संवाद ‘अर्जक संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती यांच्याशी
पडघम - सांस्कृतिक
राहुल थोरात
  • ‘अर्जक संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती, त्यांच्या संघाचे चार संस्थापक आणि संघाचे बोधचिन्ह
  • Mon , 15 January 2024
  • पडघम सांस्कृतिक अर्जक संघ Arjak Sangh शिवकुमार भारती Shivkumar Bharti महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका)च्या २०२३च्या ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्काराने’ आज १५ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात  उत्तर प्रदेशमधील ‘अर्जक संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार भारती यांना समारंभपूर्वक गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखतीचं हे पुनर्मुद्रण....

.................................................................................................................................................................

राहुल थोरात : तुम्हाला ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सुरुवातीलाच आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.

- धन्यवाद. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेने मला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल मी फाउंडेशनचे आणि पुरस्कार निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने मला पुरस्कृत करणे, हा माझा महाराष्ट्राच्या मातीने केलेला सन्मान आहे. तो मी नम्रपणे स्वीकारत आहे.

तुमच्याविषयी मराठी वाचकाला फारशी माहिती नाही तेव्हा...

- मी शिवकुमार भारती. ‘अर्जक संघा’चा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर या ऐतिहासिक शहरात सध्या राहतो. माझा जन्म एका समाजवादी पित्याच्या पोटी झाला. माझे वडील शिवनारायण कटियार हे डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासोबत काम करत होते. ते लोहियाजींच्या उत्तर प्रदेश सोशालिस्ट पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यामुळे समाजवादी विचारांच्या वातावरणातच माझे बालपण गेले. मी हिंदी भाषेमध्ये पदवीधर झाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. मी विद्यार्थी असतानाच ‘अर्जक संघा’शी जोडला गेलो. बहुजनांच्या सांस्कृतिक उत्थानासाठी काम करणारी उत्तर भारतातील ‘अर्जक संघ’ ही एक सत्यशोधक चळवळ आहे. ५५ वर्षांपासून उत्तर भारतात सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचार रुजवण्यामध्ये ‘अर्जक संघा’ची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

माझा हा पुरस्कार म्हणजे ‘अर्जक संघा’च्या कामाचा सन्मान आहे असे मी समजतो. या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्राला ‘अर्जक संघा’ची ओळख व्हावी म्हणून मी आपणास विनंती करतो की माझ्या वैयक्तिक ओळखीपेक्षा मी काम करत असलेल्या आणि ज्या संघटनेने मला घडवलं, त्या संघटनेची म्हणजेच ‘अर्जक संघा’ची ओळख आपण या मुलाखतीच्या द्वारे महाराष्ट्रातील वाचकांना करून द्यावी.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

- अर्जक म्हणजे अर्जन करणारा- कष्ट करणारा श्रमिक. अर्जक म्हणजे मजुरी किंवा श्रम करणारे लोक. ‘अर्जक संघा’चा सदस्य ब्राह्मणी संस्कृती नष्ट करून समतेवर आधारित मानववादाची प्रतिष्ठापना करून जात-वर्णविरहित संस्कृतीची स्थापना करू इच्छितो. अर्जक सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषणाला कारणीभूत असणाऱ्या श्रद्धा आणि प्रथा नाकारतो; विवाह आणि मृत्युसमयी ब्राह्मणाला बोलावत नाही. अर्जक जानव्याला उच्च वर्णाचे नव्हे, तर गुलामीचे प्रतीक मानतो. आदर दर्शवण्यासाठी ब्राह्मण व इतरांच्या पायाला स्पर्श करण्यास विरोध करतो.

उत्तर प्रदेशमध्ये महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामास्वामी पेरियार, संत कबीर यांचे समतावादी विचार रुजवण्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सोशालिस्ट पार्टीचे अर्थमंत्री असलेले रामस्वरूप वर्मा यांनी ‘अर्जक संघ’ या सामाजिक संघटनेची स्थापना १ जून १९६८ रोजी लखनऊ येथे केली. रामस्वरूप वर्मा हे लोहिया यांच्यासोबत राजकारणात काम करत होते, परंतु लोहियांची ‘जितनी संभव हो सके उतनी समता’ आणि वर्माजींची ‘संपूर्ण समता’ या मुद्द्यावर वाद-संवाद होऊन समाजात संपूर्ण समता स्थापनेच्या उद्देशाने वर्माजींनी ‘अर्जक संघ’ ही सांस्कृतिक-सामाजिक संघटना सुरू केली.

सध्या उत्तर प्रदेशात ‘अर्जक संघा’च्या ५० शाखा कार्यरत आहेत. तसेच १३००० सभासद आहेत. ‘अर्जक संघा’च्या प्रकाशन विभागाच्या वतीने ५०पेक्षा जास्त ग्रंथांची निर्मिती केली आहे. ‘अर्जक’ साप्ताहिकाचे दीड हजार वर्गणीदार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, दिल्ली या राज्यातही ‘अर्जक संघा’च्या शाखा कार्यरत आहेत.

तुमच्या संघटनेचा प्रमुख कार्यक्रम कोणता?

- आमच्या संघटनेचे तीन कार्यक्रम आहेत.

पहिला कार्यक्रम - सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे. आमची घोषणा आहे- ‘राष्ट्रपती का बेटा हो या चपरासीकी संतान - सबकी शिक्षा एक समान।’

दुसरा कार्यक्रम आहे - अर्जकाला म्हणजे कष्ट करून जगणाऱ्याला सन्मान मिळावा, उचित मेहनताना मिळावा. म्हणून आमची घोषणा. ही शपथ घेतल्यानंतर विवाह संपन्न होतो. ‘अर्जक संघा’च्या वतीने लग्न झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या ५५ वर्षांत उत्तर भारतात ‘अर्जक संघा’ने असे हजारो विवाह लावले आहेत.

‘अर्जक संघा'च्या स्थापनेनंतर १९६८ साली कानपूरमध्ये माझा पहिला विवाह अर्जक पद्धतीने झाला. त्या वेळी धार्मिक लोकांनी मोठा कोलाहल केला. हा विवाह धर्मानुसार नाही, म्हणून आम्ही अजून वधूवरांना कुंवारीच मानतो, असा प्रचार ते करू लागले. पण आज या विवाहांना समाजमान्यता मिळत आहे. मागील चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे एक आय.ए.एस. अधिकारी हिमांशू सिंग यांनी स्वत:चा विवाह अर्जक पद्धतीने केला होता. ‘अर्जक संघा’चे कार्यकर्ते आपल्या मुला-मुलींचे, आपल्या नात्यातील मुला-मुलींचे विवाह अर्जात पद्धतीनेच करण्यासाठी पुढाकार घेतात. मृत्यूनंतरच्या कर्मकांडांनाही ‘अर्जक संघ’ असाच ठामपणे विरोध करत आलेला आहे.

मंडल आयोगाची पार्श्वभूमी तयार होण्यातही ‘अर्जक संघा’चा वाटा होता. सर्वांना सामावून घेता येईल, असा सणांचा पर्याय ‘अर्जक संघा’ने दिला. शूद्रांना ताठ मानेने उभे राहता येईल, असे तत्त्वज्ञान दिले, आत्मविश्वास दिला. पन्नास वर्षांत अनेक लहान- मोठ्या संघटना वाढल्या आणि लयाला गेल्या; पण ‘अर्जक संघा’चे काम अव्याहत सुरू आहे. ‘अर्जक संघा’ने आत्मा-परमात्मा, ईश्वर, पुनर्जन्म, पाप-पुण्य नाकारून जाहीरपणे नास्तिकवादाचा पुरस्कार केला आहे; धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांचे पुनर्मूल्यांकन सुरू केले. ‘अर्जक संघा’ने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधान जनतेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात वर्ग संघर्षापूर्वी वर्णसंघर्ष आवश्यक आहे, याची जाणीव वाढवली.

आपण कानपूरमध्ये मनुस्मृती ग्रंथ दहन सत्याग्रह केला होता, त्याविषयी सांगा.

- ‘मनुस्मृती’मध्ये स्त्रिया आणि शूद्रांना अपमानकारक कायदे सांगितले आहेत. धन, ज्ञान आणि मानापासून त्यांना वंचित ठेवले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये ‘मनुस्मृती’चे दहन केले. हीच प्रेरणा घेऊन आम्ही उत्तर भारतात ‘अर्जक संघा’च्या वतीने मनुस्मृतीच्या दहनाचे शेकडो कार्यक्रम आयोजित केले होते.

पोलिसांच्या तीस-तीस पलटणी बंदोबस्तासाठी असतानाही, ‘अर्जक’च्या सात कार्यकर्त्यांनी नियोजित ठिकाणी पोचून ‘मनुस्मृती’चे दहन केले. १९६८ची ही गोष्ट. खूप गदारोळ झाला होता तेव्हा. अशाच आणखी एका विषयावर शंबूकावरही आम्ही नाटक केले होते. आणि धर्मांध लोकांचा विरोध असतानाही ते सादर केले. त्या वेळी मला माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीवरून सस्पेंड करण्यात आले. पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यावर मला पुन्हा नोकरीत सामावून घेतले गेले. ‘नाटकं करतात’ या कारणाने मला वीस वेळा अटकही झाली आहे. माझ्यावर अनेक वेळा हिंसक हल्ले केले गेले. एकदा तर कलाकार आत असताना पेट्रोल टाकून नाटकाचा कापडी मंडप जाळला. कलाकार कसेतरी बाहेर पडले; पण त्यांच्या अंगावरचे कपडेही जळले होते. मंडप जाळणारा नंतर धर्मांध पक्षाचा आमदार बनला.

‘अर्जक संघ’ समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करतो त्याविषयी सांगाल का?

- आम्ही ‘अर्जक संघा’च्या वतीने समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, घातक अंधश्रद्धा यांच्याविषयी नेहमी बोलत असतो. अंधश्रद्धा जेथे असतात तेथे प्रत्यक्ष जाऊन प्रबोधन विरोध करत असतो. गोपालपूर या गावातील माझ्या नात्यातील एका मुलीला भूत लागले आहे, म्हणून एक ओझा (देवऋषी) तिच्यावर अघोरी उपचार करत होता. तुमच्या मुलीला चुडेलने घेरले आहे, असे सांगून कुटुंबाला भीती घालत होता. जेव्हा हे मला समजले, तेव्हा मी ‘अर्जक संघा’च्या कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांना या सर्व अंधश्रद्धेविषयी कल्पना देऊन त्यांचे प्रबोधन केले. त्या ओझाला बोलवून त्याची उलट तपासणी घेतली. आम्ही सोबत जाताना एक डॉक्टरही घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी या मुलीला मानसिक आजार असल्याचे निदान केले. आम्ही त्या मुलीला कानपूरला घेऊन आलो, तिला एका मानसोपचारतज्ज्ञाला दाखवले. नियमित उपचार घेतल्यामुळे ती मुलगी आता सध्या व्यवस्थित आहे. ‘अर्जक संघा’च्या अशाच एका प्रयत्नामुळे पुनर्जन्माच्या एका भाकड कथेचाही आम्ही खोटारडेपणा उघडकीस आणला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्यांच्यामुळे उत्तर भारतात पुरोगामी विचारांचे बीज पेरले गेले त्या ‘अर्जक संघा’च्या प्रमुख नेत्यांचा परिचय करून द्याल का?

- १) संस्थापक रामस्वरूप वर्माजी : १९६८ साली 'अर्जक संघा'ची स्थापना रामस्वरूप वर्मा यांनी केली. एम.ए. एलएल.बी. झाल्यावर त्यांनी आय.ए.एस. परीक्षाही पास केली; पण प्रशासकीय नोकरी केली नाही. राममनोहर लोहियांच्या संपर्कात येऊन ते समाजवादी बनले. आमदार झाले.

‘सौ में नब्बे शोषित हैं शोषितो ने ललकारा है धन धरती और राजपाठ में नब्बे भाग हमारा है दस का शासन नव्बे पर नहीं चलेगा नहीं चलेगा- भारत लेनिन जगदेव बाबू १९६७च्या चौधरी चरणसिंह यांच्या संविदा सरकारात अर्थमंत्री झाले. उच्च-नीचता, विषमता आणि धार्मिक पाखंड अशा खातेऱ्यात सामान्य जन पिचत असलेले पाहून त्यांनी ‘अर्जक संघा’ची स्थापना केली. ब्राह्मण्यवादाला मूठमाती आणि मानववादी समाजनिर्मिती हे त्यांनी ध्येय ठेवले. वर्माजी भौतिकवादी होते. सृष्टी निर्माण करणारी किंवा चालवणारी कोणी बाह्य शक्ती नाही. सृष्टी स्वयंभू आहे, ही ‘अर्जक’ची तत्त्वे आहेत. प्रत्येक पदार्थ गतिशील असून तो निसर्ग नियमांनी बद्ध आहे. मानवी विकासासाठी उत्पादन आवश्यक असून ते श्रमाद्वारेच होऊ शकते. म्हणून शारीरिक श्रम श्रेष्ठ आहेत. ते म्हणत - ‘जानो तब मानो।’ समजून घ्या; मगच विश्वास ठेवा. तर्कशक्ती न वापरणे म्हणजे आत्महत्या होय. आपले विचार त्यांनी वीसभर पुस्तके लिहून मांडले आहेत. ‘क्रांती क्यो और कैसे?’, ‘मानवतावाद बनाय ब्राह्मणवाद’, ‘ब्राह्मण महिमा क्यों और कैसे?’, ‘मनुस्मृती राष्ट्र का कलंक’, ‘अद्भुत समस्या और समाधान’, ‘आत्मा का मिथ्यत्व’, ‘अर्जक संघ, राजनीतिक विकल्प’ इ. वर्माजींना ‘अर्जक’चे कबीर म्हणतात.

२) चौधरी महाराजसिंग भारतीजी : महाराजसिंह भारती ‘अर्जक’चे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्मदिवस १ नोव्हेंबर ‘अर्जक संघा’तर्फे ‘विज्ञानदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले; पण विज्ञान आणि शेतीवरील इतके ग्रंथ त्यांनी वाचले की, ते त्यातील तज्ज्ञ मानले जाऊ लागले. १९५२ साली ते राम मनोहर लोहियांच्या बरोबर ‘सोशालिस्ट पार्टी’त सामील झाले. १९६२ साली ते आमदार बनले. नंतर ते खासदार बनले. ‘सृष्टी और प्रलय’ हा मानवी उत्क्रांतीचा माहिती सांगणारा त्यांचा ग्रंथ खूपच गाजला आहे. तसेच ‘ईश्वर की खोज’, ‘पाप और पुण्य’, त्याशिवाय ‘समाजवाद, ब्राह्मणवाद की शवपरीक्षा’, ‘नारी उत्थान और पतन’ अशी सुमारे १५ पुस्तके लिहिली आहेत.

आम्ही ‘अर्जक संघा’च्या वतीने समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, घातक अंधश्रद्धा यांच्याविषयी नेहमी बोलत असतो. अंधश्रद्धा जेथे असतात तेथे प्रत्यक्ष जाऊन प्रबोधन विरोध करत असतो. गोपालपूर या गावातील माझ्या नात्यातील एका मुलीला भूत लागले आहे, म्हणून एक ओझा (देवऋषी) तिच्यावर अघोरी उपचार करत होता. तुमच्या मुलीला चुडेलने घेरले आहे, असे सांगून कुटुंबाला भीती घालत होता. जेव्हा हे मला समजले, तेव्हा मी ‘अर्जक संघा’च्या कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांना या सर्व अंधश्रद्धेविषयी कल्पना देऊन त्यांचे प्रबोधन केले. त्या ओझाला बोलवून त्याची उलट तपासणी घेतली. आम्ही सोबत जाताना एक डॉक्टरही घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी या मुलीला मानसिक आजार असल्याचे निदान केले. आम्ही त्या मुलीला कानपूरला घेऊन आलो, तिला एका मानसोपचारतज्ज्ञाला दाखवले. नियमित उपचार घेतल्यामुळे ती मुलगी आता सध्या व्यवस्थित आहे. ‘अर्जक संघा’च्या अशाच एका प्रयत्नामुळे पुनर्जन्माच्या एका भाकड कथेचाही आम्ही खोटारडेपणा उघडकीस आणला.

३) बिहार लेनिन : बाबू जगदेव प्रसाद : शहीद जगदेव बाबू कुशवाह हे ‘बिहारचे लेनिन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणत देशात ९० टक्के लोक शोषित आहेत, त्यांच्यावर १० टक्क्यांचे राज्य चालणार नाही. जगदेवबाबू जाहीर सभेत भाषण करत असताना पोलिसांनी त्यांच्या मानेमध्ये गोळी घातली, जखमी अवस्थेत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेले, त्यांना पाणीही दिले नाही. प्रेत गायब करण्याचा प्रयत्न केला; पण जनक्षोभाच्या परिणामी, त्यांचे शव लोकांच्या स्वाधीन करावे लागले. ही १९७४ सालची घटना आहे. बाबू जगदेवसिंह मारले गेले; पण अर्जक विचार पसरत गेला. त्यांच्यामुळेच बिहारमध्ये आजपर्यंत ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकला नाही.

४) पेरियार ललईसिंग यादव : ब्राह्मण्यवाद्यांना सर्वांत मोठा विरोध महाराष्ट्रात सत्यशोधकांनी व ब्राह्मणेतर चळवळीने केला, तसा दक्षिणेत रामस्वामी पेरियार यांनी जस्टीस पार्टी काढून केला. मंदिरासमोरून जायला दलितांना परवानगी नव्हती, त्या विरोधात पेरियारनी केलेला वायकोम सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या प्रबोधनातून पुढे ‘द्रविड मुन्येत्र कळघम’ पक्ष उभा राहिला. पेरियार यांनी ‘ट्रु रामायन’ पुस्तक लिहून रामायणावर प्रकाश टाकला. रामायणात उत्तर भारतीय आर्यांना महत्त्व असून दक्षिणेतील द्रविडांना अपमानित करण्यात आल्याचे दाखले त्यांनी दिले.

ललईसिंग यादव यांनी पेरियार यांची परवानगी घेऊन १९६८ साली ‘ट्रु रामायन’चे हिंदीत भाषांतर केले ‘सच्ची रामायण’. ते प्रसिद्ध होताच उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली. शासनाने त्यावर बंदी आणून पुस्तकाच्या प्रती जप्त केल्या. तीन वर्षे खटला चालला आणि ललईसिंग यांनी खर्चासह न्यायालयाची लढाई जिंकली. पुस्तक मुक्त झाले. १९७४ साली पेरियार यांचे निधन झाले. त्यांच्या शोकसभेत भाषण ऐकून जमलेल्या लाखो जनतेसमोर ललईसिंगना ‘उत्तरेतील पेरियार’ म्हणून गौरवण्यात आले. ललईसिंग यादव ‘पेरियार ललई’ बनले आणि ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’ या म्हणीचा प्रत्यय आला. पेरियार ललईसिंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ‘मनुस्मृती’ आणि ‘रामचरितमानस’ जाळण्याचा सत्याग्रह झाला. पुढे ललईसिंग यादव बौद्ध बनले. त्यांनी धार्मिक गुलामगिरी विरोधात आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली होती, त्या विरोधात ललईसिंग यांनी आवाज उठविला. ते हायकोर्टात गेले. खटला जिंकून आंबेडकरांच्या ग्रंथावरील बंदी उठवली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

उत्तर भारतात ‘अर्जक संघा’च्या कामाला कसे आणि किती यश मिळाले?

- ‘अर्जक संघा’चे यश सांगताना असे म्हणावे लागेल की, ‘अर्जक संघा’ने ब्राह्मण्यवादाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. दहा राज्यांमध्ये अनुयायी-कार्यकर्ते उभे केले आहेत. तन, मन आणि धनाने प्रचार करण्याचा संस्कार त्यांना दिला आहे. संघटना उभी करण्यातही आम्हांस यश मिळाले आहे. विचार-आचार-संस्कार आणि त्यौहार अशा चार मार्गांनी आमची वाटचाल सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लोक पाप-पुण्य, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या कल्पनांत गुरफटून पुरोहितालाच देव मानतात; खाण्या-पिण्यात, उठण्या बसण्यात विषमतेने वागतात, गुलाम म्हणूनच आयुष्य काढतात, त्यातून मुक्ती मिळवणे हेच खरे स्वातंत्र्य आहे.

उत्तर भारतात अर्जक विचार घेऊन राजकारणात पुढे आलेले अनेक नेते आज दिसतात. काही पक्षांनीही हा विचार पाया म्हणून स्वीकारला. मंडल आयोगाची पार्श्वभूमी तयार होण्यातही ‘अर्जक संघा’चा वाटा होता. सर्वांना सामावून घेता येईल, असा सणांचा पर्याय ‘अर्जक संघा’ने दिला. शूद्रांना ताठ मानेने उभे राहता येईल, असे तत्त्वज्ञान दिले, आत्मविश्वास दिला. पन्नास वर्षांत अनेक लहान- मोठ्या संघटना वाढल्या आणि लयाला गेल्या; पण ‘अर्जक संघा’चे काम अव्याहत सुरू आहे. ‘अर्जक संघा’ने आत्मा-परमात्मा, ईश्वर, पुनर्जन्म, पाप-पुण्य नाकारून जाहीरपणे नास्तिकवादाचा पुरस्कार केला आहे; धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांचे पुनर्मूल्यांकन सुरू केले.

‘अर्जक संघा’ने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधान जनतेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात वर्ग संघर्षापूर्वी वर्णसंघर्ष आवश्यक आहे, याची जाणीव वाढवली.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा