविश्वाच्या माध्यमातूनच ती तोमोईची गोष्ट सांगते. तोत्तोचान ही तोमोई स्कुलची विद्यार्थिनी. ‘तोत्तोचान’ हे नॉन फिक्शन पात्र आहे. आणि तीच तोत्तोचान पुढे तेत्सुको कुरोयानांगी या नावानं ओळखली जाऊ लागली. ‘तोत्तोचान’ने सांगितलेल्या गोष्टींमुळे तोमोई मला आवडायला लागली.

सोसाकु कोबायाशी यांनी तोमोई ही शाळा १९३७ ला सुरू केली. कोबायाशी हे जपानी शिक्षणतज्ज्ञ होते. शिवाय तोमोईचे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. मुलांची वाढ ही स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतानता व्हावी यासाठी ते आग्रही असत. तोमोई ही प्रचंड आगळीवेगळी शाळा होती. कोबायाशी यांचा प्रयोगात्मक - सृजनात्मक शिक्षण पद्धतीवर भर होता. औपचारिक शिक्षणाबरोबरच ते अनौपचारिक शिक्षणावर भर देऊ लागले. मुळात, औपचारिक शिक्षण हे अनौपचारिक पद्धतीनं दिलं जाऊ लागलं. कोबायाशी यांनी उणीपुरी सात वर्षं ही शाळा चालवली. मात्र १९४५ च्या युद्धात तोमोई आगीत जळून गेली. इतकं कमी आयुष्य या शाळेला लाभलं. कोबायशी यांनी नव्यानं शाळेची उभारणी करण्यास सुरुवात केली. नंतरच्या काही वर्षांतच कोबायाशीच निधन झालं.

कोबायशी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी एका प्राथमिक शाळेत नोकरी केली. संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी तिथंही आपली संगीत साधना चालू ठेवली. नंतर त्यांना जपानमधील सर्वोत्कृष्ट संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आता हेच संगीत विद्यालय ‘तोक्यो युनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्स अँड म्युझिक’ या नावानं ओळखलं जातं. संगीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका संगीत विद्यालय संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. कोबायाशी जिथं संगीत शिक्षकाची नोकरी करायचे, ते हारुजी नाकामुरांनी स्थापन केलेलं संगीत विद्यालय होतं. या संगीत विद्यालयाची शिक्षण खूप प्रचंड वेगळी होती. त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मुक्त असे. या शाळेतील या विद्यार्थी त्यांना जे आवडायचं तेच करायचे. प्राथमिक शिक्षणाचा टप्पा हा मुलांच्या आयुष्यात पायाभरणी करत असतो. त्यामुळे हा टप्पा फार महत्त्वाचा असतो, या हारुजी यांच्या प्राथमिक शिक्षणविषयक विचारामुळे कोबायाशी प्रभावित झालेत. तोमोईसाठी त्यांनी हीच शिक्षण पद्धती वापरली. 

तोत्तोचानने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत. सोसाकू कोबायाशी  यांनी अतिशय विचार करून तोमोईचे उपक्रम आखले होते. त्यांचा प्रत्येक प्रयत्न मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करत असे. प्रत्येक गोष्टीतून मुलांना नवं काहीतरी मिळे. त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करे. ‘समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरच काहीतरी’ या गोष्टी तोत्तोचान सांगते की, कोबायाशी जेव्हा हा वाक्प्रचार वापरायचे, तेव्हा सुरुवातीला त्याचा अर्थ तिला उमगला नव्हता. मात्र नंतर मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे बघायचे, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, आहारात भाताशिवाय इतरही पदार्थ असावेत, यासाठी मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार तयार केला. समुद्रातील काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी आणि डोंगरावरचं म्हणजे भाज्या, मास, अंडी वगैरे.  कोबायाशी मुलांच्या चौरस आहाराला देखील महत्त्व द्यायचे. 

‘बत्तीस वेळा चावून खावा’ हे तोमोईमध्ये जेवताना म्हणायचं गाणं. ते असं- 

बत्तीस वेळा चावून खावा 

प्रत्येक घास जेवताना 

हसत मुखाने नेहमी खावा

प्रत्येक खाऊ खाताना 

भात असो वा मासे 

किंवा अंड्याची पोळी खाताना            

बत्तीस वेळा चावून खावा 

प्रत्येक घास जेवतांना 

तोत्तोचान सांगते, शाळा सोडल्यानंतरही कित्येक वर्षं आम्हाला वाटायचं की, जेवणाआधी म्हणायचं हे गाणं आहे. मात्र कोबायाशी कायम  सावकाश जेवण्यासाठी सांगत. एक घास बत्तीस वेळा मुलांनी चावावा, याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी स्वतः हे गाणं रचलं होतं.

