फक्त राजकारणी लोकांना ‘खलनायक’ ठरवण्याची जी प्रथा आहे, त्याऐवजी जे अशा घटनांना ‘प्रत्यक्ष जबाबदार’ आहेत, त्यांच्याकडेही लक्ष जाणे गरजेचे आहे
पडघम - राज्यकारण
महेश झगडे
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ची क्षणचित्रे
  • Wed , 03 May 2023
  • पडघम राज्यकारण महाराष्ट्र भूषण Maharashtra Bhushan आप्पासाहेब धर्माधिकारी Appasaheb Dharmadhikari

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिल २०२३ रोजी नवी मुंबई येथील शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. धर्माधिकारी यांचे लाखो चाहते उपस्थित राहिले, पण या कार्यक्रमास गालबोट लागले, ते तेथील समुदायातील १४ व्यक्ती उष्माघाताने मृत्यू पावल्या व अनेकांना उपचारासाठी इस्पितळात भरती करावे लागले यामुळे. ही घटना हृदयद्रावक होती. अर्थात, या उष्माघाताच्या मृत्यूमुळे जनमानसात प्रचंड चीड निर्माण झाली आणि ती चीड प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे इ. द्वारे व्यापक प्रमाणात व्यक्त होत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे राजभवनात घेण्याऐवजी मोकळ्या पटांगणात का घेण्यात आला, सूर्य आग होत असताना डॉ. धर्माधिकारी यांच्या अनुयायांना पाच तास उन्हात ठेवणे हे चुकीचे होते, २५ लाखांच्या पुरस्कारासाठी शासनाने कोट्यवधी खर्च करण्याचे प्रयोजन काय, देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ हा अत्यंत छोटेखानी कार्यक्रमात देण्याची प्रथा असताना भर उन्हाळ्यात लाखो लोकांना जमवून पाच तास तिष्ठत ठेवण्यापूर्वी त्याचा विचार का झाला नाही, राजकारणी गर्दी जमवून आपली 'व्होट बँक' वाढविण्यासाठी शासकीय निधीची उधळपट्टी करीत आहेत वगैरे वगैरे. या सर्व आरोपात किंवा मुद्दयात जाण्याऐवजी जे १४ जीव अशा सोहळ्यात मृत्यूमुळे पडले, ते टाळता येणे शक्य होते का, त्या घटनेस नेमके जबाबदार कोण आणि अशा घटना की ज्यात निष्पाप नागरिकांचे जीव जातात, त्या घटना घडूच नयेत, म्हणून काही प्रतिबंधात्मक व्यवस्था आहे का, यावर लक्ष केंद्रित करणे अधिक आवश्यक आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचे कल्याण व त्यांच्या जीवितांचे रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाद्वारे शासनावर टाकलेली आहे. त्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आणि प्रशासकीय यंत्रणाही निर्माण झालेल्या आहेत. अशा मृत्यूच्या तांडवांच्या घटना घडू नयेत, म्हणून काय प्रतिबंधात्मक तरतुदी आहेत, ते अशा आजपर्यंत घडलेल्या काही उदाहरणादाखल घटनांवरून समजून घेऊया.

जबाबदारी प्रशासनाची

सर्वांत अलीकडील घटना म्हणजेच सुरुवातीला नमूद केलेली नवी मुंबई येथील १६ एप्रिलला महाराष्ट्र भूषण प्रदान करण्याच्या कार्यक्रमात १४ व्यक्तींचा मृत्यू. हा कार्यक्रम शासकीय होता. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार इतर खाजगी व्यक्तींना धरण्याची पळवाट देखील उपलब्ध नाही. ज्या नव्या मुंबईत उघड्यावर भर उन्हात कार्यक्रम घेण्यात आला, त्या दिवशी तेथील तापमान ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले होते. अर्थात हे तापमान तांत्रिकरित्या मोजले, तर लाखो लोकांच्या दाटीवाटीच्या गर्दीत ते ३७ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणार, यात वादच नाही.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार हा कार्यक्रम पर्यटन व सांस्कृतिक कार्य या शासनाच्या विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनायालयाने सुमारे रुपये १३ कोटी खर्च करून केला होता, असे दिसते, प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहिती नाही. अशा पारितोषिक वितरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्याने मंत्रालयीन पर्यटन व सांस्कृतिक विभागाची मान्यता घेतली असणार हे स्वाभाविकच आहे. शिवाय या खर्चास वित्त विभागाचीही संमतीदेखील अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून या विभागाचे सचिव यांनी सदर मान्यता देताना सर्वंकष बाबींचा साकल्याने विचार करून आपले प्रांजळ मत मांडून मगच त्यास मान्यता दिली असणे आणि आवश्यकता असल्यास मंत्री वगैरे वरिष्ठ पातळीवरील मान्यता घेणे अभिप्रेत आहे.

प्रशासनात व विशेषतः शीर्ष प्रशासनात अनेक तत्त्वे आहेत आणि त्यापैकीच एक तत्त्व म्हणजे प्रशासन चालवताना प्रत्येक बाबींचा पूर्व अंदाज घेणे, त्या आधारे निर्धोक आखणी करणे आणि केलेल्या आखणीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे होय. या प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देताना तो जे लोक कार्यक्रमासाठी जमणार आहेत, त्यांच्या संख्येचे प्रमाण गृहीत धरूनच दिला गेला जाणेही अभिप्रेत आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक येणार हे विभागाच्या सचिवाला माहीत होते. ते माहीत नसेल किंवा त्याचा अंदाज केला नसेल, तर ती प्रशासकीय दुर्लक्ष या सदरात मोडणारी बाब. कोणत्याही शासकीय विभागाचा सचिव हा सोळा वर्षं आयएएसमध्ये सेवा पूर्ण झाल्यावरच सचिव म्हणून नियुक्त होऊ शकतो. म्हणजेच स्पर्धा परीक्षेतून बुद्धिवंत म्हणून निवड होऊन सोळा वर्षांच्या अनुभवाचे परिपक्क व्यक्तिमत्वच त्या पदावर विराजमान होऊ शकते.

या प्रकरणात नवी मुंबई येथील त्यावेळेसचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते ही सर्वसामान्यांनाही ज्ञात असणारी गोष्ट आहे, शिवाय हा कार्यक्रम घेताना तो भाग समुद्राजवळील दमट हवामानामधील आहे हेसुद्धा सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला माहिती असण्यासारखे आहे. ती बाब आयएएस व्यक्तीला निश्चितच अवगत असणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय, उष्ण आणि दमट हवामानाचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, हे प्रशासकीय अधिकाऱ्यास माहिती असणेही अभिप्रेत आहे. एखाद्या गोष्टीबाबत माहिती नसेल, तर ती माहिती उपलब्ध करून घेणे, हे या आयएएस सेवेचा आत्मा आहे.

अधिकारी कार्यक्षमता महत्त्वाची

सर्वसामान्यपणे, मानवी शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते व मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागामुळे ते तापमान नियंत्रित होते. अर्थात माणूस कोणतीही बाह्य व्यवस्था न करता जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती तापमानात जिवंत राहू शकतो, यास काही मर्यादा आहेत.

शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी घाम येऊन त्याचे बाष्पीभवन करून शरीर थंड करून उच्च तापमानातही आर्द्रता जास्त होते, तेव्हा घामाचे बाष्पीभवन होत नाही व सुखरूप राहील, अशी यंत्रणा आहे. पण जेव्हा हवेतील शरीर थंड ठेवण्याची यंत्रणा निष्प्रभ ठरते. एकंदरीतच ‘जास्त तापमान कोरडे हवामान’ यापेक्षा ‘जास्त तापमान दमट हवामान’ समीकरण मानवी जीवनास अपायकारक ठरते. याचे मोजमाप थर्मोमीटरचा पाऱ्याचा बल्ब ओल्या कापडात गुंडाळून जे तापमान येईल, त्यास ‘भिजलेला बल्ब तापमान’ म्हणजेच ‘Wet-Bulb Temperature’ असे संबोधले जाते.

संशोधनानंतर असे निष्पन्न झाले आहे की, जर भिजलेला बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले, तर उष्माघाताने मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो. (हे समजण्यासाठी ठोकताळा म्हणून हे ३५ डिग्री सेल्सिअस ‘वेट-बल्ब तापमान’ म्हणजेच ४० डिग्री सेल्सिअस तापमान व ७५ टक्के आर्द्रता ). या तापमानामध्ये निरोगी व्यक्ती सहा तासापेक्षा जास्त जगू शकत नाही.

प्रदूषित अंतरंग

१६ एप्रिल २०२३ रोजी नवी मुंबई येथील कार्यक्रमाच्या वेळी वेट बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास जाण्यासारखी परिस्थिती असू शकते, हे आयएएस अधिकाऱ्यास माहिती असणार नाही, असे मानणे भोळेपणाचे ठरेल. जर खरोखरच त्या अधिकाऱ्याने तसा विचार केला नसेल, तर मग अशा अधिकाऱ्याच्या क्षमतेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित होऊ शकते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वातावरणाची अशी परिस्थिती असताना लाखो लोकांना लोकांचा भर दुपारी मेळावा घेणे आणि तोही उघड्यावरच घेणे म्हणजे लोकांच्या जीवितशी खेळणे आहे, अशी स्पष्ट भूमिका या अधिकाऱ्याने घेणे अभिप्रेत होते. किंवा मेळावा घ्यावयाचा झालाच तर या ३५ डिग्री सेल्सिअस वेट बल्ब तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी मंडप घालून पंखे वगैरे सुविधांचा वापर करावा लागेल, अशी भूमिका घेणे प्रशासकीय दृष्ट्या जबाबदारीचे होते.

तसे त्याप्रमाणे राजकीय नेतृत्वाला पटवून देणे आणि त्यांना ते पटलेच नाही, तर लिखित स्वरूपातील प्रस्तावावर राजकीय नेतृत्वाने स्वतःच्या जबाबदारीवर वेगळी भूमिका घेतली, तरी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, हे रेकॉर्डवर ठेवणे अभिप्रेत होते. या प्रकरणात तसेच झाले किंवा नाही हे माहीत नाही. तसे झाले नसेल तर ते अतिगंभीर प्रशासनिक दुर्लक्ष होय. माझ्या प्रशासनातील ३४ वर्षांच्या अनुभवातून एक बाब मी ठामपूर्वक सांगू शकतो की, सर्वसाधारणपणे अधिकाऱ्यांनी विषय, त्यातील धोके व्यवस्थित समजून दिले तर राजकीय नेतृत्व निश्चितपणे त्यास मान्यता देते.

या उष्माघात किंवा उष्माघात आणि चेंगराचेंगरी यामुळे प्राणहानी झाली, याबाबत मतमतांतरे आहेत. वास्तविकतः ज्या कार्यक्रमास अत्युच्च पातळीवरील नेतृत्व उपस्थित असते, तेथील व्यवस्था काटेकोरच असणे अपेक्षित आहे आणि जर उष्माघात की चेंगराचेंगरी ही चर्चा होत असेल, तर प्रशासनाचे प्रदूषित अंतरंग अधिकच गडद होत जाते.

या प्रकरणाच्या निमित्ताने समाजाने आणि माध्यमाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती ही की, अशा दुर्दैवी घटना घडल्या की, राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात व ते सर्व ‘राजकारण’ या पातळीवरच स्थिरावतात. त्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्त्व किंवा लोकप्रतिनिधी हे ‘इझी टारगेट’ म्हणून ‘पंचिंग बॅग्ज’ झालेले आहेत. अर्थात लोकशाहीमध्ये ते गैरदेखील नाही. पण शासन-प्रशासन व्यवस्थेमध्येही ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर वैधानिक किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकलेल्या असतात, ते या वाद-विवादापासून नामानिराळे राहतात आणि प्रसंगी गंमत म्हणून त्याकडे बघतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

कधीतरी, अशा घटना घडणारच नाहीत, अशा पद्धतीने संबंधित अधिकारी का वागले नाहीत, हा विचार सहसा समाजमनाला का पडत नाही यावर विचार होणे आवश्यक आहे. किंबहुना हा प्रशासकीय बेजाबदारपणा आहे, हेच मुळात जनतेच्या पचनी पडत नाही. जोपर्यंत प्रशासकीय अयशस्वीता आणि त्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टाकली जात नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार आणि काही काळ राजकीय धुराळा उडून पुढील घटना घडली की, ते सर्व विस्मरणात जाणार, हे दुष्टचक्र सुरूच राहणार आहे.

जीवितहानीची ही घटना अपवादात्मक नाही. वेगवेगळ्या शासकीय विभागाशी निगडित अशा घटना नित्यनेमाने घडून निष्पाप जीवांचे बळी जातात. १८ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी पुणे शहरात गाडीतळ परिसरात अधिकृत होर्डिंग कोसळून काही लोक मृत्यू पावले होते. त्या घटनांना कोणी राजकीय नेतृत्व प्रत्यक्ष जबाबदार नाही. कायद्याप्रमाणे अनधिकृत होर्डिंग असू नयेत आणि अधिकृत होर्डिंगचा सांगाडा मजबूत असावा, या तरतुदी आहेत. त्याची अंतिम जबाबदारी महापालिका आयुक्तावर आहे. त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पडली असती, तर हे दुर्दैवी मृत्यू टाळता आले असते.

त्याचप्रमाणे अनधिकृत इमारती कोसळल्याने ठाणे, पुणे, अन्य शहरांत, तसेच पावसाळ्यात धोक्याच्या ठिकाणी वस्ती करून राहणारे लोक मृत्युमुखी पडत जाणे, अशा स्वरूपाच्या घटना तर आता नित्यनेमाच्याच झालेल्या आहेत. यासुद्धा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ‘नाकर्तेपणाचे बळी’ आहेत.

गेल्याच आठवड्यात खंडाळा घाटात बस दरीत कोसळून जीवितहानी झाली. रस्ते अपघात तर घडतात आणि तात्काळ विस्मरणात जातात. यास परिवहन विभाग ड्रायव्हिंग लायसन्स देताना जी बेपर्वाई दाखवतो आणि रस्त्यावरील बेशिस्त खपवून घेण्याची जी संस्कृती पोलीस यंत्रणामध्ये रुजलेली आहे, त्याकडे संवेदनाहीन झालेल्या प्रशासकीय नेतृत्वाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, हे मुख्यत्वे कारणीभूत आहे.

अन्न, औषधे, दूध इत्यादी मधील भेसळ तर प्रशासनाच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे, आपण फक्त जीवितहानी झाली की, हळहळ व्यक्त करतो, पण ज्या बाबींमुळे प्रत्यक्ष तात्काळ मृत्यू न होता, अप्रत्यक्षरीत्या व्याधी निर्माण होऊन कॅन्सर वगैरेसारख्या रोगाने भयानक वेदनाचे मृत्यू संभवतात, त्याकडे तर समाजमनाचे लक्षही जात नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अर्थात यामध्ये प्रामुख्याने अन्न, औषधे, प्रसाधने, जंक फूड अशा अनेक बाबींचा समावेश असून गुटखा, फेस पावडर, खाद्यतेले, दूध अशाही दैनंदिन गोष्टींचा समावेश होतो. असे मृत्यू टाळले जावेत म्हणून कायदे, नियम, यंत्रणा, निधी असे सर्व काही आहे... वानवा कशाची आहे तर वरिष्ठ प्रशासकीय नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची आणि हे प्रशासकीय नेतृत्व त्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेच्या जीवावर उठते, याची जाणीव नसणारा समाज याची!

अशा प्रकारांबाबत फक्त राजकारणी लोकांना खलनायक ठरवण्याची जी प्रथा आहे, त्याऐवजी जे अशा घटनांना प्रत्यक्ष जबाबदार आहेत, त्यांच्याकडेही लक्ष जाणे गरजेचे आहे.

.................................................................................................................................................................

‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या मे २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखक महेश झगडे भारतीय प्रशासनसेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. शासन-प्रशासनातल्या सुधारणांचा आग्रह, हा त्यांचा चिंतन-लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा