‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी चार कविता
ग्रंथनामा - झलक
कविता महाजन
  • कविता महाजन (५ सप्टेंबर १९६७ - २७ सप्टेंबर २०१८)
  • Fri , 28 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कविता महाजन Kavita Mahajan तत्पुरुष Tatpurush

‘तत्पुरुष’ हा कविता महाजन यांचा पहिला कवितासंग्रह. स्त्री-पुरुष संबंधांचं अनेक पातळ्यांवरचं व्याकरण या संग्रहात व्यक्त झालं आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील द्वंद्व समास सर्जनशील न होता दुर्दैवानं ‘तत्पुरुषी’ होतो. त्यामुळे या संग्रहाचं नाव ‘तत्पुरुष’ आहे. काही पुरुष सत्पुरुष असतात, पण बरेचसे ‘तत्पुरुष’च असतात. त्या ‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी या चार कविता.

...............................................................................................................................................................

१. तशी एखादी कविता

कदाचित

मी कधीच लिहून शकणार नाही तुझ्यासाठी

कवितेची एखादी चटक चमकदार ओळ

धारदार शब्दांची,

जी काळ्याभोर विजेसारखी लखाखेल

शुभ्र कागदाच्या अवकाशागत

तुझ्या हृदयात,

उजळवून टाकेल आसपासचे लख्ख भान.

 

तुझ्या भरभरून देणाऱ्या मनाला

ज्ञात नसेल अभावांची ती जमीन

जिथे उगवू शकते फक्त कविताच

मृगजळाच्या शिंपडणीतून

आणि वाढत जाते

भ्रमांचे, भासांचे टेकू घेऊन.

 

तू तर अंथरलं आहेस तुझं स्वत्व

सर्वदूर हिरवळीसारखं

माझ्या भूत-वर्तमान-भविष्यावर…

 

जगण्याच्या नव्या मातीत

नेऊन रुजवली आहेस माझी मलूल मुळं.

देठादेठांतून वाहू लागेल आता हिरवं रक्त,

माना टाकलेल्या जाणिवांची पाकळ्या न् पानं

पुन्हा ताठ करतील कणा,

तरारून येईल कसब.

 

तरीही मी

लिहून शकणार नाही तुझ्यासाठी कृतज्ञता

कणवेची ओंजळ ओतून जाणाऱ्या

हातांसाठी लिहावी तशी.

मी लिहू शकणार नाही आभार

जे मोजून दाखवतं अंतर

माणसामाणसातलं.

मी लिहू शकणार नाही लोभ

आसक्ती अभिलाषा

 

निदान तोपर्यंत

जोपर्यंत तू माझ्यासाठी बनणार नाहीस

केवळ एक भास,

तुझं प्रेम एक संभ्रम माझ्या मनाचा

आणि तुझं अस्तित्व एक निखळ कल्पना.

तोपर्यंत

लिहू शकणार नाही मी तुझ्यासाठी

तशी एखादी कविता

 

तू माझं वास्तव आहेस.

...............................................................................................................................................................

२. शृंगार

ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,

निरी उकलण्यापुरतीतरी एक चिरी,

काळ्याभोर मण्यांचं मंगळसूत्र,

गच्च हातभर काकणं.

कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,

नीट बोलूही न देणारी नथ,

सारा शृंगार काटोकाट जमला आहे.

पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा

हलक्या वाटतात मालक

पहा ना

त्या घालून चालताही येतंय मला…

...............................................................................................................................................................

३. माझंच

मुलीसाठी आणली आहे एक बाहुली :

तोंडातील बूच काढताच ती रडू लागते

कळवळून टाकणाऱ्या आवाजात;

लाल होतात तिची कानशिलं.

 

तिच्या छातीतील सेल संपेपर्यंतच

पेटणार आहेत कानातील लाल दिवे

आणि उमटू शकणार आहे रडणं

-हे ठाऊक आहे मला.

 

घरात कुणी नसतं तेव्हा

मी तिला तळहातावर घेते

तिच्या तोंडातलं बूच काढून

ऐकत राहते रडणं.

 

-माझंच असल्यासारखं.

...............................................................................................................................................................

४. उरलेली गोष्ट

आजकाल मुलीला येतो कंटाळा

त्याच त्याच गोष्टींचा;

मग बदलून टाकते ती पात्रं, स्थळं.

आणि गोष्ट होते नवी.

 

वाघोबाच्या तावडीतून निसटून

भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीची

गोष्ट मी सांगत होते तेव्हाही तिनं असंच

अडवलं मला.

सांगू लागली स्वत:च

तीच गोष्ट नवी निराळी करून :

 

म्हातारी निघाली लेकीकडे

आणि तिला आडवं आलं घर.

म्हणालं : थांब मी तुला खातो.

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

 

मुलगी म्हणाली, आई,

आता उरलेली गोष्ट तू सांग.

निश्वास टाकत हसून मी सांगू लागले गोष्ट पुढे.

 

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

पण घर म्हणालं :

तावडीतून निसटून जाऊ द्यायला

मी थोडीच वाघोबा आहे?

तो जनावर होता

मी तर घर आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/author/26/Kavita-Mahajan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Fri , 28 September 2018

श्रद्धांजली.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......