नीतिन पवार : परिवर्तनाच्या चळवळीतील संघर्षयात्री
पडघम - सांस्कृतिक
दत्ता काळबेरे
  • नीतिन पवार आणि त्यांची काही आंदोलने
  • Tue , 16 January 2024
  • पडघम सांस्कृतिक नीतिन पवार Nitin Pawar महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका)च्या २०२३च्या ‘सामाजिक प्रश्न, विशेष कार्य पुरस्काराने’ काल १६ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात पुण्याचेे सामाजिक कार्यकर्ते नीतिन पवार यांना समारंभपूर्वक गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्मुद्रण....

.................................................................................................................................................................

नीतिन पवार यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६७ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे माता-पिता अल्पशिक्षित, कष्टकरी होते. किशोरवयातच पितृछत्र हरपल्यामुळे त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. ‘कमवा व शिका’ हे वास्तव स्वीकारून त्यांनी शालांत परीक्षा-छपाई तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि कला शाखेचे शिक्षण प्राप्तीसाठी मोठा संघर्ष केला.

पुणे महानगरपालिकेच्या मुद्रणालयात नोकरी करत असताना साक्षरता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारी एक हस्तपत्रिका त्यांच्या वाचनात आली, आणि त्यांच्या जीवनाला नवीन प्रेरणा मिळाली. नोकरी जवळपास सोडून देऊन साक्षरतेच्या ‘भारत विज्ञान समिती’ या चळवळीचे ते पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. पण त्यांचे काम बघून पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या आमंत्रणावरून पुणे शहर साक्षरता मोहीम-अक्षर आंदोलनाचे नीतिन पवार मुख्य समन्वयक झाले. या मोहिमेमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले.

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या जाणिवेतून साक्षरता मोहिमेमध्ये वस्ती पातळीवर व जिल्हा आणि महाराष्ट्र पातळीवरही त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले. कष्टकरी निरक्षरांसाठी क-कामाचा, घ-घामाचा, भ-भाकरीचा, स-समतेचा अशी अभिनव वर्णमाला-बाराखडी त्यांनी तयार केली.

मानवी जीवनातील खरे खुरे प्रश्न आणि वास्तव परिस्थिती समजावून घेण्यासाठी साक्षरता मोहिमेतील अनुभव साहाय्यकारी झाले पाहिजेत. साक्षरता ही केवळ अक्षर, अंक ज्ञानापुरती मर्यादित न राहता तिने जीवन साक्षरतेचे उद्दिष्ट गाठले पाहिजे, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम व साक्षरतेचे विविध उपक्रम, रेशनपासून रोजगारापर्यंतच्या कार्यक्रमांची त्यांनी योजनापूर्वक मांडणी केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

निरक्षरांना केवळ अक्षर ज्ञानच नव्हे तर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत, यासाठी त्यांनी प्रभावी चळवळ उभारली. नवसाक्षरांची अभिनव लोकसभा भरवली. तुरुंगातील निरक्षर बंदीजन तर पुढे जाऊन पदवीधर झाले. तसेच निरक्षर महिला आधी साक्षर होऊन चौथी पास झाल्या. अक्षर आंदोलनाचे १९९१ ते १९९७ या काळात प्रभावी व समर्थ नेतृत्व केले.

या मोहिमेतील कलाजथ्यांद्वारे स्त्री-पुरुष, सामजिक, आर्थिक समता, धर्मनिरपेक्षता, बंधुतेची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. यातूनच बाबरी पाडली गेल्यावर ऑगस्ट क्रांती सुवर्णमहोत्सवात सामाजिक सौहार्दासाठी भारतातील पहिल्या व कदाचित एकमेव अशा लोकप्रतिनिधींच्या माणूस या पथनाट्याची निर्मिती झाली. तीन कि.मी. लांब मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.

साक्षरता मोहिमेतील अनेकविध अनुभवांमुळे नीतिन पवारांना त्यांचे जीवनध्येय गवसले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये पूर्ण वेळ सहभागी होण्यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. नंदिनीने- नीतिनच्या सुविद्य जीवनसाथीच्या प्रोत्साहन व आधारानेच हे होऊ शकले. आंतरजातीय विवाह केल्यामुळे उभयतांच्या नातेवाइकांची व त्यांची नाती तुटली होती. या खडतर पार्श्वभूमीवर, कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दानुसार ‘तेल नाही, आधाराचा हात नाही, तेथे एक दिवा लावू, ज्याच्या घरी काही नाही, अंधारावाचून काहीच नाही, तेथे एक दिवा लावू!’ हे जीवनव्रत या ध्येयवादी दाम्पत्याने मनोमन स्वीकारले आणि दृढनिश्चयी वाटचाल केली.

१९९७मध्ये महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तप्त होते. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आणि माहितीचा अधिकार चळवळीत नीतिन पवारांनी उडी घेतली. अण्णा हजारे, बाबा आढाव, ग. प्र. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ‘जनआंदोलन’ या मुखपत्राची संपादकीय जबाबदारी स्वीकारली. या न्यासाचे सर्वांत तरुण निमंत्रित विश्वस्त म्हणून मंत्र्यांची, नेत्यांची, अधिकाऱ्यांची ‘भ्रष्ट प्रकरणे’ निर्भयपणे वेशीवर टांगली. भ्रष्टाचार विरोधात विविध आंदोलने, चळवळी, लढ्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले.

जनआंदोलनाला संघटनात्मक चौकट देण्यासाठी बाबा आढाव, ग. प्र. प्रधान सर, पन्नालाल सुराणा यांच्यासमवेत राज्यभर कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. या महाराष्ट्रव्यापी आंदोलनामुळे काही भ्रष्ट मंत्र्यांची गच्छंती झाली. राजस्थान, गोव्यानंतर प्रथमतः महाराष्ट्र व २००५ साली केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याची निर्मिती केली आणि या आंदोलनाची यशस्वी फलश्रुती झाली.

नीतिन पवार यांनी गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये असंख्य आंदोलने केली. धरणे, मोर्चे, जेलभरो, उपोषणे इत्यादी सनदशीर मार्गाने शोषित समाज घटकांच्या अनेक मागण्या धसास लावल्या. केंद्र सरकारने २००८मध्ये ‘सामाजिक सुरक्षा कायद्या’ची निर्मिती केली. त्यामागे कष्टकऱ्यांच्या या असंख्य आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. कष्टकऱ्यांचे हे आंदोलन केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांनी ‘राष्ट्रीय हमाल पंचायत’ स्थापन केली आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्याबरोबर गेल्या २५ वर्षांपासून नीतिन पवार विविध चळवळींमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी, अंध-अपंगांच्या संघटना, मोलकरीण पंचायत इत्यादी कष्टकऱ्यांना संघटित करून त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी प्राण पणाला लावून झुंजत आहेत. ‘हर जोर तुल्मके टक्कर में, संघर्ष हमारा नारा हैं’ हे त्यांचे केवळ घोषवाक्य नाही, जीवनाचा मंत्र आहे.

बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी २००३मध्ये नीतिन पवार यांनी ‘बांधकाम मजदूर सभे’ची स्थापना केली. विविध आंदोलने करत पुणे महानगरपालिकेचा बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियम तयार करण्यास भाग पाडले. ४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २००६ या ४० दिवसांमध्ये समताभूमी, पुणे ते दीक्षा भूमी नागपूर अशी रोज एक या प्रमाणे महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये कष्टकऱ्यांची सामाजिक सुरक्षा रॅली आयोजित केली.

कलाजथे, पोस्टर प्रदर्शन, सभा, घर बांधणारे बेघर व कष्टकऱ्यांची सावली अशा अभ्यास पुस्तकांतून व १०० कार्यक्रम-सभांतून दीड लाख कष्टकऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान जिल्हानिहाय ३० पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे विधिमंडळावर प्रचंड मोर्चा नेला. रॅलीचा उद्देश सफल झाला. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना जानेवारी २००७मध्ये कायदा मिळाला. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले. आज या मंडळामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. लक्षावधी बांधकाम कामगारांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळत आहे.

पुण्याजवळील केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शेतमजुरांना किमान वेतनही मिळत नव्हते. नीतिन पवार यांनी या शेतमजुरांचे संघटन केले, प्रदीर्घ आंदोलन केले आणि त्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय आणि दिवाळीला बोनस इत्यादी सद्यस्थितीत अविश्वसनीय वाटणारे हक्क मिळवून दिले.

असाच अनुभव रिक्षा चालकांच्या चळवळीचाही आहे. रिक्षा चालकांच्या संघटनांच्या राज्य कृती समितीचे ते सरचिटणीस आहेत. रिक्षा चालकांचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची मागणी, पाठपुरावा व त्याच्या ७ सदस्यीय शासकीय अभ्यास समितीचे सदस्य म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

नीतिन पवारांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी सभा पुण्यात गेल्या १५ वर्षांपासून अखंडपणे विविध आंदोलने करीत आहे. अंगणवाडी सेविकांना मासिक १०,०००/- रुपये आणि मदतनीस महिलेला ५५००/- रुपये मानधन सध्या मिळत आहे. सेवानिवृत्ती लाभ एक लाख रुपये आणि मदतनीस महिलेला ७५,०००/- रुपये पर्यंत मिळत आहे. चिखली, पिंपरी-चिंचवड मध्ये घरकुल योजनेत ८० अंगणवाडी सेविकांना एक बीएचकेची सदनिका सवलतीच्या किमतीत मंजूर झाली आहे. त्यापैकी ४० भगिनींना सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा मिळालेला आहे.

महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रभावामुळे त्यांचे कार्य स्त्री केंद्रित राहिले आहे, आपल्या सर्वांच्या जगण्यातील स्त्रीचे दुय्यम स्थान कुठे आहे, याचा तपास घेऊन त्यात बदल केला पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. त्यातूनच आई-बहिणीवरून शिवी देणार नाही घेणार नाहीचे शपथ कार्यक्रम, मुलग्यांनी कपडे घुण्याचे जाहीर कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. आई-बहिणीवरून शिवी देणाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारा मोर्चाही आयोजित केला गेला. पुणे महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांना मुकादम पदावर नियुक्ती मिळालेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या १७० वर्षांच्या इतिहासात असे प्रथमत:च घडले आहे.

महात्मा फुले, समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस व कार्याध्यक्षपदावरून त्यांनी विविध चळवळींचे-आंदोलनाचे नेतृत्व केले. फुले-आंबेडकर व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन केले.

महात्मा फुले, सावित्रीबाई व फातिमा बेग यांनी १७५ वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्या शाळेची वास्तू भग्नावस्थेत होती. त्या शाळेचे, भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी नीतिन पवारांनी सातत्याने आंदोलने केली. नुकतीच त्यांची यशस्वी फलश्रुती झाली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे नजीकच्या काळात भव्य राष्ट्रीय स्मारक प्रत्यक्षात साकार होणार आहे. तीच गोष्ट बिबवेवाडी येथे उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारक नाट्यगृहाची.

जयपूर येथील उच्च न्यायालयासमोर मनुस्मृतीचा निर्माता ‘मनू’चा पुतळा उभारण्यात आला आहे. विषमतेचे प्रतीक असलेला हा पुतळा हटवण्यात यावा, या मागणीसाठी महाड ते जयपूर असा शेकडो किलोमीटर अंतराचा डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्याचे यशस्वी नियोजन नीतिन पवार यांनी केले होते.

महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रभावामुळे त्यांचे कार्य स्त्री केंद्रित राहिले आहे, आपल्या सर्वांच्या जगण्यातील स्त्रीचे दुय्यम स्थान कुठे आहे, याचा तपास घेऊन त्यात बदल केला पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. त्यातूनच आई-बहिणीवरून शिवी देणार नाही घेणार नाहीचे शपथ कार्यक्रम, मुलग्यांनी कपडे घुण्याचे जाहीर कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. आई-बहिणीवरून शिवी देणाऱ्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारा मोर्चाही आयोजित केला गेला.

पुणे महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांना मुकादम पदावर नियुक्ती मिळालेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या १७० वर्षांच्या इतिहासात असे प्रथमत:च घडले आहे.

नीतिन पवार यांनी गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये असंख्य आंदोलने केली. धरणे, मोर्चे, जेलभरो, उपोषणे इत्यादी सनदशीर मार्गाने शोषित समाज घटकांच्या अनेक मागण्या धसास लावल्या. केंद्र सरकारने २००८मध्ये ‘सामाजिक सुरक्षा कायद्या’ची निर्मिती केली. त्यामागे कष्टकऱ्यांच्या या असंख्य आंदोलनांची पार्श्वभूमी आहे. कष्टकऱ्यांचे हे आंदोलन केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांनी ‘राष्ट्रीय हमाल पंचायत’ स्थापन केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

नीतिन पवार यांनी संघटनेची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला, इतर सहकाऱ्यांच्या सहभागाने महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्ली माथाडी व हमाल कायद्याचे प्रारूप तयार करून दिल्ली सरकारला सादर केले आहे. या कष्टकऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, उपदान, बोनस इत्यादी आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

नीतिन पवार यांनी ध्येयवादी व त्यागी वृत्तीने केलेल्या लोकसेवेला लोकमान्यता व राजमान्यता मिळाली आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात त्यांना ‘दिवंगत धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ मिळाला आहे. ‘छात्र भारती’चा ‘डॉ. अरुण लिमये युवा जागर पुरस्कार’, ‘लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार’, ‘अण्णाभाऊ साठे पुरस्कार’, ‘आवाबेन नवरचना केंद्रा’चा ‘सुमतीबाई साठे पुरस्कार’, ‘कॉ. दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार’, सोलापूरचा ‘सुशील स्नेह पुरस्कार’ इत्यादी अनेक सन्माननीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

स्त्री, दलित, आदिवासी, हमाल, कष्टकरी इत्यादी उपेक्षित आणि शोषित जनसमूह हे नीतिन पवार यांचे कार्यक्षेत्र आहे. लोकशाही, समाजवाद, इहवाद, विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करण्यासाठी अहर्निश कृतिप्रवण राहणे, हा त्यांचा ध्येयवाद आहे.

भारतीय संविधानातील ही मूल्य साकार व्हावीत, यासाठी ते सदैव कटिबद्ध आहेत. या सर्व चळवळीमागे त्यांच्या जीवनसाथी नंदिनी पाडपत्रीकर व मुले अमन व रोशनी यांचे प्रोत्साहन व सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख