‘माग्रस’ : एका वाचक चळवळीची पन्नास वर्षे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
हर्षवर्धन निमखेडकर
  • डावीकडे खाली कवि आरती प्रभू यांचं स्वागत करताना कवि ग्रेस आणि उजवीकडे सुधीर देव एका सभेत मनोगत व्यक्त करताना. त्याखाली माग्रसची एक जुनी बैठक
  • Fri , 24 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो माग्रस Magras सुधीर देव Sudhir Deo

आज ‘माग्रस’ या नागपुरातील वाचक चळवळीचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन आहे. माग्रस म्हणजे माझा ग्रंथसंग्रह. कोणतंही औपचारिक प्रारूप, स्वरूप, आकृतीबंध नसलेली एक चळवळ. मुळात नागपूरच्या वाचनप्रिय लोकांसाठी सुरू झालेली, पण नंतर विदर्भ आणि विदर्भाबाहेरही पसरलेली ही एक कल्पना. त्यानिमित्त हा लेख.

.............................................................................................................................................

माग्रस म्हणजे माझा ग्रंथसंग्रह. कोणतंही औपचारिक प्रारूप, स्वरूप, आकृतीबंध नसलेली एक चळवळ. मुळात नागपूरच्या वाचनप्रिय लोकांसाठी सुरू झालेली, पण नंतर विदर्भ आणि विदर्भाबाहेरही पसरलेली ही एक कल्पना. तिला संस्था म्हणता येणार नाही, कारण माग्रसचे तसे सेट-अपच नाही. हा एक अनौपचारिक प्रयास आहे. ग्रंथप्रेमींचं ग्रंथप्रेम अधिकाधिक वाढावं,  त्यांनी पुस्तकं विकत घेऊन वाचावीत आणि स्वतःचा ग्रंथसंग्रह वाढवावा, या भावनेतून जन्माला आलेला हा एक उपक्रम आहे, असंच याचं वर्णन करता येईल. पन्नास वर्षांपूर्वी १९६८ मध्ये याच दिवशी काही समविचारी व्यक्तींना सोबत घेऊन सुधीर देव या रसिक माणसानं माग्रसची पहिली सभा आयोजित केली आणि तिथूनच या दीर्घ प्रवासाची सुरुवात झाली.

पन्नास वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मराठी लोकांची आर्थिक स्थिती काही वेगळीच होती. आज जी सुसंपन्नता दिसते, ती तेव्हा नव्हती. सहावा आणि सातवा वेतन आयोग जन्माला यायचा होता. त्यामुळे बहुसंख्य वाचक वाचनालयांतून पुस्तकं आणून वाचायचे. पुस्तकांच्या किमती अगदी दहा वीस रुपये असल्या तरी तेवढीही रक्कम एकदम देणं जड वाटायचं. सुधीर देवांची स्वतःची पण हीच कथा होती. पण त्यांना वाचनाचा शौक तर जबरदस्त होता. त्यातच चांगल्या पुस्तकांचा संग्रह करण्याची तीव्र इच्छासुद्धा होती. मग त्यांनीच यावर एक उपाय शोधला. बँकेत जमा करतो, तसे दरमहा काही पैसे वेगळे ठेवायचे, बारा महिन्यांनंतर जमा झालेल्या रकमेतून आपल्या आवडीची दोन-तीन पुस्तकं विकत घ्यायची, हा इतका साधा फंडा होता. म्हणजे पुस्तक विकत घेतल्याचंही समाधान आणि आकस्मिक एकदम खर्च करण्याची गरज नाही.

त्या काळच्या कौटुंबिक बजेटमध्ये या बाबीचं महत्त्व जास्त असायचं. यातूनच मग अन्य, दुय्यम उद्देशही पुढे आले. यानिमित्तानं समविचारी लोक एकत्र येतील, त्यांच्यात साहित्यविषयक विचारांचं आदानप्रदान होईल, वेगवेगळ्या प्रकाशकांशी, लेखकांशी संपर्क साधता येईल, आणि ही चळवळ या सर्वांना जवळ आणेल, हेसुद्धा यात अध्याहृत होतं.

झालेही तसंच. सुधीर देवांचा हा प्रस्ताव नागपुरातल्या अनेक पुस्तकवेड्यांना पसंत पडला आणि त्यांनी देवांना बहुमोल सहकार्य केलं. या सर्वांच्या पाठिंब्यानं गेली पन्नास वर्षं नागपुरात (आणि बाहेरही) माग्रसचं कार्य सुरू राहिलं आहे.

देव स्वतः या उपक्रमाचे सूत्रधार आहेत. त्यांच्या कल्पक मेंदूतून त्यांनी या प्रदीर्घ वाटचालीत विविध छटा आणि आयाम असलेले कार्यक्रम शोधून काढले आणि राबवले. म्हणजे फक्त पुस्तक खरेदी विक्री हाच मर्यादित हेतू न ठेवता त्यांनी माग्रसचा आवाका वाढवला. तोवर माग्रसचं नाव सर्वदूर झालं होतं. विविध क्षेत्रांतली मंडळी त्यांच्यासोबत आता येऊ लागली होती. यात राजकारणी होते, वकील, डॉक्टर, इंजिनिअर होते; प्राध्यापक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार हेसुद्धा होते. बँक आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक, गृहिणी हे पण होते. या सगळ्यांच्या सहभागातून माग्रसचा एक-एक वर्षांचा इतिहास लिहिला गेला आहे.

याच दरम्यान मराठी मध्यमवर्गीयांना बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. त्यामुळे महागडी पुस्तकं विकत घेणं आता सहज शक्य झालं. हे सगळं माग्रसच्या बॅनरखाली नागपूरबाहेरही विविध ठिकाणी स्थानिक पुस्तकप्रेमींच्या पुढाकारानं घडून येत होतं. या काळात माग्रसने प्रत्यक्ष ग्रंथव्यवहारव्यतिरिक्त जे उपक्रम चालवले, त्यात ‘अक्ष’ नावाचं अनियतकालिक, मासिक स्नेहभेटी, वार्षिक स्नेहभेट, पुस्तक प्रकाशन, साहित्यविषयक चर्चा, मान्यवर लेखकांच्या भेटी आणि अन्य ललितकलांवरसुद्धा आधारित कार्यक्रम यांचा समावेश आहे.

सुधीर देव अत्यंत उत्साही आणि कल्पक गृहस्थ आहेत. त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह जसा जोरदार आहे, तसाच त्यांचा लोकसंग्रहही काबिले तारीफ आहे. अहंगंडानं पछाडलेल्या स्वनामधन्य साहित्यपुंडांसोबतच अत्यंत साध्या, सरळ, डाऊन टू अर्थ प्रामाणिक लेखकांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे सगळे सुधीर देव आणि त्यांच्या तेवढ्याच कर्तबगार पत्नी अपर्णा देव या दोघांवरही मनापासून प्रेम करतात. देवांचे वय आज ऐंशीच्या पुढे आहे. तब्येतीची गाऱ्हाणी सुरू झाली आहेत, पण त्यांचा उत्साह अजूनही तसाच कायम आहे.

गेल्या दहा-पंधरा वर्षांत एकूणच पुस्तक वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे. एकविसाव्या शतकातल्या नव्या पिढीजवळ तर वेळच नाही. त्यामुळे आज माग्रसची चळवळ पूर्वीएवढीच अॅक्टिव्ह आहे, असं म्हणता येणार नाही. याच सोबत, या ना त्या कारणांनी देवांवर नाराज होणारे, माग्रसपासून दूर गेलेलेही काही लोक आहेतच. देवांच्या सर्वच इच्छा पूर्ण झाल्या असतील असं मला वाटत नाही. काही उणिवा राहिल्या असतील, काही प्रयास अपुरे पडले असतील, काही चुका झाल्या असतील, काही स्वप्नं बाकी असतीलच. पण एकंदर गोळाबेरीज केली तर गेल्या पन्नास वर्षांचा माग्रससह देवांचा हा प्रवास बघणं हे मनोरंजक आणि अनुभवसमृद्ध करणारं होतं, असंच म्हणावं लागेल.

एका ग्रंथप्रेमीनं अन्य ग्रंथप्रेमींसाठी, आणि ती ही इतक्या सातत्यानं चालवलेली अशी दुसरी कोणतीच अनौपचारिक चळवळ भारतात नसावी, असं माझं मत आहे. नागपूरच्या साहित्यविषयक इतिहासात माग्रसचं नाव आवर्जून घ्यावं लागेल एवढी मोलाची कामगिरी देवांनी केली आहे, हे अभिमानानं नमूद करावंसं वाटतं.

बदलत्या काळानुरूप आज माग्रसचं काय प्रयोजन आहे, देवांनंतर माग्रसचं काय होणार, असंही कोणाला वाटू शकतं. पण आजच्या या वर्धापनदिनी तरी या शंका कुशंका दूर ठेवून मोकळ्या, निरभ्र मनानं सुधीर देवांचं त्यांच्या या अविरत ग्रंथसेवेसाठी कौतुक करायलाच पाहिजे. त्यांचं अभिनंदन, माग्रसच्या भावी वाटचालीसाठी आणि सुधीर व अपर्णा देव या दोघांच्या दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा.

.............................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत आणि वुडहाऊसचे अभ्यासकही.

bosham@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......