‘सगळ्यात खराब कपडे’ या कथेत तोत्तोचान सांगते की, कपडे मळण्याच्या किंवा फाटण्याच्या भीतीनं मुलांनी मोकळेपणानं न खेळणं हे त्यांना लज्जास्पद वाटायचं. मुलांनी मुलांसारखं असावं आणि त्यांनी विनाकारण काळज्या करू नयेत, असं त्यांना वाटे. म्हणून ते पालकांना म्हणत, मुलांना शाळेत पाठवताना सगळ्यात खराब कपडे घालत जा. मुलांचं निरागस बालपण ओरबडून जाऊ नये, हा त्यांचा विचार खरंच खूप महत्त्वाचा आहे. मात्र आज आपल्याकडे शाळेत गणवेश नाही म्हणून मुलांना शिक्षा दिली जाते. याचा अर्थ असाही नाही की, गणवेश नसावा. मात्र नियम-शिस्त यांच्या कचाट्यात मुलांचं बालपण हिरावलं जाऊ नये इतकंच!

या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट ही तोमोईच्या मुख्याध्यापकांचा - कोबायाशी यांचा नवा प्रयोग होता. तो फसला नव्हता. कारण त्यामागे एक समृद्ध विचार होता. तोत्तोचान  सांगते, ‘तू खरोखर चांगली मुलगी आहेस’ या एका वाक्यानं तिच्या आयुष्याला नवा अर्थ आला. तोमोई स्कुलला येण्याआधी ती ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेतून तिला काढून टाकलं होतं. ‘मी जर तोमोईत गेले नसते तर मला शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी म्हणून शिक्का बसला असता’.  मात्र तोमोईच्या मुख्याध्यापकांच्या शब्दांनी तोत्तोचानचं आयुष्य बदललं. कोबायाशी यांनी तोत्तोचानला बळ दिलं, विश्वास दिला.  

तोमोईतील अभ्यास, शाळेतलं गाणं, पोहण्याचा तलाव, प्रगती पुस्तक, उन्हाळी सुट्ट्या, अपूर्व साहस, धीटपणाची परीक्षा, तोत्तोचान सांगितलेल्या या गोष्टी मला आवडल्या आणि तोमोईच्या मुख्याध्यापकांची शिक्षणाची त्यांची पद्धतीही आवडली. तोत्तोचान मला पुस्तकात भेटली. मी तोमोई स्कुलचा विद्यार्थी नाही, याची मला खंत आहे. तोमोईत शिकायला आणि तोत्तोचानशी मैत्री करायला मला नक्की आवडलं असतं!

प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. सृजनात्मक शिक्षण कसं असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तोमोई स्कुलचा तोमोई पॅटर्न! आपल्याकडे कार्यानुभव असा एक तास असतो. दुर्दैव हे की, आपले शिक्षक, विद्यार्थी हे सगळे तो तास ‘टिवल्याबावल्या’ करायचा तास म्हणून बघतो! असो.

मॉन्टेसरी ही अशीच एक शिक्षण पद्धती, म्हणजे मुलांच्या नैसर्गिक वाढीला महत्त्व देणारी शिक्षण पद्धती. मात्र या पद्धतीचं भारतीय स्वरूप प्रचंड वेगळं आहे. अभ्यास एके अभ्यास,  परीक्षा, ट्युशन असं काहीतरी आणि या गराड्यात पालक मुलांना झोकून देतात.  मात्र या गोष्टींचं मुलांना दडपण येत असेल याचा आपण जराही विचार करत नाही. परवा ‘तोत्तोचान’ या पुस्तकासंदर्भात प्राथमिक शिक्षिका असलेल्या विदर्भातील एका शिक्षिकेशी बोलत होतो. त्या सांगत होत्या- “खरंच किती चुकीची शिक्षण पद्धती आहे आपली! शिवाय आमच्या शाळेत तर शनिवारी श्लोकदेखील म्हणून घेण्यात येतात.”

भारतीय शिक्षण पद्धतीत परीक्षेला फार महत्त्व आहे. परीक्षेचं ओझं मुलांचं बालपण हिरावून घेतं. प्राथमिक शिक्षका जसं सांगत होत्या, तसंच शिक्षणाच्या भगवीकरणाचा मोठा प्रयत्न या पाचेक वर्षांत झाला आहे. भविष्यात माझ्या चिमुकल्याला मी कुठल्या शाळेत घालावं, हा प्रश्न मला सतावत आहे. आहे का एखादी माणुसकीची शाळा, जिथं कुठल्याही धार्मिक गोष्टी माझ्या मुलाच्या मनात रुजवल्या जाणार नाहीत, परीक्षा पद्धतीपेक्षा मुलांच्या चौकस बुद्धीला महत्त्व दिलं जाईल, विषयाच्या मुळात जाण्याची उत्सुकता निर्माण केली जाईल आणि त्याच्या नैसर्गिक वाढीला महत्त्व देईल? मी आत्तापासूनच माझ्या चिमुकल्यासाठी तोमोई शोधतोय!

.............................................................................................................................................

‘तोत्तोचान’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/3379/Tottochan

.............................................................................................................................................

कबीर उषा लक्ष्मण बोबडे

kabirbobade09@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 March 2019

काय हो कबीर उषा लक्ष्मण बोबडे, एव्हढं का हो तुमचं धर्माशी वाकडं? मेकॉलेछाप शिक्षणपद्धतीचा निषेध करण्यासाठी सुद्धा तुम्हाला धर्म मध्ये आणावासा वाटतो. यावरून धर्माचं सर्वव्यापकत्व अधोरेखित होत आहे. मग उगीच धर्माला नावं कशाला ठेवताय? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......