राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘मनस्वी’ आनंदात उगाच मिठाचा खडा टाकण्याचा ‘कर्मदरिद्रीपणा’ करायलाच हवा का?
पडघम - देशकारण
एक निरीक्षक
  • डावीकडे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांनी ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करताना | उजवीकडे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर आडवाणी यांच्यासह, शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 02 April 2024
  • पडघम देशकारण लालकृष्ण आडवाणी Lal Krishna Advani भारतरत्न ‌Bharat Ratna द्रौपदी मुर्मू Droupadi Murmu

आज २ एप्रिल, म्हणजे ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’. २०१७पासून २ एप्रिल हा दिवस ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’ ही संस्था जगभरातल्या काही फॅक्ट चेकिंग संस्थांच्या सहकार्याने साजरा करते. १ एप्रिल हा जगभर ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतरचा हा दिवस, त्यामुळे त्याचे औचित्य वेगळ्याने अधोरेखित करण्याची गरज नाही. विद्यमान केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या काळात प्रत्येक दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जात असल्याचा कुत्सितपणा काही लोक करतात, पण त्यावर अधिक भर न देता, त्याच्या जरा आधीच्या दिवसाकडे वळू या…

तर ३० मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भाजपनेते’ लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला. या समारंभाची छायाचित्रं लगेचच ट्विटरवर प्रसारित होऊन त्यावर भरपूर टीकाटिपणी सुरू झाली. मोदीविरोधक, मोदी सरकारविरोधक, भाजपविरोधक, संघविरोधक, हिंदुत्वविरोधक यांची नेहमीचीच आपली ओरड. राष्ट्रपतीपदाची ‘गरिमा’ राखली नाही, राष्ट्रपतींनी उभं राहून भाजपनेते आडवाणी यांना पुरस्कार प्रदान केला, त्या वेळी आडवाणी यांच्या शेजारी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीतच बसून राहिले होते. नंतर प्रसारमाध्यमांसाठी जी छायाचित्रं काढली गेली, त्यातल्या एकात राष्ट्रपती अंग चोरून, काहीशा बापुडवाण्या स्थितीत भाजपनेते आडवाणी यांच्या शेजारी उभ्या दिसतात वगैरे वगैरे.

काही ऑनलाईन पोर्टल्स आणि काही वर्तमानपत्रांनी ‘फॅक्ट चेक’ करून तसं काही झालं नसल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रपती भवनानेही हा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसारच झाला असून त्यात काहीही अनुचित घडलं नसल्याचा खुलासाही केलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यातही राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करत असताना प्रेक्षकवृंदात बसलेल्या पंतप्रधानांसह सर्व जण बसूनच होते. त्यामुळे ट्विटरपंडितांच्या वावदूक टीकेकडे दुर्लक्ष करायला हवं.

आडवाणी ९६ वर्षांचे आहेत. त्यामुळे ते राष्ट्रपती भवनात झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, हे तसं समजण्यासारखं आहे. त्यात फक्त माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर या हयात नसलेल्या व्यक्तींनाच पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी स्वीकारले. पण आडवाणी या सोहळ्याला उपस्थित राहिले असते, तर तेच या सोहळ्याचे खरे सत्कारमूर्ती ठरले असते. एवढ्या भव्य, देखण्या सोहळ्यात ‘भारतरत्न’सारखा पुरस्कार स्वीकारताना आडवाणी यांनाही मनस्वी आनंद झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान करण्यासाठी जो वेळ लागला, त्यापेक्षा कमी वेळात आडवाणी यांनी सन्मानित करता आले असते. कारण राष्ट्रपतीभवनात प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळला जातो.

त्यामुळे असा प्रश्न पडतो की, आडवाणी यांचं प्रकृतिअस्वास्थ्य हेच ते राष्ट्रपतीभवनातल्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचं मुख्य कारण होतं की, इतर कुठलं? बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं होऊ द्यायचं नसावं. ‘फोकस’ जराही हळू न देण्याचं त्यांचं एकंदरीत ‘कसब’ पाहता, ही शंका रास्त वाटते. असो. नाही म्हणायला पुरस्कार तर दिलाय, पण त्याचा ‘सोहळा’ होऊ न देता! ‘हेचि फल काय मम तपाला’ असा प्रश्न आडवाणी यांना पडला असेल का?

आडवाणी यांच्या घरी झालेल्या सोहळ्यात आडवाणी आणि पंतप्रधान मोदी खुर्चीत बसलेले दिसतात. दुसऱ्या एका छायाचित्रात राष्ट्रपती आडवाणी-मोदी यांच्यापासून थोड्याशी अंतरावर एका खुर्चीत बसलेल्या दिसतात. त्यावरही काही ट्विटरपंडितांनी आक्षेप घेतला. मुद्दामहून त्यांना लांब बसवलं, त्यांना वेगळी खुर्ची दिली वगैरे. तर त्यातही अर्थ नाही. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार त्यांची खुर्ची वेगळी असली, तरी आडवाणी-मोदी यांच्या खुर्च्यांपेक्षा मोठी होती आणि त्यांच्या आसनव्यवस्थेखाली कॉर्पेट टाकलेलं होतं. त्यामुळे त्यांना मुद्दामहून वेगळी वागणूक दिली, या दाव्यातही तथ्य नाही. उलट त्यांना यथास्थित वागणूक दिली गेली.

पण या घरगुती सोहळ्यातली गंमत वेगळीच आहे. एका छायाचित्रात पंतप्रधान मोदी यांनी आडवाणी यांचा हात हातात घेतलेला दिसतो. मोदी गालातल्या गालात हसत आहेत, तर आडवाणी यांच्या चेहऱ्यावर मात्र फारसे कुठलेही भाव दिसत नाहीत. ९६ वर्षांच्या व्यक्तीकडून फार हर्ष-उल्हासाचं प्रदर्शन घडवण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, हे खरं. पण त्यांनी फार समाधानानं हा पुरस्कार स्वीकारला, याचा आनंद तरी निदान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला हवा होता. तसं काही या सोहळ्याची जी छायाचित्रं आणि व्हिडिओ प्रसारित झाले आहेत, त्यातून तरी दिसत नाही.

हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत स्वीकारताना त्यांच्या मनात द्वंद्व चाललं असावं का? आडवाणी हिंदी सिनेमे पाहत होते की, नाही माहीत नाही. जर पाहत असतील आणि त्यांनी तिंगमांग्शू धुलिया यांचा २०११ साली आलेला ‘शागीर्द’ हा सिनेमा पाहिला असेल, तर त्यांना तो नक्कीच आठवला असता.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आडवाणी यांनी म्हटलं की,“ ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. ज्या आदर्श आणि सिद्धान्तांची आपण आयुष्यभर सेवा केली, त्याचा हा सन्मान आहे.’’ आडवाणी यांनी नेमके कुठले आदर्श आणि सिद्धान्त यांची आयुष्यभर सेवा केली, याची उजळणी करण्याची ही वेळ नाही. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ज्या कुठल्या आदर्श व सिद्धान्तांची उजळणी केली, त्यांचं गेल्या दहा वर्षांत त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या मोदींनी काय केलं? ती अजून उंचीवर नेली की, त्यांचा सपशेल पराभव केला, याबद्दल त्यांच्यासारख्या धुरंधर ज्येष्ठ व्यक्तीनं काही बोलावं, अशी अपेक्षा होती. पण तीही तशी अनुचितच म्हणायला हवी. गेल्या दहा वर्षांत आडवाणी कधी बोलले आहेत, ते आता बोलतील!

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया तर अजूनच मासलेवाईक म्हणावी लागेल. ते म्हणाले, ‘‘जनसेवेसाठी समर्पण आणि आधुनिक भारताला आकार देण्यातील त्यांची निर्णायक भूमिका, यामुळे इतिहासावर अमीट ठसा उमटवला आहे. गेली अनेक दशkx त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. हा सन्मान म्हणजे देशाच्या विकासात त्यांच्या चिरकालीन योगदानाला मिळालेली पावती आहे.”

‘आधुनिक भारता’ला आकार देण्यात आडवाणी यांनी नेमकी कुठली निर्णायक भूमिका निभावली, याचा जरा शोध घ्यायला हवा. कारण हा पूर्णपणे संशोधनाचाच विषय आहे. आडवाणींनी ‘देशाच्या विकासात चिरकालीन योगदान’ दिलं, असंही मोदी म्हणाले. ते नेमकं कुठलं? रथयात्रा काढून देशात जातीय तणाव निर्माण करणं, हे? की, बाबरी मशिदीच्या विध्वंसात सक्रिय सहभाग घेऊन देशभर जातीय द्वेष-तिरस्काराचं वातावरण निर्माण केलं, हे? अर्थात मोदींच्या दृष्टीकोनातून हेसुद्धा ‘चिरकालीन योगदान’ असूच शकतं.

पण आपला मूळ मुद्दा हा नाही. तो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सोडून आडवाणी यांच्या घरी जाण्याचा. राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे पद सर्वोच्च मानलं जातं. त्यामुळे पंतप्रधानांसह सगळं मंत्रीमंडळ, विरोधी पक्षनेते, इतकंच काय पण परदेशी पाहुणे, हे सर्वजण राष्ट्रपतींना भेटायला राष्ट्रपतीभवनात जातात. राष्ट्रपती त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी वा कार्यालयात जात नाहीत, असाच आजवरचा इतिहास सांगतो. त्यामुळे राष्ट्रपतींनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाण्याची गरज होती का? ते त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये बसतं का?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कदाचित आडवाणी यांच्या वयाचा विचार करता, प्रोटोकॉलमध्ये न बसणारा हा बदल केला गेला असावा. अर्थात त्यामुळे बिघडत काहीच नाही. या देशात गेल्या ७५ वर्षांत जे काही बिघडवलेलं आहे ते सगळं पं. नेहरू आणि काँग्रेसने आणि जे काही ‘नवनिर्माण’ केलंय ते विद्यमान पंतप्रधान मोदी यांनीच केलेलं आहे! असो, तर राष्ट्रपतींना उलट आनंदच झाला असणार. राष्ट्रपती ‘भाजप’च्या, ‘भारतरत्न’ पुरस्कारप्राप्त आडवाणीही भाजपचेच आणि पंतप्रधान मोदीही भाजपचेच. म्हणजे ‘भाजप’च्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भाजपनेते’ आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला. त्या वेळी ‘भाजप’चे पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हा घरचाच समारंभ होता. त्यामुळे त्यांचा उर अभिमानानं भरून आला असावा.

तसंही राष्ट्रपती झाल्यापासून त्यांना राष्ट्रपतीभवन सोडून फारसं कुठं जाता येत नाही. देशातल्या कुठल्याही संस्थांची वा कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारता येत नाहीत, त्यांना उपस्थित राहता येत नाही. इतकंच काय पण परदेशी दौरेही करता येत नाहीत. सारखं आपलं राष्ट्रपतीभवन एके राष्ट्रपतीभवन. या प्रासादतुल्य भव्य वास्तूत राहून राहून त्यांनाही कंटाळा येत असणार.

शिवाय याआधीच्या राष्ट्रपतींना देशभरातले आणि देशाबाहेरचेही कितीतरी नेते, विद्वान, पंडित, मुत्सद्दी भेटायला येत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या नशिबातही तेही योग दिसत नाहीत फारसे. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपतीभवनाऐवजी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते म्हणे! त्यामुळे आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना स्वहस्ते ‘भारतरत्न’ प्रदान करण्याच्या निमित्तानं का होईना, पण राष्ट्रपतीभवनाबाहेर पडून जरा पाय मोकळे करता आले, याचा राष्ट्रपती मुर्मू यांना मनस्वी आनंदच झाला असणार. त्यांच्या त्या आनंदात उगाच मिठाचा खडा टाकण्याचा कर्मदरिद्रीपणा करायलाच हवा का?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......