सगळ्यांनी टाकली धाड । वर्णन करावे कोठवरी
ग्रंथनामा - आगामी
शंकर विभुते
  • ‘कंट्रोल युनिट’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी कंट्रोल युनिट Control Unit शंकर विभुते Shankar Vibhute शब्दालय प्रकाशन Shabdalaya Prakashan

डॉ. शंकर विभुते यांची ‘कंट्रोल युनिट’ ही कादंबरी लवकरच शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीमध्ये निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची कहाणी सांगितली आहे. त्यातून आपल्या देशातल्या लोकशाहीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते, निवडणुका कशा होतात, यावर प्रकाश पडतो. सध्या गुजरातमधील निवडणुकांच्या निमित्तानं देशभर त्याविषयीची चर्चा चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

सोळा मुद्यांचा अहवाल भरल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी भरण्याचा फॉर्म हातात घेतला. ते भरायला सुरुवात करणार तेवढ्यात झोनल ऑफिसर मतदान केंद्रात टपकले.

‘काय, भोसले सर, व्यवस्थित झाले ना? तुम्ही प्राध्यापक मंडळी फार टेन्शन घेता. तुम्हाला तर एका मतदान केंद्राचे टेन्शन असते, मला तर अशा सोळा मतदान केंद्रावर लक्ष ठेवावे लागते.’

‘येच्या मायला, याला कशाचं टेन्शन आलंय. आतापर्यंत कालपासून फक्त तीन वेळा आला असेल, काय बी इच्यारलं की, अ‍ॅडजेस्ट करून घ्या म्हणतो. आणि वरून काही अडचण आहे का? म्हणतो. याला सोळाच काय सोळाशे मतदान केंद्रं दिली तरी हा पट्टा सांभाळला असता.’ राठोड सर व वाघमारे सरांची कुजबुज ऐकून झोनल ऑफिसर म्हणाले.

‘बोला, तुमची काही अडचण आहे का? अरे हो, तुमचे मानधन घेऊन आलो आहे. खरे तर हे फार कमी आहे. पण यातील एक रुपयासुद्धा देशाप्रती तुम्ही केलेल्या सेवेची पावती आहे’ असे म्हणून त्यांनी आपली बॅग उघडली.’

प्रस्तावनेवरून रक्कम कमीच मिळणार लक्षात आले होते. ते तर्क खरे ठरले. मतदान अधिकारी क्रमांक एक-दोन-तीन यांना चौदाशे रुपये, सेवकास साडेचारशे रुपये व केंद्राध्यक्षास सोळाशे रुपये मानधन होते. होमगार्डला मानधन पोलिस खात्यातून मिळणार होते. सर्वांनाच या मानधनाविषयी नाराजी वाटली. यापूर्वीचे तीन ट्रेनिंग, जाण्यायेण्याचा खर्च व हे शेवटचे दोन दिवस सर्व मिळून चौदाशे रुपये म्हणजे अतिशय अल्प मानधन होते. भोसलेंना वाटले.

‘उपवास-तपास करीत, फॅन नसताना, टॉयलेट नसताना, पिण्याचे पाणी, जेवण्याची व्यवस्था काहीच नसताना प्रामाणिकपणे ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे मानधन अतिशय त्रोटक आहे. यापेक्षा उमेदवार प्रतिनिधीचे काम अधिक चांगले. त्याला जेवण, नाष्टा मिळून एका दिवसाचे आठशे रुपये मिळाले. प्लॉटची सरकारी किंमत व खाजगी किंमत यात जशी तफावत असते, तशी आपली किंमत झाली होती.’ झोनल ऑफिसर निघून जाताच, सहकारी शोषणाची कैफियत भोसलेकडे मांडू लागले. ताकलोड म्हणाले,

‘साहेब, कुठेही आमची हीच गत आहे. शाळेची गुणवत्ता वाढवा, शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांना यशस्वी करा, ‘ढ’ असणाऱ्या पोरांना सकाळी एक तास व शाळा सुटल्यावर एक तास अधिकच घ्या. यासोबतच जनगणना, साक्षरता अभियान, दारिद्रयरेषेखालील लोकांची यादी, निवडणुका अशी अनेक अशैक्षणिक कामे करा. काम करण्यासाठी कायद्याची व कलमाची भाषा. मानधन मात्र तुटपुंजे. वरून प्राथमिक वर्गाची गुणवत्ता ढासळत चालली. प्राथमिक शिक्षकांनी दारू महाग केली. मास्तर शिकवतच नाहीत, शाळांना डुम्मा मारतात, प्रार्थना घेत नाहीत, रजा न घेता शाळा सोडून जातात, असे टोले अधिकाऱ्यांकडून व समाजाकडून कानावर ऐकायला मिळणार. ज्यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट उपसत असतो किंवा लोकशाही बळकट करण्याच्या नावाखाली जी हमाली करीत असतो, ते मादरचोद चौथी पास, सातवी पास, दहावी नापास असे आमचेच विद्यार्थी असतात. हेच निवडून आल्यावर गुणवत्तेची भाषा करतात. जेवढे अधिकारी आहेत ना त्यातील ऐंशी टक्के साहेब आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकून वर गेले. वरून आमच्या डोक्यावर मुततात. साहेब आमच्यापेक्षा धंदा करणारी रांड परवडली बघा. तिला तरी काही काळासाठी सन्मान मिळतो. तुम्ही प्राध्यापक मंडळी, लयी सुखी. ‘गाव जमले हनुमान बाहेर’. तुमचा या समाजाचा व अधिकाऱ्यांचा संबंध नसतो. मायला पहिल्या जन्माचं काही तरी पाप म्हणून जिल्हा परिषदेचा मास्तर झालो. माफ करा जास्त बोललो, पण पोटतिडकी होती साहेब. तुम्ही समजदार दिसलात म्हणून पोटातलं ओकलो साहेब. वाईट वाटून घेऊ नका.’

भोसलेही काही काळ सुन्न झाले. त्यांच्या चिडण्यात बरेच तथ्य होते. त्यांचे ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. उपदेश म्हणून एवढेच म्हणाले, ‘जावू द्या सर, आपण प्रामाणिक काम करावे, तेवढीच देशसेवा व समाधान मानता येईल.’ यांनाही वाटले, ‘काम करतात बिचारे तर त्यांना तसं मानधनही द्यावं. बरं आपणही ऐकलं की, निवडणूक कामासाठी जो खर्च होतो, त्याचे ऑडिट होत नाही. त्यामुळे खर्च करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणावर सर्व काही अवलंबून आहे. जाऊ दे. आपण काय करू शकतो. आपल्याकडून जेवढे त्यांच्यासाठी करता येईल तेवढं केलं. त्यांना मिळालेल्या पैशातूनच ते कालपासून झालेल्या खर्चाची रक्कम म्हणून काही रक्कम आपणास देत होते. आपण घेतली नाही. घेण्यासाठी खर्च केलाच नव्हता. तेवढेच ते आपल्यावर खूश झाले.’

‘कामे खूप पडलेली होती. चर्चा करण्यात अर्थ नव्हता. बस येईपर्यंत जेवढे मोहेरबंद करता येईल तेवढे येथे करावे, बाकीचे केंद्रावर जाऊन करावे’ असं भोसलेंना वाटू लागलं.

बस येण्यास उशीर होता. कारण शेवटच्या मतदान केंद्राकडून कर्मचाऱ्यांना घेत-घेत शेवटी बस येणार होती. त्यामुळे बरीच कामं होण्यासारखी होती. म्हणून भोसलेंनी परत मतदानाची अंतिम टक्केवारी भरण्यासाठी फॉर्म हातात घेतला व भरायला सुरुवात केली.

यानंतर महत्त्वाचे लिफाफे भरून मोहोरबंद करावयाचे होते. भोसलेच्या मते अतिशय महत्त्वाचा लिफाफा म्हणजे सतरा सी. यातील बराच भाग कालच भरलेला होता. मतदान केंद्राचे क्रमांक, नाव, कंट्रोल युनिट क्रमांक, मतदान युनिट क्रमांक, एकूण मतदारांची संख्या, प्रदत्त मतपत्रिका क्रमांक, कागदी मोहरांचा हिशोब इ. दुसरा लिफाफा होता केंद्राध्यक्षांनी दिलेल्या घोषणापत्रांचा. मतदान सुरू करण्यापूर्वी, मतदान सुरू झाल्यावर व मतदान समाप्तीच्या वेळी घोषणा करावयाच्या होते. चौथं घोषणापत्र निरंक होता. यंत्रात काही बिघाड झाला आणि दुसरं नवीन मशीन मागविलं तर ते घोषणापत्र करावयाचं होतं. घोषणापत्रावर केंद्राध्यक्षांच्या व उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या ताकलोड सरांनी काल काही व सकाळी काही घेऊन टाकल्या होत्या. त्याचा एक वेगळा लिफाफा करण्यात आला. तिसरा लिफाफा होता दैनंदिनींचा. मतदान केंद्रात मतदान घेण्याच्या संबंधांतील कार्यवाहीसंबंधी, त्या प्रयोजनासाठी असलेल्या दैनंदिनीत भोसलेंनी वेळोवेळी नोंदी घेतलेल्या होत्या. त्याचा स्वतंत्र लिफाफा करण्यात आला. व्हिजीट बुक (भेटपत्र-निळे पॉकीट)मध्ये झोनल ऑफिसर सोडून कोणीही मतदान केंद्रास भेट न दिल्यानं त्यांची असलेली भेट नोंद वही व वरील सोळा मुद्यांचा कागद एकत्र करून त्या दोन्हीचा एक लिफाफा तयार करण्यात आला.

