कुमारस्वामींचा ‘विलाप’ महाराष्ट्रातील सेना-भाजप युतीच्या ‘विलापा’सारखाच आहे!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी
  • Mon , 16 July 2018
  • पडघम देशकारण एच. डी. कुमारस्वामी H. D. Kumaraswamy लोकशाही Democracy भाजप BJP काँग्रेस Congress

परस्परांबद्दल क्षणिक आकर्षण हा कधीच सदृढ नातेसंबंधाचा पाया असू शकत नाही. परस्परांवरील विश्वास, आदर आणि प्रेम यांच्या आधारे दोघांमधील ऋणानुबंध जोपासले जात असतात. जोडीदाराबद्दलचा विश्वास आणि आदराची भावना नाहीशी झाली की, उरतो तो केवळ प्रेमसंबंध असल्याचा कृत्रिम आभास.  त्यानंतर असे नातेसंबंध टिकवण्यासाठी मग जोडीदाराला कधीकाळी अस्तित्वात असू शकणाऱ्या जुन्या गोडव्याचे दाखले द्यावे लागतात. नीतिमत्तेचे उमाळेही वारंवार काढले जातात. दुरावलेल्या जोडीदाराला या नात्याची आठवण करून देण्याची वेळ एखाद्यावर येणे, हाच या प्रेमनाट्याचा शोकांत असो शकतो.

आपला जोडीदार आपल्यासोबतच्या संबंधांना, सहवासाला कंटाळलाय, त्याला आता हे बंधन असह्य होतेय, ही बाब संबंधितांनी लक्षात घ्यायला हवी असते. नात्यांची वीण अशी जुलमाच्या तत्त्वावर कधीच घट्ट होत नसते. उलट आपल्याला मनाविरुद्ध जोडीदारासोबत राहावे लागत असल्याच्या वेदनेमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील नैसर्गिक हास्य लोप पावत असते. याची तमाही नीतिमत्तेचे दाखले देणाऱ्यांनी बाळगणे अपेक्षित असते.

नातेसंबंध हा दोन्ही दिशांनी प्रेम आणि विश्वासरूपी पोषकद्रव्यांनी वाढवली जाणारी फुलबाग असते, ती अशी जबदरस्तीने सांभाळता येत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे नातेसंबंधांकडे यादृष्टीने पाहिले जात नाही. कधीकाळचा गोडवा संपल्यानंतरही एकत्र राहण्याच्या अटीसाठी सोबत्याला मनाविरुद्ध दिवस कंठायला लावणे, हा मानवी स्वभावातला पैलू आता सार्वजनिक जीवनातही पदोपदी पहावयास मिळत आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे सध्या अशाच प्रसंगाला तोंड देत आहेत की काय, अशी शंका यायला लागली आहे. कुमारस्वामी यांनी काल केलेला विलाप हा राजकारणातील बिघडलेल्या नातेसंबंधांवर पुरेसा प्रकाश टाकणारा आहे. कुमारअण्णांचा स्वभाव तसा संवेदनशील, त्यात आघाडी सरकारमधील मोठा भाऊ असलेला काँग्रेस आपल्या जनहितार्थ काम करू देत नसल्याची तक्रार करत त्यांना रडू कोसळले आहे.

‘बापाने सोडले अन नवऱ्याने मारले’ अशी काहीशी गत झाल्याचा आभास होत असल्याचे कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे. जनतेने नाकारले तरीही नशिबाने डोक्यावर राजमुकुट बसवला. आता हे राजसिंहासन कुमार यांना टोचायला लागले आहे.

 .............................................................................................................................................

 या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4448

.............................................................................................................................................

कर्नाटकात काँग्रेसला भाजपची सत्ता येऊ द्यायची नव्हती या अट्टाहासापायी त्यांनी कुमारस्वामी यांना सत्तेच्या घोड्यावर बसवले. कुमारस्वामीही उत्साहाच्या भरात स्वार झाले खरे, पण या घोड्याचा लगाम आपल्या हातात नाही आणि खोगिर टोचायला लागले, याची जाणीव त्यांना झाली आहे. एवढाच त्रास होत असेल तर कुमार यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा घाट घालण्याची तयारी का दर्षवली? अटी-शर्थींवर आधारीत आघाडीचा संसार कसा चालतो, याचा अनुभव त्यांना नव्हता का? बरे, समजा काँग्रेससोबतचा घरोबा सोडून ते भाजपसोबत गेले तर भाजपकडून त्यांना अपेक्षित सन्मान दिला जाईलच, याची हमी येदियुरप्पा देणार आहेत का?

सध्या ते निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यांतील आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर जनतेने तुम्हाला सत्ता दिलीच नाही तर या आश्वासनाची पूर्तता करण्याचा अट्टाहास ते का करत आहेत? स्थानिक मतदाराने कुमारस्वामी आणि त्यांच्या पक्षाला स्पष्ट नकार दिलेला आहे. जनतेने नाकारलेले असताना आपण केवळ नशिबाने या पदी विराजमान आहोत, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. निकालापूर्वी स्वबळावर सत्तास्थापनेच्या वल्गना करणाऱ्या कुमारस्वामींचा पूर्वेतिहास मतदाराला ज्ञात आहे. यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर मांड ठोकत कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना कसे झुलवत ठेवले होते, हे अद्याप विस्मरणात गेलेले नाही. त्यामुळे आता त्यांना कोणाकडूनही सन्मानपूर्वक वागवले जाईल, असा आशावाद त्यांनी बाळगू नये.

त्यामुळेच त्यांच्या ‘बेवफा सनम’च्या नाट्यविलापाला अर्थ नाही. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ हे तत्त्व राबवणाऱ्या महाराष्ट्रातील सेना-भाजप युतीतील विलापासारखाच हा विलाप आहे. वेगळे झालो तर सत्ता येत नाही अन गुमाने राहिलो तर स्वबळ वाढत नाही, अशा विचित्र अवस्थेत सेना आपल्या आमदारांना खिसे खाली करू देत नाही. (यांच्या खिशातले राजीनामे पावसात भिजत कसे नाहीत?)

तर दंड कितीही फुगले तरी ‘शतप्रतिशत’ होता येत नाही, हे भाजपचे शल्य आहे. पण तरीही यांची फरफट सुरूच असते आणि कुठेतरी दूरवर काका-पुतणे अस्वस्थ होत राहतात. कारण इथे जोडीदाराच्या सहवासापेक्षा सत्तासुंदरीची आराधना महत्त्वाची असते. सत्तेसाठी माणसे काहीही करू शकतात. मग जोडीदारासोबतच्या भांडणाचे नाद शेजाऱ्याला ऐकवण्याचे कर्तव्यही पार पाडावे लागते.

राजकारण हा तडजोडीचा खेळ असतो. तिथे सर्वकाही ठरवून करता येते. या वाटचालीत विश्वासार्हता महत्त्वाची असते. राजकारण असो वा व्यक्तिगत भावसंबंध विश्वासार्हता संपली की, उरतो तो नात्यांमधील औपचारिक आभास!  

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......