‘युद्धस्य’ परिणाम नसती कधीच ‘रम्या’...
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 02 March 2019
  • पडघम देशकारण भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi नमोभक्त टीव्ही चॅनेल्स TV Channels वृत्तवाहिन्या News Channels

केवळ तोंड पाटिलकी करत ‘युद्धस्य तु कथा रम्या’ असं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो. त्यात माणुसकी लोप असतो आणि सत्याचा कडेलोट असतो. (महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळताना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो.)  अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद चढलाय, त्या पिसाटलेल्या माध्यमकर्मी आणि नमोभक्तांना हे सांगून काहीही उपयोग नाही. पुलावामाच्या घटनेनंतर देशभक्तीच्या नावाखाली जो काही धुमाकूळ बहुसंख्य ‘संस्कारी’ वर्गाकडून सध्या देशात माजवला जात आहे आणि ‘देशभक्ती’चा स्टॅम्प मारायची जी घाई झालीये, ती अत्यंत घातक आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीत काही लाभ होईलही, पण खरंच युद्ध झालंच तर भारत किमान दोन-अडीच दशक मागे जाईल, हे लक्षात घ्यायला हवं.

सध्या भारत आणि पाकच्या दरम्यान जो काही तणाव निर्माण झालेला आहे तो तसा काही नवा नाहीये. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ साली युद्ध झाली आणि प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. मात्र या एकाही पराभवातून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतलेला नाही. उलट प्रत्येक युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव आणि समस्यात वाढच झालेली आहे. दोन्ही देशांतील मुस्लिमांमध्ये असुरक्षेची भावना वाढली. परिणामी काश्मीर प्रश्न अधिकाधिक क्लिष्ट होत गेलेला आहे. याच काळात दोन्ही देशातील कट्टर पंथीयांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढण्याची खुमखुमीही चढ्या क्रमानं वाढतच गेलेली आहे. तिकडच्या देशातील धर्मांधांना वाटतं की, भारताकडून झालेल्या आजवरच्या पराभवाचा दहशतवादाच्या तरी मार्गानं बदला घ्यावा, तर इकडच्या देशातील धर्मांधांना आधीच्या पाकिस्तानवरील विजयामुळे आलेल्या नशेची चटक लागलेली आहे.

यात आजवर किती सामान्य माणसांचे बळी गेले आणि किती पिढ्या व लोक दहशतीच्या छायेत सलग जगत आहेत, दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या अगणित कळ्या न उमलताच कुस्करल्या गेल्या आहेत, याची माणुसकीच्या पातळीवर मोजदाद करण्याचा प्रयत्न करण्याचं भान कुणालाच राहिलेलं नाहीये.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

१९७१च्या युद्धाच्या परिणामाचे त्याचे चटके सहन करावी लागलेली हयात असलेली माझी पिढी आहे. त्या युद्धाचे परिणाम देशभर झाले होते. अधिकृत आकडेवारीनुसार त्या युद्धात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले, तर पाकिस्तानचे ८ हजार जवान मारले गेले. म्हणजे एवढ्या कुटुंबातील सर्वांनी घरातलं कुणी तरी गमावलं. युद्धात किती नागरिक मारले गेले आणि युद्धभूमीच्या बाहेर एकूण किती नुकसान झालं, याची आकडेवारी जगातील आजवरच्या कोणत्याही युद्धानंतर कधीच जाहीर झालेली नाहीये.

१९७१च्या युद्धाआधी आणि नंतरही बांगला देशातून जे निर्वासितांचे लोंढे भारतात आले, त्याचा अति अतिरिक्त भार जनतेवर पडला. देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागात स्थानिक विरुद्ध बांगलादेशीय असा नवीन संघर्ष उभा राहिला, तो अजूनही शमलेला नाही. पूर्व पाकिस्तान नावाच्या शत्रुचं नामकरण बांगला देशी झालं एवढाच काय तो फरक पडला आणि भारत-पाकिस्तान-बांगला देश या देशातील समस्यांत भरच पडली.

सीमावाद, घुसखोरी, दहशतवाद्यांना आश्रय आणि उत्तेजन या समस्या आणखी उग्र झाल्या, कारण पाकिस्तानचे तुकडे झाल्याने आणि ते तुकडे करण्यात पुढाकार घेतलेल्या भारताविरुद्ध टोकाचा द्वेष व कडवट भावना आणखी बळकट झाली. या तीन देशातील धर्मांध पुजार्‍यांनी त्या भावनेचं सुडाग्नीत रूपांतर केलं.  

दुसरा मुद्दा म्हणजे १९७१चं युद्ध आणि मग आलेल्या दुष्काळानं या देशाच्या अर्थ व्यवस्थेचं कंबरडं मोडून टाकलं. निधी युद्धाकडे वळवला गेल्याने आणि सर्वच क्षेत्रात मंदीची लाट आली. हाताला काम नाही, खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशी ती भीषण स्थिती होती. आमच्या पिढीच्या अनेकांना ते दिवस आठवले, तर रांगा लावून मिळवलेल्या मिलोच्या खाल्लेल्या भाकरी आणि नोकरीसाठी केलेली वणवण आठवून आजही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आताही भारत-पाकचे जवान सीमांवर एकमेकाकडे बंदुका रोखून उभे आहेत. अशी युद्धजन्य किंवा कोणत्याही क्षणी भडका उडेल, अशी स्थिती कारगिल युद्धाच्या आधी आणि नंतर संसदेवर हल्ला झाला, तेव्हाही निर्माण झालेली होती. तेव्हा दोन्ही वेळा मिळून सीमेवर  नुसतं सैन्य उभं ठेवण्याचा खर्च १८ ते २० हजार कोटी झाला असावा असा अंदाज होता.

भारताच्या १२ मिराज विमानांनी परवा बालाकोटच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा खर्च ६ हजार ३०० कोटी रुपये आहे तर दोन्ही देशांची जी विमाने पडली (किंवा पाडली गेली) त्याची किंमत अशीच हजार कोटींच्या घरात आहे, अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय दारूगोळ्यावर होणारा खर्च तर अफाट आहे. अगदी ०.३२ क्षमतेच्या पिस्तुलाच्या एका गोळी(बुलेट)ची किंमत किमान ५० रुपये असते. युद्धभूमीवर तर कोट्यावधी गोळ्या, बॉम्ब आणि आणि दारूगोळ्यांचा संततधार वर्षाव होत असतो. म्हणजे एका दिवसाचा युद्धाचा खर्च कसा हजारो कोटी रुपयांचा आहे याचा अंदाज येऊ शकेल. शिवाय त्या दारुगोळ्यांमुळे मरणारे नागरिक, प्राणी, पक्षी, उजाड होणारी जमीन आणि उध्वस्त होणारी शेती, मरणारी झाडं, ओझोनचा स्तर आणि पावसाच्या प्रमाणात होणारी घट याचा विचार या उन्मादात कधीच होत नाही.

अणुबॉम्ब वापरला गेला तर होणारी महाभयंकर हानी आणि वातावरणाचा होणारा वातावरणाचा प्रचंड ऱ्हास याचा विचार तर अंगाचा थरकाप उडवणारा आहे. जी काही माहिती प्रकाशित होतीये, त्यानुसार दोन्ही देशातील महत्त्वाची शहरे अणुबॉम्बचे लक्ष असतील. तसं खरंच घडलं तर काय हाहा:कार उडेल याची कल्पना तरी केली जाऊ शकते का? युद्धाची भाषा करणार्‍यांनी कधी रणभूमी पहिली तरी आहे का? एखादं शस्त्र कधी हाताळलं आहे का? 

आपल्या पोलीस मामाची साधी ३०३ बंदूक घेऊन दोन तास पहारा देऊन दाखवला तर युद्धाचा उन्माद चढलेले शेंदाड नमो भक्त,  सोशल मीडियावरचे वाचाळवीर आणि प्रकाश वृत्तवाहिन्यांवरचे बालबुद्धीचे अँकर्स चार दिवस अंग शेकत बसतील अशी स्थिती आहे आणि तरी म्हणतात – ‘युद्ध हाच पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग आहे!’ (सेवा कार्यांचा सन्माननीय अपवाद वगळता) प्रात:शाखेत जाऊन दंड फिरवणं, समाजमाध्यमांवर मनाला येईल तशी बेताल कमेंट टाकणं किंवा अँकर्स म्हणून बेताल बडबड करणं आणि प्रत्यक्ष युद्ध लढणं यात फार मोठ्ठं अंतर असतं, हे समजून घेणं या शेंदाडांच्या आकलनाच्या पलीकडचं वास्तव आहे. 

पाकिस्तान सध्या फार मोठ्या आर्थिक खाईत आहे. युद्ध लढण्याची क्षमताच या देशात नाही. प्रकाशित झालेल्या बातम्यांवरून दिसतं आहे की, पाककडे दोन आठवडे पुरेल एवढाही इंधनाचा साठा नाही, पुरेसा दारूगोळाही नाही. पाक सैन्यही युद्ध करण्याच्या मन:स्थितीत नाही. शिवाय युद्ध सुरू करणं सोपं असतं, ते थांबवणं मात्र युद्ध लढणार्‍या देशांच्या हातात कधीच नसतं. त्याचा एक परिणाम म्हणून अन्य देशांची अनेक आघाड्यांवर बटिक व्हावं लागतं, याची जाणीव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना असावी असं दिसतंय हे सुचिन्ह आहे.

हा मजकूर लिहीत असताना इम्रान खान यांनी विनाअट चर्चेची तयारी दर्शवताना पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या भारताच्या वैमानिकाला सोडण्याची घोषणा करून आणि ती अंमलात आणून नमतं घेतलेलं आहे. त्यामुळे नाक ठेचलं वगैरे उन्माद न दाखवता, आपली समस्या पाकिस्तान नाही तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे, हे लक्षात घेऊन बालाकोटला केले तसे हल्ले करणं आणि दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त करणं, मसूद अजहर, दाऊद इब्राहीम सारख्यांना कायमचा धडा शिकवणं, कुलभूषण जाधव यांची सुटका करवून घेणं आणि दहशतवादाला पाठीशी घातल्याबद्दल पाकिस्तनाची जागतिक पातळीवर आता केली आहे, त्यापेक्षा सर्व बाजूने जास्तीत जास्त कोंडी करणं, ही आणि केवळ हीच नीती असायला हवी. ही प्रक्रिया दीर्घकालीन असेल तरी तीच कायमस्वरूपी असेल. माथी भडकावून युद्धज्वर निर्माण करून देशात कायम उन्मादाचं वातावरण पेटतं ठेवणं कोणाच्याच हिताचं नाही.

राहता राहिला, विद्यमान युद्ध सदृश्य वातावरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राजकीय फायदा उठवत असल्याचा मुद्दा. पराक्रम हवाई दलानं केलाय नरेंद्र मोदी किंवा सरकारनं नाही असा विरोधकांचा दावा आहे आणि तो खराही आहे. आपल्या देशात प्रत्येकच मुद्द्याचं राजकारण करण्याची प्रथा निर्माण झालेली आहे. बांगला आणि कारगिलच्या युद्धातही सैन्यच लढलेलं होतं, तरी बांगला युद्धातील यशाचं व बांगला देशच्या निर्मितीचं श्रेय इंदिराजी गांधी आणि कारगिल विजयाचं श्रेय अटलबिहारी वाजपेयी या तत्कालीन पंतप्रधानांनाच मिळालं, सैन्याला नाही. कोणत्याही सरकारच्या काळात झालेल्या प्रत्येक चांगल्याचं श्रेय त्या सरकारच्या नेतृत्वाला मिळतं आणि अपयशाचाही धनी तोच होतो ही वैश्विक रीतच आहे. चीन विरुद्ध झालेल्या युद्धातल्या पराभवाची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नम्रपणे आणि खळखळ न करता स्वीकारली होती. अपयशाचं श्रेय घेण्याची हिंमत इंदिराजी आणि वाजपेयी यांच्यात जशी होती, तशी ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही.

या काळात मोदींनी दाखवलेली विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्याची वृत्तीही लोकशाहीला शोभेशी नाही. विरोधी पक्षांच्या या काळात झालेल्या बैठकींना ते उपस्थित राहण्यात पंतप्रधानपदाची शान होती. पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची चांगली कामगिरी बजावूनही त्यांची अशातली भाषण ऐकतांना ते गंभीर पंतप्रधान न वाटता नौटंकीबाज नेते वाटू लागले आहेत. निश्चलनीकरणानंतर ही निर्माण झालेली प्रतिमा विद्यमान तणावाच्या परिस्थितीत बदलण्याची संधी मोदी यांनी गमावली आहे. कारण नरेंद्र मोदी हे स्वप्रतिमेच्या आहारी गेलेले नेते आहेत!       

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 03 March 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर, युद्धस्य कथा: रम्या: नसतात हे मान्य. हेच बघा ना पुलावामात एका दहशतवाद्याने आपले ४४ जवान मारले. मग बालाकोटमध्ये मेलेल्या ३०० दहशतवाद्यांच्या मागे आपले ४४ * ३०० = १३,२०० इतक्या जवानांची संभाव्य हानी टळली की नाही? हीच खरी अहिंसा. बाकी 'प्रात:शाखेत जाऊन दंड फिरवणं' वगैरे शेरेबाजी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघास नावे ठेवण्यामागील तुमचा हेतू कळला नाही. अशाने मोदींची मतं वाढतात. आपला नम्र, -गामा पैलवान


Vividh Vachak

Sun , 03 March 2019

"आपली समस्या पाकिस्तान नाही तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे" -- दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या दोघांमध्ये फारसा फरक नाही राहिलेला. देश म्हणजे काय? देशाचे कारभार चालवणारे सरकार. पाकिस्तानात लोकशाही आहे ती नावापुरती आणि पाकिस्तानी सरकारच्या वेळप्रसंगी मुसक्या बांधून लष्कर सरकार चालवते, हे आपल्यासारख्या सुजाण पत्रकारांना सांगण्याची गरज नाही. पण त्यामुळे सत्तापिपासू सेना भारताविरुद्धच नव्हे तर सर्व दहशतवाद्यांसाठी रिसॉर्ट चालवत आहे आणि हेच कारभार हाकताहेत, ही गोष्ट सुजाण पत्रकारसुद्धा कशी विसरतात? "अपयशाचं श्रेय घेण्याची हिंमत इंदिराजी आणि वाजपेयी यांच्यात जशी होती, तशी ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही." हे नक्की कुठले अपयश ह्याबद्दल काही सांगू शकाल का? मोदी आल्यावर कुठले युद्ध झाले आहे, हे आठवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपले काँग्रेस आणि गांधी/नेहरू लोकांवरचे प्रेम जाणून आहोत पण ही मळमळ जरा जास्तच होते असे नाही वाटत?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......