‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या विषयावर सखोल विवेचन करणारे पुस्तक
ग्रंथनामा - झलक
मेघा पानसरे
  • ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद Darmnirpeksh Lokshahi ani Jamatwad मेघा पानसरे Megha Pansare

‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ हे डॉॅॅॅ. मेघा पानसरे यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकतंच श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला डॉ. मेघा पानसरे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

कोल्हापुरात (कै.) कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुढाकाराखाली संघटीत, संघर्षशील कामगारांच्या आर्थिक व सामाजिक सहभागातून ‘श्रमिक प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन झाली. स्थापनेपासूनच पुरोगामी विचारांच्या लोकांचा एक खुला मंच हे या संस्थेचे स्वरूप राहिले आहे. २००१ पासून या संस्थेद्वारे कामगार संघटनेचे सदस्य, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते व संवेदनशील लोकांच्या प्रबोधनाच्या उद्देशाने एक व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. २००३ साली व्याख्यानमाला आयोजनाच्या कामात असतानाच कॉ. अविनाशचे निधन झाले. तेव्हापासून ती ‘कॉ. अवी पानसरे व्याख्यानमाला’ या नावाने आयोजित होऊ लागली. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक मान्यवर विचारवंतांची व्याख्याने पुस्तकरूपात प्रकाशित करून त्यामार्फत वैचारिक प्रबोधनाचा प्रसार करण्याची परंपरा श्रमिक प्रतिष्ठानने जपली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ संशोधक व कन्नड लेखक प्रा. एम.एम.कलबुर्गी आणि निर्भीड, शोषितांच्या मानवी हक्कांसाठी लढणारी पत्रकार गौरी लंकेश अशी यांचे निर्घृण खून अद्याप लोक विसरलेले नाहीत. त्यांच्या खुनांचे सूत्रधार व खुनी यांना कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी लोक शासनाकडे करतच आहेत. परंतु न्यायासाठी अजून दीर्घकालीन संघर्ष करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर १ ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत शाहू स्मारक भवन, कोल्हापूर इथं १५व्या व्याख्यानमालेतून ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या  विषयाचा विविध अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न झाला.

या व्याख्यानमालेत ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या मध्यवर्ती विषयावर मांडणी झाली. डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता व भारतीय संविधान’ या विषयावर विवेचन करताना एक व्यापक पट उलगडला आहे. ईश्वर व धर्म या संकल्पनांची उत्पत्ती, हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व जातीव्यवस्था आणि त्यातून समाजात निर्माण झालेली शोषक श्रेणीबद्धता, विषमता याची भेदकता ते उदाहरणे देऊन स्पष्ट करतात. या देशात प्राचीन काळापासून वैदिक संस्कृतीबरोबरच एक समांतर भौतिकवादी विचार परंपरा अस्तित्वात होती, आहे. कमालीचे सांस्कृतिक वैविध्य व विरोधाभास, सुसंवाद व संघर्ष यातून हजारों वर्षानंतर वसाहतवादाविरुद्ध लढताना राष्ट्र म्हणून आपण एक झालो आणि स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने एक समतावादी संविधान निर्माण झाले. एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. डॉ. कसबे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमागील डॉ. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट करतात.    

प्रा. इरफान इंजिनियर ‘जमातवाद व जातीय दंगे’ या विषयावर मांडणी करताना धार्मिकता व जमातवाद यातील फरक स्पष्ट करतात. गांधीजी व मौलाना अबुल कलम आझाद हे नेते धार्मिक होते, पण जमातवादी नव्हते. मात्र वि. दा. सावरकर व बॅ. जीना हे जमातवादी होते, धार्मिक नव्हे. भारतात धार्मिक हिंसा, जमातवाद ही वसाहतवादी इंग्रजांच्या धोरणांची उत्पत्ती आहे. काँग्रेस व भाजपच्या जमातवादाच्या बाबतीतील धोरणातील अंतर स्पष्ट करताना ते ‘काँग्रेस व्यवहारात जमातवादी आहे, आणि भाजपचा  कार्यक्रमच  जमातवादी आहे’ असे विधान करतात. धर्मांध, जमातवादी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी २०१९ मधील निवडणुकांसाठी पुरोगामी पक्षांनी रणनीती निश्चित करण्याची गरज ते व्यक्त करतात.

अलीकडील अभ्यासानुसार आता ८७ ते ८८ टक्के संपत्ती ही जगातील केवळ १० टक्के लोकांकडे एकवटली आहे. भारतामध्ये दोन दशकांपूर्वी १० टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती होती. ती आता ६० टक्के एवढी झाली. म्हणजे जागतिक विषमता वाढते आहे आणि भारतामधील विषमताही अधिक तीव्र होते आहे. आज विकासाच्या प्रत्येक निर्देशांकामध्ये भारत हा जगामध्ये अतिशय खालच्या क्रमांकावर आहे. हे नवउदारमतवादाचं फलित आहे. आज जागतिक पातळीवर ट्रम्पपासून, ले पेनपासून, मोदींपर्यंत सगळीकडे एकाधिकारशाहीची वृत्ती असलेले आणि नवफॅसिझमच्या दिशेने जाणारे सत्ताधीश आहेत. कारण ते आता जगभर मोठ्या प्रमाणावर प्रभावी असलेल्या वित्तभांडवलाशी जुळलेले आहेत, हे सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक दत्ता देसाई ‘नवउदारमतवाद आणि नवफॅसिझम’ या लेखात स्पष्ट करतात. भारतामध्ये पुढच्या लोकशाहीकरणासाठी आवश्यक अशा शक्ती वर येत आहेत, असा आशावाद जागवून ते त्या शक्ती एकत्र कशा येतील, हा एक महत्त्वाचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन करतात.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई त्यांच्या व्याख्यानातून प्रसारमाध्यमे आणि जमातवाद यांतील अंतर्संबंध उलगडून दाखवतात. पत्रकारितेची संपूर्ण नीतीतत्त्वे मोडीत काढण्यात येत आहेत. आज भारतामध्ये ७० टक्के चॅनेल्स मोठ्या खाजगी कंपन्यांच्या मालकीची आहेत. परिणामी प्रसारमाध्यमे मालक कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधांसाठी धर्मवादी, जमातवादी राजकीय शक्तींना अवकाश देत आहेत. त्यांचा धार्मिक अजेंडा सतत सेट करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे हासुद्धा धार्मिक अजेंडाच आहे. आज ‘सोशल मीडिया’ हा एक नवा स्तंभ झाला आहे. त्याची विश्वासार्हता टिकवून ठेवणे, त्याबद्दल लोकांना विश्वास वाटणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुरोगाम्यांनी त्याचा उपयोग अधिक भक्कमपणे, मजबुतीने, कल्पकतेने, चतुराईने केला पाहिजे. नव्या तंत्राची, नव्या युगाची भाषा शिकून घेतली पाहिजे.

आज ‘इतिहास’ आणि ‘इतिहासाचा गैरवापर’ हा एक ज्वलंत प्रश्न बनला आहे. डॉ. श्रद्धा कुंभोजकर इतिहास या अभ्यास क्षेत्रातील काही मूलभूत संकल्पना स्पष्ट करतात. जेव्हा अस्तित्वात असलेल्या विषमता आणखीनच सखोल व्हाव्यात, त्यांची आणखीनच भलावण व्हावी, यासाठी विशिष्ट कथनांचा वापर केला जातो तेव्हा त्याचा निषेध करणं, त्याच्याविरुद्ध बोलणं अतिशय गरजेचं आहे. आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत, तो माहितीच्या महास्फोटाचा काळ आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, सोशल मीडिया, इंटरनेट या माध्यमातून सतत सत्याचा अपलाप करणाऱ्या, सत्य झाकून ठेवणाऱ्या, सत्याचा विपर्यास करणाऱ्या पद्धतीने माहिती पोचत असते. यामागील उद्देश परस्पर विश्वास आणि सामाजिक सुसंवाद यावर आघात करणे, हाच असतो.

श्रद्धा कुंभोजकर म. श्री. दीक्षित संपादित ‘आम्ही चित्पावन’ आणि ऊर्मिला पवारांचं ‘आम्हीही इतिहास घडविला’ या दोन पुस्तकांच्या लेखनामागील प्रेरणा, उद्देश आणि यथार्थता तपासून पाहतात. त्या विश्लेषणातून ‘आम्ही चित्पावन’सारखे पुस्तक स्वतःच्या जातीचं श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी लिहिले गेलेले कथन आहे. त्यात इतिहासाचे अतिरंजित आणि खोटे चित्र समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न दिसतो. तर ‘आम्हीही इतिहास घडवला’ हा इतिहासाचा गैरवापर नाहीये. इथे इतिहासाला आयुध म्हणून वापरलेय, हे त्या स्पष्ट करतात.

किशोर बेडकिहाळ आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेचा ऐतिहासिक प्रवास उलगडून दाखवतात. युरोपच्या इतिहासातील धर्म संकल्पना आणि प्रचलित धर्मसंस्थांचा उदय, राजसत्ता व धर्मसत्ता यांतील संघर्ष, धर्म व विज्ञान यांचा संघर्ष, लोकशाही तत्वांचा विकास आणि धर्मनिरपेक्षता हा विस्तीर्ण पट स्पष्ट करतात. राज्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या तीन गोष्टींच्या एकत्रीकरणावर भारतीय राष्ट्रवाद उभा आहे. इथल्या राजसत्तेला धर्मसत्तेच्या वर्चस्वाची मर्यादा राहिली. धर्मसत्तेच्या श्रेष्ठत्वामुळे धर्मचिकित्सा बंद झाली. परिणामी समाज ‘अंधाऱ्या युगा’त कुंठीत झाला. १९व्या शतकातील प्रबोधन चळवळी व स्वातंत्र्यलढ्यातून या समाजाची वाटचाल लोकशाहीच्या दिशेनेच करायची आहे, हा निर्णय पक्का झाला आणि ‘धर्मनिरपेक्ष भारतीयत्व’ ही संकल्पना पुढे आली. आता संविधानाने स्वीकारलेल्या या तत्वाचे जतन करण्यासाठी धर्मनिरपेक्ष शासन भारतासाठी आवश्यक आहे, असे  मत किशोर बेडकिहाळ व्यक्त करतात.  

अखेरीस ‘स्वातंत्र्य चळवळ व नेत्यांचे विकृतीकरण’ याबद्दल विवेचन करताना शेखर सोनाळकर अनेक उदाहरणे देतात. महात्मा गांधी, सरदार पटेल - पंडित नेहरू आणि देशाचे पंतप्रधान पद, सोमनाथ मंदिर निर्मितीबाबत त्यांच्या भूमिका, नेत्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिका,  भगतसिंगाची फाशी आणि गांधी विवाद, संविधानाच्या कलम ३७०ची उभारणी, भारतीय संदर्भात साम्यवादी पक्षाची उभारणी, राखीव मतदारसंघ आणि विभक्त मतदारसंघ, पुणे करार, खिलाफत चळवळ व गांधीजी अशा अनेक मुद्द्यांना ते स्पर्श करतात आणि संदर्भासहित वस्तुस्थिती समोर मांडतात.

सर्वच व्यासंगी अभ्यासकांनी ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या विषयावर अतिशय सखोल विवेचन केले. गणेश विसपुते यांनी पुरोगामी चळवळीशी बांधिलकी दर्शवत कोणतेही मानधन न स्वीकारता या पुस्तकाचे सुसंगत असे मुखपृष्ठ बनवून दिले. या सर्वांचे योगदान बहुमोल आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......