आत्ताच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपला ‘अ‍ॅटिट्यूड’ कसा हवा? तर ‘आशावादी बुद्धिमान’ लोकांकडून ‘वास्तववादी इच्छाशक्ती’ला बळ पुरवणारा!
पडघम - सांस्कृतिक
मायकेल अल्बर्ट
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 15 December 2022
  • पडघम सांस्कृतिक मायकेल अल्बर्ट Michael Albert अ‍ॅटिट्यूड Attitude

आजच्या काळात आपला ‘अ‍ॅटिट्यूड’ नक्की कसा असावा? कसा असायला हवा? मराठीमध्ये ‘Attitude’ या मूळ इंग्रजी शब्दाला समर्पक पर्यायी शब्द नाही. दृष्टी, विचार, वृत्ती, अंगस्थिती असे काही शब्द तितकेसे समर्पक नाहीत आणि ‘दृष्टीकोन’ हा शब्द विचारधारणेशी जास्त निगडीत आहे. त्यामुळे ‘अ‍ॅटिट्यूड’ हा मूळ इंग्रजी लेखातला शब्द इथं तसाच ठेवला आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञ, लेखक, वक्ते आणि राजकीय भाष्यकार मायकेल अल्बर्ट यांच्या ‘Attitude’ या विषयावरील इंग्रजी लेखाचा हा मराठी अनुवाद…

अनुवाद : नीलांबरी जोशी

.................................................................................................................................................................

“काहीच अशक्य नाही असं माना, नंतर संभाव्य शक्यतांचा विचार करा” चार्ल्स डिकन्सनं दिलेला हा सल्ला आहे. तो एक अ‍ॅटिट्यूड आहे.

तुमचा शेजारी हेच वाक्य कदाचित असं लिहिल, “काहीच शक्य नसतं. माणसं डोक्यात जातात. आहे हे असं आहे. चेहऱ्यावर एक हसू डकवा. एक सेल्फी काढा. आहे त्यात आनंद माना…” हाही एक वेगळ्या प्रकारचा सल्ला आहे. वेगळ्या प्रकारचा अ‍ॅटिट्यूड आहे.

तुम्हाला निवड करायची असेल, तर या दोन्हीपैकी एक सल्ला मानाल, किंवा त्याऐवजी नुसतंच म्हणाल, “हे सगळं संपल्यावर मला उठवा. मध्येच मी गचकलो, तर माझं थडगं स्वच्छ राहील याची काळजी घ्या – अर्थात मला नीट पुरलंबिरलं तर, आणि तुम्ही मला पुरायला जिवंत असलात तर…!”

किंवा ताठ मानेनं तुम्ही म्हणाल, “भोवताली नजर टाका. सगळीकडे विद्रोहाची मुळं दिसत आहेत. सगळीकडे कामगार, कृष्णवर्णीय, स्त्रिया, तृतीयपंथी, स्थलांतरित आणि इतर जण आधी कधी नव्हे इतके जागृत झाले आहेत. छोट्या-मोठ्या गोष्टी विसरा. आता सगळं जिंकायची वेळ झाली आहे. त्याहून कमी मान्य करू नका.”

माझा यावरचा प्रश्न? “अशा अस्थिर काळात आपला अ‍ॅटिट्यूड कसा असायला हवा?”

आत्ताचा काळ हा निर्विवादपणे सर्वांत भयंकर आहे. माणसं एकमेकांपासून दुरावणं सर्रास चालू आहे. माणसाची असभ्यता ही रोगराईसारखी पसरली आहे. पर्यावरणाची दु:स्वप्नं आता भयावहपणे मोठी, तर झाली आहेतच आणि ती सर्वत्र पसरून, एका काळरात्रीकडून दुसऱ्या काळरात्रीकडे अशा प्रवासाला निघाली आहेत. युद्ध सर्वत्र पेटलं आहे. न्यायाधीश घाणेरड्या वैयक्तिक पद्धतींचा अवलंब करून त्या पद्धतींचे ढोल पिटतात आणि स्वत:चं नैराश्य इतरांवर लादतात असं घडतं आहे. बहुसंख्य लोक लहानसा बदलही अमान्य करत आहेत. अल्पसंख्याक माथेफिरूंना निवडून आणत आहेत. बंडखोरांनादेखील आता समूहाला प्रेरित करणं जमत नाही. अमेरिकेतले लठ्ठ पगार घेणारे क्रीडाविश्वातले गुरू आणि मिनिमम वेजेस मिळवणारे अमेरिकेतले क्रीडास्पर्धांचे चाहते असे सर्व जण हिरीरीनं ‘‘करोडो डॉलर्सचा करार मिळवायला हा बॉलर पात्र आहे का, तो बॉलर पात्र आहे’’ किंवा “त्याला जरा कमी मिळायला हवे होते असं मला वाटतं. त्याला ना जरा जास्त मिळायला हवे होते, असं मला वाटतं”, यावर वाद घालत बसतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशा त्यांच्या चर्चेदरम्यान आपल्याभोवती आयुष्य पुढे सरकतच असतं, म्हणजे मृत्यूच्या दिशेनं निघालेलं असतं. धोरणं ठरवणारे तज्ज्ञ अणुविषयक धोरणांवर चर्चा करून सामाजिक आत्महत्येच्या जणू आणाभाकाच घेत असतात. उजवीकडे थोडातरी शहाणपणा अस्तित्वात असतो. डावीकडे आपण एकमेकांवर शब्दांचे बाण फेकण्यात मग्न असतो. दरम्यान आपल्याभोवती आयुष्य पुढे सरकतच असतं, मृत्यूच्या दिशेनं निघालेलं असतं!

तरीही आताचा काळ हा सर्वोत्कृष्ट काळ आहे. भावभावनांकडे लक्ष देणं वाढलं आहे. उचित संताप उफाळून येतो आहे. तरुण माणसं - जागतिक तापमानवाढ, लैंगिकतेबाबत कोणाच्याही अधीन असणं, वर्णभेद आणि दडपशाही आणि कामाच्या ठिकाणचे हक्क आणि जबाबदाऱ्या यांची गल्लत - हे सगळं नाकारत आहेत. कायद्यानं वागणाऱ्या समाजात सर्वांना न्याय मिळेल, अशी वाटचाल काही ठिकाणी सुरू आहे. क्रीडा, अगदी क्रीडाक्षेत्रात जरी कितीही बजबजपुरी माजलेली असली तरी ती घाण स्वच्छ करायला त्यांनी सुरुवात केली आहे. प्रतिकाराचा स्वर आणि व्याप्ती विविध आकार घेते आहे. लोकांना शांतता आणि न्याय हवा आहे. माणसं क्रौर्य, वसाहतवाद आणि दडपशाही नाकारत आहेत. अक्राळविक्राळ लाटा आणि दुथडी वाहणारे पूर यांच्या विरोधात माणसं एकमेकांना मदत करत आहेत. माणसं दडपशाहीच्या कारणांवर, बदल कशा स्वरूपाचा असावा, यावर संशोधन करत आहेत. कार्यकर्ते एकत्र येत आहेत. कामगार संघटित होत आहेत. नव्यानं उमललेल्या चळवळी सातत्यानं लढा देत आहेत. नव्यानं उमललेल्या चळवळी लढा देताना सामर्थ्यानं पुढे जात आहेत. माणसं, भांडवलशाही, पितृसत्ताक पद्धती आणि वर्णभेद नाकारत आहेत.

मूलभूत बदल होण्याच्या मानकातून पाहिलं, तर या नवीन चळवळी काही काळ हरत आहेत, हरत चालल्या आहेत, हरतच चालल्या आहेत, असं चित्र दिसेल. मात्र दररोज विकास, विस्तार पावणं, दृढनिश्चय आणि स्पर्धात्मकता या मानकातून या नवीन चळवळी छोट्या प्रमाणावर जिंकत, जिंकत, जिंकतच चाललेल्या दिसतील. यातून मोठाले बदल घडून लोकांचं आयुष्य उंचावेल. त्यामुळे समांतर परिणाम म्हणजे नंतर जास्त प्रमाणात जिंकण्याची इच्छा निर्माण होत जाईल, काय जिंकायचं ते ठरत जाईल आणि अखेरीस मूलभूत बदल झाला, हा विजय प्राप्त होईल.

पण क्षणभर थांबा. हे मूर्खपणाचंही युग आहे. वैचारिकता आणि समंजसपणा नाहीसे झाले आहेत. लोकांच्या मोठ्ठाल्या पदव्यांचं प्रमाण वाढलं आहे. भरमसाठ शिक्षण आणि वाचन लोकांमध्ये वाढलं आहे. लोकांना अमर्याद माहितीस्त्रोत उपलब्ध आहेत. कायदेविषयक, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनविषयक माहितीवर काही लोकांनी मक्तेदारी मिळवली आहे. आपल्या अर्थहीन मूर्खपणाबद्दल लोक स्वत:हूनच बाष्कळ बडबड करत सुटले आहेत. विशेषत: अर्थतज्ज्ञ, राजकीय वैज्ञानिक, मॅनेजर्स आणि माध्यमांचे विद्वान. आपण ज्याच्या अधीन झालो आहोत, त्यातून खरं तर मुक्त होऊ पहातो. इथे त्याऐवजी त्या अधीनतेचेच सगळेजण ढोल बडवत आहेत. ज्यांना आपल्या प्रत्येक कृतींची भीती वाटते, त्यांना आपण त्या भीतीतून मुक्त करायला पहातो.

याउलट इथे ते भीती वाटणाऱ्यांना गिळंकृत करू पहातात. आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो आणि तमाम जनतेच्या तसंच स्वत:च्या इच्छा-आकांक्षांकडे दुर्लक्ष करतो – ‘ते’ पोकळ बडबड करत रहातात. ‘त्यांचे’ बाॅम्बज लोकांना विद्रूप करतात आणि मारून टाकतात, मात्र ‘आपले’ बाॅम्बज आयुष्यातून मुक्त करून लोकांची जोपासना करतात, अशा विधानांवर आपण विश्वास ठेवावा असं त्या ‘दोघां’नाही वाटतं. ‘आपण’ साम्राज्य नाकारतो आणि ‘ते’ साम्राज्याचा उदोउदो करत त्याचा विस्तार करतात – यावर आपण विश्वास ठेवावा असं त्या ‘दोघां’नाही वाटतं.

‘ते’ काहीतरी वाचवण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी विनाश घडवून आणतात, यावर ‘आपण’ विश्वास ठेवावा, असं त्यांना वाटतं. सर्वांत उच्चशिक्षित सत्य नाकारतात, तर्काची खिल्ली उडवतात आणि अगदी मूलभूत अशा नैतिकतेच्याही विरोधात उपदेश करतात. ते खोटं बोलतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा, असं त्यांना वाटतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमेरिकेत आपण जितक्या जास्त विद्वानांचं ऐकू, तितकी आपल्याला कमी माहिती समजेल. अमेरिकेत आपण जितक्या जास्त पदव्या घेऊ, तितका राजकीय क्षेत्राबाबत आपल्या डोळ्यांवर पडदा पडेल. एकूण काय, तर अमेरिकेत ‘कचरा’ वाढतोय.

पण जरा मान वर करून पहा, हाच शहाणीवेचाही काळ आहे. टॅक्सी ड्रायव्हर आणि मांस विक्री करणारा, नर्स आणि रेल्वेतला खानसामा, मोलकरीण, शिक्षक, फार्मसीच्या दुकानातला कॅशियर, ट्रक ड्रायव्हर आणि यंत्रावर काम करणारा - या सगळ्यांना आता संपत्तीच्या आणि सत्तेच्या उतरंडीमध्ये, शाळेत, कामाच्या ठिकाणी, इस्पितळांमध्ये आणि न्यायालयामध्ये आणि सत्तेचा जिथे जिथे वापर होतो, त्या सर्व मार्गांमध्ये अन्याय व्यापून राहिला आहे, याची नीट जाणीव होते आहे.

त्या सगळ्यांना सगळं काही तुटत गेलं आहे, हे माहिती आहे. त्या सगळ्यांना जे माहिती आहे आणि जे नेहमी बोलून दाखवायची गरज वाटत नाही, ते म्हणजे ट्रम्पला आत्मा नव्हता, टीव्ही फक्त भ्रम निर्माण करतो आणि पत्रकारिता हरामीपणा बळकट करत चालली आहे. जाहिराती आणि इतर मूर्ख आक्रस्ताळ्या आवाजातलं किंचाळणं सर्वत्र आपलं लक्ष वेधून घेत असलं, तरी लोकांचं मन आणि मेंदू जिंकण्यात ते सपशेल हरले आहेत. लोकांना आता जाग येते आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ लागला आहे. माणसं स्वत:च आनंद शोधू लागली आहेत.

आता, आपण आपल्या प्रश्नाकडे वळू. या सगळ्या गुंतागुंतीच्या, अस्ताव्यस्त, उफराट्या, काळाच्या उलट्या दिशेनं चाललेल्या काळात असंतुष्ट लोकांनी कोणता अ‍ॅटिट्यूड बाळगावा? आपली आशा चार पंचमांश लोप पावली आहे आणि तिचं फुटक्या मडक्यातून गळणाऱ्या पाण्याप्रमाणे गळणं चालू आहे, हे जाहीर करावं? का आशेचं पात्र चार पंचमांश भरलेलं आहे आणि ते भराभर भरतच चाललं आहे, असं जाहीर करावं? का अजूनच काही?

