पक्ष्यांची किलबिल ऐकली, पक्षी-फुलपाखरे स्वछंद नाचताना दिसली की, आई-बाबा आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते
ग्रंथनामा - आगामी
डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
  • पत्रपंडित गोविंद तळवलकर यांच्या पुस्तक प्रकाशनाची कार्यक्रमपत्रिका आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 20 March 2018
  • ग्रंथनामा आगामी ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर निरुपमा तळवलकर सुषमा तळवलकर

उद्या पत्रपंडित गोविंद तळवकरांचा पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आज सायंकाळी पुण्यात त्यांच्या दोन मुली, निरुपमा व सुषमा यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तळवकरांविषयी अनेक कथा-दंतकथा सांगितल्या जात असल्या तरी त्यांचे अनेक पैलू अनेकांना माहीत नाहीत. धैर्य, त्याग, सत्यनिष्ठा, औदार्य, कुटुंबवत्सलता, निस्पृह वृत्ती या त्यांच्या गुणांची आणि काव्यशास्त्रविनोद, संगीत, पशु-पक्षी, फुलझाडे व बागकाम, निसर्ग व पर्यावरण, प्रवासाची आवड इत्यादी क्षेत्रांतील त्यांची अभिरुची याविषयीही फारशी माहिती नाही. ते सर्वांना माहीत व्हावे या उद्देशाने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातल्या तळवलकरांच्या प्राणीप्रेमाची ओळख करून देणाऱ्या दीर्घ प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

बाबा ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाल्यावर आम्ही मुंबईला राम महालमध्ये राहायला आलो. त्या घरापुढे भले मोठे कॅशियाचे झाड होते. त्याला पिवळ्या फुलांचा बहर यायचा आणि हिरवे हिरवे पोपटांचे थवे त्यांवर बसायचे. त्यांतलेच काही पोपट आमच्याकडे गॅलरीत बाबांच्या बागेतही पाहुणचाराला यायचे. त्यांच्यासाठी आई डाळिंबाचे दाणे, पेरू वगैरे ठेवायची. बाबांना हे पाहुणे फार प्रिय. हिरव्या रंगाच्या पक्ष्यांना हिरवी फुले, फळे आवडणार, म्हणून पोपटांना ते व आई पिस्ते द्यायचे. तिथे आम्हाला कुत्रा बाळगणे शक्य नव्हते, परंतु आम्ही चौघे दर वर्षी नेमाने ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ‘डॉग शो’ला जायचो.

चर्चगेटच्या या भागात त्या वेळी सचिवालय, आयुर्विमा, ‘हिंदू’सारखी कार्यालये, ब्रेबॉर्न स्टेडियम, इरॉस सिनेमा, बँका, ब्रिटिश कौन्सिलचे ग्रंथालय, के. सी. कॉलेज, लॉ कॉलेज होते; बाकी सर्व निवासी वस्तीच होती, तीही फार कमी. त्यामुळे संध्याकाळी ही कार्यालये बंद झाली की, एकंदर सर्व शांत वातावरण असायचे. तेव्हा आमच्या भागात डाससुद्धा नव्हते, ते पुढे आले. पहाटे चारच्या सुमारास प्रथम कोकिळांचे कूजन ऐकू यायला लागायचे आणि नंतर वेगवेगळ्या पक्ष्यांचा कलरव. हे कोकिळांचे कुहू कुहू बाबांना फार आवडायचे. सकाळी जेवायच्या आधी प्रथम पशूपक्ष्यांना दाणापाणी द्यायचे, असा आईचा तिच्या लहानपणापासूनचा नियम होता. त्यामुळे गॅलरीत पक्ष्यांसाठी नेहमीच फळे वा इतर पदार्थ ठेवलेले असारचे. चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट, मैना, एवढेच काय, एक घारसुद्धा पाहुणचाराला यायची. कधी कधी शाळा भरल्यासारखे पाच-सहा पोपट एका रांगेत गॅलरीच्या कठड्यावर येऊन बसायचे. मोगरा, गुलाब, कर्दळ, जास्वंद या रंगीबेरंगी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे नाचत असायची. आतासारख्या त्या भागात तेव्हा कुरूप, उंच इमारती नव्हत्या. त्यामुळे समोर समुद्र दिसायचा. त्यावर बुडणारा सोन्याचा गोळा, सूर्यास्ताचे मनोहर रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आकाशात उडणारे पक्षी, बलाकमाला असे चित्रासारखे मनोवेधक दृश्य.

बाबांना प्राणी संग्रहालयात जायला खूप आवडायचे. लहानपणी पुण्याला पेशवेबागेत आम्हाला आई-बाबा न्यायचे. तेथील सुमित्रा हत्तिणीबरोबर अनेक वर्षांची मैत्री जुळली होती.

हत्ती, वाघ, सिंह, मोर, काकाकुआ, महाप्लव वगैरे सगळेच बाबांचे जुने प्रिय मित्र होते. दिल्ली, लंडन, बर्लिनमधील प्राणी संग्रहालये ते हमखास पाहत. नैसर्गिक वाटेल अशा परिसरात या प्राणी संग्रहालयांतले वाघ, सिंह वगैरे आहेत, हे बाबांना फार पसंत होते. मुंबईला राणीच्या बागेत, तसेच दिल्ली, लंडन इत्यादी ठिकाणी आम्हीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. वाघ, सिंह, हत्ती, मोर, राजहंस हे तर लाडके होतेच. पुण्याजवळ एका ठिकाणी आम्ही मुद्दाम राहिलो होतो. तिथे मोर पाळले होते, ते बाबांना आवडायचे. निळा निळा मखमली पिसारा फुलवून ते सवंगडी नाचायला लागले की, आई-बाबा मंत्रमुग्ध होऊन बघायचे. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे माडगूळकरकाकांचे, पुलकाकांनी दिलेल्या चालीवर आशाने गायलेले गीत आई-बाबांना फार आवडायचे.

मुंबईला आमच्या घरी लाकडाच्या हत्तींचे भारदस्त बुक होल्डर्स व मोराची पिसे सुंदर पात्रात पुस्तकांच्या दोन बाजूंना ठेवली होती. त्यांच्या शेजारी गरुडाच्या आकाराच्या सोनेरी रंगाच्या दोन गोल्डन ईगल्सच्या राजस बाटल्या होत्या, त्या नाशिकच्या घरात आहेत. ते हत्ती आता पुण्याला भांडारकर संस्थेतील बाबांच्या दालनात आहेत. गरुडही तिथे ठेवण्यात येतील.

पुण्याला झाडाखाली बाबांना भारद्वाज पक्षी दिसले होते आणि नाशिकला चक्रवाक. खूश होऊन त्यांनी आम्हाला लगेच सांगितले. गीरच्या जंगलात ते सिंह बघायला गेले होते. त्यांच्याबरोबर तिथे असलेले विख्यात छायाचित्रकार सुलेमान पटेल यांनी बाबांना सिंहांच्या कुटुंबाचा फार सुंदर फोटो भेट म्हणून दिला होता. तो आमच्या नाशिकच्या घरात आहे. पटेल यांचे गीरच्या जंगलावरील पुस्तकही बाबांच्या ग्रंथसंग्रहात आहे. बाबांनी सुलेमान पटेल यांच्या छायाचित्रांवर लेखही लिहिला होता.

‘लासी’, ‘लासी कम होम’, ‘नॅशनल व्हेलवेट’, ‘हतारी’, ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ हे सर्व चित्रपट बाबांनी आम्हाला आम्ही लहान असताना दाखविले. नंतरसुद्धा आम्ही सर्वांनी ते अनेक वेळा पाहिले. ‘रोझी इज मार रिलेटिव्ह’ हे एका हत्तिणीवरील पुस्तक बाबांनी मुंबईला घेतले. बाबा आणि सुषमा त्या पुस्तकावर बेहद्द खूश झाले. आई व निरुपमा यांना ती अतिरंजित कपोलकल्पित कथा वाटली. रोझी नावाची हत्तीण बिअरची भोक्ती होती. कोणी बिअर पीत असेल, तर दारावर सोंडेने वाजवून तिलासुद्धा बिअर द्यावी अशी मागणी ती करायची. बाबांना तो भाग फारच पसंत पडला. त्यावर सिनेमा काढायला पाहिजे, असे त्यांचे मत होते. खरंच कोणी काढला असता, तर बाबांनी तो अनेक वेळा पाहिला असता. काही वर्षांपूवी ‘बेथोवेन’ नावाचा एक सिनेमा निघाला. ‘बेथोवेन’ हे त्यातील कुत्र्याचे नाव आहे. ‘बेथोवेन’च्या अद्भुत लीला बाबांना फार आवडत असत व एखाद्या लहान मुलासारखे ते हसत. आई म्हणायची की, या ‘बेथोवेन’ला एवढे समजते, असे फक्त तुम्हालाच वाटत असेल.

अलीकडे अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालरात ज्या भागात गोरिला ठेवला होता, त्या समोरच्या पाण्यात एक छोटा मुलगा पडला. त्याच्या आईने त्याच्यावर लक्ष ठेवले नव्हते. पाण्यात गटांगळ्या खात असलेला तो लहान मुलगा पाहून हरांबे या नावाचा भला मोठा धिप्पाड गोरिला तो मुलगा पाण्यात बुडू नये म्हणून धावत आला आणि त्याने त्या मुलाचा हात धरून त्याला पाण्यात इकडून तिकडे ओढले. हरांबे मुलाला वाचवायला गेला, काहीही इजा करीत नव्हता; पण प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज होऊन त्यांनी त्याला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. हे टी. व्ही.वर बघितल्यावर बाबांना अतीव दु:ख झाले व अधिकाऱ्यांच्या दुष्टपणाचा संताप आला. माणुसकी आणि दयेने प्रेरित होऊन हरांबे हा गोरिला जिव्हाळ्याने आणि काळजीने त्या लहान मुलाच्या रक्षणासाठी धावला होता, त्याला वेगळ्या उपायांनी दूर करणे वा गोळी मारून बेशुद्ध पाडणे, असे काही न करता एकदम ठार मारण्याचा खुनशीपणा केवळ मनुष्यप्राणीच करू शकतात. “ही पशुवृत्ती केवळ मनुष्यप्राण्यांतच दिसते. ‘माणसा, माणसा, कधी होशील माणूस?’ हा बहिणाबाईचा प्रश्न यांना आणि अनेकांना विचारला पाहिजे”, असे भाष्य बाबांनी केले. लक्षात घेण्याची गोष्ट ही की, असाच प्रकार इंग्लंडमध्ये आधी झाला होता, तेव्हा तेथील प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी गोरिलास गुंगीच्या गोळ्या मारून बेशुद्ध केले होते, ठार मारले नव्हते. नंतर काही लोकांनी हरांबेचे नाव अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

मांजरासारखा अपवाद सोडता इतर प्राणी दुसऱ्या प्राण्यांना केवळ स्वत:च्या आनंदासाठी मारत नाहीत, भूक लागली असेल तर खाण्यासाठी मारतात. मनुष्यप्राणी हा एक असा प्राणी आहे, जो दुसऱ्या माणसाला काहीही कारण नसता मारतो किंवा छळतो आणि असे करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. बाबांना असे ‘आसुरी संपत्तीचे मालक’ नेहमीच भेटले. येथील हॉस्पिटलमध्ये आईला अमानुष वागणूक दिली, तेव्हा ‘नरेचि केला हीन किती नर’ असे आम्हाला नेहमी वाटायचे.

कुत्र्यांचे बाबांना अतिशय प्रेम होते, पण मांजरे मात्र त्यांना मुळीच आवडत नसत. ती लबाड असल्यामुळे त्यांच्यापासून नेहमी लांबच राहावे, असे त्यांना अगदी लहानपणापासून वाटायचे. बाबांना आणि गोपीनाथकाकांना, दोघांनाही मांजरे कधी आवडली नाहीत. ती अंगावर येतील आणि ओरबाडतील, असे वाटायचे. त्यामुळे आमच्याकडे मांजर कधीही नव्हते. पुण्याला गोपीनाथकाकांकडेही एक लाडका मोती कुत्रा होता. नेहरूंकडे एक छोटे प्राणी संग्रहालयच होते, असे म्हणायला हरकत नाही. सुभाषचंद्रांनाही मांजरे आवडत नव्हती, याचा उल्लेख बाबांनी ‘सुभाषबाबूंचा काव्यशास्त्रविनोद’ या ‘मधुघट’मधील लेखात केला आहे.

व्यंकटेश माडगूळकरकाका, जयंतराव टिळक व रणजित देसाई यांना शिकारीची हौस होती. जंगलांतील पशूपक्ष्यांबद्दलच्या त्यांच्या निरीक्षणात बाबांना फार रस होता. ते त्यांच्याशी या विषयावर बोलताना रंगून जायचे. बाबांनी त्यांना ‘म.टा.’त लिहिण्यासही सांगितले होते. वसंतराव नाईक त्यांच्या शिकारीच्या कथा बाबांना सांगत. त्यांनाही बाबांनी ‘म.टा.’त त्यावर लिहायला सांगितले होते. आर्थर कोस्लर मुंबईला आले होते, तेव्हा त्यांच्यावर बाबांनी लिहिलेल्या लेखावर कोस्लर यांचा त्यांच्या कुत्र्याबरोबरचा फोटो छापला होता, ते कोस्लर यांना फार आवडले, असे त्यांनी बाबांना सांगितले होते. समान विचारसरणीबरोबरच कुत्र्यांची आवड हा दोघांतील समान धागा होता.

बाबा १९७५ मध्ये प्रथम अमेरिकेत गेले, तेव्हा एका सफारी पार्कमध्ये गेले होते. एक सिंह डुलत डुलत त्यांच्या मोटारीच्या टपावरच येऊन बसला. जणू बाबांना भेटायलाच आला होता! थोडा वेळ बसून तो गेला. बाबा अफाट खूश झाले होते. वृक्षवल्ली आणि वन्य प्राणी यांनाच सगेसोयरे मानून राहणाऱ्या जॉय अ‍ॅडम्सन आणि जॉर्ज अ‍ॅडम्सन या दाम्पत्याने आफ्रिकेत सिंह पाळले होते. त्यापैकी एल्सा या सिंहिणीवर त्यांनी लिहिलेल्या ‘बॉर्न फ्री, लिव्हिंग प्री, फॉरएव्हर फ्री’, तसेच चित्तिणीवरील ‘पिपा’ या पुस्तकांवर बाबांनी लिहिले होते. ती त्यांची आवडती पुस्तके होती. ती सर्व बाबांच्या ग्रंथसंग्रहात आहेत. त्यावरील चित्रपटही त्यांनी आम्हाला लहानपणी दाखविले होते. जॉर्जचे निधन झाल्यावर ‘वनराज अ‍ॅडम्सन’ असा अग्रलेख त्यांनी लिहिला होता, तो ‘पुष्पांजली’त आहे. जॉर्ज यांनी जे १५ सिंह कोरा जंगलात सोडले होते, ते सर्व एकाच वेळी जॉर्ज यांचा खून झाला त्याच्या आदल्या रात्री त्यांच्याकडे आले होते, असे जॉर्ज यांच्या पाहुण्यांनी सांगितल्याचे बाबांनी या अग्रलेखात लिहिले होते. तुमच्या तत्त्वज्ञानात न कल्पिलेल्या अनेक गोष्टी स्वर्गात आणि पृथ्वीवर आहेत, या हॅम्लेटच्या वाक्याची यावरून आठवण झाली, असे भाष्यही केले होते.

बाबासाहेब बूट नावाचे एक वनाधिकारी होते. त्यांची व बाबांची मैत्री होती. ते आमच्या घरी नेहमी यायचे. जंगलच्या कथा सांगायचे. त्यांच्या ओळखीने आम्ही जंगले बघायला गेलो होतो. बाबांना डाकबंगल्यात राहायला फार आवडायचे. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी डाक बंगल्यात राहायचो. नदी, सरोवर, समुद्र यांच्या काठावर तसेच डोंगरावर, जंगलात राहायलाही बाबांना आवडायचे. ‘सुखालागि आरण्य सेवीत जावे’ असा अग्रलेखही त्यांनी लिहिला होता.

व्याघ्र-संवर्धन प्रकल्पाची कल्पना बाबांना अतिशय आवडली होती. बांदीपूरच्या जंगलात आम्ही राहिलो होतो. जंगलात आतमध्ये जीपने जाऊन हत्तींना त्यांच्या नैसर्गिक परिसरात पाहिले. एक भली मोठी हत्तीण तिच्या पिल्लाबरोबर झाडाखाली उभी होती. आमची जीप आल्याबरोबर ते पिल्लू कोणाला दिसणार नाही अशा रीतीने त्याला आडोसा करून त्याच्या संरक्षणासाठी ती त्याच्या समोर उभी राहिली. त्या मातेचे हे अपत्यप्रेम आम्हाला फार कौतुकास्पद वाटले. आई-बाबांना तर तिच्याबद्दल फारच ममत्व निर्माण झाले.

निरुपमा अमेरिकेच्या ईसीएफएमजी या परीक्षेसाठी क्वालालंपूरला गेली होती, तेव्हा सिंगापूरला तेथील पक्षीशाला बघून यायला बाबांनी सांगितले होते. नंतर आम्ही दोघी इंग्लंडमध्ये शिकत असता आई-बाबा आले होते, तेव्हा आम्ही चौघे लंडनच्या प्राणी संग्रहालयात जायचो. तेथील पोलर अस्वल आई-बाबांचे आवडते होते. आम्ही कापूस भरलेले पिंगट तपकिरी रंगाचे टेडीबेअर व पांढरा शुभ्र स्नूपी डॉग घेतले होते. ते नाशिकच्या घरात आहेत.

ब्रिस्टलच्या प्राणी संग्रहालयात रेवाच्या महाराजांनी दिलेले पांढरे वाघ आम्ही पाहिले होते. ब्रिस्टलजवळच्या स्लिमब्रिज येथे जलचरपक्षीशाला (Water Bird Sanctuary) बघायलाही मुद्दाम गेलो होतो. फ्लेमिंगो, राजहंस, विविध आकारांची व रंगांची बदके वगैरे पाहण्यात वेळ केव्हाच संपून गेला. त्यांना खायला देण्यासाठी गव्हाच्या पिशव्या विकत घेतल्या होत्या. या राजस पक्ष्यांच्या थव्यांचे विहंगम दृश्य बघून बाबा फारच उल्हसित झाले होते. फ्लेमिंगोंचा एक थवा तेवढ्यात उडून आकाशात भरारी घेऊ लागला. तो नाचरा आनंदोद्रेक पाहून बाबांनी आम्हाला लगेच फोटो काढायची घाई केली, पण कॅमेराचा ट्रायपॉड लावेपर्यंत फ्लेमिंगो दुसऱ्या तळ्यात जाऊन बसलेसुद्धा. युद्धात सत्यपक्षाचा विजय झाल्यावर देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, अशी वर्णने पुराणकथांतून लहानपणी वाचली होती. हे तांबूस गुलाबी फ्लेमिंगो आकाशातून खाली उतरताना पाहून तशाच पुष्पवृष्टीचा भास झाला. गोजिरा गुलाबी, सुंदर सोहळा! सैबेरियातून हजारो राजहंस काही ऋतूंमध्ये स्लिमब्रिजला येतात आणि मग तिकडे परत जातात. हे राजहंस केव्हा, कोठे व कसे जातात, हे आईला बरोबर माहिती होते. तिने त्यावर वाचले होते. अनेक रंगांची आणि आकारांची बदके तिथे आहेत. त्यांच्या पंखांचे रंग, चोचींचे रंग, डोक्याचे रंग इतक्या नाना प्रकारचे बघून आपण थक्क होतो. सूर्यास्ताच्या तांबूस गुलाबी पार्श्वभूमीवर शेकडो फ्लेमिंगोंच्या तांबूस गुलाबी थव्याचे दृश्य अविस्मरणीय होते.

राजहंस आणि मोर यांचे बाबांना विशेष प्रेम. इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये जागोजागी अगदी छोट्या तळ्यांमध्येही राणीच्या मालकीचे राजहंस असतात. सुखद, थंड हवा, हिरवीगार सृष्टी आणि राजहंस हे दृश्य बाबांना मोहून टाकायचे. रिजंट्स पार्कमध्ये दोन काळे राजहंस होते. त्यांवरून बाबांना हॅन्स ख्रिश्चन अँडरसनची ‘अग्ली डकलिंग’ ही गोष्ट व ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ही माडगूळकरकाकांची कविता आठवायची.

एफआरसीएस झाल्यावर हार्ट सर्जरीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी निरुपमा ग्लासगोला राहत होती. तिथे घरासमोरील छोट्या तळ्यातही राजहंस होते. स्वित्झर्लंडमध्ये लेक ल्युसर्नला आम्ही गेलो होतो, तिथेही तळ्यात राजहंसांचे थवे पाहून बाबांचे मन सुप्रसन्न झाले होते. प्रत्येक तासाला छोटे दार उघडून बाहेर येऊन कूजन करणाऱ्या कोकिळेचे घड्याळ आम्ही तिथून मुद्दाम घेतले होते. ते नाशिकच्या घरात आहे.

काही वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेत न्यूरॉर्कमध्ये लाँग आयलंडवर पोर्ट वॉशिंग्टनला राहत होतो. रविवारी तिथे डक पाँडवर जाऊन रंगीत बदके बघणे, त्यांना खायला देणे आणि तिथेच झाडाखाली बाकावर बसून वर्तमानपत्रे वाचणे, असा बाबांचा क्रम होता. तेथील समुद्रात राजहंस होते. आम्ही त्या लाँग आयलंड साउंडवरही फिरायला जायचो. लाँग आयलंड साउंडवर बसूनच लाँगफेलोने त्याची ‘दि गोल्डन सनसेट’ ही कविता रचली होती, त्यामुळे तो समुद्र बाबांना आणखीच आवडायचा. ‘सुनील नभ हे, सुंदर नभ हे’, ही सावरकरांची कविता याच कवितेवर आधारित आहे. ह्युस्टनमध्ये ब्लू जे जागोजाग दिसायचे. राइस युनिव्हर्सिटीच्या फॉन्ड्रन लायब्ररीत बाबा रोज सकाळी जायचे. तिथे झुडुपांखाली ब्लू जे नाचत असायचे. आमच्या आवारातील झाडांखालीही असायचे. आई त्यांना धान्याचे दाणे टाकायची. आम्ही उत्तर प्रॉव्हिडन्समध्ये राहत होतो, त्या भागात खूप झाडी होती. ब्लू जे आणि तांबडे कार्डिनल खूपच होते. तिथे बाबा रोज दोन-अडीच मैल फिरायला जायचे. घरी परत आले की, किती कार्डिनल दिसले ते आम्हाला सांगायचे. बालकवींचा ‘बालविहग’ होता, तर माझा हा ‘लालविहग’ आहे, असे बाबा गमतीने म्हणायचे.

गेली काही वर्षे आम्ही अमेरिकेत क्लीव्हलँडला राहत आहोत. आमच्या भागात खूप दाट झाडी आहे. त्यात हरणे असतात. मोटारीतून बाबांना ग्रंथालयात घेऊन जाताना झाडीतून बाहेर येऊन रस्त्याच्या बाजूने जाणारी किंवा कधी रस्ता ओलांडून जाणारी हरणे दिसली की, आई-बाबांना फार आनंद वाटायचा. ते आम्हाला गाडी जरा हळूहळू न्यायला सांगायचे. कधी कधी ती हरणेही थांबून बघत राहायची. आमच्या जवळच्या ग्रंथालयात कधी कधी आम्ही चालत जायचो. वाटेत दोन-तीन हरणे पदपथावरच भेटायची. आमच्या आवारातही ती कधी कधी येतात. खारी, ब्लू जे, तांबडे कार्डीनल, फिंच, रॉबिन आणि काही पोपटी, तांबूस वगैरे रंगीबेरंगी चिमुकले पक्षी आमच्यासमोरच्या भल्या मोठ्या झाडावर असतात. आरामखुर्चीत बसून वाचता वाचता खिडकीतून बाहेर बघितले की, बाबांना हे चिमुकले मित्र दिसायचे. ते बाबा आम्हाला दाखवायचे. इथे अमेरिकेत वा इंग्लंडमध्येही पोपट मात्र कोठेच दिसले नाहीत. मैनाही नाहीत. भारतात पोपट सगळीकडे असतात. जवळच ईरी नावाचे प्रचंड मोठे तळे आहे. तेथील बदकांचे थवे सकाळी तळ्यावरून इकडे आमच्या बाजूला आणि संध्याकाळी परत तळ्यावर जाताना फार सुंदर दिसतात. नियमितपणे ठरावीक वेळी त्यांचे हे येणे-जाणे बाबांना अतिशय कौतुकास्पद वाटायचे. आईला तर त्यांच्या नेमक्या वेळाही माहीत होत्या आणि प्रत्येक मोसमात पक्ष्यांच्या वेळा कशा बदलायच्या, हेही तिला माहीत होते. या पक्ष्यांकडून लोकांनी शिकण्यासारखे खूप आहे, त्यांच्यासारखी शिस्त पाळून वेळच्या वेळी काम केले पाहिजे, असे बाबा म्हणत.

रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर

तुही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर

असे गोपीनाथकाकांनी रोज सकाळी वेळच्या वेळी येणाऱ्या चिमुकल्या निळ्या रानपाखराचे कौतुक केले आहे. यासंबंधात एक नमूद करावेसे वाटते. बाबांना २०१७ च्या फेब्रुवारीत दुबईहून एक ई-मेल आली. पार्किन्सन या रोगामुळे हालचालींत दोष निर्माण झालेल्यांची हालचाल सुधारण्यासाठी उपचार म्हणून कथ्थक शिकत असता एका विद्यार्थिनीने रंगात येऊन गोपीनाथकाकांची ‘रानपाखरा’ ही कविता गाण्यास सुरुवात केली. हालचाल करण्यास त्यामुळे सगळ्यांना अधिक उत्साह वाटला. चित्रपटनिर्मिती शिकवणाऱ्या संस्थेची एक विद्यार्थिनी अनुबोधपट तयार करीत असता तिला हे समजले, म्हणून तिने ती कविता समाविष्ट करण्याबद्दल बाबांची परवानगी मागितली.

अनेक वर्षांपूर्वी जिम कॉर्बेट यांच्या ‘माय इंडिया’ या पुस्तकाचे बाबांनी मराठीत भाषांतर केले होते. त्याचे हस्तलिखित लक्ष्मणशास्त्रीजीकाकांनी हरविले. कॉर्बेट यांची सर्व पुस्तके बाबांनी आणली होती. जिम कॉर्बेट यांची शताब्दी १९७५ मध्ये होती. तेव्हा बाबांनी नैनिताल व मुक्तेश्वरला जाऊन तो सर्व प्रदेश पाहिला. परत येताना वाटेत कालाढुंगीला जाऊन कॉर्बेटचे घर व त्यांच्या कुत्र्याची समाधी पाहिली. कुमाऊंच्या जंगलातही ते गेले होते. त्या प्रदेशावर व कॉर्बेट यांच्या पुस्तकांवरील ‘जिम कॉर्बेटचा प्रदेश’ हा लेख ‘वाचता वाचता’मध्ये आहे. कॉर्बेट यांच्या जन्मशताब्दीनिमित्तच्या ‘अक्षर’मधील ‘वन्य प्राणिमित्र कॉर्बेट’ या लेखात बाबा लिहितात : “बंदुकीप्रमाणेच शब्दांवर त्यांची हुकमत होती. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक तशीच शब्दांची निवड. गोळीबंद बंदुक व गोळीबंद वाक्ये, त्यामुळे कुमाऊंचा प्रदेश हा तिथे न जाताच आपल्या माहितीचा होतो. तेथील लोक, त्यांच्या चालीरीती, भावना, जंगले आणि भूप्रदेश, नद्या हे सारे त्यांनी शब्दरूप केले आहे. एवढेच कशाला- त्यांच्या कुवरसिंगाप्रमाणेच ‘पवळागडचा ब्रह्मचारी’ म्हणून ओळखला जाणारा नरभक्षक वाघ किंवा धाकची नरभक्षक वाघीण हीसुद्धा आपल्या अगदी ओळखीतील आहे, असे वाटते. सतत त्यांच्याबरोबर असणारा रॉबिन कुत्रा असो किंवा कुवरसिंगसारखा शिकारीतील सांगाती असो, सर्वांशी आपली जानपहचान होऊन जाते. कॉर्बेट यांच्याशी जंगल बोलते व ती भाषा ते आपल्यालाही ऐकवितात. वाघ, बिबटे यांच्या सवयी त्यांना अवगत होत्याच; पण पावलांच्या ठशांवरून वाघाची लांबी काय असेल, तो जखमी आहे काय, हेसुद्धा कॉर्बेट ओळखत. हे सर्व शास्त्र त्यांनी कलात्मकरीत्या मांडले आहे.” असे गोळीबंद वर्णन करून बाबाही आपल्याला कॉर्बेट, जंगल आणि त्यांचे वन्य प्राणिमित्र यांच्या जगात नेऊन त्यांच्याशी आपले मैत्र जुळवतात. कॉर्बेटबद्दल बाबा नेहमी इतक्या आपुलकीने बोलायचे की, ते आमचे अगदी परिचयाचे, नेहमीचे येण्या-जाण्यातलेच आहेत, नात्यातलेच आहेत, असे आम्हाला वाटायचे.

‘बहर’मधील ‘विचारवंत पंडितजी’ या लेखात बाबांनी लिहिले आहे की, सुंदरतेवर नेहरूंचे प्रेम होते, ज्ञानाचा हा मार्ग असेल अशी त्यांची धारणा होती. बाबांचेही सुंदरतेवर प्रेम होते, असुरीवृत्तींवर सुंदरता मात करेल व अंतिम विजय ‘सत्य शिवं सुंदरं’ यांचाच होईल, अशी त्यांची धारणा होती. वृक्षवल्ली, पशूपक्षी आणि निसर्ग हा सृष्टीने आपल्याला बहाल केलेला सुंदरनिधी आहे. त्याचा उपभोग घेऊन तो ठेवा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना होती. सृष्टीच्या सुंदरतेप्रमाणेच मनाची, विचारांची, लेखनाचीही सुंदरता असते. बाबांनी युरिपिडिसच्या पुढील काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत :

What else is Wisdom? What of man’s endeavour

Or God’s high grace, so lovely and so great?

To stand from fear set free, to breathe and wait;

To hold a hand uplifted over Hate;

And shall not Loveliness be loved for ever?

पशूपक्ष्यांमधील माणुसकी, मैत्री, प्रेम, कृतज्ञता यांचे बाबांना अतिशर कौतुक होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल फार जिव्हाळा होता. माणसांच्या कृतघ्न आणि दुष्ट प्रवृत्तीचा अनुभव आला की, हे अधिकच प्रकर्षाने जाणवत असे.

‘पक्षीमित्र सलीम अली’ या अग्रलेखाची सुरुवात बाबांनी पुढीलप्रमाणे केली होती-

वृक्षवल्ली आम्हां सोररीं वनचरें

पक्षीही सुस्वरें आळविती

येणे सुखें रुचे एकांताचा वास

नाही गुणदोष अंगा येत

आकाश मंडप पृथिवी आसन

रमे तेथें मन क्रीडा करी

- संत तुकाराम

बाबाही सर्व चिंता विसरून या जीवाभावाच्या सोरऱ्यांत मनापासून रमत. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे थोडा एकांत, थोडा गलबला हे बाबांना आवडायचे.पूर्वी ऋषी-मुनी दूर एकांतात, निसर्गरम्य स्थळी ध्यानधारणा आणि ज्ञानोपासना करीत. बाबांनी सर्व गलबल्यात राहूनही पुस्तके, साहित्य, विचार, कला, वृक्षवल्ली, पशूपक्षी यांच्या विेशात रमून अखंड ज्ञानसाधना चालू ठेवली. ते आधुनिक काळातील ऋषीच होते, ज्ञानतपस्वी होते, असे आम्हाला वाटते.

कोकिळेचे कूजन आठवून वर्डस्वर्थ म्हणतो :

And I can listen to thee yet:

Can lie upon the plain

And listen, till I do beget

That golden time again.

आता आमचे आई-बाबा नाहीत; पण अजूनही पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकली, ब्लू जे, कार्डिनल व रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे स्वछंद नाचताना, पंख फडफडवताना दिसली, समोरच अंगणात वा रस्त्यांत हरणे बागडताना दिसली, खारी, कुत्रे वगैरे प्राणीमित्र भेटले, ठरावीक वेळेला बदकांची मालिका आकाशात दिसली, मोर नाचताना पाहिला व कोकिळेचे सुस्वर गायन ऐकले की, आई-बाबाही सदैव आमच्यातच आहेत, आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते. आईच्या हातातील कंकणांची किणकिण, बाबांच्या हातातील पुस्तके खणातून काढल्याची, पुस्तकाची पाने उलटल्याची फडफड ऐकू येते. आई-बाबांबरोबरचे मंतरलेले दिवस, सुंदरतेची मैफल आठवून आमचे मन उल्हसित होते, रमून जाते आणि त्याच वेळी व्याकूळही होते.

.............................................................................................................................................

या पु्स्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4401

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......