नागनाथ कोत्तापल्ले : शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (जन्म - २९ मार्च १९४८, मृत्यु - ३० नोव्हेंबर २०२२)
  • Sat , 03 December 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली नागनाथ कोत्तापल्ले Nagnath Kottapalle

आमच्या पिढीनं काळ्यावर पांढरं करायला सुरुवात केली, तोपर्यंत कवी आणि कथालेखक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्याच्या प्रांगणात चर्चेत आलेलं होतं. हा लेखक खूप समजून-उमजून लिहितो, अनेकदा तर आपल्याला जे म्हणावसं वाटतं तसंच लिहितो, अशी जवळीक कोत्तापल्ले यांच्या लेखनाविषयी तेव्हाही वाटायची. तेव्हा ते बीडला प्राध्यापक होते आणि शिक्षकांविषयी आदराची स्थिती वाटावी, असा तो काळ होता. याचं कारण, एक तर शिक्षक तळमळीनं शिकवत, ‘शहाणे करून सोडावे विद्यार्थीजन’ ही वृत्ती तेव्हाच्या शिक्षकांत होती आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनीही मन लावून वर्गातच शिकण्याचे ते दिवस होते. 

कुठल्या तरी कामानिमित्त तेव्हा बीड मार्गे जात असता एकदा कोत्तापल्ले यांना भेटलोही. ते वर्गावर होते. बाहेरून बघितलं तर शिकवण्याची त्यांची मस्त तंद्री लागलेली होती आणि विद्यार्थीही मन लावून नोटस् घेत होते. मोठं विलोभनीय असं ते दृश्य होतं! अध्यापनातली तन्मयता कोत्तापल्ले यांच्यात कायमच राहिली असं नव्हे, तर पुढे जाऊन त्यांच्यातल्या शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकाचीही भूमिका निभावली.

एक आधीच सांगून टाकायला हवं, मी काही कोत्तापल्ले गुरुकुलातला विद्यार्थी नव्हे. लेखक म्हणूनही त्यांच्याशी माझी फार काही घसट नव्हती. अधूनमधून भेटी, गप्पा होतं. ‘आपण दोघंही मराठवाड्याचे’ हा मृदगंध आमच्यातल्या त्या गप्पांना असे. त्यांनी एखादी नवीन असाइनमेंट स्वीकारली की, आवर्जून जाऊन त्यांना त्या नव्या पदाच्या खुर्चीत बघण्याचा नाद जणू मला लागला होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षण संपलं. मी पत्रकारितेत आलो आणि स्थिरावलोही. हा मधला दहा-बारा वर्षांचा काळ आमच्यात मुळीच संपर्काचा नव्हता. नागपूरला ते कुठल्या तरी कार्यक्रमाला आले, तेव्हा भेटायला गेलो. गप्पांतून लक्षात आलं की, भेट न होता आम्ही दोघांनीही परस्परांविषयी स्वत:ला अपडेट ठेवलं होतं. एव्हाना कोत्तापल्ले नावाचं झाड  कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, शिक्षक असं विविधांगी बहरलेलं होतं. या झाडाला लागलेली फुलं आणि फळंही आगळ्याच कर्तृत्वानं त्यांचं बहरून आलेली  होती. मराठी भाषा आणि साहित्यविषयक अनेक समित्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं कुलगुरूपद, चिपळूणला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे याच कर्तृत्वाचे बहर होते.

कोत्तापल्ले यांच्यातला कथालेखक अगदी सुरुवातीपासूनच मला जास्त भावत गेला. त्यांच्या कथा काळाच्या पुढे जाणाऱ्या असल्याचं जाणवत असे. त्यांची भाषा सामाजिक बांधीलकी आणि मानवी संवेदनेची होती. दृष्टीकोन पुरोगामी, डावीकडे झुकलेला, नव्याचं स्वागत करणारा अगत्यशील होता आणि वर्तन विवेकी होतं. साहित्याच्या विविध प्रांतात मुशाफिरी करण्याच्या कैफात त्यांच्यातला कथालेखक बराचसा मागे पडला, असंही माझं मत आहे आणि हे मी त्यांना बोलूनही दाखवत असे.

