डिजिटली घडण्याऐवजी ‘बि’घडत(च) चालली आहे तरुण पिढी…
पडघम - तंत्रनामा
प्रथमेश उदेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 January 2023
  • पडघम तंत्रनामा सोशल मीडिया समाजमाध्यम Social Media फेसबुक Facebook ट्विटर Twitter व्हॉटसअ‍ॅप WhatsApp

आपला भारत देश ‘जगातील सर्वांत तरुण देश’ म्हणून ओळखला जातो. भारतात सुमारे ५८.३ टक्के लोकांचे वय २९ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ३०-४० या वयोगटातील लोकांची टक्केवारी ४१ टक्के आहे. तरीदेखील आपला देश इतर देशांच्या तुलनेत एवढा मागे का? याचे उत्तर शोधायला गेल्यावर एक भयाण वास्तव समोर येते, ते म्हणजे सोशल मीडिया व इंटरनेट यांच्या अजगरी विळख्यात अडकलेली आणि भान नसलेली तरुण पिढी. हे वास्तव चिंता वाटायला लावणारे आहे.

इंटरनेटचा शोध लागला आणि सर्व जग जवळ यायला सुरुवात झाली. डिजिटल जगात कोणतीही माहिती मिळवणे किंवा कोणतीही गोष्ट आत्मसात करणे एकदम सुकर होऊन गेले. परंतु इंटरनेटची जशी चांगली बाजू आहे, तशी वाईट बाजूदेखील आहे. इंटरनेटवर भरपूर अशा गोष्टी आहेत, ज्या कोणत्याही व्यक्तीला वेड लावतात आणि वाईट गोष्टींच्या आहारी नेतात.

त्यानंतर येतो सोशल मीडिया. खरे तर याचा शोध दूर असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात संवाद साधण्यासाठी लागला होता, पण आता त्याचे विपरित परिणाम दिसू लागले आहेत. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन लोक ‘सोशल’ न राहता ‘एकलकोंडे’ होत आहेत. विशेषतः तरुण पिढी त्यात जास्तच गुंतत गेली आहे. ती या आभासी दुनियेलाच सर्वस्व मानायला लागली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट ही ॲप्स अक्षरशः तरुण व किशोरवयीन मुला-मुलींना वेड लावत आहेत. परिणामी त्यांच्यासाठी मोबाईल जीव की प्राण होत चालला आहे, किंबहुना झाला आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे तरुण मुले-मुली अनेक घातक आजारांचे बळी होत चालले आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सोशल मीडियावर कोणताही नवीन ट्रेंड आला की, त्याला फॉलो करणे, हे आजकालच्या तरुण-तरुणींचे ध्येय होत चालले आहे. त्यात ते आपला अमूल्य वेळ व ऊर्जा वाया घालवत आहेत. सोशल मीडियावर जर आपण अपडेट किंवा कार्यरत राहिलो नाही, तर आपले अस्तित्वच संपून जाईल, अशी भीती त्यांना वाटत असते. तिथे मिळणारे लाईक्स व शेअर त्यांना एखाद्या पुरस्कारासारखे वाटतात आणि त्याचा त्यांना (फोल) अभिमानदेखील असतो.

आपण वास्तव आयुष्यात कसेही असलो तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण आपल्याला कसे दाखवतो, याला त्यांच्यालेखी जास्त महत्त्व आले आहे. यामुळे आपण आपल्यातच एक विकृती निर्माण करतोय, याची जाणीव त्यांना राहत नाही.

जे तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या विळख्यात सापडलेले असतात, त्यांना काय चूक व काय बरोबर आहे याचे भान नसते. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रफिती एवढ्या मग्न करून टाकणाऱ्या असतात की, त्यात अनेक तरुण आपला अमूल्य वेळ वाया घालवतात.

आजकालचे तरुण-तरुणी किंवा किशोरवयीन मुले-मुली चित्रपटात दाखवणाऱ्या नायकाला अथवा खलनायकाला आपला आदर्श बनवून बसतात आणि त्यासारखे वागायला लागतात. त्याच्या नादात ते हे विसरतात की, ते जग आभासी आहे आणि आपण जे जगतोय ते खरे.

सोशल मीडियाने तरुण व किशोरवयीन मुला-मुलींची संयमाची पातळी खूपच खालावून ठेवली आहे. तीस सेकंदांच्या वरची चित्रफित बघण्याचा संयम त्यांच्यामध्ये राहिलेला नाही. त्यामुळे कोणतेही काम हातात घेऊन ते पूर्ण करण्याच्या त्यांच्या क्षमता कमी होत चालल्या आहेत. परिणामी अनेक तरुण-तरुणी नैराश्य, अस्वस्थता, निद्रानाश व अनेक मानसिक रोगांची शिकार झाले, होत आहेत.

सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या हिंसक व व्यभिचारी चित्रफितीमुळे एक वेगळ्याच प्रकारचा मनाचा झोक तरुण-तरुणींमध्ये बघायला मिळत आहेत. उदा., कोणत्याही छोट्या गोष्टीवरून तीव्र प्रतिकिया देणे, समजूतदारपणाचा अभाव, दुसऱ्यांशी बोलताना कायम वरच्या सुरात व अपमानाच्या भाषेत बोलणे, आपण कोणीतरी महान आहोत व आपल्याशी सर्वांनी आदराने वागावे, अशी भावना ठेवणे आणि ती पूर्ण न झाल्यास संताप करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर न करणे इत्यादी इत्यादी.

‘प्रेम’ या शब्दाची व्याख्याच सोशल मीडियाने बदलून टाकली आहे. आजकाल ‘सिंगल’ असणे गुन्हा झाला आहे. तुमचे सोशल मीडियावर ‘रिलेशनशिप स्टेटस’ काय आहे, यावरून तुमच्याविषयी मत बनवले जाते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये नसाल, तर तुम्हाला आयुष्यात काही जमलेले नाही, असे समजले जाते.

तरुण मुले-मुली सोशल मीडियावर आपण एखादी क्रयवस्तू असल्यासारखा आपला भाव ठरवताना दिसतात. म्हणजे जेवढे एखाद्या मुलाला किंवा मुलीला लाईक किंवा फॉलोअर जास्त, तेवढी त्यांची किंमत. केवळ छायाचित्र बघून प्रेमात पडणाऱ्यांची तर मीडियावर काही कमी नाही. समोरचा माणूस कोण, काय आहे, हे न तपासता त्याच्याशी मैत्री करणे, त्याला भेटणे सर्रास घडताना दिसते. त्यातून जे व्हायला नको ते घडते…

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सोशल मीडियामुळे अनेक लोकांचे आयुष्य उदध्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्जनशीलता, विवेक, ध्येय व संयम हे शब्दच आजकालच्या तरुण-तरुणींच्या शब्दकोशातून नाहीसे होत चालले आहेत. 

सोशल मीडियाच्या विळख्यातून आजकालच्या तरुण-तरुणींना मोकळ करणे, ही काळाची गरज आहे. मोबाईलच्या वापरावर अंकुश घातला पाहिजे. मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये सांघिक भावना निर्माण होतात, तसेच जीवनात आपण सर्वांना घेऊन कसे पुढे जाऊ शकतो, याचे महत्त्व समजते.

आभासी आणि खऱ्या जगातल्या फरकाची जाणीव करून दिली पाहिजे. आभासी दुनियेत अनेक मित्र असतात, पण खऱ्या दुनियेत वेळ प्रसंगी मित्र किंवा नातेवाईकांची गरज असते, याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. आपण असेच या आभासी दुनियेत गुंतून पडलो, तर आपले आयुष्य उदध्वस्त होऊ शकते, हे त्यांना पटवून देता आले पाहिजे.  

कोणत्याही गोष्टीचे जसे वाईट उपयोग असतात, तसेच चांगले उपयोगदेखील असतात. तरुण-तरुणींनी या चांगल्या गोष्टींवर लक्ष द्यायची गरज आहे. उदा., युट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले कोर्सेस करायला व शिकायला मिळतात. अनेक चांगले वक्ते व त्यांचे विचार ऐकायला मिळतात. सोशल मीडियाला आपण पूर्णपणे टाळू शकत नसलो, तरी त्याचा वापर कमी करता येऊ शकतो. आठवड्यातील एक दिवस सोशल मीडियाच्या ॲप्सचा वापर पूर्णपणे टाळावा. त्यामुळे बाहेरचे सुंदर आणि वास्तव जग आपण पाहू शकू, त्याचा आनंद लुटू शकू.

तरुण-तरुणींचा पुस्तकांकडे कल वाढवला पाहिजे. पुस्तकांमध्ये माणसांचे आयुष्य बदलवण्याची ताकद असते. मानवी मनात उत्क्रांतीची सुरुवात पुस्तक वाचनापासून झाली आहे. प्रेम, दया, करुणा व दुसऱ्यांच्या भावनांचा आदर, ही मूल्ये तरुण-तरुणींमध्ये रुजवली पाहिजेत. आपण या देशाचे काहीतरी देणे लागतो, हे तरुण-तरुणींना समजले पाहिजे आणि आपल्या देशाचे भले करण्याचे कार्य त्यांना समजून सांगितले पाहिजे. आपले जीवन राष्ट्रहिताच्या ध्येयाशिवाय व्यर्थ आहे, याची जाणीव त्यांना झाली पाहिजे.

.................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा -

‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ अशा समाजमाध्यमांपासून अंतरानं कसं रहायचं, याच्या ‘शिकवण्या’ सुरू होण्याचा दिवस काही फार दूर नाही - सुनिता कुलकर्णी

आभासी युगातील सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे, तिथं आपलं शरीर व मन कुणालाही दिसत नाही. जे दिसतं, ते फक्त ‘curated profile’! - डॉ. वृषाली रामदास राऊत

सोशल मीडिया हा दुधारी शस्त्रासारखा आहे; पण अगदीच क्वचित चांगल्या गोष्टींसाठी त्या माध्यमाचा वापर होतोय… - अलका धुपकर

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे - डॉ. वृषाली रामदास राऊत

.................................................................................................................................................................

लेखक प्रथमेश उदेकर रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारघर इथं भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

udekarp007@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा