ते ‘कुंकू-टिकली’बद्दल बोलतील, तुम्ही ‘वाट्या’बद्दल विचारा... प्रतिमा-प्रतीकांची लढाई आता हाणूनच पाडा...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सुनिता कुलकर्णी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 07 November 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न स्त्रिया महिला कुंकू टिकली हक्क आरक्षण वाटा

गेला आठवडाभर समाजमाध्यमांमधून कुंकवाची उठाठेव सुरू आहे. पूर्वी पतीनिधनानंतर संबंधित स्त्रीने कुंकू लावायचं नाही, असा रिवाज होता. (आता तो बऱ्यापैकी कालबाह्य झाला आहे.) पण तेव्हा संबंधित स्त्रीला उद्देशून ‘विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला?’ अशी म्हण प्रचलित होती. ज्या व्यक्तीचा ज्या गोष्टीशी संबंध नाही, तिने त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नये, असा त्याचा अर्थ. मग ज्यांना कधी कुंकू किंवा टिकली लावावी लागत नाही, त्या पुरुषांनी तरी त्याच्या भानगडीत कशाला पडावं? आणि शहाणेसुरते पुरुष त्या भानगडीत पडतही नाहीत. त्याची कारणं दोन.

एक म्हणजे त्यांना हे आतून नीट माहीत असतं की, या कुंकू - टिकली, मंगळसूत्रं, वेगवेगळे हार, नेकलेस, बांगड्या, पैंजण, जोडवी, गजरे या सगळ्या गोष्टी स्त्रिया घालत असतात, ती त्यांची नटण्या-मुरडण्याची हौस म्हणून. ज्यांना त्या सगळ्यात अर्थ वाटत नाही, त्या स्त्रिया यातल्या कोणत्याच गोष्टी घालत नाहीत. त्यांनी ते सगळं घालायचं की नाही, हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. विवाहित स्त्रीने हे सगळं घालणं, न घालणं याचा आणि लग्नाचा काडीचाही संबंध नाही. लग्न केलं जातं, ते निसर्गाने निर्माण केलेल्या लैंगिक गरजांच्या पूर्तीच्या आवश्यकतेसाठी. त्यासाठी लग्न करण्याचीही गरज नसते, ही गोष्ट वेगळी. आता त्यासाठी समाजाने घालून दिलेली एक व्यवस्था म्हणजे लग्न. ती पाळावी असं अनेकांना वाटतं, ते लग्न करतात. ज्यांना वाटत नाही, ते आजकाल ‘लिव्ह इल रिलेशनशीप’मध्ये राहतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर लग्न केल्यानंतर त्या दोन व्यक्तींचा लैंगिक संसार सुखाचा होणं, त्यांची मनं जुळणं, त्यांनी जगण्याचा एकत्र आनंद घेणं, त्यांनी एकमेकांच्या बरोबरीने वैयक्तिक- सामाजिक- आर्थिक विकास करून घेणं, त्यांना हवं असेल तर मुलं जन्माला घालून प्रजोत्पादनाचा निसर्गाचा हेतू साध्य करणं हे सगळं अपेक्षित असताना त्यात मंगळसूत्र- कुंकू- टिकली या गोष्टी कुठून येतात? त्यांचा वैवाहिक जगण्याशी काय संबंध? लग्न केल्यामुळे एकटी स्त्रीच तेवढी सौभाग्यवती कशी होते? मनासारखा जोडीदार मिळणं, हे पुरुषाचंही सौभाग्य नाही का? आणि दुर्दैवाने तिचा जोडीदार असलेला नवरा गेला, तर तिला एक प्रकारे सामाजिक बहिष्कृताचं जगणं का जगावं लागावं?

हे आणि असे सगळे प्रश्न उपस्थित होतात, कारण एका महिला पत्रकाराने मंत्रालयाच्या परिसरात ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलात, तर ते काय म्हणाले? काय बोलणं झालं?’ हा प्रश्न विचारल्यावर ‘तू टिकली लावून ये, मगच तुझ्याशी बोलीन. आपली भारतमाता विधवा नाही’, अशी उत्तरं मिळतात, म्हणून. एरवी जगण्यामधला प्रश्नांचा रेटा इतका जबरदस्त आहे की, कुणी टिकली लावली आहे का आणि आणखी काही केलं आहे का, हे बघायलाही कुणाला वेळ नाही.

त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे सगळे साधारण ७०-८०च्या दशकात स्त्रीवादी चळवळ बारसं धरायला लागली होती, त्या काळामधले मुद्दे आहेत. त्या काळामध्ये प्रश्न विचारायला नुकती कुठे सुरुवात झाली होती. प्रतिमा-प्रतीकांचा आधार घेत खऱ्या संघर्षाला सुरूरुवात झाली होती. मुलीनेच का कुंकू लावायचं, तिनेच का मंगळसूत्र घालायचं, पुरुषासाठी हे सगळं का नाही, घरातली कामं मुलीनेच का करायची, पाटपाणी घेणं हे तिच्या भावाचं काम का नाही, असे अगदी मूलभूत आणि म्हटलं तर बाळबोध प्रश्न विचारायला मुलींनी सुरुवात केली होती. तेव्हा एवढं विचारणं हेदेखील धाडसच होतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

हॉटेलात एकट्या जाऊन बसलेल्या स्त्रीला काय हवं, हे विचायरायलादेखील वेटर यायचा नाही, कारण ती एकटी येऊन खाईल, हे संभवतच नव्हतं. पतीनिधनानंतर रेशन कार्डावर कुटुंबप्रमुख म्हणून तिचं नाव लावायला तिला संघर्ष करावा लागायचा. त्याऐवजी तिच्या लहान मुलाचं नाव लावलं जायचं. आडनाव न बदलणाऱ्या स्त्रियांनाही त्या काळात बँकेत, रेशन कार्डावर, पासपोर्टवर नाव न बदलता माहेरचं नाव कायम ठेवण्यासाठी त्या त्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागला आहे.

कुंकू, टिकली, बांगड्या, मंगळसूत्रं, लग्नानंतर नाव न बदलणं, नवऱ्याचं नाव न लावणं या सगळ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने लादलेल्या प्रतिमा-प्रतीकांविरोधामधला संघर्ष तेव्हा अपरिहार्य होता. त्या दशकामधल्या स्त्रियांनी तो केला. त्यासाठी आपली उर्जा खर्च केली. त्याची किंमत मोजली. पण त्यातून जो अवकाश तयार झाला, त्यामुळेच आज कुंकू न लावणं, मंगळसूत्र न घालणं, लग्नानंतर नाव न बदलणं यात काही वेगळं आहे, असं फारसं कुणाला वाटत नाही. स्त्रीप्रश्नांच्या परिघात या मुद्द्यांची तर चर्चादेखील होत नाही, इतक्या या गोष्टी आता मागे टाकल्या गेल्या आहेत.

पण तरीही कुणीतरी बुरसटलेल्या विचारांचा माणूस हा असलं काहीतरी बोलतो, तेव्हा काय करायचं, हा प्रश्न उरतोच. आता समाजमाध्यमं सहजपणे आणि सगळ्यांनाच उपलब्ध असल्यामुळे टिकली या मुद्द्यावर अनेक जण वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त झाले. फक्त स्त्रियांनीच नाही, तर अनेक पुरुषांनीदेखील आपला विरोध नोंदवला. पण हे करताना झालं काय, तर स्त्रियांविषयीच्या प्रश्नांचा ड्राईव्ह एक प्रकारे बुरसटलेल्या मंडळींच्या हातात दिला गेला. बायांना प्रतिमा- प्रतीकांच्या लढाईतच अडकवून ठेवण्याचा हा डाव आहे, हे कुणी लक्षातच घेतलं नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आज कितीतरी मुद्दे असे आहेत की, ज्यांच्याबद्दल सतत बोललं जायला पाहिजे आहे. लग्नांतर्गत बलात्काराला अजूनही भारतात गुन्हा कायद्यानुसार गुन्हा ठरवलं गेलेलं नाहीये. करोनाच्या काळात सगळेच जण आपापल्या घरी होते, तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी पुढे आली. करोना नंतरच्या काळात बालविवाहांचं प्रमाण लक्षणीय पातळीवर वाढलं आहे. वेश्याव्यवसायात मुलींना ढकलण्याचं प्रमाण वाढलं आहे. वडिलोपार्जित तसंच वडिलांच्या संपत्तीत मुलींना कायद्याने हक्क असूनही तो मिळतोच असं नाही. त्यासाठी त्यांना झगडावं लागतं किंवा तो सोडून द्यावा लागतो. या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येत निम्मा सहभाग असतानाही विधानसभा आणि लोकसभेत स्त्रियांना निम्मं तर सोडाच, ३३ टक्केदेखील आरक्षण मिळत नाही. निवडून येण्याच्या निकषावर तिकिटं मिळत असल्यामुळे स्त्रियांच्या वाट्याला राजकारणात त्यांच्या हक्काच्या जागा येत नाहीत.

या सगळ्याबद्दल स्त्रियांनी बोलणं, प्रश्न विचारणं कुणालाच नको आहे. हिंदू स्त्रियांना जास्तीत जास्त मुलं व्हायला हवीत, माझ्या आमराईतला आंबा खाल्ल्यामुळे पुत्रप्राप्ती होते, अशा प्रतिगामी विचारसरणीला तर स्त्रियांनी कोणतेच प्रश्न विचारायला नको आहेत. हिंदू स्त्रियांनी कुंकू-टिकली लावावी, यासाठी आग्रह धरायचा आणि मुस्लीम स्त्रियांनी हिजाब घालू नये, यासाठी त्यांच्यावर समूहाने चालून जायचं, अशा विरोधाभासातून ही मंडळी नवाच हलकल्लोळ उडवून देऊ पहात आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

असा सगळा गोंधळ निर्माण झाला की, स्त्रिया प्रतिमा-प्रतीकांच्या लढाईत अडकतील आणि आजच्या मूलभूत प्रश्नांकडे वळणारच नाहीत, हा यातला डाव आहे. तेव्हा बायांनो, प्रतिमा-प्रतीकांमध्ये अडकू नका. ते टिकलीबद्दल बोलतील, तुम्ही ‘वाट्या’बद्दल (संपत्तीमधला वाटा, आरक्षणाचा लाभ) विचारा...

.................................................................................................................................................................

लेखिका सुनिता कुलकर्णी या मुक्त पत्रकार आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......