मुक्तिबोधांची ‘जन हे वोळतू जेथे’ ही माझी आवडती एक कादंबरी आणि कोत्तापल्ले यांची ‘उलट चालिला प्रवाहो’ ही माझी अतिशय आवडीची कादंबरी. आवडत्या या दोन्हीतील शब्दसाधर्म्य लक्षणीय आहे. ‘उलट चालिला प्रवाहो’ या कादंबरीचा नायक नारायण अनेक वर्षे माझ्या स्वप्नात पिंगा घालायला येत असे, असं जर आज कुणाला सांगितलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण पत्रकार केवळ साहित्यातल्या बातम्या देतात, असाच बहुसंख्य लोकांचा समज आहे; पत्रकार साहित्याशी असे एकाग्र होतात, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण ते असो.

कोत्तापल्ले यांच्या ‘गांधारीचे डोळे’, ‘सावित्रीचा निर्णय’ या कथांचा पोत साहित्याच्या सर्व निकषांवर अस्सल भरजरी आहे, यात शंकाच नाही. त्यांचा स्मरणात राहिलेला आणखी एक लेख म्हणजे ‘चळवळीचे साहित्यशास्त्र’. मुळात चळवळींना काही साहित्य मूल्य किंवा शास्त्र असतं, याची जाणीवच (काही मोजके समीक्षक वगळता) तोवर विकसित झालेली नव्हती. कोत्तापल्ले यांच्या या लेखानं चळवळींकडे बघण्याचा दृष्टीकोन साहित्यिक अंगानं मग उलगडत गेला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कोत्तापल्ले विद्यार्थीकेंद्रीत शिक्षक होते. ते कुलगुरू झाले, तेव्हा माझी मुंबई-नागपूर अशी मुशाफिरी सुरू होती, पण मराठवाड्यात पत्रकारितेच्या निमित्तानं चकरा सुरूच असत. औरंगाबादला आलो की, ‘स्वामी’ श्याम देशपांडेसोबत कोत्तापल्ले यांची ओझरती का असेना भेट झाली नाही, असं कधी घडतचं नसे. अशाच एका औरंगाबाद भेटीत सतीश कुलकर्णी या ज्येष्ठ मित्रानं विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कसा अन्याय झाला, याची कथा सांगितली. त्या विद्यार्थ्याची भेटही घडवून आणली. हे घडलं तेव्हा नेमकं कोत्तापल्ले औरंगाबादला नव्हते. पुढे त्या विषयावर मी एक बातमी लिहिली. ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर माझ्या नावानिशी ती प्रकाशित झाली; स्वाभाविकच त्या बातमीची बरीच चर्चा झाली. कोत्तापल्लेंचा फोन आला आणि ‘हा विषय बातमीचा कशाला करायचा? मला फोनवर जरी सांगितलं असतं तरी मार्ग काढला असता’, असं ते म्हणाले. ‘त्या विद्यार्थ्याला माझ्याकडे पाठवून द्या.’ असंही त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याची भेट घेऊन, प्रश्न समजावून घेऊन, त्यातून मार्गही काढला.

कोत्तापल्ले यांचं आणखी एक योगदान फारच महत्त्वाचं वाटतं. १९६०च्या आसपास मराठी साहित्याला दलित, ग्रामीण, विद्रोही, वास्तववादी असे धुमारे फुटू लागले. दलित साहित्यानं तर मराठी साहित्यातल्या तोवर प्रस्थापित संकेत, शिष्टाचार आणि रूढींना चक्क हादरेच दिले. कोत्तापल्ले लिहू लागले त्याच्या आसपास आनंद यादव, रा.रं. बोराडे, गणेश चंदनशिव, वासुदेव मुलाटे, अशा अनेकांनी ग्रामीण साहित्याच्या दालनात उल्लेखनीय योगदान देणं सुरू केलेलं होतं. अस्सल मातीचा गंध असणाऱ्या या साहित्य प्रकाराची चर्चाही सुरू झालेली होती. मात्र, ग्रामीण साहित्याची ठोस अशी समीक्षा होत नव्हती. कोत्तापल्ले यांनी ग्रामीण साहित्याच्या समीक्षेला एक निश्चित वैचारिक दिशा मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न केला, यात शंकाच नाही.

प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे कोत्तापल्ले यांच्यासोबत सलग दोन आठवडे राहण्याचा योग आला. जागतिक पातळीवर मराठी संमेलन व्हावं, असा तेव्हा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या कौतिकराव पाटील आणि त्यांच्या गटाचा आग्रह होता. आणि नेमका मनोहर म्हैसाळकर व त्यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ साहित्य संघाचा या संमेलनाला विरोध होता. मी तेव्हा नागपुरात होतो आणि म्हैसाळकरांच्या तंबूतला एक म्हणून साहित्यप्रांती बरीच लुडबूड करत होतो. तरी विश्व साहित्य संमेलनाच्या कल्पनेचा मी हिरिरीने पुरस्कार केला. एवढंच नाही, तर अमेरिकेत सॅन होजेला झालेल्या संमेलनात एक प्रमुख वक्ता म्हणून सहभागीही झालो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्या दौऱ्यात अर्थातच कोत्तापल्ले हेही होते. त्यानिमित्तानं मुंबई ते न्यूयॉर्क या सुमारे दोन आठवड्याच्या प्रवासात कोत्तापल्ले यांच्याशी चांगलीच जवळीक निर्माण झाली. त्यांच्या कथालेखनावर भरपूर चर्चाही झाली. या काळात कोत्तापल्ले यांच्यासोबत काही मैफिलीही रंगल्या आणि गप्पांतून त्यांच्यातल्या उमदेपणाचाही परिचय झाला. कोत्तापल्ले, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे यांच्यासोबत नायगरा धबधब्याशेजारी असलेल्या एक हॉटेलात रात्री उशीरापर्यंत रंगलेली मैफल अजूनही स्मरणात आहे.

भारतात परतल्यावरही आम्ही बऱ्यापैकी संपर्कात होतो. एक दिवस कोत्तापल्लेंचा फोन आला आणि चिपळूणला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठीचा त्यांच्या नावाचा अर्ज मी नागपूरहून दाखल करावा, तसंच त्यांच्या बाजूनं प्रचार करावा, असंही त्यांनी सुचवलं. मी फारच अडचणीत सापडलो कारण हा फोन येण्याच्या पाच-सहा दिवसच आधी ह.मो. मराठे यांचा उमेदवारी अर्ज नागपूरहून दाखल करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला मी अनुकूलता दर्शविली होती. १९७७पासून त्यांच्याशी माझा स्नेह होता. लेखनाच्या अनेक संधी त्यांनी मला दिलेल्या होत्या. त्यांची ब्राह्मणवादी भूमिका मला साफ अमान्य होती, तरी व्यक्तिगत पातळीवर परस्परांत ‘सेंटीमेंटल’ गुपितंही शेअर करण्याइतपत आमची मैत्री होती.

ब्राह्मणवादाच्या ‘त्या’ वादग्रस्त भूमिकेचा उच्चारही न करता निवडणूक लढवत असाल, तरच पाठिंबा देतो’, ही सेवानिवृत्त विंग कमांडर अशोक मोटे आणि माझी अट ‘ह.मों.’नी मान्य केली होती आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांच्यासाठी मतांची जुळवाजुळवही सुरू केली होती.

थोडंसं बोलणं झाल्यावर पाठिंबा न देता येण्यामागची भूमिका मी कोत्तापल्ले यांना सविस्तरपणे सांगितली. माझ्या नकारामुळे आलेली नाराजी स्पष्ट, पण सौम्य शब्दांत त्यांनी व्यक्त केली. तेव्हाचं बोलणं माझ्या अजूनही स्मरणात आहे, पण त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता कोत्तापल्लेंच हयात नाहीत, म्हणून ते संभाषण इथं देत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कोत्तापल्ले-मराठे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पुढे त्या निवडणुकीने नाट्यमय वळण घेतलं. एका प्रकाश वृत्तवाहिनीनं मराठे यांचं ब्राह्मणविषयक जुनं वक्तव्य नवं म्हणून सादर केलं आणि निवडणुकीला एकदम कलाटणीच मिळाली. त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. परिणामी विजय हाताशी आलेली ती निवडणूक मराठे हरले आणि कोत्तापल्ले अध्यक्ष झाले. नंतर आमची भेट झाली, तेव्हा त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठलीही कटुता नव्हती. जे काही घडलं, ते त्यांनी उमदेपणानं  घेतलं होतं.

शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा एक लेखक, तळमळीचा शिक्षक आणि उमदा माणूस म्हणूनही कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्यात महत्त्व अत्यंत ठळकपणे नोंदवलं गेलेलं आहे. म्हणूनच ते आज आपल्यात नाहीत, ही जाणीव विषण्ण करणारी आहे... 

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......