चतुराईनं वागणारी धूर्त माध्यमं जेवढं वास्तव त्यांच्या व्यवस्थेत चपखल बसत असेल आणि त्यातून लोकांचं लक्ष आणि महसूल मिळत असेल, तेवढंच लोकांसमोर सादर करतात. हास्यास्पद ठरलेली माध्यमं आता त्यांची व्यवस्था सुरक्षित ठेवतील आणि त्यांना लोकांचं लक्ष व महसूल मिळेल, अशा प्रकारे ढोंगी असत्य तयार करून त्या थापा लोकांसमोर सादर करतात. आपण ते आपल्या चौकटींमधून पाहतो. आपण यु-ट्यूबवर लक्ष खिळवून बसतो. अल्गॉरिदम्स आपल्यासमोर जे आणतात, तेवढंच आपण पाहतो. मूळ प्रवाहातली भ्रष्टाचारी इलेक्ट्रॉनिक माध्यमं सत्याचा विपर्यास करून समोर येतात, हे आपल्याला माहिती आहे, पण आपण तरीही पहात बसतो!

बाहेर सगळा विचका झालेला आहे. मग आत, कोणता अ‍ॅटिट्यूड काळाला पूरक ठरेल? माझ्यासाठी कोणता अ‍ॅटिट्यूड असावा? तुमच्यासाठी कोणता अ‍ॅटिट्यूड?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी इथं खोटं बोलणार नाही. तुमचा शेजारी, चेहऱ्यावर खोटं हसू डकवतो. तुमचा शेजारी निमूटपणे खाली पहात चालतो. त्यांच्या या वागण्याला एक अर्थ आहे. जे काही आपण बाहेर परत परत पहातो, ऐकतो त्यानं आपण विद्ध होतो. जे काही आपण बाहेर परत परत पहातो, ऐकतो त्यानं आपल्याला विषाद वाटतो. मग तुमच्या शेजाऱ्यांनी ही सततची वेदना नजरेआड का करू नये, असा निष्कर्ष काढला आहे.

आपणही या भयंकर दृश्यालाही उत्कृष्टपणे कसं सामोरं जाता येईल, असा का विचार करू नये? काहीही अशक्य नाही. जे आहे ते असं आहे हेच खरं असेल, तर मग एक हसू चेहऱ्यावर डकवा. एक सेल्फी काढा. जेवढं उत्तम आहे ते करा. असं का करायचं नाही? आपण काढलेल्या सेल्फीजमध्ये तर स्वर्गाकडे मार्गक्रमण करणाऱ्या राजहंसाचा भास होतच असतो!

ठीक आहे तर मग, प्रेरणादायी विचार करून याऐवजी असं जाहीर का करू नये – सभोवताली पहा. सर्वत्र प्रतिकाराची मुळं फैलावलेली दिसत आहेत. कामगार, कृष्णवर्णीय, स्त्रिया, समलिंगी, स्थलांतरित सगळे जागृत झाले आहेत आणि मान उंचावून पहात आहेत. छोट्या-मोठ्या गोष्टी सोडून द्या. हा सगळं जिंकायचा काळ आहे. ‘सगळ्या’पेक्षा कमी असं अजिबात स्वीकारूच नका. अशा विचारांमुळे उत्साह निर्माण होऊन बरं वाटतं, हे नक्की! अशा लहानसहान गोष्टी केल्याशिवाय मोठ्या लाभापर्यंत पोचता येत नाही.

पराभूत मानसिकता प्रयत्नांचं महत्त्व उणावते. तुम्ही जर आपण हरणार आहोत, असा विचार केला तर तुम्ही हरू शकता.

विजयाची मानसिकता प्रयत्नांकडे दुर्लक्ष करते. अर्थात आत्ताची घसरण विस्मृतीत जाण्याइतक्या नजीकच्या काळात क्रांतीचा विजय होणार नाही.

नवीन संस्था उभारण्यासाठी आवश्यक बदल घडायला हवेत. ते महत्त्वाचं आहे. जुन्या संस्थांद्वारे क्रांतीच्या मार्गावरची प्रक्रिया तयार करताना बदलाच्या दीर्घकालीन टप्प्याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे मानवतावाद जिवंत राहील इतकंच नव्हे तर तो मुक्त होईल. हेही महत्त्वाचं आहे.

अ‍ॅटिट्यूड? अविचलपणे, माहितीपूर्ण आणि सातत्यानं प्रयत्न करत राहण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वासपूर्ण, अचूक आणि भक्कम विचारसरणी हवी. हे खरं, पण ते साध्य करायचं कसं?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अँटोनियो ग्राम्ची हा विख्यात इटालियन क्रांतिकारक, आपल्याकडे ‘बुद्धिमानांचा निराशावाद’ आणि ‘इच्छाशक्तीचा आशावाद’ हवा आहे, असं आवाहन करतो. त्याचा सल्ला कदाचित तत्कालीन फॅसिझम आणि त्या वेळी मूल्यवान असा समाजवाद जोपासणं, यासाठी खूप मौलिक असेल. मात्र आज, तुम्ही माझी निंदा केली तरी चालेल, पण मला वाटतं त्याचा सल्ला आज वापरणं योग्य ठरणार नाही. आत्ता, मला वाटतं, बुद्धिमान लोकांचा आशावाद गरजेचा आहे, निराशावाद नव्हे! तसंच मला वाटतं, आपल्याकडे आशावादी नव्हे, तर वास्तववादी इच्छाशक्ती हवी.

का?

‘बुद्धिमानांचा निराशावाद’ ही संकल्पना वास्तव किती भयंकर आहे, ते जाणून घ्या आणि ते तसं का आहे ते मांडा, असं आवाहन करते. आणि हो, अर्थातच आपण समकालीन धोके ओळखून त्याबद्दल प्रामाणिकपणे बोलायला हवं, पण त्यासाठी कोणी आपली विनवणी करण्याची गरज आहे का? ‘बुद्धिवाद्यांचा निराशावाद’ दुर्मीळ आहे का? मला तसं वाटत नाही. याउलट, मला वाटतं, ‘बुद्धिमानांचा आशावाद’ आज दुर्मीळ आहे.

मला वाटतं, नक्की काय दुर्मीळ असायला हवं, याबद्दल नीट आकलन करून घेण्याची गरज आहे.

मला वाटतं, आपण ज्याचा पुरवठा कमी व्हायला हवा, त्याबद्दल पाठिंबा उभा करण्यासाठी आजच्या काळाबद्दल सजग असायला हवं. म्हणजे आपल्या सध्याच्या दुर्दशेबद्दल आपल्याला स्पष्टता असायला हवी, पण त्याहूनही जास्त प्रमाणात चांगल्या ठिकाणी पोचण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल स्पष्टता असायला हवी. आपल्याकडे ‘बुद्धिमानांचा निराशावाद’ खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे जो दुर्मीळ आहे आणि ज्याची विलक्षण गरज आहे तो म्हणजे ‘बुद्धिमानांचा आशावाद’.

आणि ‘आशावादी इच्छाशक्ती’चं काय? मला ग्राम्ची यांच्या भावनांबद्दल आदर आहे, मला त्यांचं कौतुक आहे आणि माझ्या विचारांचं प्रतिबिंब मला त्यात सापडतं. पण आत्ताच्या काळातल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना - हा आपला काळ आहे, असं आपण खचितच म्हणू शकणार नाही - हे मला सांगायचं आहे. त्यासाठी ‘बुद्धिमानांच्या निराशावादा’च्या वर ‘आशावादी इच्छाशक्ती’ ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे काय होईल?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘बुद्धिमानांचा निराशावाद’ यातून काय साध्य होतं? काही धूसर हेतूंबद्दलच्या जादुई घोषणा, ज्या फार थोड्या जणांना पटतात आणि त्या फारशा टिकतही नाहीत. अगदी ‘आशावादी इच्छाशक्ती’ जरी ‘आशावादी बुद्धिमानां’मध्ये जमा केली, तरी तुम्हाला काय मिळतं? तर आम्हाला जग हवं आहे आणि ते आत्ताच हवं आहे, असा मंत्रघोष! तो छान वाटतो, पण त्यातून साध्य काहीच होत नाही. मला असं वाटतं, त्याऐवजी आपल्याला एक शहाणीव असलेली झुंजार मानसिकता हवी आहे. ती म्हणजे, मला जग हवं आहे, पण त्यासाठी किती वेळ आणि किती टप्पे पार करायला लागतात ते आम्हाला ठाऊक आहे, त्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न चालू ठेवू.

एकंदरित, मला असं म्हणायचं आहे की, आत्ताच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपला अ‍ॅटिट्यूड कसा हवा? तर ‘आशावादी बुद्धिमान’ लोकांकडून ‘वास्तववादी इच्छाशक्ती’ला बळ पुरवणारा!

.................................................................................................................................................................

मायकेल अल्बर्ट यांचा ‘Attitude’ हा मूळ इंग्रजी लेख https://znetwork.org या पोर्टलवर १ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://znetwork.org/znetarticle/attitude/

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा