भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे
पडघम - राज्यकारण
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 30 April 2022
  • पडघम राज्यकारण कामगार दिन Workers' Day १ मे 1 May

“A quiet secluded life in the country, with the possibility of being useful to people to whom it is easy to do good, and who are not accustomed to have it done to them; then work which one hopes may be of some use; then rest, nature, books, music, love for one's neighbor — such is my idea of happiness.”
― Leo Tolstoy

‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ हे पुस्तक मी गेल्या वर्षी मे महिन्यात लिहून पूर्ण केलं. त्यानंतरच्या काळातली जगभरातली व भारतातली कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्याची काय स्थिती आहे, हे बघणं गरजेचं आहे. या वर्षी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये मानसिक आरोग्यावर कंपन्यांनी लक्ष द्यावं, ही सूचना केली आहे. त्यानंतर ‘इंडियन कॉर्पोरेट’ने काय करायला पाहिजे, यावर बरेचसे लेख प्रकाशित झाले. हे सर्व लेख इंग्रजी भाषेत होते. त्यामुळे स्थानीय भाषेत लोकांना मानसशास्त्र कसं समजावून सांगावं हा प्रश्न उरतोच.

मानसशास्त्राविषयी भारतीयांच्या मनात अजूनही भीती आहे. परिणामी अजूनही ‘माझं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, मी माझ्यासाठी वेळ काढणार आहे’ असं म्हणणारे भारतीय लोक चटकन आढळत नाहीत. याउलट कामात बुडवून घेणारे असंख्य भारतीय सापडतात, जे स्वत:च्या मनाची व शरीराची स्पंदनं ओळखत नाहीत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एवढंच काय मला माहीत असलेल्या भाषांमध्ये सर्व प्रकारच्या भावनांना शब्दसुद्धा उपलब्ध नाहीत. ज्या भाषेत भावना मर्यादित आहे, ती भाषा बोलणाऱ्याची भावनिक-साक्षरताही मर्यादितच राहते. त्यामुळे बहुसंख्य भारतीय ‘मनाला काय वाटतं?’ याचं नीट भाषेत रूपांतर करू शकत नाहीत. इथूनच मनाच्या गोंधळाची सुरुवात होते. या साचलेल्या भावना शरीरावर परिणाम करतात. म्हणून भारत मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. याशिवाय भारतात उच्च रक्तदाब, हृदयविकार प्रचंड प्रमाणात आढळतात.

सप्टेंबर २०२१मध्ये ‘लिंकेडिंन’ (Linkedin)ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात ५५ टक्के कर्मचारी ताणाखाली काम करतात. या अहवालातील काही ठळक मुद्दे -

१) कामाच्या जागेत तीव्र बदल होऊनही ३१ जुलै ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत + ५५च्या संमिश्र स्कोअरसह भारताचा एकूण कर्मचारी लोकांचा आत्मविश्वास स्थिर राहिला.

२) परंतु गेल्या १८ महिन्यांपासून या बदलाच्या काळाशी जुळवून घेतल्याने देशातील कार्यरत व्यावसायिकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे.

पहा- https://www.indiatoday.in/education-today/latest-studies/story/world-mental-health-day-55-of-indian-employees-feel-stressed-says-linkedin-report-1863187-2021-10-10

‘Oracle & Workplace Intelligence’ यांनी जागतिक स्तरावर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या देशांतील लोक मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यात भारतीय आणि चिनी लोक सर्वांत वाईट अवस्था अनुभवत आहेत. जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत (८९ टक्के), चीन (८३ टक्के) आणि अमेरिका (८१ टक्के) या देशांत सर्वांत जास्त कामगार आहेत. करोना महामारीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अहवालात असेही आढळून आले की, चीनमधील ४३ टक्के आणि भारतातील ३२ टक्के कर्मचारी साथीच्या रोगाचा फटका बसल्यापासून जास्त कामामुळे ‘बर्न आऊट’ झाले आहेत.

जगभरातील बहुतांश कामगारांपेक्षा भारतीयांना जास्त ताण सहन करावा लागतो. ३६ टक्के भारतीय कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य खराब आहे (जागतिक स्तरावरील २८ टक्क्यांच्या तुलनेत). ३२ टक्के लोकांना नोकरीसाठी प्रेरणा मिळत नाही (जागतिक स्तरावरील २५ टक्क्यांच्या तुलनेत), आणि ३१ टक्के लोक त्यांच्या वैयक्तिक जीवनापासून तुटल्यासारखे वाटतात (जगभरातील २३ टक्क्यांच्या तुलनेत).

पहा- https://www.oracle.com/emea/news/announcement/c-suite-execs-experienced-mental-health-challenges-2021-02-03/

मानसिक आरोग्याचं एक मोठं सूचक उदाहरण हे आत्महत्याचं प्रमाण आहे. भारतात २०२०मध्ये रोज ४१८ आत्महत्या याप्रमाणे १,५२,५७० आत्महत्या झाल्या. त्यातील सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. त्यातही स्त्रियांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे, पण ते कोणत्याही रेकॉर्डवर उपलब्ध नाही. कारण विविध कारणांनी भारतात आत्महत्या व आत्महत्येचा प्रयत्न यांचा डेटा व्यवस्थित गोळा होत नाही.

पहा- https://www.ndtv.com/india-news/suicide-rate-up-in-2020-maharashtra-tops-the-list-with-near-20k-2592112

२०१६ ते २०२० दरम्यान भारतात लग्नाच्या समस्यांमुळे दररोज सरासरी २० लोकांनी आत्महत्या केल्या. या कालावधीत विवाह संबंधित समस्यांमुळे झालेल्या एकूण ३७,५९१ आत्महत्यांपैकी २६०० घटस्फोटामुळे झाल्या.

गेल्या दोन वर्षांत करोनामुळे नोकरी व व्यवसाय यावर प्रचंड परिणाम झाले. त्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला, जो आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला. २०११च्या आसपास माझ्या पीएच.डी.च्या वेळेस आयटीमध्ये कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणे प्रचंड त्रासदायक होते, कारण त्या तेव्हा भारतीयांना याविषयी फारशी माहितीच नव्हती. आयटीमध्ये काम करायला मिळत आहे, पैसा आहे, परदेशी जायची संधी, अशा गोष्टींमुळे संगणकावर काम केल्याने जे मानसिक त्रास होतात, त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं. मात्र करोनानं भारतीयांना खूप चुकीच्या पद्धतीनं याविषयीची जाणीव करून दिली. अजूनही कामाच्या पद्धतीत, जागेत सुधारणा केल्या, तर मानसिक आरोग्य चांगलं राहील, यावर लोकांचं ठाम मत नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

भारतात काम चुकीच्या पद्धतीनं करायचं व नंतर गोळ्या किंवा समुपदेशन करून मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करायचा, हीच पद्धत अजूनही लोकप्रिय आहे. आपल्याकडे औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ फार कमी आहेत. त्यामुळे कामाच्या जागा आनंदी बनवण्याकडे कल दिसून येत नाही.

भारतात कामगार व कर्मचारी यांविषयी असणारे कायदे फार त्रोटक आहेत. आयटी उद्योगाला मान्यता नसल्यानं त्यातील कर्मचाऱ्यांचे आणखी हाल आहेत. कर्मचारी व कामगार यांच्या शारीरिक सुरक्षेसाठी अपुरे कायदे व सुविधा असताना मानसिक सुरक्षेसाठी कायदे करणे, अपेक्षित नाही. व्यावसायिक आरोग्य, त्यामुळे उद्योगावर होणारे परिणाम, हा प्रकार भारतीय उद्योगांना अजूनही फारसा समजलेला नाही.

व्यावसायिक यश राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेच, पण त्यामुळे नागरिक आनंदी राहतील असे नाही. दक्षिण कोरियासारख्या पहिल्या दहा प्रगत राष्ट्रांत समावेश असलेल्या देशात लोक झोपेच्या समस्यांचा विचित्र पद्धतीनं सामना करत आहेत. तिथं झोपेशी संबंधित उद्योग हा २.५ बिलियनच्या आसपास आहे. ‘गँगम स्टाईल’ या अति-प्रचंड लोकप्रिय गाण्यातील गँगम या शहरात लोक झोपेच्या समस्यांनी इतके त्रस्त आहेत की, काहींना २० गोळ्या घेऊनही झोप येत नाही. दक्षिण कोरियाने काहीही विशेष नसताना केवळ मनुष्यबळावर एवढी प्रगती केली, मात्र त्याचा अति-वापर हा या निद्रानाशाचं कारण आहे. त्यामुळे हा प्रगत देश सर्वांत जास्त आत्महत्या असलेला, डिप्रेशनचे सगळ्यात जास्त रुग्ण असणारा, दारूचा व झोपेच्या गोळ्यांचा अति वापर करणारा आहे.

भारताची औद्योगिक प्रगती बघता, ही परिस्थिती आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. कारण अगोदरच आपण गडबडलो आहोत. निद्रानाशाच्या बाबतीत भारतीय जपानशी स्पर्धा करतात. आपल्याकडील एकंदरीत आरोग्यव्यवस्था बघता, अशी वेळ आल्यावर भारतीय कितपत सामना करू शकतील याची शंकाच आहे. भारतात कामगारांच्या व कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर एकंदरीत दृष्टीकोन चुकीचा आहे. त्याला काही प्रमाणात भारतातील जात व धर्मव्यवस्थासुद्धा कारणीभूत आहे.

एसटी कामगारांचा संप असो किंवा इतर कोणताही संप, तो अत्यंत मुत्सद्देगिरीनं व शांत डोक्यानं हाताळण्याची गरज असते. पण हे भारतात बघायला मिळात नाही. कामाच्या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न मुख्य असतो, तिथं तडकभडक भावना कामाला येत नाही. दया, सहसंवेदना व संवादकुशलता आवश्यक असते. मात्र भारतातील कामगार संघटना व कामगार हक्कासाठी काम करणारी मंडळी अजूनही ‘conflict resolution’चे जुनाट मार्ग वापरतात. त्यासाठी सततचा संवाद, भावनिक आव्हान न करता विवेकाने काम करणे व वाटाघाटीमधील पारदर्शकता आवश्यक असते. त्यासाठी भावनिक-साक्षर असणारी व्यक्ती तिथं असणं गरजेचं असतं, मात्र याच्या अगदी विरुद्ध स्थिती सध्या भारतात बघायला मिळते. त्यामुळे प्रशासकीय सेवेतील व्यक्तींना भावनिक साक्षरतेचं प्रशिक्षण गरजेचं आहे. जेणेकरून त्यांच्यासमोर येणार्‍या सर्व प्रकारच्या मानवी वर्तणुकीच्या समस्या ते योग्य प्रकारे सोडवू शकतील, पण असं होत नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘करो या मरो’च्या निश्चयामं बहुतेकांची डोकी तापलेली असतात. त्यातून हमखास अविचारी निर्णय घेतले जातात. याला शास्त्रीय भाषेत ‘amygdala hijacks’ म्हणतात. डॅनियल गोलेमन या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, कर्मचार्‍याला आदर न मिळणं, त्यांचं म्हणणं ऐकून न घेणं, अशा गोष्टींमुळे नकारात्मक भावना वाढीस लागून एक दिवस अचानक आत्मघातकी निर्णय घेतले जातात किंवा कंपनीविरुद्ध असंतोष वाढीस लागून कंपनीचं नुकसान केलं जाते. अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणारे लोकसुद्धा असतात, ते यात स्वत:चा फायदा करून घेतात.

या परिस्थितीत बदल होत नाहीत का? भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे. भारतात मानसशास्त्राचा सर्वांत योग्य उपयोग ‘ग्राहक मानसशास्त्रा’त केला जातो. त्यामुळे नको असलेले कोणतेही उत्पादन/सेवा आपण विकत घेत घेतो आणि आपला डेटा आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुरवतो. परिणामी त्यांच्याकडे आपल्या मेंदूचा कंट्रोल सुपूर्द करतो.

भारतातील मानसशास्त्र ज्या पद्धतीनं काम करतं, त्यामुळेसुद्धा भारतीयांची मानसिक आरोग्याबद्दलची भीती गेलेली नाही. अजूनही भारतात या विषयाला ‘विज्ञान’ म्हणून मान्यता नाही. जी पदव्युत्तर पदवी आहे, ती मानव्यशास्त्रात आहे. मी स्वतः गणितातील पदवीधर असूनही मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना या विषयाचं काठिण्य लक्षात आलं होतं. कलाशाखेतील विद्यार्थ्यांना गणितात गती कमी असल्यानं त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे उपयोगी डेटा आपल्याकडे एका ठिकाणी उपलब्ध नाही. ‘American Psychological Association’सारखी एखादी संस्था भारतात नाही. सगळ्या गोष्टी विखुरलेल्या आहेत. त्यामुळे एकसंध परिणाम दिसून येत नाही. 

उद्या, १ मे रोजी कामगार दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी या विषयावर बोलायची व नेटानं बदल घडवून आणायची गरज आहे. हे भारताच्या येणार्‍या पिढीच्या दृष्टीनं व भारताच्या भविष्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे.

.................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा