‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही आपल्या राज्यघटनेची देण आहे, त्यावर आपण पुढची कमाई करू शकतो
पडघम - देशकारण
विश्वंभर चौधरी
  • ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’चं एक पोस्टर आणि लेखक विश्वंभर चौधरी
  • Wed , 05 April 2023
  • पडघम देशकारण नास्तिक्य Atheism श्रद्धा-अंधश्रद्धा Faith-Superstitions विश्वंभर चौधरी Vishwambhar Choudhari

‘ब्राइट्स सोसायटी’तर्फे पुण्यात १८ डिसेंबर २०२२ रोजी ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ भरवण्यात आली होती. या परिषदेतील हे एक भाषण, संपादित स्वरूपात…

.................................................................................................................................................................

१.

आजकाल ‘माझी ओळख कोणती’ हे माझं मलाच कळत नाही. इतका विचारधारांचा गुंता झालेला आहे, तरी मी असं समजतो की, मी काही भक्तांपैकी नाही. आणि मी असेही समजतो की, त्यातल्या त्यात मला वैचारिकदृष्ट्या रानडे, गोखले, गांधी, विनोबांची परंपरा जवळची वाटते! ते जेवढे धार्मिक आहेत, तेवढा मीही धार्मिक आहे. मी अज्ञेयवादी आहे. मी या निष्कर्षाला आलेलो आहे की, अज्ञेयवादी लोकांना नास्तिक हे जास्त जवळचे असायला पाहिजेत. त्याची कारणंही सांगतो.

नास्तिकपण नाही आणि धार्मिकपण नाही, असे अनेक लोक समोर दिसतील. माझ्यासारखे अनेक लोक आस्तिक आहेत, पण तेही राजकीय कारणांनी. त्याचाही ऊहापोह मी करणार आहे. पण असेही खूप गट आहेत की, जे नास्तिक नसतील; पण त्यांना आपण ‘विवेकवादी’, ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ म्हणतो. नास्तिकवाद हा एक ‘सिंगल पॉईंट’ अजेंडा झाला की, अस्तित्व नाकारणं हे ‘नास्तिक्य’ झालं. पण, त्याच्यापुढे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्याच्यापुढे विवेकवाद. बुद्धिप्रामाण्यवादी माणूस विवेकी असेलच असं नाही. तो बुद्धिप्रमाणाला धरून म्हणेल की, ‘आता या माणसानं जे काही केलं, ते पाहता त्याला फाशी दिली पाहिजे’. विवेकवादी मनुष्य म्हणेल की, ‘फाशीची शिक्षा ही रानटी शिक्षा आहे. ती नको!’

या वेगवेगळ्या छटा आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकवादी यामध्ये ‘सहनशीलता’सुद्धा कदाचित चढत्या क्रमानं वाढते की, काय मला माहिती नाही. नास्तिकांच्या परिषदेत मी हे बोलतोय की, ‘सहनशीलता’सुद्धा नास्तिकांमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं- अज्ञेयवादी हे नास्तिकांच्या थोडे जास्त जवळचे आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मी स्वतःला भारतीय राज्यघटनेच्या कक्षेत जेवढा पाहिजे तेवढा पुरोगामी समजतो. राज्यघटनेनं उपासनेचं स्वातंत्र्य दिलं, व्यक्तिस्वातंत्र्य दिलं. त्या सगळ्या कक्षांमध्ये मी स्वतःला पाहतो. आणि तेवढीच माझी ओळख असावी, असं मला वाटतं. कुरुंदकरांच्या चालीवर मी असं म्हणेन की, नास्तिकांनी असं म्हणायला पाहिजे- ‘तुम्ही आस्तिक असल्याचा हक्क मी मान्य करावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर, मी नास्तिक असल्याचा हक्क तुम्ही मान्य केला पाहिजे’. आपली ‘उदारमतवादी’ राज्यघटना सगळ्यांना स्वातंत्र्य देते.

राज्यघटनेच्या कक्षेमध्ये नास्तिकांचे अधिकार, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांच्या बाजूनं मी उभा राहीन. वॉल्टेअर असं म्हणाला आहे की, “भलेही तुमची मतं माझ्याविरुद्ध असतील, पण ती तुम्हाला मांडता यावी, यासाठी मी तुमच्या बाजूने उभा राहील.” माझी आणि नास्तिकांची मतं इतकीही भिन्न नाहीयेत. पण तरीही मी म्हणेन- “अज्ञेयवादी असलो तरी मी नास्तिकांच्या बाजूनं उभा राहीन!” कारण की, तुमचा मतस्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो तुम्हाला बजावता आला पाहिजे, असं मला वाटतं.

आजकाल भक्तांचे दिवस आहेत आणि रोज त्यांचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे मी थोडी वर्गवारी करतो- उपद्रवमूल्य असलेले भक्त आणि उपद्रवमूल्य नसलेले भक्त. म्हणजे एखादा माणूस बाहेर कोणालाही त्रास होणार नाही, शेजाऱ्याला त्रास होणार नाही, अशी घरात देवपूजा करत असेल किंवा प्रकृती चांगली राहावी, म्हणून सकाळी सूर्यनमस्कार घालत असेल, तर त्याचा उपद्रव नाही. भलेही तो सूर्याला देव समजत असेल, तरी त्याचं उपद्रवमूल्य नाही.

आपण ही वर्गवारी समजून घ्यायला पाहिजे. उपद्रव नसलेल्यांबद्दल आपण अधिक समजुतीनं घ्यायला काही हरकत नाही, असं मला वाटतं. माझं आणि देवाचं भांडण कुठे आहे? घरी देवपूजा करत असाल, तर माझं काही भांडण नाही, मंदिरात करत असाल तरी माझं भांडण नाही. मशिदीत नमाज पढत असाल तरी माझं भांडण नाही. पण तुम्ही जेव्हा रस्त्यावर याल, मिरवणुका काढाल, तेव्हा माझं आणि तुमचं भांडण आहे. कारण ती जागा कायद्याची, सुव्यवस्थेची आणि अमलबजावणीची आहे. एका अर्थानं ती सार्वजनिक जागा आहे, राज्यघटनेची जागा आहे. म्हणून माझं या मर्यादित मुद्द्यांवर भक्तांशी भांडण आहे.

२.

नास्तिक जवळचे का वाटतात? त्याचं एक कारण आहे. एकतर नास्तिक मिरवणुका काढत नाहीत, कारण त्यांचा देव नसतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा- नास्तिक आणि आस्तिकांचं भांडण आहे, त्याच्यापेक्षाही फार मोठं भांडण आस्तिक-आस्तिकांमध्येच आहे. हिंदू परंपरांमध्ये तर या परंपरा जेवढ्या एकमेकींशी भांडलल्या आहेत, तेवढ्या अन्य कुठेही नाहीत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शैव आणि वैष्णव हे फार मोठं भांडण आहे. हे भांडण इतकं प्रबळ आहे की, वैष्णव शिवरात्रीला मुद्दाम उपवास करतात आणि मुद्दाम पुरणपोळी खातात. परंपरांचं हे द्वंद्व आपल्याला पाहावं लागेल. त्यामानानं नास्तिक कमी भांडताना दिसतात. नास्तिक मिरवणुका काढत नाहीत, भोंगे लावत नाहीत. त्यामुळे ते जास्त श्रेयस्कर आहेत, असं मला वाटतं. पण नास्तिकांना देवाशी झुंजत असताना धर्माशीसुद्धा झुंजावं लागेल. कारण देव हे धर्माचं अधिष्ठान आहे, असा एक लोकसमज आहे. त्या धर्माशी झुंजताना नास्तिकांच्या व्यूहरचना आहेत, त्याबद्दलही बोललं पाहिजे.

मी धार्मिक नाही, पण राज्यघटनेच्या परिघांमध्ये असलेल्या उपासना-स्वातंत्र्याला माझा विरोध नाही. मी स्वतः नास्तिक नाही, पण लोकांच्या श्रद्धेला - राज्यघटनेच्या कक्षेत - माझा विरोध नाही. त्यामुळे हा मुद्दा थोडा गंभीर होतो. हा खासकरून तरुणांनी नीट समजून घेतला पाहिजे. भारतात धर्माशिवाय काहीच होत नाही. धर्माशिवाय राजकारण पुढे जात नाही आणि धार्मिक राजकारणाला उत्तर ‘हिंदू धर्माला विरोध’ हे नसून ‘सहिष्णू हिंदू धर्म’ हे आहे. ‘जय श्रीराम’ला जर विरोध करायचा असेल, तर ‘राम राम’ म्हणावं लागेल. ‘राम राम’ म्हणणारा हिंदू आणि ‘जय श्रीराम’ म्हणणारा संघी हिंदू, यात भेद आहे आणि ते नीट समजून घेतले पाहिजेत.

महात्मा गांधी धर्मनिरपेक्ष होते, पण त्यांनाही नास्तिक होता आलं असतं. आंबेडकरांनाही नास्तिक होता आलं असतं. कित्येकदा तुम्हाला वाटूनही राजकारण तसं होऊ देत नाही. त्याचं कारण असं की, तुम्हाला ज्या मुख्य प्रवाहात राहायचं आहे, तिथं धर्म ही फार मोठी गोष्ट आहे. तीला सोडून चालत नाही. गांधींना म्हणता आलं असतं, त्यापेक्षाही आंबेडकरांना नक्कीच म्हणता आलं असतं की, ‘मी नास्तिक आहे, उद्यापासून माझा कोणताही धर्म नाही. मला कोणताही देव नाही.’ पण आंबेडकरांनाही धर्म, देव घ्यावा लागला. त्याचं कारण भारतीय आचारपद्धती आणि इथला धर्म एकमेकांत इतके मिसळले आहेत की, ते वेगळं होणं अवघड आहे. म्हणून ज्यांना राजकारण करायचं आहे, मतं मिळवायची आहेत. आणि ज्यांना ‘वोट’ आणि ‘ओपिनियन’ या दोन्हीसाठी लोकांची मत बदलवायची आहेत, त्यांना या परिघाच्या फार बाहेर जाता येईल, अशी परिस्थिती नाही.

सुधारणावादी म्हणून ते काम गांधींनी केलं. त्याच्याकडे नास्तिकांनी डोळसपणे पाहिलं पाहिजे. केवळ गांधी ‘हे राम’ म्हणाले म्हणून त्यांना ‘त्यातले’ ठरवून उपयोगाचं नाही. गांधींनी हिंदू धर्म मंदिराच्या बाहेर, पुजाऱ्याच्या बाहेर आणला, देवापासून लांब आणला, हे लक्षात घ्या.

गांधी म्हणाले, “सार्वजनिक प्रार्थना करू. काय गरज आहे मंदिरात जाऊन पुजाऱ्याला दक्षिणा देण्याची?” त्यांनी हिंदूंमधून ब्राह्मणत्व दूर केलं आणि ती सार्वजनिक प्रार्थनासभा केली. गांधींचा राम हा हिंदू परंपरेतला राम आहे, तो सिंधुत्ववाद्यांचा राम नाही. तो भ्रूकुटी, ताशे लावलेला राम नाही. गांधींचा राम सीतेसोबत नांदणारा गोड राम आहे! नास्तिकांना राम मान्य आहे की नाही, या गोष्टी पुढच्या झाल्या, पण हा प्रवाह आपण समजून घेतला पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

हे सगळं का? हा सामाजिक-राजकीय चर्चाविषय का? गांधीजी राम म्हणत होते, मरतानाही ‘राम’ म्हणाले, पण त्यांनी ‘कर्मकांड करू नका’ हेही सांगितलं. आंबेडकर धर्महीन का झाले नसतील? त्यांनी उद्यापासून माझा कोणताही धर्म नाही, असं का नाही म्हटलं? भारतीय परंपरेतील बौद्ध धर्म त्यांना घ्यावा लागला. का? तो त्यांनी मजबुरीनं घेतला, असं मी म्हणणार नाही. ती त्यांची निवड होती, अत्यंत डोळस निवड! पण जोपर्यंत आपण धर्म आणि समाज, देव आणि समाज यांची वीण नीट लक्षात घेणार नाही, तोपर्यंत गोष्टी पुढे जाणार नाहीत. पण म्हणून आंबेडकर आणि गांधी हे कोणता तरी धर्म घेणारे आणि देवाच्या बाजूनं बोलणारे, असा गैरसमज निदान आपल्यात नको.

आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की, या दोघा राष्ट्रीय पुरुषांनी आपापली कामं सांभाळत कडक धर्मचिकित्सासुद्धा केली आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’ वाचलं असेल. आता त्यावर बंदी आली आहे, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल. तीच धर्मचिकित्सा गांधींनीही केली. तर्कतीर्थ, कुरुंदकर यांच्यानंतर मात्र आपल्या पुरोगामी वर्तुळातून कोणी धर्मचिकित्सा गंभीरपणे करत आहे, असं वाटत नाही.

धर्मचिकित्सा ही एकदाच करायची गोष्ट नाही. कारण तात्कालिक संबंध, संदर्भ सतत बदलत असतात. जे संदर्भ तर्कतीर्थ, कुरुंदकर यांच्यावेळेस होते, आज वेगळे आहेत. त्यामुळे धर्मचिकित्सा सतत व्हायला पाहिजे. धर्मचिकित्सा, ईश्वरचिकित्सा आणि ग्रंथचिकित्सा झालीच पाहिजे. त्यासाठी अभ्यासमंडळं सुरू करायला हवीत, काही लोक जमवायला हवेत. धर्मचिकित्सा बंद पडता कामा नये. कारण धर्माशी लढायचं असेल, तर धर्मचिकित्सा झालीच पाहिजे.

धर्मचिकित्सेचा अजून एक फायदा होतो. तो मलाही झालेला आहे. धर्मचिकित्सेतून होतं असं की, धर्माच्या तंगड्या धर्माच्याच गळ्यात घालता येतात. म्हणून धर्मचिकित्सा महत्त्वाची! काबरे सरांनी सांगितलं की, कुरुंदकरांनी म्हटलं आहे, “आपल्या लोकांना धर्मग्रंथांचा फार अभिमान असतो, कारण त्यांनी ते वाचलेले नसतात.” मला शंकराचार्य आणि माझी ‘झी २४ तास’वर झालेली चर्चा आठवते. मी शंकराचार्यांना म्हणालो होतो, “शंकराचार्य महाराज, मी पुरोगामित्वाचे जोडे बाहेर ठेवून एक सश्रद्ध हिंदू म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे. तुम्ही मला ‘मनुस्मृति’मधला भेदभाव सांगावा- मी ‘मनुस्मृति’प्रमाणे वागावं की भगवद्गीतेत ‘ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।।’ असं कृष्णानं सांगितलं त्याप्रमाणे वागावं का? त्याचं तुम्ही मला उत्तर द्यावं.” पण शंकराचार्य वेगळंच बोलत राहिले.

पण प्रश्न असा असतो की, अभ्यास केला तर विरोधाभास दाखवता येतात. हे म्हणता येतं की, श्रीकृष्ण ‘भगवद्गीते’त एकीकडे म्हणतो, “हे चातुर्वर्ण्य मीच निर्माण केले” आणि दुसरीकडे म्हणतो, “या सर्व जीवांमध्ये माझा अंश आहे.” मग तू चातुर्वर्ण्य का निर्माण केलेस? हा प्रश्न विचारण्यासाठी ‘गीता’ वाचावी लागते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी गीतेची चिकित्सा केली. ‘भगवद्गीता’ हा ‘उत्तरकालीन प्रक्षेप’ असं लोक म्हणतात. ती श्रीकृष्णानेच सांगितली का? यावर काही लोकांचं म्हणणं ‘हो’ असं आहे, तर काहींचं म्हणणं आहे- “व्यासांनी सांगितली, पण कृष्णाच्या नावानं”. पण मुद्दा असा आहे की, जोपर्यंत धर्मचिकित्सा होत नाही, आपण धर्मग्रंथ वाचत नाही, चिकित्सा करत नाही, तोपर्यंत हिंदुत्व नावाचं जे काही चाललेलं आहे, ‘त्व’ लागलेलं, त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्यावरचे हल्ले बंद होणार नाहीत.

३.

नास्तिक म्हणून भारतातल्या काही परंपरा मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही. बुद्ध-महावीर ही एक परंपरा आहे. ती आपल्याला नाकारता येत नाही. त्यातली धर्माची गंमत बघा. विषमता आहे म्हणून जे हिंदू धर्मातून बाहेर पडले, तर तिकडेही क्रमानं तेच झालं. जैनांमध्ये ‘श्वेतांबर–दिगंबर’ हे पंथ पडले. बौद्धांमध्येही ‘हिनयान-महायान’ हे पंथ निर्माण झाले. धर्माची ही मूलभूत गोष्ट आहे- धर्मच भेद करतो, भेदाला प्रोत्साहन देतो. बुद्ध, महावीर इथपासून ते ज्ञानोबा, तुकोबापर्यंतची परंपरा नाकारून नास्तिकांत फार विचारवंत होतील, असं मला वाटत नाही. कारण ती आपलीच परंपरा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नावांवरून ते काहीतरी संतसाहित्य आहे, म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण तसं नाही. मी ‘ज्ञानेश्वरी’च्या तीन तरी ओव्या सांगू शकतो, ज्या अत्यंत पुरोगामी आहेत-

‘मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु।

म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी॥२२॥’

गुरू कोणता चांगला आहे? जो विवेकावरचा आदर वाढवतो. हीच आपली भूमिका आहे आणि आपला विवेकवादही तेच सांगतो.

‘वेद संपन्नु इये ठायी| परी कृपणु ऐसा आनु नाही।

कानी लागला तिही| वर्णाच्याची॥’

तुमचा वेद फार संपन्न असेल, मोठा असेल, पण आता तो कृपण झालेला आहे. संकुचित झालेला आहे. आता तो फक्त तीन वर्णांचं ऐकतो. चौथ्या वर्णाचं, शूद्रांचं ऐकत नाही. यापेक्षा वेगळी कोणती क्रांतिकारी भूमिका असू शकते, असं मला वाटत नाही. कर्मकांडांवरची भूमिका बघा-

‘तुम्ही व्रत नियमो न करावे।’

काही गरज नाही व्रतनियम करायची. तर तुकारामांची ओवी आहे- ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता…’

आपण सगळे बहुमताला न मानणारेच आहोत. ही परंपरा सोडून नास्तिकांचा, नास्तिक्याचा विचार भारतात होऊ शकत नाही, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आणि यासाठी सांगायचं आहे की, भारतीय आचारपद्धतीला सांभाळून, तिच्याशी चार हात करून हे नास्तिक्य पुढे जाईल. त्याशिवाय ते पूर्णत्वास जाणार नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दुसरा भाग ईश्वराच्या चिकित्सेचा भाग आहे. ईशनिंदेचं कलम काढलं पाहिजे का? तर त्यावर आपल्या सर्वांचं स्पष्ट उत्तर आहे- ‘हो! काढलं पाहिजे.’ ईश्वराची, धर्माची, धर्मग्रंथांची चिकित्सा व्हायलाच पाहिजे. चिकित्सेला विरोध करता कामा नये.

ईश्वराची उत्पत्ती हा एक वेगळाच भाग आहे. वेदकाळात फक्त वरुण असतो, इंद्र असतो वगैरे वगैरे. राम आणि कृष्ण कसे होतात, ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कुरुंदकरांचं एक व्याख्यान आहे, ते तुम्ही नक्की ऐका. भारतात देव बनण्याची एक प्रक्रिया आहे. जे राष्ट्रपुरुष होते, पराक्रमी होते, त्यांना आपण ‘देव’ बनवलं आहे. कृष्ण पराक्रमी होता. तो भारतातला पहिला ‘रिमोट कंट्रोल’ राज्यकर्ता होता. तो पदावर नसताना ‘रिमोट कंट्रोल’ होता. म्हणजे आधी कोणीतरी पराक्रमी असतं आणि त्याचं लोकांच्या मनातील स्थान पक्कं होतं. मग हळूहळू त्याच्याभोवती दंतकथा विणल्या जातात. मग ते देव बनतात.

ही देव बनवण्याची प्रक्रिया आजही चालू आहे. आपल्या हयातीत जन्माला आलेल्या लोकांना आपण ‘महापुरुष’ म्हणतो. वीस वर्षांनी आपण त्यांना ‘देव’ म्हणू. सध्या भक्तांचा जो छंद चालला आहे, तो पाहता गांधी सोडून सगळेच देव होतील, असं मला वाटतं. त्यांची देवत्वाकडे ‘ऑलरेडी’ वाटचाल चालू आहे. गांधी देव होणार नाहीत, कारण ‘मी माणूस आहे’ याची त्यांनी खूप तयारी करून ठेवली आहे… ‘माझ्या चुका काय, मी काय केलं’ वगैरे.

आता देव कुठे आहे? आकाशात आहे का? माहिती नाही. नास्तिक लोक म्हणतील, कुठेच नाहीये! पण व्यवहारात देव दिसतो, धर्मात दिसतो, जन्मापासून मरणापर्यंत दिसतो. जन्मल्यावरही देवाची पूजा आणि मरतानाही देवाची पूजा आहे. भारतीय आचारपद्धती देवाने भरलेली आहे. चित्रकलेच्या चार शैली होत्या. त्यातली मुगल सोडली, तर इतर तिन्हींमध्ये ७५ टक्के चित्रं श्रीकृष्णाची आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये श्रीकृष्ण आणि रामावरच्या बंदिशी ७० ते ७५ टक्के आहेत. मला कधी कधी असं वाटतं की, आपण त्यातच का घोळत राहिलो? अशी बंदिश बनायला हवी, जी ग्रहण समजावून सांगेल वगैरे.

देव आणि धर्म सोडून भारतीय आचारपद्धती नाही. यात जर बदल करायचा असेल, तर त्यांच्याशी जरा वेगळ्या पद्धतीनं पंगा घ्यावा लागेल. गांधीजी म्हणाले होते की, ‘देवाला धर्म नसतो’. पण धर्मात मात्र देव असतो, ही मोठी अडचण आहे. नास्तिकांना काही युक्तिवादाचे मुद्दे देणे हे मी माझं कर्तव्य मानतो. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये विश्वास, उपासना असं म्हटलं आहे. त्यात असंसुद्धा म्हटलं आहे की, ‘Not to keep faith is also a faith. Belief, Not to belief is also a right.’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आता मतदानाचंच बघा. मतदानाचा हक्क आहे, पण मतदान न करण्याचासुद्धा हक्क आहे. नास्तिकांबद्दल जर कोणी चॅलेंज करत असेल, तर हे सांगायला पाहिजे की, right to belief जसा आहे, तसा right to not beliefसुद्धा आहे. मुळात ते एकत्रच येतात.

४.

शेवटचा मुद्दा आहे, भारतीय राज्यघटनेतील ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’चा. हा उल्लेख इतर कोणाच्याही राज्यघटनेत नाही. त्याचबरोबर मला खासकरून नास्तिक मित्रांसाठी हे महत्त्वाचं वाटतं की, भारतीय राज्यघटना कोणत्याही एका धर्माला ओळख देत नाही, तिच्यात कोणत्याही एका धर्माचं नाव नाही आणि ती कोणत्याही एका देवाला ओळख देत नाही.

‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही फार वेगळी गोष्ट आहे. ती मी सतत लावून धरतो, तुम्हीही लावून धरा. ‘वैज्ञानिक दृष्टीकोना’साठी चांगले नागरिक तयार व्हावे लागतात, आणि चांगले नागरिक तयार होण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र २० मार्कांचं नाही, तर १०० मार्कांचं असावं लागेल.

मी तीन-चार मुख्यमंत्र्यांचे पत्र फॉलो-अप घेतले. पत्र लिहिण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही. माझा प्रस्ताव असा होता की, राज्यघटना पन्नास मार्कांची असावी. आपण पुतळ्यांवरील मारामाऱ्यांचा ८० मार्कांचा इतिहास शिकवतो आणि उद्याचं नागरिकशास्त्र २० मार्कांचं शिकवतो. विवेकवादी चळवळींनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे. तुम्हाला या देशातून धर्म ही गोष्ट कमी करायची असेल, तर त्या जागी विज्ञान शक्य तितकं आणावं लागेल. युरोपमध्ये तेच झालं. तिथं विज्ञानानं हे स्थान इतक्या पटकन काबीज केलं की, चर्चेस बघता बघता अप्रासंगिक झाली.

३८ टक्के लोक नास्तिक आहेत याचा मला दिलासा वाटला. पण मुद्दा असा आहे की, तुम्हाला विज्ञानाची प्रतिष्ठा शक्य तितक्या लवकर वाढवावी लागेल आणि ती करण्याचा मार्ग नागरिकशास्त्र १०० मार्कांचं करणं.

मागे कोणीतरी म्हणालं होतं की, आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती. गणपतीचं उडालेलं मुंडकं प्लास्टिक सर्जरीनं लावलं. मग बाळकडूसाहेबांनी प्रश्न विचारला की, “प्लास्टिक सर्जरी उपलब्ध होती, तर हत्ती कशाला मारला? जे मुंडकं उडालं होतं, तेच लावलं असतं.” तर्कनिष्ठ प्रश्न आहे. काही काही वेळा प्रश्न फार तर्कनिष्ठ असतात. हा वैज्ञानिक दृष्टीकोन आला पाहिजे.

भारतातला कुठलाही पक्ष हे करेल असं वाटत नाही. कारण त्यांनाच मुळात ते नको असतं. काँग्रेसवाले निदान येतो म्हणून व्हिडिओ पाठवतील, पण राष्ट्रवादीवाले म्हणतील ‘नास्तिक’ शब्द काढा आणि भाजपवाले म्हणतील बघतो कशी घेता परीक्षा ते!

त्यासाठी पुन्हा तुम्हाला-मला; यावं लागेल. मला आता आंदोलन वगैरेचं चित्र फारसं दिसत नाही. पण जिथं जिथं विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांमध्ये जाऊ, तिथं तिथं या विषयाची चर्चा करू. ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही आपल्या राज्यघटनेचं देण आहे, त्यावर आपण पुढची कमाई करू शकतो, असा मला विश्वास वाटतो.

‘आजचा सुधारक’च्या एप्रिल २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा