व्यंगोबानाथाची कहाणी
ग्रंथनामा - झलक
डॉ. शंतनू अभ्यंकर
  • ‘पाळी मिळी गुपचिळी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 12 October 2018
  • ग्रंथनामा झलक पाळी मिळी गुपचिळी Pali Mili Gupchili शंतनू अभ्यंकर Shantanu Abhyankar

‘बायका आणि बायकांचे आजार’ या गंभीर विषयावरचं हे गमतीदार म्हणजे सहजसोप्या, संवादी भाषेतलं पुस्तकं. त्याचं नाव - ‘पाळी मिळी गुपचिळी’. लेखक आहे - डॉ. शंतनू अभ्यंकर. प्रकाशक आहेत - विश्वकर्मा पब्लिकेशन्स. या पुस्तकातील ‘व्यंगोबानाथाची कहाणी’ हे प्रकरण. सव्यंग मूल जन्माला आलं, तर करायचं काय, याचा लेखाजोखा...

............................................................................................................................................

ऐका व्यंगोबानाथा तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथे तीन शेजारणी राहत होत्या. एकीचं नाव सुलाबाई, तर दुसरीचं भुलाबाई तर तिसरीचं गुलाबबाई. दोघीही सख्ख्या मैत्रिणी. एके वर्षी काय झालं, दोघी गरत्या राहिल्या. नवमासांनी दोघीही प्रसवल्या. दोघींच्याही घरी आनंदीआनंद झाला. सार्‍यांनी पेढे वाटले. पण हाय रे दैवा! काय हे दुर्दैव!! थोड्याच वेळात सार्‍या आनंदावर विरजण पडलं. दोघींच्याही मुलांना पाठीवर आवाळू होते. आवळ्याएवढे लिबलिबीत आवाळू. मणके मुळी जुळलेलेच नव्हते. बाळाचे पाय अशक्तसे हलत होते. लघवीची धार जेमतेम उडत होती. ही सारी मणके उघडे असण्याची किमया होती. दोघीही हताश झाल्या.

सुलाबाई कर्माला दोष देऊन गप्प बसली. घरची होती तालेवार; पण सासूचं त्वांड कोण धरणार! सासू म्हणाली, ‘तुझंच पाप भोवलं पोराला. व्यंगोबाचा कोप झाला. गिराण आलं-गिराण गेलं. तू काहीच नाही पाळलं. उलट तेव्हा उलटून बोललीस. आता भोग आपल्या कर्माची फळं.’

काही दिवस असे गेले. सुलाबाईने मनाचा हिय्या केला. नवर्‍याला पटवलं. शेजारच्या गावात कोणी बैरागी आला होता. त्याची पूजा झाली. काही गुण नाही. पलीकडच्या गावात पीर होता. त्याचा नवस झाला; पण फेडायची वेळ आली नाही. करता-करता लांब-लांब प्रवास घडू लागला. वैद्य झाले, हकीम झाले, साधू, संत, फकीर झाले. आशा-निराशेचे झोके झाले. गंडे, दोरे, ताईत झाले. अंगारेधुपारे, उतारे झाले. उतार काही पडेना. आजार काही हटेना. मूल मुळी चालेना, मुळी बाळसं धरेना. त्याच्या पायांत ताकद नव्हती. रांगतंय कसलं? फरफट तेवढी होती. पुढे ते वारंवार आजारी पडू लागलं. बाकी घर त्याचा दुस्वास करू लागलं. माय तेवढी माया धरून होती. कोण म्हणे मुळावर आलंय, कोण म्हणे घराला खायला आलंय. सुलाबाई नुसती रडत राही, खंगत राही, मनाने भंगत राही. पुढे ते मूल गेलं. डोक्याला हात लावून, नशिबाला बोल लावून, सारं काही उरकलं.

यातच पुन्हा दिवस गेले. आता डोळेच पांढरे झाले. पुन्हा असं झालं तर? हीच चिंता दिवसभर. पुन्हा सारं-सारं केलं. तंत्रमंत्र, उपासतापास, जपतप, व्रतवैकल्यं सगळं-सगळं झालं. गिराण आलं-गिराण गेलं. सुलाबाईने सगळं केलं. रात्रभर टक्क जागी. नाही अन्न नाही पाणी. पण पुन्हा तसेच घडले. तसलंच मूल देवाने धाडलं. बाळापाठी आवाळू वाढलं. गिराण पाळूनही व्यंगोबा नडला. व्यंगोबाचा फेरा पडला.

भुलाबाईची कथाच न्यारी. तिची सारीच तर्‍हा न्यारी. भुलाबाईने काय केलं? दळणाच्या डब्यामागे चार पैसे साठले होते. कनवटीला लावून तिने इस्पितळ गाठलं होतं. बाळाचा एक्स-रे झाला. डॉक्टर म्हणे- सीटीस्कॅन करा. बाळाचा सीटीस्कॅन झाला. डॉक्टर म्हणे- एमआरआय करा. बाळाचा एमआरआय झाला. बाळाचं ऑपरेशन झालं. बाळ बरंच सुधारलं. वर्षाच्या अखेरीस धरून धरून चालू लागलं. डॉक्टर म्हणे- भुलाबाय, पुढच्या वेळी सावध र्‍हाय. नवर्‍याचं रक्त तपासू. तुमचंही रक्त तपासू. भुलाबाय समजे, डॉक्टर हाय रक्तपिपासू. पै-पैसा वाहत होता. नवा तपास समोर होता. शेवटी सारे रिपोर्ट आले. तेव्हा कळलं, भुलाबाईला मधुमेह होता. बाळातील व्यंग हा त्याचाच प्रताप होता. गोड दुखण्याचा दुखरा खेळ. असा सगळा लागला मेळ. पुढच्या वेळी ती शहाणी झाली. आधीच डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले, साखर सांभाळा. तोपर्यंत दिवस टाळा. इन्सुलिनची सुई दिली. साखर आटोक्यात आली. फोलिक अ‍ॅसिडची मात्रा दिली. मगच भुलाबाय गरती राहिली. यथाकाल प्रसूत झाली. नक्षत्रावाणी लेक झाली. दुनिया आनंदानी भरली.

इतक्यामधे काय झालं? शेजारीण गुलाबबाई दारी आली. ही होती पिचलेली. व्यंगोबाच्या फेर्‍यांनी खचलेली. गुलाबबाई म्हणे, ‘अगं अगं भुले, काय वसा घेतलास ते सांग तरी मले. माझी कूसही आहे रिती. दोन झाली; पण दोन्ही गेली. मागच्यासाली सुलाबायला भेटले. तिच्या सांगण्यासारकं केलं सारं. पण फळ काही नाही हाती. मी रिती, ती आहे रिती.’

भुलाबाईने धीर दिला. दवाखान्याचा पत्ता दिला. व्यंगोबाचा वसा तिने गुलाबबाईला सांगितला. ‘डॉक्टर गाठ, तपास कर. शेवटपर्यंत धीर धर. उतू नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.’

‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.’

गुलाबबाई लगबग बाहेर पडली. दवाखान्याची पायरी चढली. डॉक्टर म्हणे, ‘सांगू काय? आधीच्याचा रिपोर्ट कुठाय?’

‘कसला रिपोर्ट आणि कसलं काय. तपास मुळी केलाच न्हाय. व्यंगोबानाथाचा प्रताप सारा. नाही उपाय तर तपास कशाला? जायचं ते नशिबानी गेलं. जे व्हायचं तेच झालं. हाती काहीच नाही आलं. पहिलं झालं, ते गेलं. दुसरं झालं, तेही गेलं. नेमकं व्यंग ठाऊक नाही, फोटो नाही. एक्स-रे नाही. सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय काही नाही. बाळाचं रक्त तपासलं नाही. गेलं, नेलं, नदीकाठी पुरलं. त्याचं काहीच नाही उरलं.’

डॉक्टर म्हणे, ‘असं कसं? शवविच्छेदनही हवं होतं.’ गुलाबबाई शहारली. कल्पनेनेच घाबरली.

डॉक्टर म्हणे, ‘तसं नव्हे. निसर्गाचे हे उखाणे. सुटतील तेवढे सोडवायला हवे. तपास केला तर कारण सापडेल कदाचित. सापडलं कारण, तर उपाय असेल कदाचित.’

गुलाबबाई बुचकळ्यात पडली. डॉक्टरला विचारती झाली, ‘शोधूनही काही सापडलं नाही, तर काय रे सांगणार?’

डॉक्टर म्हणे, ‘सापडलं नाही तर सांगीन तसं. पण खोटंनाटं सांगणार नाही. नसलेलं कारण जोडणार नाही. माहीत नाही तर ‘माहीत नाही’ म्हणू. अज्ञान आधी मान्य करू. दोघं मिळून पुन्हा शोधू. अज्ञान मान्य करण्यामध्ये विज्ञानाचा उगम आहे.’

गुलाबबाईला थोडंच कळलं. बरंचसं नाहीच वळलं. तपासण्यांची फैर झडली. दोष काही आढळला नाही. आशीर्वाद आणि शुभेच्छांशिवाय डॉक्टरकडे शब्द नाही. शेजीबाई हिरमुसली. पदरात तोंड खुपसून मुसमुसली.

डॉक्टर म्हणे, ‘उगी राहणे जे जे होईल ते ते पाहणे. मोठा काही दोष नाही, हा दिलासा कमी नाही. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे- असंही म्हणता येतं. पुढे सारं होईल छान, ही शक्यता मनी जाण. आता तू एवढं कर. खा, पी, पुष्ट हो. मिश्री, दारू शिवू नको. कुठलंही औषध सावधपणे घे. रुबेलाची लस घे. आयोडिनवालं मीठ माग. फोलिक अ‍ॅसिड घेऊ लाग. व्यंगोबानाथाचा हाच वसा सगळ्यांना सांग.’

गुलाबबाई गोंधळली. ‘डॉक्टर, डॉक्टर सांगा आता, सुलाबायचा इस्कोट झाला. भुलाबायचं भलं झालं. पण भुलाबायच्या मार्गांनी मला अजून नाही फळ! कोणाची चूक आणि कोण बरोबर? कोण आहे लबाड आणि कोण आहे खरं?’

डॉक्टर म्हणे, ‘कान देऊन ऐक. सुलाबायचा वसा साधासा. वड्याचं तेल वांग्याला लावती. काहीही बिनसलं तरी दैवाले बोलती. गिराण, नजर असली कारणं जोडती. भुलाबायचा वसा न्यारा. तोच व्हावा सर्वांना प्यारा.’

‘डॉक्टर तुम्ही सांगताय खरं; पण मनात माझ्या भलतंच येतं. मी केला की तपास सारा. कारण नाहीच की सापडलं तुम्हा.’

डॉक्टर म्हणे, ‘तरीबी त्येच. कळलं नाही हे मान्य करणं केव्हाही ब्येस! चुकीचं कारण जोडलं की थांबतो शोध. मग चुकीच्याच कारणातून चुकीचा बोध. गुलाबबाई तुला राहील पुन्हा. तपासून-तपासून लावता येईल छडा. कहाणीचा ह्या, हाच आहे धडा. निसर्गानं व्यंगाचा घातला जर उखाणा, तर सोडून देऊ नका, सोडवून बघा.’

पुढे गुलाबबाईनं काय केलं? भुलाबाईचा वसा घेतला. दिवस राहिले, तपास योजला. व्यंगोबाचा छडा लागला. त्याच्यावरती उपाय योजला. गुलाबबाई प्रसवली. नाकी-डोळी नीटस बाळ. दाट जावळ, रुंद कपाळ. अवघा आनंद झाला. व्यंगोबाचा फेरा टळला.

तर अशी ही व्यंगोबानाथाची कहाणी. वसा वसला मनोभावे. भाग्य धावत घरा आले. भुलाबाई आणि गुलाबबाईप्रमाणे तुमच्याही घरी भाग्य येवो. अशा रीतीने, ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......