माणूस माणसाच्या जीवावर उठायला भाषा कारणीभूत ठरत असेल तर...
ग्रंथनामा - झलक
सुधीर रा. देवरे
  • ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 March 2019
  • ग्रंथनामा झलक मी गोष्टीत मावत नाही Mi Goshtit Mavat Nahi सुधीर देवरे Sudhir Deore

लेखक सुधीर देवरे यांची ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी नुकतीच पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश... 
.............................................................................................................................................

करमणूक : आपली करमणूक करून घेण्यासाठी काय काय करता येईल माणसाला? कोणत्याही दोन देशांतील युद्धाचे टीव्हीने थेट प्रक्षेपण केले तर किती भव्य करमणूक होईल शांतताप्रेमी देशातील माणसांची! अशा कार्यक्रमावर प्रायोजकांच्या नुसत्या उड्या पडतील. मग जाहिरातींचा भाव पाच सेकंदांसाठी पाच कोटी रुपये. अणुबॉम्ब टाकण्याच्या दृश्याआधीच्या जाहिरातीसाठी एका सेकंदाला पंचवीस कोटी रुपये पडतील. बोला. एक वार. दोन वार. तीन वार. युद्धाच्या समरप्रसंगी थेट प्रक्षेपणासाठी जास्तीत जास्त युद्ध दाखवता यावे म्हणून मोजक्याच मिनिटांच्या जाहिराती उपलब्ध. त्वरा करा. संपर्क साधा.  
         
भारत-पाक युद्ध झाल्यास अमेरिका तटस्थ

न्यूयॉर्क, दि. १ (वृत्तसंस्था) :  भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावातून भारत-पाक अणुयुद्ध सुरू झाल्यास अमेरिका युद्धात हस्तक्षेप करणार नाही, पण या युद्धात जगलेल्या वाचलेल्यांना मदतीचा हात पुढे करील, असे अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

भारत-पाक संघर्षाला सुरुवात झाली तरीही अमेरिका कोणत्याही बाजूने आपले शस्त्रसामर्थ्य वापरणार नाही, असे अमेरिकेतील नियतकालिक ‘न्यूजवीक’ने यासंदर्भात केलेल्या विश्लेषणात म्हटलेले आहे. पण युद्धात वाचलेल्यांसाठी मदतीचा हात मात्र पुढे करू. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकार्याआचा दाखला देऊन ‘न्यूजवीक’ने हे वृत्त दिलेले आहे. अमेरिकेतील दुसरे प्रसिद्ध नियतकालिक ‘टाईम’नेही भारत-पाक युद्धाचा संभाव्य अंदाज व्यक्तं केलेला आहे... अमेरिकन लष्कर पेंटॅगॉनने भारत-पाक अणुयुद्ध सुरू झाले तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असावी याचा विचार केलेला होता. भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून अणुयुद्ध सुरू झाले तर अण्वस्त्रांचा वापर होऊ नये म्हणून काय करता येईल यावरही पेंटॅगॉनने विचार केलेला होता. पण भारत-पाक युद्ध सुरू झालेच तर अणुयुद्ध रोखता येणार नाही, असाच या विश्लेषणाचा निष्कर्ष निघाला. अशी माहिती ‘टाईम’च्या अंकात देण्यात आलेली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यावर घातलेले आर्थिक निर्बंध पाकिस्तानला अधिक जाचक ठरतील हे अमेरिकन तज्ज्ञांनी मान्य केले. पण परिणामी आर्थिक अडचणीत आलेला पाकिस्तान ही अण्वस्त्रे व तंत्रज्ञान अरब देशांना विकू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सृष्टीकडून उंदराकडे 

एक अब्ज म्हणजे १०० कोटी. भारतातील उंदरांची संख्या माणसांच्या तीस पट आहे. तीन हजार कोटी उंदीर म्हणजे दरडोई तीस उंदीर. माणूस आणि उंदीर यांच्यातील गुणोत्तर ध्यानात घेण्यासारखे आहे. उंदीर आपल्या देशातील तीस टक्के अन्नधान्याचा फडशा पाडतात. भारताचे धान्य उत्पादन वीस कोटी टन आहे. म्हणजे तीस पट आधिक. संख्येच्या मानाने उंदीर कमीच खातात. उंदरांना दारिद्र्यरेषा ओलांडता येत नाही आणि माणसांना बीळ...   लोकसंख्येचा टाईम साधून आलेला बॉम्ब आणि अग्रलेखात अलंकारिक भाषेत लेख. सेकंदागणिक तुरूतुरू पळणारे उंदीर प्रश्नांसारखे दबा धरून लपून.

