टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • योगी आदित्यनाथ, मनू महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महादेव जानकर आणि प्रीती झिंटा
  • Sat , 06 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या योगी आदित्यनाथ Yogi Adityanath मनू महाराज Manu Maharaj पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan महादेव जानकर Mahadev Jankar प्रीती झिंटा Preity Zinta

१. उत्तर प्रदेशात कट्टरतावादी हिंदू संघटनांच्या वाढत्या उच्छादावरून करण्यात येत असलेल्या टीकेला आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. एखाद्याने आमची बदनामी करायचीच ठरवले असेल तर आमचा नाईलाज आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सहारनपूर आणि आग्रा येथे काही दिवसांपूर्वी भाजप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले होते. यावेळी एक खासदार आणि पोलीस अधिकारी जखमी झाला होता. तसेच गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात स्वयंघोषित गोरक्षकांचा उपद्रवही वाढला आहे. बुलंदशहरमध्ये नुकतेच हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आले. उत्तर प्रदेशात कोणताही भेदभाव नसून कायद्याच्या राज्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कोणीही असुरक्षित नाही, हे मी हमी देऊन सांगू शकतो, असे ते म्हणाले.

करेक्टाय. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे आणि कायदा गोरक्षकांच्या, हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या हातात आहे, हे इतरांनी, अगदी पोलिसांनीही लक्षात घेतलं पायजेलाय. या संघटना जे काही करतील, तो कायद्याच्या अंमलबजावणीचाच भाग आहे, हे लक्षात घेतल्यास या संघटनांच्या बदनामीचा विषयच उदभवणार नाही. बदनाम सही नाम तो हुआ, हे त्यांना माहिती असल्याने बदनामीने असाही त्यांना काही फरक पडणार नाही.

................................................................................................

२. हिंदी चित्रपटसृष्टी सोडून वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आपण सिनेमांवर पाणी सोडून आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघ घेतला. एकदाही आयपीएल न जिंकलेल्या या संघावर सुरुवातीपासूनच खूप विश्वास आहे. हा संघ हा माझ्या मुलासारखाच आहे म्हणूनच या संघासोबत जास्तीत जास्त सामने जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे, असं प्रख्यात अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली.

हिंदी सिनेमातली सद्दी संपुष्टात आल्यानंतर आपण पोटापाण्याचा आणि चर्चेत राहण्याचा एक ग्लॅमरस मार्ग म्हणून आयपीएलचा संघ विकत घेतला, असं प्रीती म्हणाली असती, तर ते तिच्या प्रांजळ आणि प्रामाणिक प्रतिमेला शोभून दिसलं असतं. बाकी संघावरची आणि खेळाडूंवरची तिची माया अधूनमधून मैदानात उतू जात असते आणि या संघाचे सामने पाहणारे लोक अनेकदा त्या वात्सल्याच्या क्षणांकडेच डोळे लावून बसलेले असतात, हे खरंच आहे.

................................................................................................

३. बिहारमधील दारूबंदीमुळे, इतरत्र होते तशी सहजगत्या उपलब्ध असलेली दारू फक्त अनावश्यक महाग आणि घातक बनली आहेच. त्याचबरोबर राज्यातील उंदीर दारूच्या अधीन झाले आहेत! पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उंदरांना दारूची चटक लागल्याची तक्रार एका ठाणे अंमलदाराने केली. पोलिसांच्या मालखान्यात (जप्त केलेल्या वस्तू ठेवण्याची जागा) ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उंदीर खाली पाडून फोडतात आणि त्यातील दारू पितात, असा या ठाणे अंमलदाराचा दावा आहे. जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मालखान्यात सीलबंद करून ठेवलेल्या दारूच्या सर्व बाटल्या उघडून उंदरांनी सर्व दारू फस्त केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. गेल्या वर्षी पाच एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून घालण्यात आलेल्या छाप्यांत पाच लाख लिटरहून अधिक विदेशी दारू, तीन लाख लिटर देशी दारू आणि बारा हजार लिटर बिअर असा साठा जप्त करण्यात आला. 

बिहारचे उंदीर मालखान्यातली दारू पिऊन टाइट झाल्यानंतर खाकी कपडे घालून अंमलदार म्हणून ठाण्यात वावरतात की काय, याची चौकशी व्हायला हवी. कारण, दारू उंदीर पितात आणि वास यांच्या तोंडाला येतो, अशी अजब गंमत आहे. काही काळाने उंदीर ब्लॅकमध्ये दारूविक्री करतात, असंही मनूमहाराजांना ऐकावं लागणार आहे. दारू प्यायल्यावर उंदरांमध्ये तेवढी अक्कल आपोआपच येणार, हे कोणताही अस्सल मद्यप्रेमी छातीठोकपणे सांगू शकेल.

................................................................................................

४. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावर गेल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. या मंत्र्यांना तातडीने परत बोलाविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

सांगा पाहू मुलांनो याचा अर्थ काय? करेक्ट. या मंत्र्यांनी शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलेलं नसणार आणि काँग्रेसच्या ज्या आमदारांना सोबत नेलंय ते टीका करणाऱ्यांच्या विरोधी गटातले असणार. बाकी या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही खरं तर काहीच बोलता कामा नये. २००९मध्ये आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी असा संवेदनशील काळात असंवेदनशील दौरा आखला होता, तेव्हा आताच्या सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती आणि तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी तिला भीक न घालता दौरा पूर्ण केलाच होता.

................................................................................................

५. मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी हे विधान केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

सत्तारोगाची लागण झाली की भलेभले कार्यकर्तेही कसे बहकतात, ते जानकरांकडे पाहून कळतं. आपल्यावर एका समाजाचा शिक्का मारू नका, असं म्हणण्याजोगं विविधांगी काम ज्यांनी केलं आहे, ते शरद पवारही जिथे अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात व्यतीत केल्यानंतरही ‘मराठा स्ट्राँगमन’च राहतात, तिथे जानकरांची काय कथा? बाकी याच भाषणात, पुढच्याच श्वासात जानकरांनी कोणता विषय मांडला, तर धनगर आरक्षणाचा. ही त्यांच्या सर्वसमावेशकतेची ग्वाही म्हणावी की काय?

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......