निर्मल वर्मांच्या कथा बडा ख्याल सुरू व्हावा तशा सुरू होतात आणि त्याच लयीत त्यांची बढत होते!
ग्रंथनामा - झलक
आनंद थत्ते
  • ‘कावळे आणि काळं पाणी’चं मुखपृष्ठ
  • Fri , 22 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कावळे आणि काळं पाणी Kavale ani Kala Pani कौवे और काला पानी Kavve Aur Kala Pani निर्मल वर्मा Nirmal Verma साहित्य अकादमी Sahitya Akademi आनंद थत्ते Anand Thatte

निर्मल वर्मा यांच्या ‘कौवे और काला पानी’ या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथासंग्रहाचा आनंद थत्ते यांनी ‘कावळे आणि काळं पाणी’ या नावाने केलेला मराठी अनुवाद नुकताच साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला आनंद थत्ते यांनी लिहिलेले हे मनोगत..

.............................................................................................................................................

हिंदी भाषेत साहित्यनिर्मिती करणारे निर्मल वर्मा हे भारतीय साहित्यातले अग्रगण्य कथा-कादंबरीकार होते. ‘नयी कहानिया’ या हिंदी साहित्यातील चळवळीत भीष्म सहानी, मोहन राकेश, कमलेश्वर, अमरकांत, राजेंद्र यादव यांच्या बरोबर अग्रणी होते. त्यांची ‘परिंदे’ ही कथा (१९५९) या चळवळीची सुरवात मानली जाते.

एखादा बडा ख्याल सुरू व्हावा तशा अतिशय संथ लयीत त्यांच्या कथा सुरू होतात आणि त्याच लयीत त्यांची बढत होते. त्यांच्या कथा वाचकाला अतिशय वेगळ्या वातावरणात नेतात. त्यांच्या कथेतील भौगोलिक प्रदेश हा भारताची राजधानी दिल्ली, भारतातली निम शहरं, पहाडी प्रदेशातली गावं आणि कस्बे, युरोपातली (पूर्व आणि पश्चिम) शहरं असा वैविध्यपूर्ण असतो.

पावसाची विविध रूपं, विविध ऋतूमधलं ऊन आणि त्याचे विभ्रम, पहाडातला पाऊस आणि बर्फ, युरोपातली थंडी अशा निसर्गाची ते अशी वर्णनं करतात की, तो त्यांच्या कथेतील एक अनिवार्य घटक होऊन जातो. हा निसर्ग त्यांच्याकथेतील पात्रांच्या मनोवस्था अतिशय समर्थपणे व्यक्त करतो.

त्यांच्या कथा मानवी नातेसंबंधांच्या असतात. स्त्री-पुरुष संबंधांच्या असतात. विफलनातेसंबंधांच्या असतात. तुटलेल्या नात्यांची, त्यातल्या ताण्याबाण्यांची खोलवरची अनुभूती देणाऱ्या असतात. या सगळ्या खेळाकडे त्यातला निवेदक अतिशय तटस्थपणे बघत असतो.

या अनुभवांचं चित्रण करत असताना काळाचा केलेला वापर अतिशय गुंतागुंतीचा असतो. घडत असलेल्या घटनेवर भूतकाळातल्या घटनांची, वर्तनांची, संभाषणाची दाट सावली पसरलेली असते. आणि त्यातली पात्र तो अनुभव जगत असताना वर्तमान आणि भूत या दोन काळांच्या आंदोलनात सतत गुरफटलेली असतात.

हे जगणं जगत असताना नाती जोडली जाणं अपरिहार्य असतं, ती निर्माण होतात, ती फुलत असतानाच त्यात त्यांच्या तुटले जाण्याचे संकेत जाणवू लागतात. त्यात एक प्रकारची अगतिकता असते, अपरिहार्यता असते. पिळवटून टाकणारं दुःख असतं आणि एक प्रकारचा मूक, हतबल शहाणीवेचा स्वीकार असतो. आणि तो वाचकाला स्वतःच्या नात्यांसंबंधी विचार करायला प्रवृत्त करतो.

यातला निवेदक पात्रांमार्फत आणि भाष्यांमधून सुख, दुःख, प्रेम, नातं  या विषयी चिंतन करत असतो. हे चिंतन अतिशय तरल आणि काव्यात्म भाषेत असतं. आणि त्यातला दुःखाचा स्वर काळीज कुरतडत जातो. या चिंतनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते अतिशय अनोख्या शब्द प्रतिमांतून आपल्या समोर येतं. आणि त्यातला निवेदक अतिशय अलिप्तपणे त्या घटनांकडे बघत असतो. हा निवेदक अतिशय संवेदनशील असतो. दुःखाच्या विविध स्तरांची, त्यातल्या गुंतागुंतीची, निसर्गाच्या विविध प्रतिमांचा नावीन्यपूर्ण वापर करत अशी रचना करतो की, वाचक गुरफटत जातो.

त्यातल्या वातावरणाचा, चिंतनाचा, उपमांचा, तरलतेचा आणि विषण्णतेचा पगडा वाचकाच्या मनावर बसू लागतो. मग ती कथा मनावर ताबा गाजवायला लागते. हळूहळू आपली पकड मजबूत करत नेते. आणि अखेरीस वाचकाला आपण पूर्ण जखडलो गेलोय याची जाणीव होते. पण त्यातून सुटका होत नाही. बाहेर पडू म्हणता पडता येत नाही. त्यातल्या पात्रांची दुःख, वेदना, आपण भोगतोय, किंवा कधीतरी भोगलंय, किंवा कधीतरी भोगावं लागेल असं वाटतं. आणि आपण फरफटत जातो.

मग शरण जाणं हाच एक उपाय उरतो.

माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद माझ्या हातून झाला याचा मला खूप आनंद झाला आहे.

.............................................................................................................................................

कावळे आणि काळं पाणी - निर्मल वर्मा, अनुवाद : आनंद थत्ते, साहित्य अकादमी, नवी दिल्ली.

पाने – १६२, मूल्य – १७५ रुपये.

ISBN - 978-93-87567-44-3

.............................................................................................................................................

लेखक आनंद थत्ते मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......