देशी भाषांच्या विकासासाठी एवढी झळ सोसलीच पाहिजे, कारण त्यांच्या विकासातच भारताचा विकास आहे
ग्रंथनामा - झलक
डॉ. दीपक पवार
  • ‘भाषाविचार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 June 2018
  • ग्रंथनामा झलक दीपक पवार Deepak Pawar भाषाविचार ‌‌Bhashavichae ग्रंथाली Granthali

मराठी अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. दीपक पवार यांच्या ‘भाषाविचार’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच मुंबईत झालं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एक प्रकरण...

.............................................................................................................................................

एखादं गाव, एखादं शहर, एखादा जिल्हा, एखादं राज्य, एखादा देश यांच्या विकासाबद्दलचा एखादा दस्तावेज कोणत्या भाषेत असला पाहिजे, याचं उत्तर ‘लोकभाषे’त असावं असं आपल्याला वाटतं आणि एखादं लहान मूलही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल इतका साधा प्रश्न आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं नाही, असा भारतभरातला अनुभव आहे.

फेसबुक हे शीघ्र चर्चेचं माध्यम आहे. तसंच ते संक्षिप्त चर्चेचंही माध्यम आहे. एकदा मी पाहिलं की, एका शहराच्या विकासाचा इंग्रजीत तयार केलेला आराखडा राजकीय पक्षांनी लोकभाषेत मागितला तर फेसबुकवरच्या एकाला ते आवडलं नाही. इंग्रजी न कळणारी सर्वसामान्य माणसं आहेत का, असा प्रश्न त्याला पडला. (असा प्रश्न एखाद्याला पडतो तेव्हा ती व्यक्ती ज्यांच्यात वावरते, ती माणसं किती सर्वसामान्य आहेत, हे कळायला हरकत नाही; पण बऱ्याचदा आपल्या भोवतालच्या माणसांच्या विचारविश्वामुळे आपली नजर बंदिस्त होते, तसं या व्यक्तीचं झालं असावं.) त्यामुळे मूळ मसुदा लोकभाषेतच असला पाहिजे असा आग्रह मी धरला. त्यावर त्यांचं म्हणणं असं की, ‘शहराचा विकास ही विशेष अभ्यासाची बाब आहे. त्यामुळे त्यातल्या तज्ज्ञांना इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा येत असतील अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. जोपर्यंत उच्चशिक्षण लोकभाषेमध्ये दिलं जात नाही, तोपर्यंत या विषयांची देशी भाषांमधली परिभाषा तयार होणार नाही. ती तयार होईपर्यंत देशी भाषांमधले अहवाल किचकटच राहतील. त्यापेक्षा इंग्रजीचा आधार घेतलेला कधीही चांगला.’

‘वादे वादे जायते तत्त्व बोध’, हे म्हणणं खरं असलं तरी फेसबुकवरच्या वादांमुळे दरवेळेला तत्त्वबोध होतोच असं नाही, हे लक्षात घेऊन आणि टायपिंगचा कंटाळा करून मी हा वाद थांबवला. मला दोन वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दोन विधानं आठवली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी ‘आपल्याकडे येणारी फाईल हिंदीतलीच असली पाहिजे, तरच आपण त्यावर सही करू’, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एका महाविद्यालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात बोलताना ‘लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ असं स्पष्टपणे सांगितलं होतं. हिंदीतली परिभाषा तयार होत नाही तोवर येऊ देत इंग्रजीतल्या फायली, अशी सवलत रविशंकर शुक्ल यांनी दिली असती तर हिंदीची परिभाषा शोधण्याचे कष्ट कोणी घेतलेच नसते.

देशातल्या ज्या-ज्या राज्यांमध्ये तिथले राज्यकर्ते आपापल्या भाषांच्या प्रचार - प्रसारासाठी ठाम राहिले आहेत; तिथं परिभाषा नाही, अनुवाद कंटाळवाणा होतो, माणसं मिळत नाहीत, इंग्रजी सगळ्यांना कळतंच की, एवढा खर्च कशाला, हे साहित्यातल्या लोकांचं काम आहे, अशा खुळचट सबबी आपोआप बंद होतात. तरीही आमचा राज्यकर्ता वर्ग हे धाडस का दाखवत नाही?

संसदेत सादर होणारी सर्व विधेयकं मुळात इंग्रजीत असतात. त्यांचा हिंदीत अनुवाद केला जातो. हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा असल्याचं सरकारचं अधिकृत धोरण असल्यामुळे अनुवादित मजकुराला मूळ मजकूर म्हणून मान्यता दिली जाते. जे केंद्रात तेच वेगवेगळ्या राज्यांमधेही घडतं. अनुवाद करणाऱ्या लोकांना भाषेतलं कळत असलं तरीही त्या-त्या व्यवहार क्षेत्रातलं कळतंच असं नाही. उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या आणि अशा विविध क्षेत्रातलं जे ज्ञान गेल्या शतकभरात विकसित झालं आहे. ते पेलण्यासाठी त्या ज्ञानशाखेशी तर काही वेळेला आंतरविद्याशाखीय पद्धतीनं झटापटी कराव्या लागतात. हे करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ जोवर आपण देशी भाषांच्या विकासासाठी वापरत नाही, तोवर प्रादेशिक भाषांचा विकास अशक्य आहे. महात्मा गांधींच्या शब्दांत सांगायचं तर ‘आपल्या समाजातले बुद्धिमान लोक त्यांची सर्व ऊर्जा इंग्रजी भाषेच्या विकासासाठी वापरत असल्याने देशी भाषेच्या विकासाला लागणारी ताकद आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी मिळू शकलेल्या नाहीत.’

आता हे दुष्टचक्र इतकं पक्कं झालं आहे की, सगळं इंग्रजीत हवं असं म्हणणारे आणि लोकलज्जेस्तव देशी भाषांच्या बाजूनं बोलणारे, पण प्रत्यक्षात मात्र इंग्रजीचाच कैवार असणारे लोक यांच्यात छुपा समझोता झाला आहे. ज्यांना देशी भाषा नको आहेत, त्यांनी उघडपणानं जागतिकीकरणाची हूल उठवायची आणि उरलेल्यांनी ‘देशी भाषा सक्षम होईपर्यंत इंग्रजीत व्यवहार करायला काय हरकत आहे’ अशी प्रच्छन्न प्रश्नोत्तरं सुरू करायची. या पद्धतीनं देशी भाषांवर घाला घालण्याचे थेट आणि अप्रत्यक्ष सगळेच मार्ग वापरले जात आहेत. माहितीचं महाजाल हे काही प्रमाणात देशीभाषांना मुक्तद्वार देणारं असलं तरी अजूनही त्यावर इंग्रजीचा प्रभाव लक्षणीय आहे. त्यात सोशल मीडियाच्या तात्कालिकतेमुळे आणि सर्व गोष्टी व्हायरल होण्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रसारही वेगानं होताना दिसतो. त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘आता देशीभाषांचं काही खरं राहिलं नाही. त्यामुळे इंग्रजीमागे जाण्याशिवाय तरणोपाय नाही’ असा विकसित झालेला विचार.

दुसरं म्हणजे लाईक्स, कॉमेन्ट्स व शेअरमधून या संसर्गजन्य रोगाचं वेगात पसरणं. लेखाच्या सुरुवातीला मी ज्या चर्चेचा उल्लेख केला, त्यातली संबंधित व्यक्तीची भूमिका, ही या मानसिकतेचाच पुरावा आहे.

युरोपियन संसदेमध्ये युरोपातल्या जवळपास सगळ्या भाषांमध्ये बोलता येतं. ते त्याच वेळी इतरांना अनुवादित करून ऐकवता यावं इतका तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग तिथं केला जातो. भारतीय संसदेत हे अशक्य का असावं? घटनेच्या आठव्या परिशिष्टात सध्या असलेल्या २२ भाषांमध्ये बोलण्याची आणि अनुवाद करण्याची सोय संसदेत झाली, तर त्या त्या भाषिक समुदायांमध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होईल. केंद्र सरकारचे सर्व अहवाल या २२ भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवेत. त्यातून देशी भाषांमध्ये या क्षेत्रातल्या अनुवादाचं एक शास्त्र तयार होईल. हे अनुवाद केलेलं साहित्य जेव्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन लोकांपर्यंत पोचेल, तेव्हा प्रशासनाची पारदर्शकता वाढेल; तसंच उत्तरदायित्वाची भावनाही निर्माण होईल. या सगळ्याला नक्की खर्च येईल, पण देशी भाषांच्या विकासासाठी एवढी झळ सोसलीच पाहिजे. कारण देशी भाषांच्या विकासातच भारताचा विकास दडला आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4428

.............................................................................................................................................

लेखक दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे संचालक आहेत.

santhadeep@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Fri , 08 June 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......