धार्मिकता

टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच सर्व नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात. मुंबईची दंगल ही दोन्ही बाजूंच्या आस्तिक लोकांची दंगल होती. सगळ्याच धार्मिक दंगली आस्तिकतेमुळे होतात. बॉम्बस्फोट धार्मिक एकांगीकतेमुळे झालेले आहेत. बाबरी मशीद आणि आस्तिकता. पॅलिस्टिनी अतिरेकी मुस्लीम धार्मिक आस्तिक आहेत. काश्मिरी दहशतवादी आस्तिक आहेत. आणि मतांसाठी लोकांच्या धार्मिक भावना भडकविणारे राजकीय पक्षही आस्तिक आहेत. खूनांपासून पैशाने फसवणुकीचे आरोप ज्या चंद्रस्वामी नावाच्या साधूवर झालेत, तो आस्तिक होता. धिरेन्द्र ब्रह्मचारी नावाचा एक आस्तिक. सत्यसाईबाबा नावाचा भोंदू आस्तिक होता. हिटलरसारखा नरभक्षक आस्तिक होता आणि त्याचे गोडवे गाणारे लोकही आस्तिकच आहेत. भिद्रनवाला नावाचा मस्तवाल अतिरेकी आस्तिक होता. अतिरेक्यांना धर्माची अफू देवून आस्तिकाचे उदाहरण पाहिले तर जग निरिश्वरवादी झाल्यावर संहार करणारे लोक कधीच यशस्वी होणार नाहीत. कारण त्यांना धार्मिक प्रतिष्ठा प्राप्त न झाल्याने त्यांना लौकिक यश कधीच मिळणार नाही.

देवभोळा     

विशिष्ट ग्रहावर चराचर सृष्टी असावी. मानवी अस्तित्वामागे अशी काही खरोखरच ईश्वरी प्रेरणा वगैरे असती तर एकाच ग्रहावर धर्म-पंथाची इतकी बजबजपुरी नक्कीच माजली नसती. माझा एक देवभोळा मित्र, ज्याला अतिसामान्य आचरणही पाळणे शक्य होत नाही, त्याला दृष्टांत झाला, “तू ज्याची प्रार्थना करतो तो अस्तित्वात नाही म्हणून बरे, नाहीतर त्याने पहिल्यांदा तुझ्याच मुस्कटात मारली असती.’’  

सत्कार दखलपात्र गुन्हा

दर पाच वर्षांनी नवे (काही जुनेच) लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार-खासदार निवडून येतात. काही प्रामाणिक प्रतिनिधींचा अपवाद वगळता निवडून येण्यासाठी अनेक उठाठेवी, तडजोड, भेद, लाचखोरी, सौदेबाजी, दारूबाजी, पार्टीबाजी वगैरे प्रयत्न केले जातात. आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी नसूनही वीस-पंचवीस टक्क्याच्या मतांनी पण इतर विरोधकाच्या तुलनेत जास्त मते मिळाली म्हणून अमूक एक लोकप्रतिनिधी लादून घेण्याचा प्रसंग मतदारांवर येत असतो. अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अनुनय करण्यासाठी ‘सत्कार’ अंक सुरू होतो. स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी अशा लोकप्रतिनिधींजवळ जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे त्या लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार घडवून आणणे. हा एककलमी कार्यक्रम मतदारातील महत्त्वाकांक्षी लोकांकडून सुरू होतो. आणि निवडणूक संपून सहा महिने उलटून जातात तरी हे प्रतिनिधी सत्कारच घेत राहतात. या सत्कार प्रसंगी भाषण बाजीचे बार फुटत राहतात. ‘हुजरेगिरी’ करणाऱ्यांची एक लांबलचक रांग तयार होते. देवाच्या आरतीत जशी अवास्तव स्तुती ठासून भरलेली असते, तसे हे लोक स्तुतीचे फुगे प्रतिनिधीवर सोडत राहतात. लोकशाहीचे असे विडंबन टाळण्यासाठी असा सत्कार घडवून आणणे, हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा ठरायला हवा. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले तिच्याकडूनच सत्कार घेणे, हे लोकप्रतिनिधींनाच लज्जास्पद वाटायला हवं. खरं तर लोकप्रतिनिधीने नागरिकांचा सत्कार करायला हवा. म्हणजे त्यांची कामे मार्गी लावायला हवीत.

साखळी

समन्वयवादी लोक यशस्वी होतात... समन्वयवादी लोक महात्मे होतात... तत्त्वज्ञ होतात... संतही होतात... देवही होतात... समन्वयवादी लोक समाजात पुजले जातात... महात्मे होतात... लोकांना धक्के सहन होत नाहीत... लोक दगड आणि देवातला फरक नीट ओळखत नाहीत... लोक देवाला दगड म्हणत नाहीत आणि दगडाला देव! योग्य आकाराचे दगड योग्य वेळी देव होऊन बसतात! लोक कोणत्याही काळात फक्त  लोकच राहतात. लोक देव निर्माण करतात... देव लोकांचे आभार मानत नाहीत... लोकांना आपले लोकपण कळत नाही... लोक देवपूजा करून करून सुखात अथवा भ्रमात मरून जातात...

विकास

समजा बकऱ्यांच्या मेंदूचा विकास झाला असता... म्हशींच्या मेंदूचा विकास झाला असता... बैलांच्या मेंदूचा विकास झाला असता... माणसांऐवजी... तर त्यांनीही लावले असते शोध, त्यांच्याचसाठी उपयुक्ता असे... त्यांच्या बाह्यरूपासारखेच दिसले असते देव... त्यांच्या कल्पनेप्रमाणेच चितारल्या असत्या त्यांच्या देवतांच्या लीला... त्यांच्या सारख्याच लिहिल्या गेल्या असत्या पोथ्या. आणि आपण म्हणजे माणूस, जसा पाळतो घोडा... बैल... म्हैस... बकरी. तसे त्यांनीही पाळले असते कदाचित माणसं... गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून... त्यांनीही सांगितली असती मग एखाद्या पुराणातली कथा. या जन्मात पाप केलं की माणसाचा जन्म मिळतो... पण माणसाच्या मेंदूचा विकास झाला आणि सर्व उल्टंपाल्टं झालं...

अथवा

एक बैल दुसऱ्या बैलाला जीवानिशी ठार मारत नाही...  एक हत्ती दुसऱ्या हत्तीला जीवानिशी ठार मारत नाही...  एक म्हैस...  एक वाघ...  एक सिंह...  एक मेंढी...  एक बकरी...  दुसऱ्या म्हैस...  कुत्रा...  वाघ...  सिंह...  मेंढी...  बकरीला ठार मारत नाही...  एक माणूस दुसऱ्या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो...

बैल बैलाशी बोलत नाही... हत्ती हत्तीशी भाषा करत नाही... वाघ वाघाशी... सिंह सिंहाशी विशिष्ट भाषेत सलग बोलत नाहीत. म्हैस... मेंढी... बकरी आणि सर्व प्राण्यांचे काही सांकेतिक हुंकार सोडले तर ते एकमेकांशी सलग संवाद साधत नाहीत... प्राण्यातल्या भाषेत लिपी नाही... व्याकरण नाही... नियम नाहीत... प्राण्यात स्तुतीची भाषा नाही आणि द्वेषाची... मत्सराची वर्मी लागेल अशी कठोर भाषा नाही...एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची तिसऱ्या प्राण्याजवळ चुगली करत नाही आणि निंदाही करू शकत नाही... भाषा अस्तित्वात नसल्यामुळे... कोणताच प्राणी कोणत्याच प्राण्याचे चारित्र्यहनन करत नाही. आणि... कोणताच नर कोणत्याच मादीशी चोरून व्यभिचार करत नाही... संबंध राजरोस अनुनयाने ठेवले जातात... ते एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत... प्राणी भाषणं करत नाही. माणूस माणसाच्या जीवावर उठायला भाषा कारणीभूत ठरत असेल तर माणसाची भाषा नष्ट करायला हवी का?

------------------------------------------------------------------------------------------------------------------

'मी गोष्टीत मावत नाही' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4792/Mi-Goshtit-Mawat-Nahi

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 15 March 2019

कहना क्या चाहते हो भाई? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......