जगभरात ‘Quiet quitting’चा ट्रेंड वाढू लागला आहे. २०२१च्या ‘Great Resignation’नंतर आता भारतातदेखील ‘Quiet quitting’ सुरू झालं आहे!
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 30 August 2022
  • पडघम तंत्रनामा करोना Corona क्वाईट क्विटिंग Quiet quitting Great Resignation वर्क-लाईफ Work Life बर्न आऊट Burn out जनरेशन झेड Generation Z

“I would rather be a little nobody, then to be a evil somebody.” -Abraham Lincoln

‘इतने पैसे में इतनाच मिलेगा!’ हे मजेदार वाक्य ‘Quiet quitting’ या नव्या ट्रेंडचंचं चपखल वर्णन करतं.

२०२२मध्ये न्यूयॉर्कस्थित झाईद खान या इंजिनिअरने त्याच्या टिकटॉक अकाउंटवर पहिल्यांदा ‘Quiet quitting’ हा शब्द वापरला. त्या वेळेस मानव संसाधन व व्यवस्थापन क्षेत्रांतील दिग्गजांना धक्का बसला, कारण १९८९च्या नंतर जन्माला आलेल्या, तसंच करोनाच्या मागे-पुढे स्वतःचं करिअर सुरू केलेल्या विशी-पंचविशीतल्या पिढीने कामाच्या ठिकाणी अचानक वेगळीच वर्तणूक दाखवायला सुरुवात केली होती.

‘Quiet quitting’मध्ये जेव्हा सरळपणे राजीनामा देता येत नाही, त्या वेळेस कमीत कमी काम करत नोकरीत राहणं, हा प्रकार घडतो. यामध्ये प्रामुख्यानं -

१) कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सला नकार देणं.

२) आठ तासांच्या वर काम न करणं.

३) कामाची वेळ संपल्यावर ऑफिसच्या कॉल्स व ई-मेलला उत्तर न देणं.

४) कमीत कमी काम करणं.

५) Going above and beyond म्हणजे गरजेपेक्षा अधिक काम न करणं.

६) कामाच्या ठिकाणी क्षमता विकसित करणारं प्रशिक्षण घेण्यास नकार देणं.

७) आधीच्या पिढीसारख्या महत्त्वाकांक्षा न ठेवणं.

या गोष्टी केल्या जातात.

जगभरात ‘Quiet quitting’चा ट्रेंड वाढू लागला आहे. २०२१च्या ‘Great Resignation’नंतर आता भारतातदेखील ‘Quiet quitting’ सुरू झालं आहे. 

सध्या चाळिशीच्या पार आणि साठीच्या खाली असणार्‍या भारतीय पिढीने रात्रंदिवस मेहनत करून सुबत्ता मिळवली. अगदीच न-शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या पालकांची मुलं परदेशी कंपन्यांत सीईओच्या पदापर्यंत गेली. आपल्या आई-वडिलांच्या कितीतरी पावलं पुढे जाऊन या पिढीनं संपत्ती जमवली. यांची २०-२२ वयोगटातील मुलं आता कामाच्या ठिकाणी रुजू होत आहेत. त्यांच्याकडे स्वत:चं घर, दुचाकी व चारचाकी आहे. ही नवी पिढी - ‘जनरेशन झेड’ - लहानपणापासून बऱ्यापैकी सुखवस्तूपणा उपभोगत आली आहे. तंत्रज्ञानावर आधारित आयुष्य जगतेय. मागच्या पिढीच्या तुलनेत हिचं आयुष्य सोपं असलं तरी त्याचे दुष्परिणामदेखील आहेत. उदा., संयम अत्यंत कमी असणं, नात्यांपेक्षा मशीनच्या जास्त जवळ असणं, ताण सहन करण्याची शक्ती कमी असणं, मानसिक व शारीरिक आरोग्याचे प्रश्न आणि प्रत्येक गोष्टीत एकापेक्षा जास्त पर्याय असणं, अशी मोठी यादीच करता येईल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत जगभरातल्या अनेक देशांत उदयाला आलेली हुकूमशाहीसदृश्य लोकशाही आणि कमकुवत राजकीय नेतृत्व, यामुळेही या पिढीच्या नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना संदिग्ध\अस्पष्ट आहेत. सोशल मीडिया (‘फेसबुक’\२००४, ‘इन्स्टाग्राम’\२०१०, ‘टिकटॉक’\२०१६) व स्मार्टफोन पौगंडावस्थेपासूनच वापरत आलेली, किंबहुना त्यावरच पोसलेली ही पिढी ‘Quiet quitting’मध्ये आघाडीवर आहे. करोनाच्या थोडं आधी किंवा करोना काळात काम सुरू करणारी ही पिढी सामान्य म्हणता येईल, असं स्वत:चं करिअर सुरू करू शकली नाही. त्यांना करिअरच्या सुरुवातीलच ‘वर्क-लाईफ’चा विचार न करता काम करावं लागलं. हे त्यांच्यासाठी कठीण होतं. त्यामुळे काहींना अगदी सुरुवातीला; ‘बर्न आऊट’चा अनुभव आला.

‘बर्न आऊट’ म्हणजे अति प्रमाणात स्वतःच्या शरीरातील ऊर्जेचा (मानसिक व शारीरिक) वापर केल्यामुळे तुमची काम करण्याची इच्छा कमी होऊन काम सोडून देणं किंवा कामात गुणवत्ता न राखता रोजचा दिवस ढकलत राहणं. हेही ‘Quiet quitting’चं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी त्यांचं मानसिक स्वास्थ चांगलं राहावं, ‘वर्क-लाईफ’ समतोल राहावं म्हणून ‘कामाशी काम’ ठेवायला सुरुवात केली आहे. करोनामध्ये सर्वच वयोगटातल्यांनी ‘बर्न आऊट’ अवस्था अनुभवली.

गेल्या २० वर्षांतल्या औद्योगिकीकरणाने नवीन तरुण उद्योगपती जगाला दिले आहेत. ते मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगविश्वावर राज्य करताना दिसतात. या तरुण मंडळींनी अगदी कमी वयात अब्जावधीचा आकडा गाठला आहे. यात प्रामुख्यानं मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोस, जॅक डोर्सी, एलोन मस्क, लॅरी पेज अशी मंडळी दिसतात. यांच्या आधीच्या पिढीच्या बिल गेट्स, जॅक मा यांसारखी मंडळींनी ६०च्या अगोदर जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं. या सर्वांमध्ये एक साम्य दिसतं, ते म्हणजे अनियंत्रित महत्त्वाकांक्षा.

एकाधिकारशहा काही फक्त राजकारणातच नसतात, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानानंही आपल्याला भरपूर एकाधिकारशहा दिले आहेत. त्यांची विचित्र स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्यासारखे सामान्य लोक उर फुटेस्तोवर धावतात. पूर्वीचे उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणात राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारे नव्हते. कर्मचारी संघटना सक्रिय होत्या. कर्मचारी एकमेकांबद्दल आत्मीयता बाळगून होते. याउलट परिस्थिती गेल्या दोन दशकांत, विशेष करून गेल्या दशकात दिसते. त्यामुळे कर्मचारी व कामगार पिळून निघाले आहेत. त्यात करोनाकहराने भर घातली. त्याचा जगभरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. परिणामी सगळं नियंत्रण कंपनी मालकांच्या हाती आलं. ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये अति कामामुळे लोकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत. घरातील व इतर नातेसंबंधावर परिणाम होत आहेत. स्वप्नं कोणाची आणि त्यासाठी आपल्या घरादारावर वरवंटा कोण चालवतंय?

‘Quiet quitting’ या सर्वांचा एकत्रित परिपाक आहे. यात १९८९नंतरची ‘मिलेनिअल’ आणि १९९७नंतर जन्माला आलेली ‘जनरेशन झेड’ पिढी आघाडीवर आहे. त्याचबरोबर १९८० ते ९७च्या दरम्यान जन्मलेली पिढीदेखील ‘बर्न आऊट’चा अनुभव आल्यानं ‘Quiet quitting’मध्ये सहभागी आहे.

हा ट्रेंड वाईट आहे? अजिबात नाही. उलट एका मर्यादेपर्यंत चांगलाच म्हणावा लागेल. कारण त्यामुळे इतकी वर्षं मालकांचं वर्चस्व असलेलं ‘जॉब मार्केट’ आता कामगार व कर्मचार्‍यांची भाषा समजू लागलं आहे. ‘कॉग्नीझंट’सारख्या बड्या कंपनीतून जवळपास सव्वा लाख लोक बाहेर पडले आहेत. या कंपनीत साडेतीन लाखांच्या आसपास लोक काम करतात. एक तृतीयांश लोक सोडून गेल्यामुळे कंपनीच्या सीईओला जाब विचारण्यात आला. हे पहा -

https://trak.in/tags/business/2022/08/20/36-percent-attrition-cognizant-record/

२०२१मध्ये एका चिनी नागरिकानं त्याचं सरकार नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ९ असं आठवड्याचे सहा दिवस काम करायला लावतं, त्यामुळे चिनी लोकांना कामाव्यतिरिक्त दुसरं आयुष्य राहिलेलं नाही, अशी जाहीर टीका केली. तोच प्रकार दक्षिण कोरियामध्ये आहे. जगातील पहिल्या १० विकसित देशांत गणना होणाऱ्या दक्षिण कोरियात लोक कामाशी संबंधित ताणामुळे झोपू शकत नाहीत. तिथं नैराश्य, दारू आणि झोपेच्या गोळ्या खाणं, यांचं प्रमाण प्रचंड आहे. करोना काळात बहुतेक देशांच्या सरकारांनी व उद्योगांनी कामगारांना मनमर्जीनं वागवलं, त्याचे हे परिणाम आहेत.

रोबेर्ट ओवेन (Robert Owen) या कामगार हक्कांसाठी काम करणाऱ्या माणसानं आठ तास काम, आठ तास आराम/मनोरंजन आणि आठ तास झोप, ही संकल्पना १८१७मध्ये युरोपमध्ये मांडली होती. ती अमेरिकेत १९व्या शतकाच्या सुरुवातीला लोकप्रिय झाली. गेल्या दोन दशकांत मात्र या संकल्पनेला पूर्णपणे धक्का बसला आहे. वैयक्तिक यश हे सामाजिक सलोख्यापेक्षा जास्त महत्त्वाचं झालं. किंबहुना गेल्या काही वर्षांत सेल्फ हेल्प, वैयक्तिक यशासाठी प्रेरणा देणारी पुस्तकं इतकी आली की, त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालं.

यश आलं की, त्याची भावंडं असूया, द्वेष, ईर्ष्या सोबत येतात. खूप काम करा, खूप खर्च करा, पण निसर्गाचा विचार अजिबात करू नका, अशा विचारानं झपाटलेले स्त्री-पुरुष माध्यमामध्ये आपली प्रतिमा कशी उंचावत राहील, याचा सतत प्रयत्न करत होती. नेमक्या त्याच वेळेस करोना आला अनेक समीकरणं बदलली.

करोनामुळे लोकांना मानसिक आरोग्याची जाणीव, मनाच्या अस्तित्वाची जाणीव झाली. ‘यशस्वी एकटेपणा’ साजरा करणाऱ्या रथी-महारथींना मनाच्या अथांगतेची जाणीव झाली. नुकतीच भारताच्या माजी कर्णधार विराट कोहलीने आपण करिअरमध्ये कधीच शांत चित्त नव्हतो, अशी कबुली दिली आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत असतानासुद्धा मला एकटं वाटायचं, असं त्याने जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. सांघिक खेळात अति-आक्रमकता विशेष कामी येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना जे वाटायचं ते कोहलीला जाणवत आहे, ही चांगली गोष्ट आहे. गेल्या एक महिन्यात मी हातात बॅट घेतली नाही, असं सांगणारा कोहली खरा वाटतो.

सगळं कसं छान, लोकांना बघायला आवडेल, असं कधीच, कोणाचं आयुष्य नसतं. लोकांची स्वीकृती मिळवत आयुष्य जगणं, त्यासाठी मनावर दगड ठेवत धावणं, हे ‘बर्न आऊट’साठी कारणीभूत ठरतं, हे ‘Quiet quitting’ च्या निमितानं समोर आलं. हे पहा -

https://indianexpress.com/article/sports/cricket/virat-kohli-on-his-high-intensity-people-from-outside-and-even-within-the-team-thought-it-was-abnormal-but-not-for-me-8114672/

Gallup या कंपनीनं केलेल्या निरीक्षणानुसार अमेरिकेत १९८९ व नंतर जन्मलेल्या कर्मचाऱ्यांची कामाशी असलेली बांधीलकी ही आतापर्यंत सर्वांत कमी आढळून आली आहे. या वयोगटातील लोकांना कामात उद्देश/हेतू सापडत नाही. या वयोगटातल्यांना काम घराचे व कारचे हप्ते\ईएमआय देण्यासाठी नको असतं. त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मीडियामुळे नवीन पिढीला वाचून, बघून बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यामुळे त्यांना समजावून सांगतानासुद्धा कठीण जातं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गेल्या वर्षी Great Resignationचा बोलबाला होता, तर या वर्षी ‘Quiet quitting’ धुमाकूळ घालत आहे. कामगारांचं मानसिक आरोग्य हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेत येत असूनही उद्योगांच्या विचारपद्धतीत काही विशेष फरक होताना दिसत नाही.

अनेक मातब्बर मंडळींनी ‘Quiet quitting’ या ट्रेंडला विरोध दर्शवला असून नवीन पिढीनं त्यांचं काम गंभीरपणे घ्यावं, असा सल्ला दिला आहे. दोन्ही बाजू बरोबर आहेत. काम करायला हवं, शिकायला हवं, अनुभव घ्यायला हवा, पण करोनानंतर उद्योगधंदे ज्या अपेक्षा कर्मचार्‍यांकडून करत आहेत, त्या अवाजवी आहेत.

करोना मानसिक व शारीरिकदृष्ट्‍या थकवणारा होता. तो मानसिक आघात होता. त्याच्या तीव्रतेनुसार होणाऱ्या PTSD (Post-traumatic stress disorder) या मानसिक आजाराचा सामना अजून काही महिने आपल्या सगळ्यांनाच कमी-अधिक प्रमाणात करावा लागणार आहे. त्यातून बाहेर पडायला काही लोकांना गोळ्या व समुपदेशन लागेल. काहींसाठी वेळ हेच औषधाचं काम करेल, परंतु अशा मानसिक आघातातून लगेच बाहेर पडून १०० टक्के उत्पादकतेची अपेक्षा अमानवीय आहे. आणि कंपन्या नेमकी तीच अपेक्षा करत आहेत. करोनाच्या परिणामांमधून बाहेर पडायला अजून वर्ष तरी जाऊ द्यावं लागेल. या काळात शासन व उद्योगधंद्यांनी कामगारांच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम येणार्‍या काळात दिसतील.

सगळ्याच क्षेत्रात असलेली अ-वास्तवता, फुगत जाणारे आकडे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे त्या सोबत येणारा त्रासही वाढतच जाईल. आपण आपली मर्यादा ठरवत कुठे थांबायचं, हे जर नीट ठरवलं, तर आयुष्य सोपं होईल, नीट जाईल…

.................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा