भारतातल्या उद्योग जगताला 5G हवे आहे. या दिवाळीपासून आपल्याला मिळणारही आहे, पण 5G म्हणजे नेमके काय?
पडघम - तंत्रनामा
जीवन तळेगावकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 11 October 2022
  • पडघम तंत्रनामा फाइव्ह-जी 5G फोर-जी 4G थ्री-जी 3G टु-जी 2G मोबाईल Mobile स्मार्ट फोन Smat Phone इंटरनेट Internet

नवी दिल्लीत प्रगती मैदानाच्या पुनर्निर्मित इमारतीत १ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’मध्ये 5G सेवेचे अनावरण केले. त्या वेळी त्यांनी या दिवाळीपासून आपल्या देशातील तीन टेलिकॉम सेवा कंपन्या हे तंत्रज्ञान भारतीय ग्राहकाला उपलब्ध करून देतील, अशी उद्घोषणा केली. काही महिन्यांपासून भारतीय उपभोक्ता 5G म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत; तसेच बऱ्याच भारतीय कंपन्यादेखील या तंत्रज्ञानामुळे नेमके काय बदल होतील, याचा आपापल्या परीने आढावा घेत आहेत, तर काही बहुराष्ट्रीय कंपन्या याचा स्वीकार करत आहेत.

थोडक्यात, आज आपण LTE (‘लॉन्ग टर्म इव्होल्यूशन’) / किंवा 4G तंत्रज्ञान वापरत आहोत. त्याच्या तुलनेत आपल्याला दहा पट अधिक स्पीड 5Gमुळे मिळणार आहे, असे आपण समजू. आज ५०-६० Mpbs मिळणारा मोबाईल इंटरनेटचा वेग वाढून साधारण ५००-६०० Mbps होईल. आज ४० ते ८० मिली सेकंड्स मिळणारी लेटन्सी (विलंब) घटून १०-२५ मिली सेकंड्स एवढी मिळेल. म्हणजे एखादा कन्टेन्ट अ‍ॅक्सेस करण्यासाठी लागणारा अवकाश कमी होईल, असे समजू. उपभोक्त्याच्या दृष्टीने जाणवणारे हे दोन महत्त्वाचे फरक असतील.

आता पुढचा प्रश्न - याचा व्यावहारिक उपयोग काय? जास्त वेग आणि कमी विलंब, यामुळे माहितीचे आदानप्रदान वाढेल, निर्णय झटपट होतील, व्यवहारांची वारंवारिता वाढेल. एका अभ्यासानुसार, देशाचा जीडीपी ०.५ ते १ टक्क्याने वाढेल. जगभरात लोकांना आणि व्यवसायांना जोडण्यात, संवाद वाढवण्यात दूरसंचार तंत्रज्ञानाने (‘टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता हे अधिक जलद कसे करता येईल, यावर नव्या तंत्रज्ञानाचा भर आहे. 

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या तंत्रज्ञानाने नव्या अ‍ॅप्लिकेशन्सना जन्म दिला आहे. ग्राहकांसाठी आंतरजालावरील माहिती लवकर मोबाईल फोनमध्ये उपलब्ध होईल, शेअर मार्केटमधील व्यवहार अधिक जलद होतील, धान्यांचे आणि इतर कमोडिटीज संबंधीचे व्यवहार अधिक जलद होतील, नवीन चित्रपट किंवा गेम्सच्या ७० GB (‘गिगा बाइट्स’)च्या हेवी फाईल्स १५५ मिनिटांऐवजी १५ मिनिटांत डाउनलोड होतील, ‘मेटाव्हर्स’सारखी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ स्पेस आकार घेऊ लागेल. कारण या हेवी ‘थ्री-डी’ कन्टेन्टला मोबाईलवर अ‍ॅक्सेस करण्यासाठी लागणारा मोठा बिट पाईप आता उपलब्ध असणार आहे.

एखादी मॅच चालू असताना विविध अँगल्समधून त्याचे चित्रीकरण करण्यात येईल आणि त्याचे ‘रिअ‍ल-टाइम शॉट्स’ 4K किंवा 8K व्हिडिओज द्वारे (म्हणजे फुल ‘हाय डेफिनेशन’ (HD) कन्टेन्टच्या चार किंवा आठ पट अधिक क्लिअर) उपभोक्त्यांपर्यंत पोचतील आणि रोमांचकता वाढवतील.

शहरी आणि ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतदेखील नवीन क्रांती घडून येईल. काही साधी उदाहरणे द्यायची तर, अ‍ॅम्बुलन्समधील पेशंटचा ‘गोल्डन-अवर’ डेटा जलदगतीने डॉक्टर्सपर्यंत पोचेल. जगभरातील शैक्षणिक ‘थ्री-डी’ मॉडेल्स देशाच्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील, ते जगाच्या तुलनेत एकाच समान पातळीवर असल्याचा अनुभव घेतील.

अधिक माहितीसाठी मोठ्या शहरात स्थलांतरित होण्याची आवश्यकता असणार नाही. ‘वर्क फ्रॉम होम’ सामान्य बाब झाल्यापासून आपण याचा अनुभव घेत आहोत, पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरेल तेव्हा त्यापेक्षा अधिक हवे, असे वाटत राहील. आणि तोपर्यंत 6G आकार घेऊ लागेल. त्यावर अ‍ॅडव्हान्स रिसर्च सुरू झाला आहे, ‘वर्किंग मॉडेल्स’ही बनत आहेत.           

हे असे का होते, याचा विचार केल्यास हे आपल्याला माणसाच्या ‘बिहेविअरल चेंज’पर्यंत घेऊन जाते. साधे आहे, आपण आधी मोबाईलवर गाणी ऐकायचो, म्हणजे काय करायचो? एखादे ‘MP3’ अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करायचो. आता आपण गाडी चालवतानादेखील ‘यु-ट्यूब’ चालू करून ठेवतो आणि गाणी ऐकतो, पण मोबाईल नेटवर्कवर तर व्हिडिओ कन्टेन्टचे आदानप्रदान होत असते; आपण गाडी चालवत असल्याने तो पाहत नाही, ऐकतो. तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि स्वस्त आहे म्हणून आपण ते वापरतो. आपल्या नकळत आपली सवय बदलली आहे.

काही काळ जाताच आता नवे वाटणारे तंत्रज्ञान आपल्या अंगवळणी पडलेले असते. एकेकाळी आपल्याला ‘फेसबुक’ नवे वाटायचे, आता सगळ्या वयोगटातील सगळे नातेवाईक ‘फेसबुक’वर गोळा झाले आहेत. त्यामुळे तरुणांनी ‘इन्स्टाग्राम’ किंवा तत्सम काही शोधले. त्यांना ‘सोशल मीडिया’वर ‘पेरेंटिंग’ नको आहे, ‘व्हिजिलन्स’ नको आहे. हा ‘बिहेविअरल चेंज’ आहे. यामुळे नवीन तंत्रज्ञान येत राहणार आणि त्याला ग्राहकांचा आधार मिळत राहणार, हे आपण थोपवू शकत नाही. मार्केट ‘डिमांड आणि सप्लाय’वर टिकलेले असते, ते आपला आकार घेत राहील, कोणाला हवे असले तरी किंवा नको असले तरी.    

आता इंडस्ट्रीच्या दृष्टीने 5G नेमके काय घेऊन आले आहे, ते पाहू. GSA (‘ग्लोबल मोबाईल सप्लायर्स असोसिएशन’)चा नवीन अहवाल जगभरात ९००च्या आसपास कंपन्यांनी ‘प्रायव्हेट 5G’ नेटवर्क लावल्याचे सांगतो. यात ‘मॅन्युफॅक्चअरिंग’, ‘ऑइल अँड गॅस’, ‘एनर्जी अँड यूटिलिटीज’, ‘एअरपोर्ट्स’, ‘वॉटरपोर्ट्स’, ‘माईन्स’, ‘हेल्थकेअर’, ‘एज्युकेशन’, ‘लॉजिस्टिक्स-वेअरहाऊसिंग’ इत्यादींचा समावेश होतो.

या क्षेत्रांना 5G का हवे आहे, याची काही व्यावसायिक कारणं आहेत-

१) ‘ऑप्टिकल फायबर’ इंटरनेटसाठी उत्तम ‘बॅकहॉल टेक्नॉलॉजी’ असली तरी कंपनीत असलेल्या हजारो डिव्हायसेसना कनेक्ट करण्याच्या कामी ‘वायरलाईन’ उपयोगी नाही. त्यासाठी ‘सेल्युलर वायरलेस ऍक्सेस टेक्नॉलॉजी’ हवी. ती 5G देते. त्यामुळे मोबाईल (मूव्हिंग) अ‍ॅप्लिकेशन्सना जोडणे सोयीचे जाते. उदा., ‘रोबोट्स’, ‘ए-एम-आर’, ‘ए-जी-व्ही’, ‘ऑटोनॉमस वेहकल्स’, ‘ड्रोन्स’, ‘सर्व्हेलन्स कॅमेराज’, ‘ऑगमेंटेड रियालिटी हेडसेट्स’ इ.        

२) 5G वापरून इतर तंत्रज्ञानाच्या तुलनेत प्रति चौरस मीटर कित्येक पटीने अधिक डिव्हायसेसना कनेक्ट करता येते.

३) 5Gचे पॉवर कंझम्शन बाकी तंत्रज्ञानाच्या तुलनेत खूप कमी आहे.

४) 5Gचे आर्किटेक्चर ‘क्लाऊड नेटिव्ह’ आहे. म्हणजे त्याला निर्देश देणारे ब्रेन (‘कोअर’) इंडस्ट्रीच्या फायरवॉलच्या आतमध्ये सुरक्षित राहू शकते.

५) हे तंत्रज्ञान स्वीकरणाऱ्या कंपन्या स्वतःचा ऑपेरेशनल डेटा भविष्यात मॉनेटाईझ करू शकतात. त्यामुळेच ‘डेटा इज न्यू ऑइल’ असं म्हटलं जातं.

६) हे तंत्रज्ञान प्रत्येक अ‍ॅप्लिकेशनसाठी एक ‘QoS’ ('क्वालिटी ऑफ सर्व्हिस' किंवा ‘स्लाईस’) देऊ शकते, म्हणजे ज्या अ‍ॅप्लिकेशनला जेवढा स्पीड वा अवकाश हवा तेवढाच देणे इ. म्हणजे ‘स्पेक्ट्रम’चा अपव्यय टाळते.

नुकत्याच झालेल्या लिलावावरून आपण अंदाज बंधू शकतो की, सेवा क्षेत्रात भारतातल्या तीन कंपन्यांनी मिळून १९ बिलियन डॉलर्स या ‘स्पेक्ट्रम’साठी खर्च केले आहेत. त्यामुळे त्याचा सयुक्तिक वापर किती महत्त्वाचा ठरतो.   

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतात सध्या 5G सेवा देण्यासाठी ७०० MHz (१० मेगाहर्ट्झ बॅण्डविड्थ), ३.३ GHz (१०० मेगाहर्ट्झ बॅण्डविड्थ), आणि २६ GHz (१००० मेगाहर्ट्झ बॅण्डविड्थ) उपलब्ध आहे. गणितीय नियमाप्रमाणे ७०० मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी ही कव्हरेज आणि मोबिलिटीसाठी वापरली जाईल. ३.३ गिगाहर्ट्झ अधिक कपॅसिटी आणि कव्हरेजचा सुवर्णमध्य म्हणून वापरली जाईल आणि २६ गिगाहर्ट्झ अधिकाधिक वेग प्रदान करण्यासाठी वापरली जाईल. अर्थात, लेखात वर उल्लेख केला ती स्पीड ‘बी-टू-सी’ युजरसाठी आहे, इंडस्ट्रीला १ मिलीसेकंडपर्यंत कमी विलंब आणि ६ जीबीपीएसपर्यंत डाउनलोड स्पीड या तंत्रज्ञानाने उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी वरील स्पेक्ट्रमच्या कॉम्बिनेशन्सचा आधार घेतला जातो.    

इंडस्ट्रीच्या तांत्रिक बाबींमध्ये न फसता केवळ उपभोक्त्याचा विचार केल्यास, सामान्यतः काही प्रश्न पडतात. त्याची उत्तरे पाहू - मोबाईल बदलावा लागेल का? ‘हो’ अर्थात 5G सपोर्ट करणारा मोबाईल घ्यावा लागेल, आणि आता असे मोबाईल्स अगदी १५ हजारांपासून सुरू असल्यामुळे नवीन मोबाईल घेताना तो 5Gला सपोर्ट करणारा आहे, याची खात्री करूनच घ्यावा, हे उत्तम. आधीच 5G सपोर्ट करणारा मोबाईल असल्यास, त्यातील ‘सिम’ बदलावे लागेल का? हा दुसरा सामान्य प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे, बहुतांश कंपन्या आहे, त्याच ‘सिम’ला OTT सॉफ्टवेअर वापरून अपग्रेड करतील, ग्राहकांना त्याचा त्रास होणार नाही.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ही सेवा 4G तुलनेत खूप महाग असणार आहे का? हा तिसरा प्रश्न. याचे उत्तर देखील नक्कीच ‘नाही’ असे आहे. भारतातील टेलिकॉम सेवा कंपन्या जगाच्या तुलनेत सर्वांत स्वस्त सेवा पुरवतात. 5G ही सेवादेखील खूप महाग असणार नाही, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळेच तर या तंत्रज्ञानाचे सर्व क्षेत्रांतून अभूतपूर्व स्वागत होत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

...............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा