‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी चार कविता
ग्रंथनामा - झलक
कविता महाजन
  • कविता महाजन (५ सप्टेंबर १९६७ - २७ सप्टेंबर २०१८)
  • Fri , 28 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कविता महाजन Kavita Mahajan तत्पुरुष Tatpurush

‘तत्पुरुष’ हा कविता महाजन यांचा पहिला कवितासंग्रह. स्त्री-पुरुष संबंधांचं अनेक पातळ्यांवरचं व्याकरण या संग्रहात व्यक्त झालं आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील द्वंद्व समास सर्जनशील न होता दुर्दैवानं ‘तत्पुरुषी’ होतो. त्यामुळे या संग्रहाचं नाव ‘तत्पुरुष’ आहे. काही पुरुष सत्पुरुष असतात, पण बरेचसे ‘तत्पुरुष’च असतात. त्या ‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी या चार कविता.

...............................................................................................................................................................

१. तशी एखादी कविता

कदाचित

मी कधीच लिहून शकणार नाही तुझ्यासाठी

कवितेची एखादी चटक चमकदार ओळ

धारदार शब्दांची,

जी काळ्याभोर विजेसारखी लखाखेल

शुभ्र कागदाच्या अवकाशागत

तुझ्या हृदयात,

उजळवून टाकेल आसपासचे लख्ख भान.

 

तुझ्या भरभरून देणाऱ्या मनाला

ज्ञात नसेल अभावांची ती जमीन

जिथे उगवू शकते फक्त कविताच

मृगजळाच्या शिंपडणीतून

आणि वाढत जाते

भ्रमांचे, भासांचे टेकू घेऊन.

 

तू तर अंथरलं आहेस तुझं स्वत्व

सर्वदूर हिरवळीसारखं

माझ्या भूत-वर्तमान-भविष्यावर…

 

जगण्याच्या नव्या मातीत

नेऊन रुजवली आहेस माझी मलूल मुळं.

देठादेठांतून वाहू लागेल आता हिरवं रक्त,

माना टाकलेल्या जाणिवांची पाकळ्या न् पानं

पुन्हा ताठ करतील कणा,

तरारून येईल कसब.

 

तरीही मी

लिहून शकणार नाही तुझ्यासाठी कृतज्ञता

कणवेची ओंजळ ओतून जाणाऱ्या

हातांसाठी लिहावी तशी.

मी लिहू शकणार नाही आभार

जे मोजून दाखवतं अंतर

माणसामाणसातलं.

मी लिहू शकणार नाही लोभ

आसक्ती अभिलाषा

 

निदान तोपर्यंत

जोपर्यंत तू माझ्यासाठी बनणार नाहीस

केवळ एक भास,

तुझं प्रेम एक संभ्रम माझ्या मनाचा

आणि तुझं अस्तित्व एक निखळ कल्पना.

तोपर्यंत

लिहू शकणार नाही मी तुझ्यासाठी

तशी एखादी कविता

 

तू माझं वास्तव आहेस.

...............................................................................................................................................................

२. शृंगार

ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,

निरी उकलण्यापुरतीतरी एक चिरी,

काळ्याभोर मण्यांचं मंगळसूत्र,

गच्च हातभर काकणं.

कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,

नीट बोलूही न देणारी नथ,

सारा शृंगार काटोकाट जमला आहे.

पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा

हलक्या वाटतात मालक

पहा ना

त्या घालून चालताही येतंय मला…

...............................................................................................................................................................

३. माझंच

मुलीसाठी आणली आहे एक बाहुली :

तोंडातील बूच काढताच ती रडू लागते

कळवळून टाकणाऱ्या आवाजात;

लाल होतात तिची कानशिलं.

 

तिच्या छातीतील सेल संपेपर्यंतच

पेटणार आहेत कानातील लाल दिवे

आणि उमटू शकणार आहे रडणं

-हे ठाऊक आहे मला.

 

घरात कुणी नसतं तेव्हा

मी तिला तळहातावर घेते

तिच्या तोंडातलं बूच काढून

ऐकत राहते रडणं.

 

-माझंच असल्यासारखं.

...............................................................................................................................................................

४. उरलेली गोष्ट

आजकाल मुलीला येतो कंटाळा

त्याच त्याच गोष्टींचा;

मग बदलून टाकते ती पात्रं, स्थळं.

आणि गोष्ट होते नवी.

 

वाघोबाच्या तावडीतून निसटून

भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीची

गोष्ट मी सांगत होते तेव्हाही तिनं असंच

अडवलं मला.

सांगू लागली स्वत:च

तीच गोष्ट नवी निराळी करून :

 

म्हातारी निघाली लेकीकडे

आणि तिला आडवं आलं घर.

म्हणालं : थांब मी तुला खातो.

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

 

मुलगी म्हणाली, आई,

आता उरलेली गोष्ट तू सांग.

निश्वास टाकत हसून मी सांगू लागले गोष्ट पुढे.

 

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

पण घर म्हणालं :

तावडीतून निसटून जाऊ द्यायला

मी थोडीच वाघोबा आहे?

तो जनावर होता

मी तर घर आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/author/26/Kavita-Mahajan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Fri , 28 September 2018

श्रद्धांजली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......