उदाहरणार्थ, नजूबाई गावित यांच्या विषयी वगैरे...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुशील धसकटे
  • नजूबाई गावित आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 22 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो नजूबाई गावित Najubai Gavit भिवा फरारी Bhiva Farari अदोर Aador नवसा भिलणीचा एल्गार Navsa Bhilneecha Elgar विद्रोही साहित्य संमेलन Vidrohi Sahitya Sammelan

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे १३ वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन २३ व २४ डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. या संमेलनात महाराष्ट्र, गुजरातसह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील अभ्यासक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कॉ. नजूबाई गावित यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याविषयी...

.............................................................................................................................................

नजूबाई गावित या 'घरोट्या'तील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. 
त्या पैठणी वा उच्च दर्जाची खादीची साडी नेसून लेखिका म्हणून मिरवणाऱ्या; मान-सन्मानावर डोळा ठेवून कोणी दुखवलं जाणार नाही असं 'सर्वमान्य' कोटीतलं लिहिण्याची काळजी घेणारी तथाकथित ‘करिअरिस्ट’ लेखिकाही नाहीत. की समाजावर 'उपकार' करायला निघालेल्या चळवळीतील स्वयंघोषित हौशी सामाजिक कार्यकर्त्याही नाहीत.

आहे ते दाबून आणि नाही ते रंगवून स्त्री-पुरुष संबंधांवर नकली बोल्ड पद्धतीनं लिहिणं; आपल्याकडील सामाजिक पर्यावरणाचा फार विचार न करता-ग्राउंड रिअॅलिटी जाणून न घेता लेखनात योनी-लिंग अशी बिनधास्त भाषा वापरणं, आपणही पुरुषांपेक्षा कमी नाही असा आविर्भाव दाखवत नकळत पुन्हा पुरुषी वळणाचं एकसुरी लिहून आपण कसे 'मॉडर्निस्ट' आहोत वगैरे असं दाखवण्याचा एक ट्रेंड आपल्याकडे स्थिरावताना दिसत आहे. नजूबाईंना अशी दिखाऊ 'मॉडर्निस्ट' पोझ घ्यायचं कारण नाही. त्यांनी ती कधी घेतलीही नाही. कारण त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, समाजाच्या खालच्या समजल्या जाणाऱ्या समूहातून आलेल्या असल्यानं एकप्रकारे जगण्यातील समृद्धता त्यांच्या ठायी आहेच. त्यामुळे नजूबाई या सर्व ढोंगी साहित्यिक पर्यावरणापासून शेकडो मैल दूर आहेत.

मुळात आदिवासी समाजात स्त्री पुरुष नात्यांत जितका मोकळेपणा आहे, त्याच्या एकपटही मोकळेपणा स्वतःला उच्चकुलीन-सवर्ण-कल्चर्ड वगैरे समजणाऱ्या समाजात किंवा या समाजातील शिकलेल्यांमध्ये फार जाणवत नाही. त्यामुळे नजूबाईंच्या लेखनातील स्त्री-पात्रं स्वाभाविकच मोहाची दारू पिताना दिसतात, पुरुषाशी दोन हात करताना दिसतात, परिस्थितीशी संघर्ष करताना दिसतात, आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाबरोबर पळून जाताना दिसतात. असं पळून गेलं की, त्यांचं लग्न करून द्यायचं, अशी रीत आदिवासी समाजात आहे. प्रत्यक्ष जगण्याच्या पातळीवरील हा पुरोगामीपणा स्वतःला शिक्षित, नागरी, शहरी समजणाऱ्या समाजात अभावानंच आढळतो. यावरून आदिवासींच्या तुलनेत आपले जगण्या-वागण्या-बोलण्याचे पुरोगामित्वाचे दावे किती वरवरचे, पोकळ आहेत, हे जाणवतं.

शिवाय उच्चवर्णातील स्त्रियांकडे असलेला वागण्या-बोलण्याचा-वावरण्याचा-दिसण्याचा-चेहराविहीनतेचा न्यूनगंड नजूबाईंकडे नाही. कारण त्या आदिवासी जमातीतून म्हणजे तथाकथित 'खाल'च्या समजल्या वर्णातून आलेल्या आहेत. खालच्या थरात स्त्रियांना वावरण्याचा जो मोकळेपणा आहे, बंदिस्तपणाचा काच 'वरच्यां'पेक्षा अधिक सैल आहे, तो वरची प्रत्येक पायरी चढताना संकुचित होत होत गेलेला दिसतो.

नजूबाईंचं लेखन भाषेच्या दृष्टीनं फार 'पॉलीश' केलेलं नसल्यानं कोणाला ते आवडणारही नाही. परंतु आदिवासी 'मावची' बोलीचा आविष्कार, शब्द, वाक्यं, त्यांचं जगणं, त्यांचं अनुभव विश्व, त्यांच्यातील ताणतणाव, आदिवासी संस्कृती, अस्सल देशी भान अशा कितीतरी गोष्टी यातून कळत जातात. म्हणजे मराठीला अपरिचित असं भावविश्व-अनुभवविश्व नजूबाईंच्या लेखनातून येतं. शिवाय कुठे डिप्लोमॅटपणा नाही. जे आहे ते नितळ. अल्पशिक्षित असल्या तरी पुस्तक करताना तीन-तीन, चार-चार वेळा त्याचं पुनर्लेखन केल्याशिवाय पुस्तक छापायची घाई त्यांनी केली नाही, ही गोष्ट लेखक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे.

जेमतेम चौथी शिकलेल्या नजूबाई या आदिवासी-दलित-शेतकरी-कष्टकरी सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीतील सच्च्या आणि लढाऊ कार्यकर्त्या आहेत. 'अब्राह्मणी साहित्य व कला महासभा' स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. अतिशय साधं राहणीमान, चेहरा उन्हातान्हात काम करून रापलेला, आवडो न आवडो स्पष्ट बोलणाऱ्या. दोन तीन पुस्तकं येऊनही जाणीवपूर्वक कसलीही 'पोझ' घेणं नाही. पुस्तकांबद्दल विचारलंच तर म्हणतात- "मी जे समाजाकडून घेतलं, तेच मी समाजाला परत केलं. त्यात माझं असं काय होतं? ते आता समाजाचं झालंय. आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर अजून खूप काम करायचं बाकी आहे, आणखी लढे उभे करायचे आहेत."

नजूबाईंनी खेडोपाडी, वाडीवस्ती, पाडे, डोंगर माळरान पिंजून उन्हातान्हात, पावसापाण्यात रस्त्यांवर उतरून अनेक आंदोलनं केली आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यातही त्यांचा सहभाग होता. खऱ्या अर्थानं नजूबाई या रणरागिणी आहेत. आपल्याकडे गोदूताई परुळेकर, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा काही स्त्रियांनाच 'रणरागिणी' म्हणायचा प्रघात आहे की काय कळत नाही. सारखी सारखी यांचीच चर्चा केली जाते. माध्यमांना तर यांच्याशिवाय दुसऱ्या 'बहुजन' स्त्रिया दिसतच नाहीत.

असं असलं तरी कुठल्याही विद्यापीठीय चर्चाविश्वाच्या, तथाकथित अभिजन-बहुजन स्त्रीवादी चर्चाविश्वाच्या वर्तुळाबाहेर त्यांना ठेवलं गेलं. मराठी साहित्याच्या, लेखकांच्या, समीक्षकांच्या, माध्यमांच्या, (फुले ?)-आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या दलित चर्चाविश्वाच्या दृष्टीनं नजूबाई ‘आदिवासी आणि दलित’च राहिल्या. त्यांच्या लेखनाची चर्चा करावी असं कोणाला वाटलं नाही, की या बाईला बोलावून त्यांची भावना जाणून घ्यावी, असंही कोणाला वाटलं नाही. वाटत नाही.

नजूबाईंची ‘भिवा फरारी’ ही आदिवासी स्त्रीनं लिहिलेली भारतातील पहिलीच कादंबरी आहे. त्या अर्थानं त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं. 'तृष्णा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. यातील 'अदोर' हा भाग स्वतंत्रपणे इंग्रजीमध्ये आलाय. एक कथासंग्रह आहे. नजूबाईंच्या लेखनाची प्रेरणा प्राच्यविद्यापंडित शरद पाटील हे आहेत. त्यामुळे या लेखनाचा पाया हा मातृसत्ता-स्त्रीसत्ताक हा आहे. त्याला समतेचा आधार आहे.

बहिणाबाई चौधरी, दुर्गाबाई भागवत, कमल देसाई, गौरी देशपांडे (काही पुस्तकं), मेघना पेठे (‘आंधळ्याच्या गायी’), नजूबाई गावित असे सन्माननीय अपवाद केले तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात मनावर घेऊन वेळ खर्चून वाचावं... पुन्हा पुन्हा वाचावं... अशी आश्वासक स्थिती नाही. ती व्हावी अशी अपेक्षा पल्लवित करू या.

नजूबाई गावित यांच्या ‘नवसा भिलणीचा एल्गार’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4334

.............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......