कुमारस्वामींचा ‘विलाप’ महाराष्ट्रातील सेना-भाजप युतीच्या ‘विलापा’सारखाच आहे!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी
  • Mon , 16 July 2018
  • पडघम देशकारण एच. डी. कुमारस्वामी H. D. Kumaraswamy लोकशाही Democracy भाजप BJP काँग्रेस Congress

परस्परांबद्दल क्षणिक आकर्षण हा कधीच सदृढ नातेसंबंधाचा पाया असू शकत नाही. परस्परांवरील विश्वास, आदर आणि प्रेम यांच्या आधारे दोघांमधील ऋणानुबंध जोपासले जात असतात. जोडीदाराबद्दलचा विश्वास आणि आदराची भावना नाहीशी झाली की, उरतो तो केवळ प्रेमसंबंध असल्याचा कृत्रिम आभास.  त्यानंतर असे नातेसंबंध टिकवण्यासाठी मग जोडीदाराला कधीकाळी अस्तित्वात असू शकणाऱ्या जुन्या गोडव्याचे दाखले द्यावे लागतात. नीतिमत्तेचे उमाळेही वारंवार काढले जातात. दुरावलेल्या जोडीदाराला या नात्याची आठवण करून देण्याची वेळ एखाद्यावर येणे, हाच या प्रेमनाट्याचा शोकांत असो शकतो.

आपला जोडीदार आपल्यासोबतच्या संबंधांना, सहवासाला कंटाळलाय, त्याला आता हे बंधन असह्य होतेय, ही बाब संबंधितांनी लक्षात घ्यायला हवी असते. नात्यांची वीण अशी जुलमाच्या तत्त्वावर कधीच घट्ट होत नसते. उलट आपल्याला मनाविरुद्ध जोडीदारासोबत राहावे लागत असल्याच्या वेदनेमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील नैसर्गिक हास्य लोप पावत असते. याची तमाही नीतिमत्तेचे दाखले देणाऱ्यांनी बाळगणे अपेक्षित असते.

नातेसंबंध हा दोन्ही दिशांनी प्रेम आणि विश्वासरूपी पोषकद्रव्यांनी वाढवली जाणारी फुलबाग असते, ती अशी जबदरस्तीने सांभाळता येत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे नातेसंबंधांकडे यादृष्टीने पाहिले जात नाही. कधीकाळचा गोडवा संपल्यानंतरही एकत्र राहण्याच्या अटीसाठी सोबत्याला मनाविरुद्ध दिवस कंठायला लावणे, हा मानवी स्वभावातला पैलू आता सार्वजनिक जीवनातही पदोपदी पहावयास मिळत आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे सध्या अशाच प्रसंगाला तोंड देत आहेत की काय, अशी शंका यायला लागली आहे. कुमारस्वामी यांनी काल केलेला विलाप हा राजकारणातील बिघडलेल्या नातेसंबंधांवर पुरेसा प्रकाश टाकणारा आहे. कुमारअण्णांचा स्वभाव तसा संवेदनशील, त्यात आघाडी सरकारमधील मोठा भाऊ असलेला काँग्रेस आपल्या जनहितार्थ काम करू देत नसल्याची तक्रार करत त्यांना रडू कोसळले आहे.

‘बापाने सोडले अन नवऱ्याने मारले’ अशी काहीशी गत झाल्याचा आभास होत असल्याचे कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे. जनतेने नाकारले तरीही नशिबाने डोक्यावर राजमुकुट बसवला. आता हे राजसिंहासन कुमार यांना टोचायला लागले आहे.

 .............................................................................................................................................

 या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4448

.............................................................................................................................................

कर्नाटकात काँग्रेसला भाजपची सत्ता येऊ द्यायची नव्हती या अट्टाहासापायी त्यांनी कुमारस्वामी यांना सत्तेच्या घोड्यावर बसवले. कुमारस्वामीही उत्साहाच्या भरात स्वार झाले खरे, पण या घोड्याचा लगाम आपल्या हातात नाही आणि खोगिर टोचायला लागले, याची जाणीव त्यांना झाली आहे. एवढाच त्रास होत असेल तर कुमार यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा घाट घालण्याची तयारी का दर्षवली? अटी-शर्थींवर आधारीत आघाडीचा संसार कसा चालतो, याचा अनुभव त्यांना नव्हता का? बरे, समजा काँग्रेससोबतचा घरोबा सोडून ते भाजपसोबत गेले तर भाजपकडून त्यांना अपेक्षित सन्मान दिला जाईलच, याची हमी येदियुरप्पा देणार आहेत का?

सध्या ते निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यांतील आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर जनतेने तुम्हाला सत्ता दिलीच नाही तर या आश्वासनाची पूर्तता करण्याचा अट्टाहास ते का करत आहेत? स्थानिक मतदाराने कुमारस्वामी आणि त्यांच्या पक्षाला स्पष्ट नकार दिलेला आहे. जनतेने नाकारलेले असताना आपण केवळ नशिबाने या पदी विराजमान आहोत, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. निकालापूर्वी स्वबळावर सत्तास्थापनेच्या वल्गना करणाऱ्या कुमारस्वामींचा पूर्वेतिहास मतदाराला ज्ञात आहे. यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर मांड ठोकत कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना कसे झुलवत ठेवले होते, हे अद्याप विस्मरणात गेलेले नाही. त्यामुळे आता त्यांना कोणाकडूनही सन्मानपूर्वक वागवले जाईल, असा आशावाद त्यांनी बाळगू नये.

त्यामुळेच त्यांच्या ‘बेवफा सनम’च्या नाट्यविलापाला अर्थ नाही. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ हे तत्त्व राबवणाऱ्या महाराष्ट्रातील सेना-भाजप युतीतील विलापासारखाच हा विलाप आहे. वेगळे झालो तर सत्ता येत नाही अन गुमाने राहिलो तर स्वबळ वाढत नाही, अशा विचित्र अवस्थेत सेना आपल्या आमदारांना खिसे खाली करू देत नाही. (यांच्या खिशातले राजीनामे पावसात भिजत कसे नाहीत?)

तर दंड कितीही फुगले तरी ‘शतप्रतिशत’ होता येत नाही, हे भाजपचे शल्य आहे. पण तरीही यांची फरफट सुरूच असते आणि कुठेतरी दूरवर काका-पुतणे अस्वस्थ होत राहतात. कारण इथे जोडीदाराच्या सहवासापेक्षा सत्तासुंदरीची आराधना महत्त्वाची असते. सत्तेसाठी माणसे काहीही करू शकतात. मग जोडीदारासोबतच्या भांडणाचे नाद शेजाऱ्याला ऐकवण्याचे कर्तव्यही पार पाडावे लागते.

राजकारण हा तडजोडीचा खेळ असतो. तिथे सर्वकाही ठरवून करता येते. या वाटचालीत विश्वासार्हता महत्त्वाची असते. राजकारण असो वा व्यक्तिगत भावसंबंध विश्वासार्हता संपली की, उरतो तो नात्यांमधील औपचारिक आभास!  

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......