ग़ज़ल क्या है?
ग्रंथनामा - झलक
भीमराव पांचाळे
  • ‘ग़ज़लियत’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक भीमराव पांचाळे Bhimrao Panchale ग़ज़लियत Ghazaliyat डिंपल पब्लिकेशन Dimple Publication

ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांचं ‘ग़ज़लियत’ हे नवं पुस्तक नुकतंच डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातील हे काही मासले...

.............................................................................................................................................

बस, तेरी बदौलत है…

शायरी क्या है, दिली जज़बात का इज़हार है

दिल अगर बेकार हैं तो शायरी बेकार है…

रसिक वाचकांशी लेखन रूपानं संवाद साधण्याचा आनंद योग आला आहे… तोसुद्धा माझ्या आवडीच्या ग़ज़ल-शेरांच्या माध्यमातून… जे एक सशक्त माध्यम आहे भावनांच्या अभिव्यक्तीचं..

‘समजावून सांगणं’ या प्रकाराचं वावडंच असतं शायरीला… ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असा हा प्रवास असतो…

प्रसिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी असं सांगतात की, “ग़ज़लचा शेर हा आपला अर्थ कधीच सांगत नाही, तर तो केवळ अर्थाची दिशा दाखवितो… आणि अर्थाच्या या दिशा तरी किती?... ऐकणाऱ्यांचं जगणं, जगण्याचे जसे अनुभव तसा अर्थ. काव्य हे बहुआयामी असतं या म्हणण्याची जणू प्रचितीच.” १९७२ सालापासून हा छंद जडला… आणि तेव्हापासून आजतागायत ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’प्रमाणे ग़ज़लनं साथ दिली. नुसती साथच नाही तर आयुष्यात मला सगळं काही दिलं… भरभरून आनंद दिला… रसिक श्रोत्यांची दाद व प्रेम दिलं… उमेदपणानं जगायला शिकविलं… सुख आणि दु:ख, तसंच अपयश आणि यशसुद्धा पचवायला शिकविलं…

आजवरच्या या प्रवासात मला जे आवडलं, मनाला भिडलं ते रसिक वाचकांसोबत शेअर करण्याचा माझा नेक इरादा आहे. माझ्या ‘आवडण्या-भावण्या’मध्ये ग़ज़ल असेल, एखादा शेर अथवा रुबाई असेल… एखादा किस्सा, आलेला  अनुभव किंवा क्वचित प्रसंगी छंदोरचनेचा विचार किंवा ग़ज़लच्या गायकी अंगाचं सारसुद्धा असेल. मैफिलीप्रमाणे इथंही तुम्हा जिन्दादिल रसिकांचा प्रतिसाद मिळेल ही आशा करतो. शेवटी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला एक शेर मदतीला धावून आला आहे. मुलाहिजा हो –

तेरा प्यार भी दौलत है, तेरा दर्द भी दौलत है

जो कुछ मेरी दौलत है, बस तेरी बदौलत है…

………………………………………

ग़ज़ल क्या है?

ग़ज़ल क्या है, ग़ज़ल का फ़न क्या है

चन्द लफ्ज़ों में कोई आग छुपा दी जाये…

‘शब्दांत पेरलेली आग…’ असं शायरनं इथं म्हटलं असलं तरी ग़ज़ल क्या है, हा सवाल अनेकांनी उठवलेला आहे. कधी प्रेमानं, कधी कुतूहलानं, तर कधी उपहासानं…

खुद्द अमीर खुसरोसारख्या प्रयोगशील कलंदराला ही विधा सुरुवातीला पसंत नव्हती… तर ग़ालिब साहेबांनाही आपल्या अभिव्यक्तीसाठी हा आकृतीबंध तोकडा वाटायचा…

‘सुखन अज़् माशुक गुफ़्तन…’ आपल्या प्रियतमेशी केलेल्या गुजगोष्टी, एवढ्या सिमित व्याख्येनं सुरुवात झालेल्या या काव्यप्रकारानं काय झेप घेतली! छंदात बंदिस्त असलेल्या ग़ज़लचा आवाका तरी केवढा… सगळ्या मानवी भावभावनांना कवेत घेण्यासाठी, त्यांना हुंकार देण्यासाठी ती समर्थ ठरली.. या हृदयातून निघाली अन त्या काळजापर्यंत पोहोचली, असं न होता, ‘या काळजातून उसळली आणि त्या काळजावर कोसळली’, असा प्रकार झाला… आणि उचंबळून दाद येते ती यामुळेच… असो! ग़ज़ल कुण्या एका व्याख्येत मावणं शक्यच नव्हतं. मग अनगिनत शायरांनी आपापल्या परीनं सांगितलं… ग़ज़ल क्या है…

नसीम रिफ़अत ग्वालियरी म्हणतात –

दिल के जज़बात है, ग़ज़ल क्या है

चन्द लमहात है, ग़ज़ल क्या है…

फिक्रो-अल्फ़ाज की अदालत में

कुछ बयानात है, ग़ज़ल क्या है…

मनातील उत्कट भावभावनांचा निचरा आणि खऱ्या अर्थानं जगलेल्या क्षणांचा गोषवारा किंवा शब्द आणि आशयाच्या न्यायालयात शायराचा कबुलीजबाब म्हणजेच तर ग़ज़ल!...और क्या!

………………………………………

साक्षात मृत्यूची भेट…

हिरवंगार रान…

हरीण एकटंच बिचारं निवांत चरत आहे…

चारा खाण्यात एवढं मश्गूल झालं आहे की, एक घोर संकट आपली चाहूल घेत पुढे-पुढे  सरकत आहे, याचं भान त्याला खूप उशिरा आलं…

एव्हाना त्याला कळून चुकलं की, एक पारधी आपल्या कमठ्यावर तीर चढवून त्याचा वेध घेण्यास टपला आहे.

जीव वाचवायला हवा. आपली सगळी चपळाई एकवटून हरीण पळत सुटलं…

आपला वेग आणि चपळाईच्या विश्वासावर शिकाऱ्याला हुलकावण्या देत पळता पळता एका दाट झुडपात त्याची शिंगं अडकतात… सोडवण्याच्या प्रयत्नात वेलींमध्ये अधिक गुंतत जातात. काही केल्या निघत नाहीत… पारधी आता हरिणाच्या नजरेच्या, तर हरीण त्याच्या बाणाच्या टप्प्यात आलेलं आहे… पुन्हा निकराचा प्रयत्न… केविलवाणी नजर पारध्याकडे… आता सुटका नाही… कुठल्याही क्षणी तीर सुटेल आणि आपल्या काळजाचा ठाव घेईल. अशा असहाय अवस्थेत हरिणानं फोडलेली आर्त किंकाळी म्हणजे ग़ज़ल!

ख़ामुशी से हज़ार ग़म सहना

कितना दुश्वार है ग़ज़ल कहना…

खरं तर ग़ज़लच्या सर्वांत अधिक जवळ जाणारं हे रूपक… हरिणाचं! आणि गंमत अशी आहे की, ‘गझील’ हा अरबी शब्द… त्यापासून झाला ‘गझाल’… म्हणजे हरीण… या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्रणयगीत’ किंवा ‘प्रेयसीशी वार्तालाप’ आणि फार्सी शब्दकोशातील अर्थ आहे – हरिणाचा आक्रोश!

क्या बात है!

………………………………………

नया शहर ढुंढिये…

आचार्य रजनीशांच्या पुस्तकात फार पूर्वी वाचलेलं एक अरबी वचन अंधुकसं आठवतं…

‘हे मरणशील प्राणी, तू तभी खूश रह सकेगा… जब की अपना ठिकाना जल्दी-जल्दी बदल लिया करें… क्योंकी जीवन का उल्हास विभिन्नता में है… और भविष्य, ना तो तेरा है और ना मेरा!’

आपल्या खालील शेराचं म्हणणं काहीसं असंच आहे… इतकी माणसं भेटली, इतकी ओळखली-जोखली की, मनासारख्या माणसाचा शोध घेण्यासाठी नकाशा घेऊन नवीन शहर शोधण्याची वेळ आली…

नक्शा उठा के कोई नया शहर ढुंढिये

इस शहर में तो सब से मुलाक़ात हो गई…

यातल्या ‘मुलाक़ात’ शब्दातच सगळी गोची आहे. केवळ भेटणं, बोलणं, सोबत वावरणं म्हणजे ‘मुलाक़ात’ नव्हे… सूर जुळायला हवेत… संवाद व्हायला हवा. अन्यथा काही नवीनता नसलेलं, रहाटगाडग्यासारखं रटाळ आयुष्य वाट्याला येतं आणि मग जगण्याचा न सुटणारा गुंता ठरलेलाच!

आयुष्य तेच आहे, अन हाच पेच आहे…!

संवेदनशील माणसाला कठीण जाईल, पण नसीमसाहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रयत्न करून बघूया…

आजकल इतनी होशियारी रख

सिर्फ दुनिया से दुनियादारी रख

दिल किसी से अगर न मिल पाये

हात मिलने की रस्म जारी रख…

कोशिश करने में क्या हर्ज है!

.............................................................................................................................................

ग़ज़लियत - भीमराव पांचाळे, डिंपल पब्लिकेशन, मुंबई, मूल्य - २८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4297

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......