आहे ऐसा देव । घ्यावा अनुभव ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 09 March 2019
  • पडघम सांस्कृतिक तुकाराम ज्ञानेश्वर समर्थ रामदास कबीर

ज्याच्यापासून हे सारे विश्व निर्माण होते, परंतु विश्वातील कशापासूनही जे निर्माण होत नसते, ते ठाऊक नसेल तर बाकी सारे माहीत असून काय होणार आहे, असे एका दोह्यात व मूळच धरलेले असल्याने वृक्षाचे फांद्या-पाने-फुले वगैरे सारे माझ्या हाती आले आहे, असे दुसऱ्या एका दोह्यात श्रीकबिरांनी म्हटले आहे. त्यांना जे अभिप्रेत आहे ते जाणले वा पाहिले असता जाणावयाचे वा पहावयाचे तत्त्वत: बाकी काही उरत नाही, असे श्रीतुकारामांनीही एका अभंगात म्हटले आहे. म्हणून ते काय, कुठे नि कोणकोणत्या रूपात आहे व ते जाणून घेण्यासाठी काय करावयाचे, ते थोडक्यात जाणून घेऊयात.

देव म्हणजे साक्षात आत्मा!

विश्व निर्माण करण्यापूर्वी होता त्या देवाला श्रीज्ञानेश्वर ‘आद्या’ तर श्रीरामदास ‘मनाचे श्लोक’मध्ये ‘देवराया’ व ‘थोरला देव’ म्हणतात. तो आदिदेव आत्मरूप व गणेश आहे, असे ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीच्या दोन ओव्यात म्हटले आहे. ज्याच्यापासून जग निर्माण होते, ज्याच्यात स्थिर असते व ज्याच्यात लय पावते तो गणपती साक्षात आत्मा आहे, असे ‘अथर्वशीर्षातही’ म्हटले आहे.

देव आत्मा आहे म्हटल्यावर तो आपल्या देहात असणार, हे उघड आहे. देह हे देऊळ व आत्मा हा देव होय. देह हे देवाचे मंदिर तर त्यातील आत्मा हा परमेश्वर होय. देव अंतर्यामीं आहे. देव हृदयस्थ आहे म्हणजे तो हृदयात राहतो, देहरूपी पंढरीतील तो आत्मारूपी विठ्ठल होय, आत्मारूपी नारायण सर्व देहरूपी घटात आहे, देहात असणारा जीव हा देवाचा अंश आहे, देह हे क्षेत्र असून त्यात असणारा व त्रास जाणणारा आत्मा हा खरा क्षेत्रज्ञ आहे, देहरूपी पुरीचा ईश असलेला तो कूटस्थ म्हणजे गुप्त असणारा पुरुष होय. वैश्वानर म्हणजे जठराग्नि बनून देवच प्राण्यांच्या शरीरात चतुर्विध अन्न पचवत असतो, देहाच्या रोमारोमात असतो म्हणून त्यास आत्माराम म्हणतात, मेंदूच्या पोकळीतील सहस्त्रदळकमळात देव राहतो, ऋषीक् म्हणजे वृत्ती व वृत्तीद्वारे इंद्रियांचे नियमन करणारा अंतर्यामीचा ईश म्हणून त्यास ऋषीकेश म्हणतात, इंद्रियरूपी गायांना वळणारा आत्मा हा गोपाळ होय, देवाच्या सत्तेमुळे शरीर चालतबोलत असते, अशा अनेक विधानांद्वारे ‘देव आत्मरूप आहे’, हे सत्य सर्व संत स्त्रीपुरुषांनी उद्घोषिले आहे.

आधी आपुल्या देहात । पहावा मग विश्वात ॥

ज्याअर्थी देव आपल्या देहात आहे त्याअर्थी त्याची ओळखही आधी आपल्या देहातच होते, हे उघड आहे. अनंत नामे असलेला तो देव अंतर्यामी कसा आहे ते समजून घ्यावे व त्या देहधारी देवाला आधी पहावे, नंतर तो विश्वात्मक असल्याचे पहावे आणि त्यानंतर सर्वातीत असलेले परब्रह्मस्वरूप होऊन रहावे (म्हणजे देवच होऊन रहावे), असे श्रीरामदासांनी ‘दासबोधातील’ पुढील ओव्यांतून मार्गदर्शिले आहे -

चौवीस नामी सहस्त्रनामी । अनंत नामी तो अनामी ।

तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥

आधी देखिला देहधारी । मग पाहावे जगदंतरीं ।

तयाचेनि या उपरी । परब्रह्म पावावे ॥

श्रीरामदास हे श्रीरामाचे अविभक्त भक्त होते. त्यांच्या वाङ्मयात त्यांनी अनुभवलेल्या रामाच्या स्वरूपाचा बोध होतो. तोच बोध श्रीकबिरांनी रामाच्या चार रूपांचे जे वर्णन केले आहे त्यातून होतो. त्यानुसार, देवाचा सातवा अवतार दशरथपुत्र श्रीराम हा एक राम, सर्व प्राण्यांच्या देहरूपी घटात असलेला जीव हा दुसरा राम, विश्वरूपी पसारा हा तिसरा राम तर या सर्वांहून ‘न्याराही न्यारा’ असलेला तो चौथा राम होय. 

अनुसरोनि प्रथम राम । अनुभवा तो आत्माराम ॥

रामाची ही सर्व रूपे आपल्यालाही अनुभवावयाची आहेत. त्यासाठी, श्रीराम सूर्यवंशी जन्मला तसा आपला जीव नरदेही जन्मला आहे, हे लक्षात घेऊन व श्रीरामचरित्रातील काही ठळक ठळक गोष्टींपासून बोध घेऊन आता आपण नेमके काय करावयास हवे, ते श्रीहंसराजस्वामी यांनी ‘वेदेश्वरी’ या ग्रंथामध्ये उपदेशिले आहे. उदा. रामाने पित्राची आज्ञा पाळली, आपण वेदाज्ञा पाळावी; रामाने भरताला राज्य समर्पिले, आपण आपले जीवन प्रारब्धावर सोपवावे; रामाने वनवास भोगला, आपण एकान्त सेवावा; रामाने त्राटिकेचा वध केला, आपण आशा मारावी; रामाने यज्ञरक्षण केले, आपण धर्माचरण रक्षावे; राम ऋषिसंघात वर्तला, आपण सत्संग धरावा; रामाची सीता रावणाने हरण केली होती, आपल्या जीवाची स्वानुभूती अहंकाराने नेली आहे; रामाने सीतावियोगाची खंत केली, आपल्याला देवभेटीची तळमळ असावी; रामाला लक्ष्मणाचे साह्य होते, आपण लक्षपूर्वक वैराग्याचे संरक्षण करावे; रामाने देह कष्टविला, आपण कायेने गुरूसेवा करावी; रामाने शिवाचे ध्यान केले, आपण गुरूचे ध्यान करावे. रामाने शिवकृपेने पाशुपतास्त्र मिळवले, आपण गुरुकृपे अभेदज्ञान वस्तुतंत्र (आत्मा सर्वव्यापक आहे, हे सानुभव ज्ञान) मिळवावे; रामाने मारुतीहाती सीतेचा शोध केला, आपण विवेकपूर्वक स्वानुभूती ठायी पाडावी; रामाला बिभीषण शरण आला, आपल्याला सत्त्वगुणाचे साह्य लाभले पाहिजे; रामाने सेतु बांधला, आपण दृढ अभ्यासाने साधनसंपत्ती वाढवावी; राम समुद्रापल्याड उतरला, आपण मोहाचे पार जावे; राम त्यावेळी अहोरात्र युद्धविचार करत होता, आपण श्रवणमनन करावे. राम त्रिकुटावर उठावला, आपण स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहांना जिंकावे (म्हणजे आत्मरूप आपण श्रीगणपतीप्रमाणे देहत्रयातीत आहोत, असे अनुभवावे); रामाने कुंभकर्णाचा वध केला, आपण तमअहंकार नष्ट करावा; रामाने कुंभकर्णाचे कुंभ व निकुंभ हे पुत्र मारले, आपण आळस व प्रमाद यांना दवडावे; लक्ष्मणाहाती इंद्रजित मेला, आपण वैराग्याने काम संपवावा; मारुतीने त्रिशिराला मारले, आपण विवेकाने क्रोधास मारावे; रावणाचा बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध पडला त्यावेळी हनुमानाने वनस्पती आणून दिली, आपले वैराग्य नष्ट होऊ पहात असेल तेव्हा आपण ते विवेकाने जागृत ठेवावे; रामाने रावणाचा वध केला, आपण रजअहंकाराचे निर्दाळण करावे; रामाने बिभीषणाला राज्य दिले, आपण सत्त्वगुणाला प्रतिष्ठा द्यावी; रामाने सीता आणली, आपण जीवाला स्वानुभूतीपूर्वक आत्म्राशी एकरूप करावे; राम पुष्पक विमानात बसला, जीवरूप आपण अपरोक्ष ज्ञानारूढ व्हावे; राम अयोध्येला परत आला, आपण अभयपद प्राप्त करून घ्यावे; रामाचे अवतारकार्य संपले, (पूर्णकाम झालेल्या) आपले साधन गळावयास हवे; नंतर रामाने निष्कंटक राज्य केले, आपण जीवन्मुक्तिसुख भोगावे; राम निजधामाला गेला, आपण विदेहकैवल्य पावावे. असे आचरण करतात ते रामच होतात, असे उपदेशवजा विधानही श्रीहंसराजस्वामींनी सदर ‘अध्यात्मरामारण’नामक निरुपणान्ती केले आहे.

कथिली मुक्ताईंना । करा ती साधना ॥

श्रीहंसराजस्वामींनी उपदेशिल्याप्रमाणे आचरण करणारास, विश्वनिर्माता आत्माच या साऱ्या विश्वपसाऱ्याहून ‘न्याराही न्यारा’ असलेला ‘चौथा राम’ होय, असा अनुभव येतो. ‘सर्वातुनी वेगळा’ असलेला तो हाती कसा येईल, म्हणजे देव होण्यासाठी काय करायचे, ते सांगा दादा’, असे श्रीमुक्ताई म्हणतात. त्यावेळी श्रीज्ञानदेवांनी त्यांना केलेला उपदेश म्हणजे ‘ज्ञानेश्वराची सनद’ होय. या सनदीत असलेले गुह्यज्ञान श्रीकबिरांनी चार युगी सांगितले व श्रीनामदेवांनाही लाधले, असा तिचा (पर्यायाने तिच्यात संक्षिप्तपणे उल्लेखिलेल्या ‘थोर भक्ती’मार्गाचा) महिमाही त्यांनी शेवटी सांगून ठेवला आहे. ‘सर्वांतुनी वेगळा’ म्हणजे ‘इंद्रियां वेगळा मन बुद्धी निराळा’ होय, असे या सनदीत स्पष्ट होते. ‘मी देह, मन, बुद्धी आहे’ असा अज्ञानामुळे जीवाचा गैरसमज झालेला असतो. तो श्रीसद्गुरूंच्या कृपाछत्राखाली निरहंकारपणे करत असलेल्या सोऽहंसाधनेत लय पावू लागतो. श्रीमुक्ताईंप्रमाणे स्वदेहातील मूलाधारचक्रावर गणपतीची स्थापना करून षडचक्रे ओलांडीत तो जीव ब्रह्मांडातील आत्मदेवाशी एकरूप होतो.

विश्ववृक्षाचे मूळ । परमात्मा निश्चळ ॥

पंच महाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आणि त्यांचे दहा विषय, मन, सुख, दु:ख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना व धृति या छत्तीस तत्त्वांचा बनलेला आपला देह म्हणजे गीता-ज्ञानेश्वरीत वर्णिलेला अश्वत्थ वृक्ष होय. देहरूपी वृक्षच ऊर्ध्वमूल आहे. म्हणजेवर आपल्या मेंदूच्या पोकळीत असलेल्या सहस्त्रदलकमलात आकाशाप्रमाणे राहणारा आत्मारूपी हरी हा या वृक्षाचे मूळ होय. हे मूळ श्रीकबिरांच्याही हातीं आले होते, ते त्या वृक्षाच्या ‘मुळीचिया ठायां बसून’ होते. श्रीज्ञानदेवांच्या ‘हरिपाठातील’ भाषेत सांगायचे तर, ‘करतळीं आवळा तैसा तो हरी’ त्यांना दिसत होता. अर्थात आत्मारूपी मूळापासून पुढे विस्तार पावलेल्या आपल्या देहरूपी वृक्षाचेही सम्यक ज्ञान त्यांना झाले होते. सत्शिष्यांनाही देहरूपी क्षेत्र हा आपल्या आत्म्याचा विस्तार आहे, असे अनुभवास येते. नंतर श्रीसद्गुरूंचा परमकृपाप्रसाद लाभून त्यांना परमात्मस्वरूप प्राप्त होते व देहाबाहेरील ‘विश्वदेखील’, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे, ‘ममात्म्याचाच विस्तार आहे’, असे अनुभवास येते. म्हणूनच, उदा. देहात व देहाबाहेर सर्वत्र एक आत्मदेवच आहे, हे अनुभवगम्य सत्य ‘किंबहुना चराचर आपणचि जाहला’ या ओवीभागातून श्रीज्ञानेश्वरांनी व्यक्त करून ठेवले आहे. त्यांनी आपल्या ‘हरिपाठात’ उल्लेखिलेली ‘जीवनकलेची साधना’ करून त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही चराचर व्यापून उरलेल्या म्हणजे ‘शेष’ अशा त्या आपल्या देवस्वरूपाचा अनुभव घ्यावयाचा आहे. 

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................         

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 10 March 2019

सुंदर लेख आहे. हंसराज स्वामींचा उपमामय उपदेश आवडला. आपलं शरीर हेच मुळी आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. पण डोळे उघडून बघायला पाहिजे ना. ज्ञानाने, भक्तीने वा योगाने कशानेही का होईना फक्त डोळे उघडले पाहिजेत. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......