वैधानिक व अवैधानिक लिफाफे सीलबंद केल्यानंतर भोसलेंनी इतर साहित्य असलेला लिफाफा भरण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये धातूची मोहोर, बाणफुलीचा रबरी शिक्का, साधी पेन्सिल, बॉलपेन, टाचण्या, लाख, मेणबत्ती, जाडदोरा, धातुची पट्टी, कार्बन पेपर, पक्या शाईची बाटली ठेवण्यासाठी दिलेला कप, आगपेटी, शाई असलेले पॅड इ. वस्तू एका मोठ्या कापडी पिशवीत टाकणं अपेक्षित होतं. त्यासोबतच साहित्याच्या यादीत नसलेले पण अपवादात्मक परिस्थितीत कर्मचारी व मतदारांना वैदिक सेवा म्हणून मिळालेली प्रथमोपचार पेटीही त्यात टाकणं आवश्यक होतं. वैधानिक व अवैधानिक लिफाफे मोहोरबंद करताना कोणीही काहीच बोललं नाही, पण इतर साहित्य पिशवीत टाकताना ताकलोड सर म्हणाले,

‘साहेब, यातील धातूची मोहोर व बाण फुलीचा रबरी शिक्का सोडलं तर तिथं साहित्य घेताना यातील दुसरं काहीच तपासत नाहीत.’ भोसले सरांना ताकलोड सरांची भाषा समजली नाही म्हणून ते सहज म्हणाले, ‘तपासो, न तपासो, आपल्याला काय? एकदा त्यांच्या हवाली केलं की आपण मोकळे.’

वाघमारे सरांच्या लक्षात आलं की, ताकलोड सरांना काय म्हणायचं आहे ते भोसले सरांना कळालं नसेल म्हणून ते स्पष्ट म्हणाले,

‘ताकलोड सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तिथं तपासत नाहीत हे साहेबांना सोडून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यातील कोणती वस्तू पाहिजे असेल तर ठेवून घ्या. तिथं कचरापेटीतच जाणार आहे.’

‘खरंच, मला नक्की माहीत नाही. तसे तपासत नसतील तर ताकलोड सर, एखादी वस्तू ठेवून घ्या.’

भोसलेंची परवानगी मिळताच ताकलोड सरांनी झडप घालून शाई असलेलं पॅड व मेडिकल किटमधील डेटॉल बॉटल काढून घेतली. वाघमारे सरांनी पाठोपाठ त्याच किटमधील पेनकिलरच्या गोळ्या व ट्यूब आपल्या बॅगमध्ये टाकली. राठोड सरांनीही भीत-भीत मेडिकल किटमधील जखमांवर बांधावराची पट्टी व सेलोटॅप जवळ ठेवून घेतला. सेवकांनी त्याच्या पोरासाठी पेन्सिल व बॉलपेन मागवून घेतला. होमगार्डनी मेणबत्ती हातात घेतली. थोडक्यात सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रासाठी दिलेलं साहित्य हडप केलं. भोसले मनातल्या मनात गुणगुणायला लागले...

राठोड वाघमारे ताकलोड । सेवक अधिकारी होमगार्ड ।

सगळ्यांनी टाकली धाड । वर्णन करावे कोठवरी ॥1॥

नशीब येथील मतदाराचे । अति खडतर होते साचे ।

लक्ष्य होते निकालाचे । काय मागावे यापरि ॥2॥

भ्रष्ट नेता निवडून येई । अफाट पैसा मिळविला जाई ।

परी ही प्रथा बरी नाही । समाज जाईल रसातळा ॥3॥

सर्व साहित्य व पेट्या आवरून भोसले आणि कंपनी बसची वाट पहात बसले होते. रात्रीचे साडेआठ वाजले होते.

बसचा पत्ता नव्हता. एक-दोन वेळा भोसलेंनी बसचालकास फोन केला. ‘जवळ-जवळ आलो आहोत’ असंच उत्तर मिळालं होतं. त्या परिसरातील इतर दोन मतदान केंद्रांची टीमही येऊन रांच्यात सामील झाली...

.............................................................................................................................................

कंट्रोल युनिट - शंकर विभुते, शब्दालय प्रकाशन

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4298

.............................................................................................................................................

लेखक डॉ. शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......